नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday 30 September 2010

बेस्ट सेलर

विविध विषयांतील शोध जगाला या शतकात लागतात आणि बऱ्याचदा ते आपल्या प्राचीन संत वाङमयात आढळून येतात. लोकसत्तात श्री. श्रीकांत नारायण रोज एक गोष्ट सांगतात. परवा त्यांनी संत एकनाथांची गोष्ट सांगितली.
ती अशी....
गावात एक खलप्रवृत्तीचा माणूस रहात होता. एकनाथ महाराजांना तो एक दिवस म्हणाला," तुमचे जीवन किती पवित्र व शुध्द. तुमचे कोणाशी भांडण नाही. तुम्हांला सर्वजण मान देतात. त्या उलट आमचे जीवन पहा. रोज कटकटी आणि रोज भांडणे!"
एकनाथ महाराज त्याला म्हणाले,"माझे राहू दे. परंतु मला तुझ्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट कळली आहे. ती म्हणजे आजपासून बरोब्बर सात दिवसांनी तू मरणार आहेस!" प्रत्यक्ष एकनाथ महाराजांनीच सांगितल्याकारणाने त्याचा त्यावर लगेच विश्वास बसला. तो धावतच घरी गेला व ही वाईट बातमी त्याने घरी सांगितली. त्यासरशी घरात रडारड सुरु झाली. त्या माणसाला काही चैन पडेना. प्रत्येक क्षणी त्याला त्याचे मरण दिसू लागले. परंतु थोड्याच वेळात त्याच्या लक्षात आले, आपल्या मृत्युला अजून सात दिवस बाकी आहेत. त्याने घरातील लोकांची रडारड थांबवली. आणि त्या सात दिवसात त्याने जास्तीत जास्त चांगले वागण्याचा प्रयत्न केला.
सातव्या दिवशी आज आपण मरणार म्हणून पहाटेच शुचिर्भूत होऊन तो महाराजांच्या दर्शनाला गेला. त्यांच्या पायावर डोके ठेवून तो म्हणाला," मी आता चाललो. तुमचे शेवटचे दर्शन घ्यावयास आलो आहे."
त्यावर एकनाथ महाराज म्हणाले," गेल्या सात दिवसात तू किती पापे केलीस?"
त्यासरशी तो म्हणाला," पापाचा विचार देखील माझ्या मनाला शिवला नाही. सारखे देवाचे स्मरण करत होतो. जास्तीत जास्त चांगले वागायचा मी प्रयत्न केला."
एकनाथ महाराज म्हणाले," मरणाची तुला सतत आठवण होत होती म्हणून तू असे वागलास. मरणाची कायम आठवण ठेवणे हाच पापापासून दूर जाण्याचा उत्तम मार्ग नव्हे काय?"

'Veronica decides to die ' हे पुस्तक लिहिण्यापूर्वी आमच्या एकनाथ महाराजांची ही कथा Paulo Coelho च्या वाचनात आली होती काय? आणि महाराजांना जीवनाचे हे तत्वज्ञान सामान्य जनतेला समजावून सांगताना, सेक्सची काडीचीही गरज पडलेली दिसत नाही!

अर्थात संत एकनाथ महाराज काही बेस्ट सेलर लिहित नव्हते!
:)

11 comments:

Raindrop said...

एकनाथ महाराज की जय हो :) खरा आहे
पाउलो अजून तुझ्या डोक्यात कीड़े करत आहे अणि एकनाथ महाराज तय किड्यांना एक एक करूँ चलेँ करत आहेत. Simple things told through simple stories are so much more impactful than an epic like 'Veronica decides to die'.

सौरभ said...

:D दुर्दैवाने हे साहित्य योग्य पद्धतीने पोहचवलं जात नाही. जनतेने आंधळेपणाने ते आचरलं. ज्याचा बिलकुल विरुद्ध परिणाम झाला. आणि साहित्य म्हणजे बुरसट विचारांचा संग्रह असा काही समज पसरलाय.
असो. मला वाटत ह्या सगळ्या संतांचं लिखाणपण ग्लॅमराईझ केलं पाहिजे.

Anagha said...

सौरभ, बऱ्याचदा असं जाणवतं कि आपल्या संत वाङमयाला मानसशास्त्राची जोड आहे. आणि ते शास्त्र अतिशय सुरेख आणि सहजरीत्या कथेत किंवा अभंगात गुंतलेलं आढळतं.

Anagha said...

वंदू, खरंच आहे तुझं म्हणणं...फक्त आपण नावाला भाळतो आणि मग पाश्चात्य लिखाणात आपली मुळे सापडली कि चकित होतो. :)

Shriraj said...

अनघा, तुझ्या या पोस्टमुळे मला माझ्या एका प्रश्नाचे उत्तर मिळाले...ते म्हणजे पापा पासून दूर जाण्याचा रस्ता.

Anagha said...

श्रीराज, संतवाङमय वाचणे सुरु करणार वाटतं साहेब तुम्ही?

THEPROPHET said...

सौरभशी १०० टक्के सहमत!
>>दुर्दैवाने हे साहित्य योग्य पद्धतीने पोहचवलं जात नाही.

Anagha said...

विद्याधर, म्हणजे कोणीतरी तितक्याच सुंदरतेने, आपले संत वाङमय इंग्रजीत भाषांतरित करायला हवे! कठीणच आहे म्हणजे! :)

THEPROPHET said...

नाही नाही....
आपल्याच लोकांपर्यंत पोचवायला इंग्रजी भाषांतर कशाला?
परदेशी लोकांसाठी ठीके!
पण आपल्या लोकांपर्यंत पोचवायला
१. आपल्या मुलांना मराठी वाचनाची गोडी हवी
२. सेलिब्रेटींनी आम्ही हे वाचतो म्हणून चौकात सांगायला हवं

हे बेसिक्स करायला हवेत...पुढचं प्रकाशन कंपन्यांच्या कुवतीवर आहे!

Anagha said...

नवीन पिढीपर्यंत पोचायला, त्यांना त्यातील सौंदर्य समजून द्यायला...आणि ते सुद्धा ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत....माहित नाही. कोणी मग तेव्हढंच त्यांना नीट समजावून सांगणारं हवं. खूप कठीण आहे. मलाही आवडेल उलट असं कोणी असेल ज्ञानेश्वरी समजावून सांगणारं; तर आठवड्यातून एक दिवस जाऊन बसायला. कोणी असं सामान्य जनतेला समजणाऱ्या भाषेत लिहू शकत असेल तर ते छापून आणणे आणि सेलिब्रिटीसना ते endorse करायला लावणे हे तरी देखील खूप सोपं काम आहे.

Unknown said...

WA CHAN CHARCHYA.....for detail information of SANT EKNATH pls see - http://santeknath.org/home.html