नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 1 October 2012

अकलेचा उकिरडा

आपण ज्या घरात रहातो, त्याबद्दल आपल्याला प्रेम असतं. आपलेपणा असतो व त्यामुळे आपलं घर नीटनेटकं दिसावं ह्यासाठी आपण प्रयत्न करीत असतो. व घर स्वच्छ ठेवणे हे आर्थिक कुवतीवर अवलंबून नसते हे नक्की.

काल सकाळी गिरगाव चौपाटीला आम्ही सात वाजता पोचलो त्यावेळी चौपाटीच्या आवाक्याबाहेर गर्दी होती. मी, सुहास आणि अर्चना. 

समुद्र बराच आत आहे व मुंबईची ही चौपाटी बरीच मोठी आहे. जेव्हा कधी तिथून जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळी मला ही चौपाटी तरी निदान स्वच्छ दिसली आहे. पिवळसर वाळू, काळपट निळा समुद्र. पाण्यावर तरंगती एखादी बोट. किनाऱ्यावर एखादे सुकत घातलेले जाळे. जाळ्याच्या चौकटीतून दिसणारे आकाशाचे तुकडे. अनेक कावळे, एखादी घार. स्पेन, इस्तान्बुल मधील समुद्र निळा. आमचा काळपट करडा. 
आपली शिकवण सांगते, आपल्या आईची शेजारच्याच्या आईशी तुलना करू नये. मात्र आपली सुंदर आई, आपल्याच हाताने विद्रूप करावी आणि मग तरीही शेजारच्याने प्रेमाने राखलेल्या आईशी आपल्या आईची तुलनाच होऊ नये, ही काही अतिरेकी मागणी वाटते.

मुंबईवर कोणाचेही प्रेम नाही. निदान आपल्या नेत्यांना तर तिची काडीची पडलेली नाही. त्यात बिहारी येतात की मद्रासी, त्यांना काहीही फरक पडत नाही. फक्त स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी केलेली ही नाटके आहेत. ह्या वक्तव्याचा पुरावा...कालची गिरगाव चौपाटी.

काल समुद्र कोणी घाण करून ठेवला होता ? तिथे नक्की भय्ये होते...त्यांच्या बायका होत्या...कित्येक गुजराती कुटुंबीय फिरत होते. मुबलक हिंदी कानावर पडत होते. तुकतुकीत गुजराती बायका, त्यांचे नवरे, तीन चार गोरी मुले इथेतिथे. तमे गमे....कानावर पडत होते.
मात्र...नक्कीच तिथे लाखो लोक मराठीच होते. 
आणि तिथे पडलेला कचरा म्हणजे मराठी माणसाच्या मुंबईवरच्या कथित प्रेमाची लक्तरे होता.

तीन शाळकरी मुले. हातात कसले कसले आकाराचे प्लास्टिकचे पेपर. त्यांचा व त्या कागदाचा संबंध संपलेला तत्क्षणी त्यांनी ते कागद जिथे उभे होते तिथेच टाकून दिले आणि आपल्या रस्त्याला लागले. मी एक फुट अंतरावर एक मोठे पोतं घेऊन उभी होते. पोतं नक्कीच इतकं भरलं  होतं, की ते स्वत:च्या पायांवर उभं राहू शकत होतं. मी त्या मुलांकडे त्वरेने पोचले.
"ए मुला, हे बघ कचऱ्याचं पोतं. ह्यात टाक ना कचरा." मी.
"ए जा...टाक त्यात !" काम सरकवणे.
तिघांमधील दोघे तिथून निघून गेले.
ज्याच्यावर सोपवले गेले होते तो खाली वाकला आणि सगळे कागद हातात घेतले. माझ्या हातातील पोत्यात कागद विसावले.
"आता कसा....वाटतोस...शाळेत जात असावास असा !" मी.
तो चुणचुणीत दिसणारा काळसर मुलगा शरमेने हलकेच हसला. खाली मान घालून आपल्या मित्रांच्या रस्त्याला लागला.
पुढाऱ्यांच्या तावडीत सापडलेली कोवळी मने.

