नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday 30 November 2010

फलित

बाहेरगावी पाच दिवस चालू असलेल्या शूटवरून नेमके ६ डिसेंबरला मुंबईत प्रवेश करणार होतो. हे अकस्मात लक्षात आलं. आणि धाबं दणाणलं. या दिवशी शिवाजी पार्क परिसराच्या आसपास असणारा माणसांचा लोंढा आपण कुठल्या वेगळ्याच विश्वात अवतरलो आहोत असा भास आणतो.

टॅक्सीत आम्ही चौघे होतो. फोटोग्राफर साकेत, त्याचे दोन सहकारी- आशिष, शेखर आणि मी. पुढील चार महिने चालणाऱ्या एका कामाचा हा पहिलाच टप्पा होता. आम्ही जळगावपर्यंत विमानाने जाऊन त्यानंतर सहा तासाच्या अंतरावर असलेल्या एका गावी गेलो होतो. काम चांगले पार पडले होते. एकमेकांना सोडत, मुंबई विमानतळावरून आपापल्या घरी निघालो होतो.

दर वर्षी ६ डिसेंबरला आमच्या घराच्या आसपासचे बरेच रस्ते एकमार्गी केले जातात. म्हणजेच मला दूर नाक्यावर टॅक्सी थांबवून जड बॅग खेचत घरी जाणे भाग होते. त्या कारणास्तव माझी कटकट सुरु झाली. साकेतने एकदोन वाक्ये ऐकून घेतली. आणि तिसऱ्या वाक्याला कोणाला दिसू नये इतपत काळजी घेत डोळे वटारले. मला कारण काही फारसे कळले नाही. परंतु आपण विशेष काही करमणुकीचे बोलत नाही आहोत इतपत कळले. तोंड गप्प केले आणि पाच दिवस न बघितलेली मुंबई पुन्हा नजरेत भरून घ्यावयास सुरुवात केली. आशिष व शेखर आधी उतरले. मी आणि साकेत बाकी राहिलो. वाहन पुढचा रस्ता कापू लागले.
"तू उगाच काही बोलशील आणि आशिष दुखावला जाईल असे मला वाटले म्हणून तुला खुणावले." अधिक काही साकेत नाही बोलला तरी त्याची भीती माझ्यापर्यंत पोचली. तोपर्यंत माहीम चर्च मागे गेले होते. शिवाजी पार्कचा बदललेला परिसर दिसू लागला होता. गजबज. पांढऱ्याशुभ्र रांगा. निळ्या ओढण्या. "मी फक्त बंद केलेल्या रस्त्यांबद्द्ल तक्रार करत होते." विषय संपला. माझा सिग्नल आला. मी आणि बॅग एकमेकींना सावरीत घरला निघालो.

पुढील चार महिन्यात आम्ही चार वेळा पाच दिवसांसाठी एकत्र फिरलो. आंध्र प्रदेश, गुजरात आणि दोन वेळा महाराष्ट्र. आंध्र गलिच्छ, महाराष्ट्र जेमतेम आणि गुजरात बहरलेलं. एकूण वीस दिवस एकत्र राहिलो. मिळेल ते एकत्र खाल्लंप्यायलं. पहाटे पाच वाजता उठून, थंडीत रस्त्याला लागून, झुंजूमुंजू कॅमेरॅत पकडलं. कापूस फुललेला. पांढरा बर्फ जसा रोपारोपावर विसावलेला. कापसाची बोंड पहाटे दवबिंदूंनी चिंब होतात आणि सुर्यकिरणांनी त्यांची ओलेती अंगे पुसून दिल्याशिवाय ती अजिबात जागी होत नाहीत हे ज्ञान तिसऱ्या खेपेला झालं. ह्याचा स्पष्ट अर्थ असाच होता की आमचं मॉडेलच मुळी आळशी होतं आणि दहा वाजल्याशिवाय मेकअपरुममधून बाहेर येत नव्हतं! असे एकेक अनुभव घेत आमचे चार महिने गेले. क्लायंटसाठी कापूस आणि प्रगतशील शेतकरी ह्यांची चांगली तगडी इमेजबँक तयार झाली. त्यामुळे सगळेच आनंदात. आजचा शेवटचा दिवस होता. माणसं उमजून घ्यायला वीस दिवस तसे पुरेसे होते. परत एकदा आम्ही चौघे टॅक्सीत होतो. गुंटूरवरून हैद्राबाद विमानतळावर निघालो होतो.
"संपलं की साकेत आपलं शूट!"
"हो यार! मजा आली. नाही का?"
"I hope सगळ्यांनाच आली! काय रे आशिष?"

आशिष मितभाषी. काळा सडसडीत. उंच. वय वर्ष असावं २१/२२. फोटोग्राफरला धरून असलेल्या पाचांच्या टीममधील सर्वोत्तम माणूस. अतिशय सुंदर संस्कार असलेला हसरा आशिष. वीस दिवसात तक्रार काडीची नाही. आउटडोअर शूटमधील आपल्या कामात चोख. आत्मविश्वास अपार. उन्हातान्हात हसतमुख. कापसाच्या शेतात साग्रसंगीत शिरताना रोपांना अलगद जपणारा. पाचांच्या टीम मध्ये समद्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर बाईमानूस म्याच! मग रिकाम्या वेळात सगळे गावात उंडारायला गेले की हा आपला माझ्या रक्षणार्थ उभा. टेबलावर समोर जेवायला बसला तर हा इतका नीट जेवणार की मला समोर तोच बसावा पण आमचे इतर वेडेबागळे मित्र बसू नयेत असं वाटावं.

"आशिष, घरी कोणकोण असतं?
"आई बाबा आणि धाकटी बहिण."
खोलात शिरायचं मला काहीच कारण नव्हतं.
"तुझ्या आईबाबांना एक सांगशील आशिष?"
"काय?"
"त्यांना म्हणावं, त्यांनी त्यांच्या मुलाला उत्तम वाढवलं. खूप चांगले संस्कार दिले."
"सांगेन मॅडम! आई एकदम खुषच होऊन जाईल." आशिष हलकंच हसला.

झाली या गोष्टीला दोन वर्ष. कधी साकेत भेटला की म्हणतो,"अरे, शेखर, आशिष सगळे तुझी नेहेमी चौकशी करत असतात!"
"त्यांना सांग, मला देखील त्यांची आठवण नेहेमी येते. विशेष करून आशिषची." मी हसते.

काही माणसं, मनात घर करून रहातात.
तसाच राहिला माझ्या मनात हा माझा देशबंधू.
इतिहासाने विनाकारण चिकटलेला जातीधर्माचा बिल्ला कधीच भिरकावून.


साकेतने टिपलेला ओलेता कापूस ! :)

Sunday 28 November 2010

जाणीव

सूर्य, समुद्र आणि आकाश. चालले होते त्यांचे रोजचे मूकनाट्य. सूर्य धीम्या गतीने समुद्राच्या दिशेने सरकत होता. जसा खेळ संपल्यावर रंगमंचावरचा पडदा खाली यावा. आणि पडदा असावा बदलत्या रंगांचा. लाटा किनाऱ्याकडे झेपावत होत्या.

प्रेक्षक सीमा. नजर खिळलेली सूर्यावर. नाही तरी कधी ह्याच्या नजरेला नजर भिडवता येते? सीमाची विचारशृंखला सुरु झाली. मऊ वाळूत पाय खुपसून.

जी काही आहे ती मी अशीच कशी घडले? मला कोणी असे घडवले? कोणी मला साथ दिली? निर्मळ मनाने, निस्वार्थी विचाराने? कोणी शिकवले हे आयुष्याचे कुटील धडे?
आभाळात वीज कडाडते, आभाळ फाटतं, एका पळात पुन्हा जुळून येतं. ती वीज काय बदलून जाते त्या आभाळाच्या आयुष्यात? किनाऱ्यावर सरसर लाट येते. परतीच्या रस्त्यावर वाळू खेचून नेते. काय बदलते ती लाट किनाऱ्याच्या आयुष्यात? ना आभाळ नाहीसं होत. ना किनारा आटत. त्या विजेचं आणि त्या नभाचं नातं तर घट्टच. तो किनारा आणि ती लाट मैत्रीचीच तर गाज ऐकवतात. पण ही तर जाणून घ्यायची गोष्ट. कोणी नकळत केलेल्या उपकाराची जाण.
माझ्यावर हे कोणाचं कर्ज? कोण हे माझे सोबती? माझे गुरु?
हो. माझे गुरू...माझी दुःख. माझी काळजी घेणारी दुःख. कणखर बनवून जाणारी ती ही दुःख. येतात. कधी सांगून. तर कधी वावटळीसारखी. साधा दरवाजा देखील वाजवता. कधी वस्तीलाच येतात. पूर्ण पाहुणचार करूनच जातात. तर कधी उभ्या उभ्याच निघून जातात. पण येतात मात्र नक्की.
आता आकळतं. कधी नाही टाकलं त्यांनी एकटं. एकांतात देखील संवाद साधला. कधी एकत्र घेरलं. असंख्य संखेने. कधी अंधारलेल्या रात्री, आपण किती एकटे असा एक क्षण अविचार करावा आणि तलम दुलईत बाजूला बघावं तर हसून हात थोपटतात ती हीच. दुःख. सांगा कोण हल्ली अशी साथ देतं? सुखाच्याही आधी ह्या दु:खांचे आभार. आज जे आहे ते त्यांनी घडवले.
आणि असं कधी कोण विसरतं आपल्या उपकारदात्याला? कोणी आपल्यासाठी एव्हढं करतं. आणि त्यांचाच तिरस्कार करावा? ते लाटांचे थैमान, ते सौदामिनीचे आघात...त्यांची तर मी ऋणी. तुम्हीं तर मला घडवले. खंबीर बनवले. कणखर केले. ताठ मानेने जगायला शिकवले.
आता मग तुम्हीं सांगा...माझ्या दु:खांनो, होऊ कशी मी उतराई?

पडदा पूर्ण पडला. दिवसाचा एक अंक संपला. काळोख घेरू लागला. सीमाचा फोन वाजू लागला. विचार तुटले. जसा एखादा धबधबा अकस्मात लुप्त व्हावा. तिने फोन कानाला लावला.
"हो. आले."
सीमा उठली. घराच्या दिशेने चालू लागली. हातात आजच मिळालेलं बढतीचं पत्र होतं. आणि घरी दारू पिऊन नवरा मोरीत पडला होता. नेहेमीचंच असलं तरी बारा वर्षांचा लेक घाबरला होता. बाबाला उचलायला त्याला आईचे हात हवे होते.

Friday 26 November 2010

बस्स... इतकंच...

मी तेंव्हा झोपले होते.
रात्री कधीतरी फोन वाजू लागला. माझ्या लेकीच्या मैत्रिणीचा फोन होता. "Where are you?" "At home!." "okay " थोड्या वेळाने दुसरा मग तिसरा आणि मग चवथा. मध्ये माझ्या लेकीचा. युके वरून. "तू कुठे आहेस?" "अगं, तुम्ही काय चालवलंय काय? सगळे तुझे मित्र मैत्रिणी मला असं का विचारतायत? रात्री एक वाजता कुठे असते मी?" झोप शेवटी उडालेली होती. "आई, उठ आणि टीव्ही लाव!" तिने फोन ठेवून दिला. मी टीव्ही लावला. ती रात्र २६ नोव्हेंबर २००८ ची होती.

मग पुढचे दिवस जसे इतर भारतीयांचे गेले तसेच माझे गेले.

मग?
मग काही नाही.
मी कधी तक्रार केली नाही.
मी कधी शिव्या घातल्या नाही.
मी लाच कधी दिली नाही.
मी सिग्नल कधी तोडला नाही.
मी डोळ्यादेखत अन्याय कधी होऊ दिला नाही.
मी फेरीवाल्यांकडून कधी खरेदी केली नाही.
मी निर्माल्य कधी समुद्रात टाकलं नाही.
मी रस्त्यात कधी थुंकले नाही.
मी रस्त्यात कधी कचरा केला नाही.
मी काळ्या बाजारात तिकीट कधी खरेदी केले नाही.
मी सणांच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण केले नाही.
मी धर्माच्या नावाखाली आपपर कधी केले नाही.
मी राष्ट्रध्वजाचा अपमान कधी केला नाही.

मी जबाबदारी नाकारली नाही.
मी जिद्द सोडली नाही.
मी हार मानलेली नाही.

मग?
मग काही नाही.
बस्स! 'मी' हे एव्हढंच केलं.














सावधान!

काल रात्री गादीवर पडल्यापडल्या काही ऐकू आलं. कोणी जोडपं प्रेमाने, अतिशय पोटतिडीकेने काही सांगण्याचा प्रयत्न करत होतं. मी त्यांचे विचार ऐकले. मनात आलं समाजाची एक जागरूक नागरिक ह्या नात्याने हे विचार जगभर पोचवण्याची माझी जबाबदारी आहे. आणि ती मी पार पाडायलाच हवी. (जबाबदाऱ्या टाळण्याचा माझा अजिबात स्वभाव नाही)

हे तरुण जोडपं सुरात, राष्ट्रीय भाषेत जगाला आपल्या अनुभव सांगायचा प्रयत्न करित आहे...विचार करण्यासारखेच त्यांचे अनुभव आहेत..आणि महत्वाचे म्हणजे ह्यावेळी स्त्री आणि पुरुष ह्यांचे एकमत झालेले दिसून येते...आपला असा चुकीचा समज आहे की स्त्री आणि पुरुष ह्यांचे अगदी उंदीर आणि मुंगुसासारखे नाते असते. (एकमेकांवर शिरजोर होण्याचे त्यांचे प्रयत्न तसे लपून नाही रहात...) त्या विचारधारेला इथे सपशेल तोडून टाकलेले दिसते. आणि नेहेमीच बघा, अतिशय गंभीर विचार संगीताच्या माध्यमातून पोचवले गेले की जनजागृती लवकर व मोठ्या प्रमाणात होण्याची संभावना असते. एखादा विचार सुचला की तो पसरवण्यासाठी कुठले माध्यम अधिक परिणामकारक ठरेल हा विचार अतिशय महत्वाचा असतो.
वाचा...विचार करा...

जोर का झटका हाये जोरों से लागा, हां लगा.
शादी बन गयी उमर कैद की सजा. हां सजा. (२)

ये ही उदासी, जान की प्यासी
शादी से अच्छा तुम ले लो फासी
लाखों दुखों की होती ये वजह, हां वजह
जोर का झटका हाये जोरों से लागा, हां लगा.
शादी बन गयी उमरकैद की सजा. हां सजा.

पुढील कडवे म्हणजे ह्यात आपले काय कर्तव्य आहे त्याची समज दिलेली आहे. म्हणजे ह्या जोडप्याचे विचार आपल्याला पटले तर त्या विचारांना हवेत सोडून न देता, नजीकच्या काळात जे आपले सगेसोयरे, मित्रमंडळी धोक्याची पाऊले उचलण्याची शक्यता आहे त्यांना सावध करण्याची त्यांनी आपल्याला विनंती केलेली दिसून येते.

जिसकी शादी पर जाना, उसको इतना समझाना
ना कर शादी, ये बरबादी, फिर ना पछताना.
हा मौका है पगले, शादी से बचले
समझा ले दिल को, ये शादी को मचले,
शादी के मंडप से तू खुद को भगा, हा भगा
जोर का झटका हाये जोरों से लगा, हां लगा.
शादी बन गयी उमरकैद की सजा. हां सजा. (२)

ह्या जोडप्यामध्ये अधून मधून वाद होताना आपल्याला दिसून येतात. परंतु तरी देखील सामाजिक जबाबदारी त्यांनी टाळलेली दिसत नाही.
पुढील विचार थोडे हिंसक वाटू शकतात. परंतु मग त्यातील भावना विचारात घेण्याची गरज आहे... त्या पसरवण्याची ओढ लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

सबसे पहले शादी थी, यारों हाँ में जिसने की
उसको धुंडो, पकडो पीटो, गलती उसने की
वो था सौदाइ, बनके कसाई
उसने तो सबकी लुटीयां डुबायी,
पानी मिले ना मारो ऐसी जगाह,
जोर का झटका हाये जोरों से लगा, हां लगा.
शादी बन गयी उमरकैद की सजा. हां सजा. (२)

कधीकधी हे कवी, गीतकार फार मनच बोलून जातात नाही?
आजूबाजूला बघा जरा. सहचारी/सहचर बसलेले असतील आणि उगाच दाद द्यायला जाल आणि गोत्यात याल! भांडणाला कारणीभूत व्ह्यायला मला विषेसं आवडत नाही!

मी खाली लिंक दिलेलीच आहे. तेव्हा तुम्ही हे गाणे ऐकालच पण सौरभच्या मदतीने मी बोल शोधून काढलेच होते म्हणून तुम्हांला अभ्यासासाठी आयते उपलब्ध करून दिलेले आहेत!
व्हिडिओ काही मला विशेष आवडला नाही. हे सल्लागार गीतकार आहेत इर्शाद कामिल आणि आपल्या ते कानावर पडून डोक्यात शिरावं ह्याची जबाबदारी उचलली आहे संगीतकार प्रीतम ह्यांनी. हे समाजकार्य केलेले आहे चित्रपट 'अॅक्शन रिप्ले' ने!


:p

Thursday 25 November 2010

रामाची वही

त्या वेळी दादर माहीम परिसरातील चवथी ते आठवीपर्यंतची मुले, शंभर पानांच्या वहीत 'श्री राम जय राम जय जय राम' हा मंत्र उतरवत होती. त्यांना शाळेने तशी सुचना दिली होती. महिन्याभरात वही पूर्ण करून आपापल्या वर्गशिक्षकाकडे ती सुपूर्त करायची होती.

बालमोहनमध्ये हस्ताक्षराला उचित महत्व दिले जात असे. सध्याची परिस्थिती माहित नाही परंतु त्यावेळी ते ज्ञ लिहिता येऊ लागल्यावर मुलांना एक छापील वही दिली जात असे. त्यात प्रत्येक अक्षर हे रांगोळीवजा छापलेले असे. ठिपक्याठिपक्यात. सर्व विद्यार्ध्यांनी त्यावर पेन्सिलीने घोटवून आपले हस्ताक्षर बालमोहनच्या पठडीत बसेल इतपत सुधारणे अपेक्षित असे. आणि तसे नाही झाले तर आपली वही शिक्षकांकडून वर्गाबाहेर भिरकावली जाऊ शकते असा मुळी दबदबाच प्रत्येक शिक्षकाने कमावलेला असे.

त्यामुळे काही लिहायला घेतले की ते आपोआप ह्या मुलांकडून कागदावर रेखीवच उतरत असे. शाळेतून घरी आल्यावर हातपाय धुवून, ही मुले आपापल्या वहीत हा मंत्र लिहायला सुरुवात करत होती. 'श्री राम जय राम जय जय राम'. त्यांचा खेळही त्या कालावधीत कमी झाला होता. खेळाचा त्यांनी काही काळ त्यागच केला होता असे तुम्ही म्हणू शकता. लहान मुले पेन्सिलीने आणि मोठी फाउंटनपेनाने. रोज निदान तीन पाने तरी संपवणे गरजेचे. "नंदू अरे, जेवायला चल." "आलोच आई, हे एव्हढं पान होऊ दे!" हा आणि अश्याच धर्तीचा संवाद घरोघरी होत होता. "सुमा, अगं, झोप आता! अकरा वाजले!" "हो आई, शेवटची ओळ!" हळूहळू वही भरली जाऊ लागली. वहीला ९६ पाने असतात कव्हर धरून ती १०० मोजली जातात हे कळून मुलांच्या सामान्यज्ञानात भर पडली. नेमाने केल्याने, डाव्या हाताजवळ पानांचा थर अधिक आणि उजव्या हाताजवळ कमी अशी परिस्थिती हळूहळू होऊ लागली. पानांवर कोपऱ्यात आकडे पडू लागले आणि त्यातून एक चांगलेच निघाले. अशी पानांची नित्य मोजदाद झाल्याने मुलांचे आकडे पाठ होऊन गेले. ते ९६.

कशाने बरे भारला होता हा परिसर? कसला हा मंत्र? कोणाला हव्या होत्या ह्या वह्या? काय भवितव्य होतं ह्या वह्यांचं?

महाराष्ट्रात त्या वर्षी दुष्काळ पडला होता. रानोमाळ रखरखीत झाले होते. तलाव आटले होते. नद्यांनी तळ गाठला होता. डोंगर उघडेबोघडे पडले होते. वठलेली शुष्क झाडे हात रिकाम्या आकाशाकडे पसरून आर्त ये रे ये रे पावसा गात होती.

मग सरकार काय करत होते? सरकाराकडे ह्या दुष्काळावर काय उपाय होता?

उपाय हिंदू धर्माने शोधला होता. रामाची आराधना करण्याची गरज होती. तोच आता महाराष्ट्राला वाचवू शकत होता. मग रामापर्यंत ही आळवणी कोण पोहोचवणार? स्वर्गापर्यंत हा निरोप कसा धाडणार? प्रश्नाला एकंच उत्तर. पुरातनकालापासून. यज्ञ. यज्ञ, हा एकमेव उपाय होता. समस्त जनतेला वाचवण्याचा. त्या जाज्वल होमहवनानेच राम जागा होणार होता. कैक किलो तूप, शेकडो लिटर दुध दुभते जेव्हां आगीत धो धो ओतले जाईल, त्यावेळी त्या धूरधुपाच्या वासानेच त्या झोपी गेलेल्या सातव्या विष्णूवताराला जाग येईल. असे घडल्याचे रामायण महाभारतात दाखलेच आहेत.

मग त्या यज्ञाशी बालमोहनच्या बालकांचा काय संबंध?

होता. त्या बालकांचे श्रमदानच तर महाराष्ट्राला वाचवणार होते. चिमुकल्या हातांनी लिहिलेला तो मंत्रच तर रामाला भूतलावर यायला भाग पाडणार होता. आणि तो मंत्र तिथपर्यंत पोचणार कसा? अर्थात सर्व वह्या होमात आहुती जाणार होत्या. "घाल चुलीत!" असे म्हणून देखील कधी ह्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या वह्या आगीच्या भक्ष्यस्थानी घातल्या नव्हत्या. पुढल्या वर्षी त्या रद्दीत दिल्या जात असत. पण आगीत? कधीही नाही. ते बाल श्रमदान जेव्हां आगीत जळेल, माफी असावी, जेव्हां त्याचे हवन होईल, त्याचवेळी आपोआप ते मंत्र त्या मुलांच्या तालबद्ध सुरात, रामाच्या कानी पोचणार होते. राम प्रसन्न मनाने जागा होणार होता. आणि महाराष्ट्राचे रक्षण होणार होते. त्या कार्याला महात्म्य असेच तर प्राप्त झाले होते. देशासाठी श्रमदान. थोर भावना.

जसजश्या पूर्ण होतील तसतश्या वह्या शिक्षकांकडे जमा होऊ लागल्या. शिक्षकांच्या खोलीतील आपल्या शिक्षकांच्या कपाटात, वह्या कुलुपबंद करण्याचे काम वर्गप्रमुखाचे होते. सर्वांनी सुवाच्य अक्षरात वेळेवर वह्या पूर्ण केल्या. शेवटच्या दिवशी प्रत्येक वर्गशिक्षकाचा मंच वह्यांच्या गठ्ठ्यांनी भरून गेला. प्रार्थना झाल्यावर सर्व वर्गप्रमुख उपवर्गप्रमुख दोन्ही हातांवर ते पेलणारे ओझे घेऊन शाळेच्या हॉलच्या दिशेने खेपा मारताना दिसू लागले. सुरुवातीचे काही तास मग त्याच कामात गेले. जिल्हा ओला करण्याची जबाबदारी मुलांवर टाकण्यात आली होती. ती त्यांनी पार पाडली होती.

वर्गातील फक्त एका विद्यार्थाने ह्या धर्मादाय कार्यास विरोध करण्याची ठाम भूमिका घेतली. "मी असा काहीही मंत्र वहीत लिहिणार नाही. आणि तुम्हांला मी लिहिलेली वही अशी आगीत टाकू देणार नाही." तोपर्यंत वेगवेगळी तडफदार वाक्य फक्त शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकांतून पाठ केलेली होती.

जवळजवळ ३००० वह्या आगीत भस्म झाल्या.

नेमेची येणारा पाऊस त्या वर्षी अंमळ उशिराने आला. मग थोड्याफार प्रमाणात नदयानाले भरले. अगदी हिरवा शालू नाही तरी हिरवी गोधडी डोंगरांनी पांघरली. मनुष्यहानी झाली. जनावरे मरण पावली. गरिबी अधिक सुस्तावली.

'श्री राम जय राम जय जय राम'

Wednesday 24 November 2010

काटा

काटा रुते कुणाला...
आक्रंदतात कोणी....

रुतणारा काटा...
आक्रंदणारे कोणी...

काटा...
वजनाचा हो!

एका शोधाबद्दल वाचनात आले! वजनाचा काटा आणि स्त्रिया ह्यांच्या नात्याबद्दल.
मित्रांनो, लगेच हसू नका!
बायका वजन करण्याआधी कोणत्या मनस्थितीत असतात वा काट्यावर उभे रहाण्याआधी त्या कोणती काळजी घेतात ह्याविषयी आता संशोधन झाले आहे. आणि निकाल बाहेर आलेले आहेत.

असे लक्षात आले आहे की काही स्त्रिया काट्यावर एकच पाय ठेऊन उभ्या रहातात. त्यांच्या मते त्यामुळे आकडा कमी दिसू शकतो. काहींच्या मते अंगावरचे कपडे विनाकारण त्यांचे वजन अधिक दाखवतात. काहींचे सांगणे आहे की जेवणापूर्वी वजन करणे ह्यातच भले आहे. दहातील चार स्त्रिया काट्यावर उभे रहाण्यापुर्वी एकदा पोट रिकामे करून येतात. त्यांचे सांगणे असे आहे की त्यामुळे तो काटा, तुमचे वजन थोडे कमीच दाखवतो. श्वास रोधून धरा आणि मगच चढा त्या क्रूर काट्यावर. अशाने त्याला तुमचे वजन कमी दाखवणे भागच पडते! काही ३ टक्के स्त्रियांनी मात्र त्यांचा काही वर्षांचा अभ्यास आपल्यासमोर उघड केलेला आहे. तो असा की जेव्हा काळ्या काळ्या आभाळात गोल गोल चंद्र झळाळत असतो त्यावेळी त्या काट्यावर ठामपणे जरी उभ्या राहिल्या तरी देखील त्यांचे वजन कमीच भरते.
९०% स्त्रियांना वजन कमी करण्याची तीव्र इच्छा असते व ८५% स्त्रियांचे मानसिक संतुलन वजन वाढल्याकारणाने बिघडते.
आता स्त्रियांचे असे मानसिक संतुलन बिघडण्यामागे हात कोणाचा? प्रबंध दर्शवतो की ही जबाबदारी आहे 'डाएट इंडस्ट्री' ची! ही लोकं रोज उठून स्त्रियांना त्यांच्या वजनाबद्दल काळजी करण्यास भरीस घालतात. स्वतःचे खाद्य पदार्थ किंवा व्यायामाची साधने ह्याविषयी ठीकठिकाणी जाहिराती करून! (म्हणजे आमच्याच पोटावर पाय! :))
आता ह्या सर्व संशोधानानंतर चिंताजनक एक बाब पुढे आली आहे ती म्हणजे जगभर ह्या वजनाच्या काट्यामुळे अनेक स्त्रिया आपले मानसिक संतुलन हरवून बसत आहेत! ८५% स्त्रियांचा दिवस काट्यावरचा तो आकडा बघितला की अतिशय खराब मनस्थितीत जात आहे! कारण अतिशय निरुपयोगी माहिती त्यांनी सकाळी सकाळीच आपल्या मेंदूत टाकली आहे!

हम्म्म्म! मला हे मात्र कळत नाही की ह्यात स्त्रीपुरुष हा भेदभाव का केला गेला आहे? ऑफिसमध्ये बायकांपेक्षा रडके पुरुषच तर जास्ती दिसून येत असतात! अगदी मस्त गुटगुटीत बाळ, येतं आपलं रडकं तोंड घेऊन हापिसात! रोज! आणि कारणे असतात बऱ्याचदा क्षुल्लक! स्त्रियांना त्या डोंबाऱ्याच्या खेळातल्या दोरीवरचा तोल प्रत्येक क्षणाला सांभाळायचा असतो...आणि किती कौशल्यपूर्णरित्या स्त्रिया तो सांभाळतात!

तर मैत्रिणींनो, माझ्या आता लक्षात आलंय! आणि तेच खरं आहे! शरीराचं जाऊ द्या गं! समाजात आपलं वजन वाढतंय ना? मग वाढू द्या ते! अगदी वाढता वाढता वाढे...भेदिले सूर्य मंडळा!

काढूया तो काटा!
रुतणारा....
आक्रंदवणारा!
:)

Tuesday 23 November 2010

ग्लोबल चढाओढ

वर्ष संपत आलंय...आणि आता जगभर भरात आलीय जुगलबंदीची तयारी! जुगलबंदी...कान्स, क्लिओ, वन शो ह्या आंतरराष्ट्रीय जाहिरातक्षेत्रातील अवॉर्डससाठी!

रोजच्या कामासाठी, क्रिएटिव्ह+सर्विसिंग असे ग्रुप पाडलेले असतात आणि त्या ग्रुपकडे दिलेले असतात वेगवेगळे ब्रॅन्ड. आपल्या ब्रॅन्डवर चांगले काम करण्याची जबाबदारी प्रत्येकाची. सिनियर असो वा जुनियर. अधिक बिझनेस मिळवण्याची जबाबदारी देखील प्रत्येकाची. त्यावर अवलंबून इन्क्रिमेंट आणि अर्थात त्यामागोमाग प्रमोशन! अगदी लक्ष्मी येते घरा!
प्रत्येकाला कान्स हवं असतं. क्लिओ तर घरी घेऊन जायचंच असतं. तर 'एक 'वन शो' मिल जाये यार, लाइफ बन जायेगी' हा कोणासाठी श्लोक असतो!

मग मेहेनत. रात्रंदिवस डोके खाजवणे. जाडजूड पुस्तके चाळणे. हजारो साइट्सचा रोज दरवाजा ठोठावणे. जुन्या विनिंग एन्ट्रीज मन लावून अभ्यासणे. मग असेल नशीब साथीला तर पेटेल तो बल्ब. नाहीतर कितीही वेळा बटण खालीवर करा. नाही म्हणजे नाहीच पेटणार तो! लागला का बल्ब? चला तर मग. लागा कामाला. मारा स्क्रिबल्स. कॉपी लिहा, इमेजेस शोधा. फोटोशॉप उघडा. कापाकापी, खोडाखोडी, चिकटवाचिकटवी! काय झालं? गरमागरम तय्यार झाल्यावर रद्दी वाटतेय का आयडीया? हरकत नाही! खेचा ती फाईल...द्या फेकून ट्रॅशमध्ये! ढोर मेहेनत घ्यावी...लाल झणझणीत कालवण करावं...आणि चव घ्यावी तेव्हा कळावं...पापलेटातच दम नाही राव! चालायचंच! सगळ्याच स्पर्मसचं गुटगुटीत बाळ नाही होत! अहोsss, घड्याळाकडे नका बघू! नाइट मारायला लागणारच आहे! त्याशिवाय ती सोनेरी, चंदेरी, रुपेरी पारितोषिकं कशी येणार तुमच्या शेल्फवर? एक लक्षात घ्या, अख्ख्या जगभरातले मेंदू लागलेत कामाला. ऐरेगैरे नाहीत! जगभरातील कल्पक लोकांचं रँकिंग ठरवलं जातं. आणि त्यात वर नंबर लागण्यासाठी सगळेच मेंदू दर वर्षी, मोठ्या हिरीरीने कामाला लागलेले असतात. अचंबित करणाऱ्या त्या एकेक जाहिराती म्हणजे जसा एकेक कोहिनूर हिरा! डोळे दिपवणारा!

तेंव्हा हारजीत...सगळंच दुय्यम. उलट 'हम भी कम नही!' हाच अॅटिटयूड कामास येतो. दर वर्षी तितक्याच उत्साहाने...आपल्या कामाची पातळी अधिकाधिक वरच्या प्रतीला नेण्याची प्रबळ इच्छाच तारून नेते ह्या वादळात. जसा तो कोळी...पुन्हा पुन्हा कोसळून पडणारा...अपयशामुळे निराश होणारा...सावजासाठी जाळं विणणारा!

रोज ऑफिसच्या मेलबॉक्स मध्ये वरिष्ठांच्या धमक्या येऊन पडतायत! म्हणजे अगदी गन पॉइंटवर चाललंय युध्द! "अवॉर्ड मिळवा! नाही तर याद राखा!"

विचार करा...हे तुंबळ युद्ध हजारो, लाखो कल्पनांमध्ये दर वर्षी सुरु होतं. आणि जाहिराती म्हणजे फक्त वर्तमानपत्र वा टीव्ही वर ज्या दिसतात तितक्याच, इतकं हे रूप सीमित नव्हे.
त्या उलट ह्या धरतीवरील प्रत्येक मनुष्यप्राणी हा जर माझा 'टारगेट ऑडीयन्स' असेल तर मग त्याच्या रोजच्या वावरण्याच्या जागा, सवयी...ह्या बारीकसारीक गोष्टी देखील लक्षात घेऊन केल्या गेलेल्या प्रत्येक जाहिराती ह्या स्पर्धेत भाग घेतात. म्हणजेच...विविध कॅटॅगरीज. उदाहरणार्थ...प्रिंट, फिल्म, डिजीटल, डिरेक्ट मार्केटिंग, आउटडोर, मिडीया...

हे एव्हढं सगळं लक्षात घेऊन, मेंदूचं कुरुक्षेत्र करून समजा सुचलीच काही आयडेची कल्पना...तरी पुढचा प्रवास काही सोप्पा नाही राव! लगेच येत नाही ती सोनेरी झळाळी तुमच्या CV ला! आधी मुंबई ऑफिस, नंतर इंडिया हेड...चर्चा झाडणार, विचार विनिमय होणार...मग ठरणार त्या आयडियेचं भवितव्य. तुम्ही जन्म दिलात...तुमचं बाळ तुम्हांला साजरं वाटलं...गोजिरं वाटलं...पण सगळ्या बाळांमध्ये सोडलंत तर दिसतंय का ते उठून? आणतंय का ते इतरांच्या मेंदूला झिणझिण्या? हे मला का नाही सुचलं...हा असा निरुत्तर प्रश्न उभा करतंय का ते इतरांच्या मनात? म्हणजे अगदी..'kickass' आहे का तुमची idea? लावेल का त्यावर तुमचं ऑफिस पैसे? आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या प्रवेश फीचे हजारो रुपडे लावले जातील का त्यावर?

...हे आणि असे दर वर्षी मोहोळ उठवणारे प्रश्न. आत्मविश्वास भरीला घालणारे. सगळ्यांचा एकच मंत्र. गेल्या वर्षी नाही तर नाही...You never know ...कदाचित हे वर्ष माझं असेल...आणि धातू प्रसन्न होतील!

...मंडळी ही अशी रस्सीखेच.
शिरजोरी.
मगजमारी...
बारबार. लगातार.
अथक धडपड.
लॉटरी ती. लागली तर लागली. नाही तर नाही.

गेल्या काही वर्षांतील मला आवडलेल्या काही भारतीय/जागतिक जाहिराती...मन लोभून टाकणाऱ्या...जळवणाऱ्या...हे असं मला कधी सुचणार असे निराशेचे झटके देणाऱ्या...आपण 'कान्स' मारताच इतिहासजमा होणार का, असा अनुत्तरीत प्रश्न दर वर्षी उठवणाऱ्या...

(
कृपया ह्या जाहिराती मोठ्या करून बघण्यात याव्यात. प्रेक्षकाच्या/वाचकाच्या बुद्धीक्षमतेचा मान राखून त्या केलेल्या आहेत...अगदी A for Apple देता.)

रेनोल्ड्सचा व्हिडिओ आणि त्यानंतरचे काम (क्रमांक ४ नंतर) म्हणजे गेल्या काही वर्षांतील 'सावजाची वाट पहात जाळं विणण्याचे माझे प्रयत्न!'












Sunday 21 November 2010

बाई

"अनघा पाटील कोण आहे ह्या वर्गात?"
बाईंनी हा प्रश्न विचारला आणि माझे पाय लटपटले. धाबं दणाणलं. आठवीची सहामाहीची परीक्षा नुकतीच पार पडली होती. बाईंच्या हातात आमच्या उत्तरपत्रिका दिसत होत्या.
मराठीच्या बाई. 'पिटा'. त्यांच्या मूळ नावाचा विसर पडावा इतके हे नाव अंगवळणी पडलेले. असं नाव त्यांना का आणि कोणी दिलं होतं, ही ऐतिहासिक माहिती काळाच्या ओघात कधीच नाहीशी झालेली होती. रंग काळा. अगदी कुळकुळीत. कोपऱ्याच्या खाली आलेल्या बाह्यांचा पोलका. गचाळपणे अंगाभोवती गुंडाळलेली तरंगती साडी. टाळू अगदी दिसून येईल इतके तेल थापून बसवलेले केस. त्यातही करड्या केसांची संख्या जास्त. खोल डोळे. सुरकुतलेला चेहेरा.
मग चांगले काय?
मराठीचा तास सुरु व्हावा. बाईंनी डाव्या हातात वह्यापुस्तकं आणि उजव्या हातात डस्टर घेऊन वर्गात शिरावं. बालभारतीचं पुस्तक बाईंनी उघडावं आणि दस्तुरखुद्द विंदा करंदीकर सुरु व्हावेत....
देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे...
हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी...

बाई, एक दिवस तुम्ही माझं नाव पुकारलं त्यावेळी अख्खा वर्ग बुचकळ्यात पडला होता. मी घाबरले. उभी राहिले. आणि मग तुम्ही काही वेगळेच बोललात. " मराठीच्या पेपरमध्ये अनघाने लिहिलेला निबंध तुम्ही सर्वांनी वाचा! 'यमराज संपावर गेले तर'. तो कल्पना विस्तार वाचा. ती निबंधाची धाटणी बघा." मी खाली बसले तेव्हा सगळा वर्ग चकित होता. जाईने मला विचारलं," काय गं, तुला काय झालं एकदम?"
दहावी आली. बीजगणित गळ्याशी आलं. x ची कातरी आणि y ची लाथ! संधी, समास, अलंकार....सर्व बाजूला पडले. दर रविवारी मात्र मटा ताब्यात घ्यावा आणि ह. अ. भाव्यांच्या कोड्यात अडकून पडावं!

दहावी झाली. मराठी की चित्रकला ह्या संग्रमात रंग आणि कुंचले जिंकले. मी जे जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टचा रस्ता धरला.

वर्षे ओलांडली ह्या घटनेला. पण तुम्ही पेरलेली बी कधी सुकली नाही. ज्यावेळी ह्या पाश्चात्य धर्तीच्या माझ्या रोजीरोटीच्या ऑफिसमध्ये, कोणी एखादा ऑस्ट्रेलियन एशियन हेड मला म्हणतो,"You are an art director? I always thought you are a writer!"...त्यावेळी बाई, तो तुम्ही पेरलेल्या बीला पाणी घालत असतो. खत घालत असतो.

काल तुमची खूप आठवण आली.
वाटलं...तुम्ही वर्गावर यावं...
बालभारती उघडावं...
आणि साक्षात महानोर तुमच्या रूपाने आम्हां सर्वांसमोर बसावेत...
या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे...

कल्पना विस्तार तुम्ही फुलवत न्यावा...
या भुईचं, त्या नभाचं...तुम्ही रसग्रहण करावं...

तास कधी संपू नये...ती घंटा कधी वाजूच नये.

बाई, कालचा 'स्टार माझा- ब्लॉग माझा'चा निकाल वाचला...
आणि तुमची आठवण झाली.
काळाच्या पडद्याआड तुम्ही कधीच निघून गेलात...
परंतु, मराठीतील...प्रत्येक ओळीत आणि प्रत्येक शब्दांत...
जश्याच्या तश्या आहात तुम्ही...

पायाला स्पर्श करते बाई...
मला आशीर्वाद द्यावा...

Saturday 20 November 2010

आजीईईईईईईईईईई

उंच कपाटावर बसवून ठेवलंय मला. गेला एक तास. लहान आहे मी सगळ्यांत! पाच वर्षांची. म्हणून ना हे सगळे मला त्रास देतात! वेडा पराग. मावसभाऊ माझा! थोडाच फक्त मोठा आहे माझ्यापेक्षा. दोन वर्षांनी. पण वेडा आहे! दिवसभर त्रास देत असतो. कालच आईने माझ्यासाठी छान पत्र्याची बादली आणली होती. भातुकलीच्या खेळासाठी! त्याची कडीच तोडून टाकली ह्या वेड्याने! म्हणून त्याला ओरडत होते, तर त्याने ना मामाला खोटंच सांगितलं आणि मामाने ना ठेऊन दिलंय मला ह्या कपाटावर! मामा पण ना माझा वेडाच आहे! बाबा येऊ देत संध्याकाळी! मग सांगते त्यांना!
"मामाSSSSSSSSSS, उतरव ना खाली!"
श्शी! वेडे आहेत सगळे! भूक लागलीय ना मला! आजी कुठे गेलीय?
"आजीईईईईईईईईईई!"
आजी पण ना वेडी आहे माझी! ओ पण देत नाही मी एव्हढी हाका मारतेय तर! ती आली तरी काय उपयोग? म्हातारी आहे ती! मला इतकं वर ठेऊन दिलंय! कशी घेणार ती मला खाली? आणि मी पडले तर इथून?! किती खोल आहे सगळं! लागेल ना मला? मग ओरडेल आई परागला! संध्याकाळी येईल ना मला घ्यायला! ऑफिस सुटलं की! ती ऑफिसला जाते ना म्हणून सकाळी इथे आजीकडे सोडते मला! पण हा पराग आहे ना! तो मला न खूप त्रास देतो! एकदा काय झालं माहितेय? माझ्या आईने ना माझ्यासाठी एक बाहुली आणली होती! तर एव्हढी माझी नवीनवी बाहुली, नाव पण नव्हतं मी ठेवलं तिचं अजून, आणि ह्या वेड्याने ना तिचं डोकंच तोडून टाकलं! मग मला ते परत लावता पण नाही ना आलं!
आणि काय माहितेय? मला सकाळी आई इथे सोडते ना तेव्हा, ती ना माझ्या कपड्यांची ना एक पिशवी भरून देते. पण न मी इथे आले ना की माझा दुसरा भाऊ आहे तो ना माझी ती पिशवी फेकून देतो वर! म्हणजे ना एकदम पंख्यावर! वर बघा ना! दिसतेय ना? ती पिशवी आहे माझी! आता ती खाली कधी येणार? वेडी आहेत ही सगळी मुलं! आणि मलाच वेडी म्हणतात!
मी झोपते ना खूप म्हणून न मला हे सगळे टाले म्हणतात! म्हणजे ना ते मला सारखे 'उटाले उटाले" म्हणतात! त्यातला उ गेला आणि आता नुसतं टाले राहिलंय!
माझी एक बहिण आहे ना, म्हणजे माझ्या मामाची मुलगी आहे ती. मोठी आहे माझ्यापेक्षा! तिच्याकडे ना खूप खेळणी आहेत भातुकलीची! मग ना, ती मी हळूहळू ना माझ्या घरी नेली! तर ती एक दिवस शोधत होती ना घरभर तर आमचा एक गडी आहे महादू, त्याने ना तिला सांगितलं काय माहितेय? " ती बाय इथे नाय मिळणार! ती गेली तुमची खेळणी सगळी छोट्या पाटलीणीकडे!" पण तिने बघितली, माझ्याकडे सगळी आहेत तिची खेळणी! मी नीटच ठेवलीयत! दिली नाही मी तिला मग परत! मग मी कशाने खेळू? हो की नाही?
पण हा मामा मला कधी खाली घेणारेय? आई येईल ना आता! तिला मग लगेच निघायचं असत घरी जायला! तिने मुळी आजीला सांगूनच ठेवलंय! "तयार ठेव हं आई हिला संध्याकाळी! मला घरी जाऊन जेवण करायचं असतं! लगेच निघायला हवं!"
आजी येत का नाहीये मला शोधायला?
"आजीईईईईईईईईईई!"
"वेडा नुस्ता!" बघा ना कसा करतोय हा पराग! दिसतोय ना वेडा? सांगितलं ना मी तुम्हांला? जा पाहू, आता तुम्हीच बोलावून आणा माझ्या आजीला! ऐकू येत नाही तिला! आत स्वैपाकघरात असेल बघा! आमच्यासाठी खायला करत असेल काहीतरी! संध्याकाळ झाली ना, म्हणून!
पण आधी तिला सांगा मला खाली उतरवायला!
भ्यॅssssssssssssssssssssssssssssssssss
आजीईईईईईईईईईई!!!!!!!!!!!!

PTA

Post Traumatic Amnesia -An example of mixed retrograde and anterograde amnesia may be a motorcyclist unable to recall driving his motorbike prior to his head injury (retrograde amnesia), nor can he recall the hospital ward where he is told he had conversations with family over the next two days (anterograde amnesia)...

सकाळची नऊची वेळ. आज कधी नव्हे ते वेळेवर निघणे झाले होते. खारच्या ऑफिसला साडे नऊ वाजता पोचणे काहीच कठीण नव्हते. वांद्रा रेक्लमेशनचा सिग्नल दुरून दिसत होता. वाहन कायनॅटिक होतं. सवयीनुसार शिरस्त्राण परिधान केलेले होते.

स्ट्रेचर अम्बुलन्समधून काढले जात होते त्यावेळी शुद्ध आली. उलट्या आणि ग्लानी. डोक्याला मार. हिंदुजाचे ICU. चार दिवस मुक्काम. उलट्या म्हणून सिटी स्कॅन.

सांगितले जाते ते असे...स्कूटरला अपघात झाला होता. भर रस्त्यावर विसेक मिनिटे पडले होते. शुध्द हरपलेली होती. कोणीही थांबत नव्हते. मागून लीलावती हॉस्पिटलचे डॉक्टर महेश तिथून डाव्या बाजूला वळणारच होते, त्यावेळी त्यांना गर्दी दिसली. ते उतरले. गाडीत घातले आणि भाभा हॉस्पिटलमध्ये नेले. पर्सबरोबर असलेल्या फायलो फॅक्स मध्ये कोणा माणसाला घरचा नंबर सापडला. त्याने घरी फोन केला तेव्हा मधल्या मेव्हण्याने फोन उचलला. पुढच्या पंचविसाव्या मिनिटाला तो मित्राला घेऊन भाभात पोचला होतं. त्याने बघितले त्यावेळी डोक्याचे ऑपरेशन चालू होते. म्हणे जो ऑपरेशन करत होता तो दुरून तरी सर्जन वाटत नव्हता. त्यानंतर डॉक्टर महेशांनी हिंदुजाला आणले. अम्बुलन्समधून बाहेर काढले जात असता शुध्द आली. हिंदुजा हॉस्पिटलच्या आवाराचे छत अंधारलेले आहे.

कपडे पूर्ण फाटलेले. लक्तर रक्ताने माखलेली. उलट्या चालूच. बेशुद्ध असताना आजूबाजूच्या लोकांच्या कृपेने पर्स पूर्ण रिकामी झालेली होती.

कोणी एक वाटसरू बातमी घेऊन घरी पोचला होता. लेक पाच वर्षांची होती. तिला आणि आईला सांगितले गेले त्यावेळी आई की मावशी हा प्रश्न आजीला आणि नातीला पडला. मी आणि माझी धाकटी बहिण, दोघी स्कूटर घेऊन कामावर जात असू. नशिबाने अपघात मलाच झाला होता.

सिटी स्कॅनने मेंदू जागच्या जागी आणि शाबूत दाखवला. सात दिवसांनी घरी पोचले. पंधराव्या दिवशी पुन्हा स्कूटर हातात घेतली. मेंटल ब्लॉक परवडण्यासारखा नव्हता.

लेकीने एक सुंदरसं भेट कार्ड बनवलं. ते बघून लीलावतीचे डॉक्टर महेश आणि आईला वाचवणारे डॉक्टर बघून लेक, असे दोन जीव सुखावले.

आजतागायत माहित नाही हे घडलं कसं. का रस्त्यावर काही सांडलं होतं? का त्यावरून माझी स्कूटर घसरली? कि कोणी मला उडवलं? गूढ. बारीक केसांतून दिसणारी आणि रोज हाताला लागणारी एक शिवण. हा एव्हढाच त्या अपघाताचा पुरावा.

Post Traumatic Amnesia - अपघातानंतर माणसाला त्या घटनेबद्दल काहीही न आठवणे.

आयुष्यात आघात बरेच झाले. ते नाही विस्मृतीत गेले. जखमा बऱ्याच झाल्या. त्या कायम ओल्याच राहिल्या.

नेहेमीसारखेच आयुष्य पुढे सरकले. सकाळची नऊची वेळ. नेहेमीसारखाच उशीर. ऑफिसला साडेनऊ वाजता पोचणे कठीणच. अपघाताच्यावेळी केलेली चूक आज सुधारली होती. शिरस्त्राण घातलं होतं आणि त्याचा पट्टा देखील आज लावला होता.

Friday 19 November 2010

भेट

त्या घरातल्या चिमुकलीचा, तो पहिला वाढदिवस होता. घर रंगीबेरंगी सजलं होतं. फुगे सगळ्यांच्याच मनाला तरंगवत होते. बाळ नटलं होतं. "अगं, अजून ती यायचीय." "हा आला का?" "चला जमले सगळे?" बाळाचे काकामामा, मावश्या आत्या, दादा ताई सगळे आवर्जून हजर होते. एक मेणबत्ती डोक्यावर घेऊन केकही आला. बाळाचा चिमुकला हात हातात घेऊन आईने केक कापला.

आणि नंतर एक म्हटली तर साधीशी आणि म्हटली तर महत्वाची घटना आकार घेऊ लागली.

नातेवाईक एकेक करून आपापल्या भेटवस्तू घेऊन पुढे सरसावू लागले. बहुतेक सगळ्याच भेटी बाळाच्या आवाक्याबाहेरच्या होत्या. बाजूला आई उभी होती. तिच्या बाजूला ढीग उभा आडवा पसरू लागला. मी कालच सोन्याची चिमुकली बुगडी घेतली होती. बजेट मध्ये बसतील अशी. माझ्या नंतर त्या घरची धाकटी सून पुढे आली. तिच्या हातात होतं एक दीड फुट उंचीचं मऊ मऊ गुलाबी अस्वल.
"अरे वा! किती गोड आहे! कुठे मिळाला हा तुला?" मी विचारलं.
"अगं नाही! मी बनवला!"
"बनवलास? इतका सुंदर? अगदी विकत आणल्यासारखा वाटतोय हा तर!"
ह्यावर आलं एक मंद स्मित.
भेटवस्तू देण्याचा पहिला भाग आटपला. भेटवस्तू उघडण्याचा दुसरा भाग सुरु झाला. रंगीबेरंगी कागद टराटरा फाटू लागले. आनंद व आश्चर्यमिश्रीत आवाज खोलीमध्ये ऐकू येऊ लागले. माझीही भेट उघडली गेली आणि मग घरातील जेष्ठ बाई आल्यागेल्याला अतिशय कौतुकाने बुगडी दाखवू लागल्या. धाकटी सून खोलीतच इथेतिथे वावरत होती. दूर कोपऱ्यात अस्वल पडलं होतं. सुनेचा चेहेरा हिरमुसत चालला होता.
"मां, मी दिलेल्या वस्तूसारख्या, सोन्याच्या हजार वस्तू बाजारात मिळतात." मी बाईंना म्हटलं.
"तर?"
"तर काही नाही. मी अजून थोडे पैसे घातले असते तर एखादा अजून मोठा दागिना आला असता."
बाईंना हे असंतसं नव्हतंच कळणार.
"सीमाने ते अस्वल रात्ररात्र जागून खूप प्रेमाने बनवलंय. आणि दुकानात जी अशी मऊ खेळणी विकत मिळतात, तितकच हे सुंदरही झालंय." वयाचा मान राखून हे एव्हढंच बोलणं शक्य होतं.
सीमा सासूबाईंसमोर कावरीबावरी झाली.

श्रमदान तोलता येते?
सोन्याची कर्णफुले की एखादं स्वहस्ते तयार केलेलं, मऊ गुबगुबीत अस्वल...काय भावते मनाला?

Monday 15 November 2010

"उक उक!"

चांगलीच जुनी गोष्ट. पण न विसरता येण्यासारखी.
लेक पृथ्वीतलावर अवतरून फक्त दोनच दिवस झालेले. आता ती सांगते ते जर खरं मानायचं, तर म्हणे जवळजवळ पाच वर्ष ती स्वर्गात देवाजवळ बसून संशोधन करत होती. सर्व जगभर निरीक्षण करून तिने तिचे आईबाबा निवडले होते! असो.
तर वेळ होती सकाळचे अकरा. सरोज नर्सने धुऊन पुसून माझ्या बाजूला बाळाला झोपवलं होतं. खरं तर बाळ का बरं म्हणावं? तो दुपट्यात गुंडाळून आणलेला प्राणी होता सुरवंट. सुरवंट कसा वळवळतो? तसंच हलत होतं बाळ. हातपाय आत, फक्त डोकं बाहेर. वळवळ वळवळ! बाळाबाजुला पडायचं म्हणजे पण चिंताच. उगाच आपला हात पडला म्हणजे चुकून त्याच्या अंगावर? चिंचोळ्या जागेत पडून टक लावून बघत होते त्या बाहुलीकडे. श्वासाकडे नजर लावून.
"उक!"
ताडकन उठले. अगदी बिछान्यावरून जमिनीवर!
"उक"
हे काय होतंय बाळाला?
डोळे तर मिटलेलेच. मग हे काय?
"उक!"
"नर्स! नर्स!" खोलीतून बाहेर आले ती मुळी सुसाट शोधात सरोज नर्सच्या. कोणी चिटपाखरू देखील नव्हते आजूबाजूला. "नर्स! नर्स!" आवाज चढला. सुरवंटाला बिछान्यावर एकटंच ठेवून आले होते. परत धावत आले. डोळे मिटलेले. विचित्र आवाज चालूच!

हादरले. धावाधाव. तब्बल दहा मिनिटे धावपळ. रडायला सुरुवात केली तेंव्हा कुठे दिसली सरोज. ऑपरेशन थिएटर मधून बाहेर येताना.
"काय ग? काय झालं?"
"कुठे होतात तुम्ही? किती शोधलं मी तुम्हांला!" रडतरडत त्यांना जाब विचारला.
"अगं, पण झालं काय?"
"चला तुम्ही लवकर! माझ्या बाळाला बघा काय झालंय! श्वास नाहीये घेत ती नीट!"
"श्वास नाही घेत? असं कसं होईल? मी तुला आणून दिली तेंव्हा ठीक तर होती!" सरोज आमच्या खोलीकडे निघाल्या. मागे मी.
पोचलो. हिचं आपलं अजून चालूच!
"बघा ना हो कसं करतंय माझं बाळ!" रडू आणि आसू...

सरोज कमरेवर हात ठेवून उभ्या. खूप बाळं आणि खूप बाळंतिणी हाताखालून गेल्या असल्या ना की ह्या नर्संच्या चेहेऱ्यावर कसा एक वेगळाच आत्मविश्वास साईसारखा पसरतो. सरोजनी तिच्याकडे बघितलं. मग माझ्याकडे. "काय करतेय ती?"
"तिला ना अहो श्वास नाही घेता येतेय! काय करुया आता आपण?" आता अगदी डोळ्यांतून धारा!
"हे कोणी सांगितलं तुला?"
"अहो दिसतच आहे ना ते! बघा ना श्वास अडकतोय तिचा! म्हणून असा आवाज येतोय ना!" काही कळतंच नाहीये ह्यांना. एव्हढंसं माझं बाळ! बिचारीला श्वास पण घेता येत नाहीये, आणि ह्यांचे प्रश्नच संपत नाहीयेत!
सरोज पुढे झाल्या. त्यांनी बाहुलीच्या अंगाखाली हात घालून तिला उचललं. खांद्यावर टाकलं, पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली.

"नुसती उचकी पण तुला कळत नाही का ग?"
उचकी? दोन दिवसाच्या सुरुवंटाला उचकी?
"म्हणजे तेच ना? तिला श्वास नव्हता घेता येत!"
"उगाच काहीतरी बोलू नकोस! साधी उचकी लागलीय तिला! थोडा वेळ फिरव तिला आणि हात फिरव पाठीवरून!"
मी फिरवू? अजून घेता कुठे येतंय पण मला हे बाळ? ते मान पण नाही धरत! डूगुडूगु! अशी पुरचुंडी मी घेणार कशी?
"मला नाही येत घेता!"
"येत नाही म्हणजे?"
रडू. अजून रडू.
"अगं, आता शिकायलाच पाहिजे तुला!"

तेव्हढ्यात खोलीचं दार उघडलं आणि तीन बाळांची माता आली आत! नातीला घ्यायला!
"काय झालं?"
"अहो, साधी उचकी लागलीय तुमच्या बाळाला आणि ह्या तुमच्या लेकीने अख्खं हॉस्पिटल डोक्यावर घेतलं!" तक्रार नोंदवली गेली.


ह्या नर्सेसना ना काही दयामायाच उरलेली नसते! गेल्या आपल्या सगळ्या हॉस्पिटलभर माझी फजिती जाहीर करायला!

संध्याकाळी डॉक्टर मावशी आली ती मुळी हसतच!
"कसं गsss होणार तुझं?"

...पण जमलं खरं हळूहळू!
बाहुलीशी मैत्र जुळलं...
आणि आयुष्य जमून गेलं!