काळा रंग, शेंबडं नाक. एक फुट उंची. अंगावर विचित्र चमकणारा पिवळा फ्रॉक. तिने खाली वाकून एक चिमुकली चांदी उचलली. नाकासमोर धरली. मुंबईतील फुटपाथांवर घराचा डोलारा उभारलेली बरीच माणसे समुद्रावरच पसरलेली दिसत होती.
मी तिच्याकडे गेले.
"इधर आ." चिमुरडी माझ्यापाठी आली.
"डाल अब इसमें !" मी पोतं तिच्यापुढे पसरलं. तिने हात उंचावून चांदी आत टाकली.
"कचरा ऐसे इसमे डालने का. रास्ते पे फेकने का नही !" मी हसले.
तिचा चेहेरा फुलला. काळा रंग उन्हात तळपला.

दोन मध्यमवयीन बायका. मध्यम उंची. माझ्या बाजूने जाताजाता खाली वाकल्या, एका क्षणात खाली पडलेला जितका कचरा उचलता येईल तितका उचलला आणि आमच्या पोत्यात सोडला. चेहेऱ्यावर हलकाच आनंद घेऊन गेल्या.

एक गोरा अचानक समोर आला. गप्पा मारू लागला. हातात भला थोरला कॅमेरा. आणि त्या कॅमेऱ्याच्या लेन्समधून तो माझ्याकडे बघत होता. त्याच्या मागे एक भारतीय...मुंबईकर वाटणारा माणूस. मी हे का करतेय...मला हे खटकतं का...वगैरे वगैरे. घरात परका पाहुणा यावा...आणि माझं घर अस्ताव्यस्त असावं...मान शरमेने झुकावी असं वाटलं. "माझ्या देशावर माझं प्रेम आहे...माझ्याकडे...माझ्या ह्या शहराकडे तुला दाखवायला खूप काही चांगलं आहे...मात्र त्याचबरोबर वाईट देखील आहे. मला त्याची जाणीव आहे....सुधारतोय आम्ही...मी फक्त माझा खारीचा वाटा उचलते....इतकंच."

जेव्हा चुकीची जाणीव होते त्याचवेळी माणूस सुधरू शकतो....तीच जर मेली असली तर सुधारणार तरी काय ?
वाटतं गणपती विसर्जनाच्या दिवशी आपण ही जी नैसर्गिक संपत्तीची हानी करतो, त्याची दखल खरं तर जागतिक पातळीवर घेतली जावी. कारण अरबी समुद्र माझ्या देशाच्या नशिबाने आम्हांला मिळाला आहे. परंतु, ती संपत्ती पूर्ण मानवजातीची आहे. हा समुद्र म्हणजे माझ्या घरचा कचऱ्याचा डबा नाही.

"अहो, पुढल्या वर्षी मी तुमच्याकडून तुमची झाडू घेणार आहे. त्याने कचरा काढणे हे अधिक संयुक्तिक आहे. कारण त्यात कमी वेळात अधिक काम होते !" मी महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगाराला म्हटले.
"ते तुम्हांला जमणार नाही ताई." तो म्हणाला.
"का नाही ? घरी मी काढते की कचरा !" मी
"ते वेगळं ! आणि हे वेगळं !" तो म्हणाला.
"ते बरोबर ! पण मी शिकेन ना तुमच्याकडून ! आणि मी बघितलं तुम्हीं कसा कचरा काढता ते ! असा हलकेच झाडू फिरवायचा वाळूत. फार जोर लावायचा नाही. कारण जोर लावला तर खालची वाळू पण गोळा होते. आणि आपल्याला फक्त वरचा कचरा हलवायचाय ! बरोबर ?" मी.
"हो ! बरोबर !"
"मग ठरलं तर ! पुढल्या वर्षी मी माझा एक झाडूच घेऊन येणार !"
तो हसला.

आम्ही तीन पोती कचरा गोळा केला. तो नेऊन महानगरपालिकेच्या कचराडब्यात ओतला. अंदाजे १५ फुट बाय १५ फुट इतक्या आकाराचे ३ चौरस साफ केले.

लालबागचा राजा...आणि त्याच्या विसर्जनासाठी आपली रात्र घालवणारा माझा एक मित्र.
"कस्सली गर्दी लोटली होती रे ! शनिवार रात्र होती ना...त्यामुळे जास्तच गर्दी झाली होती." तो आज ऑफिसमध्ये सांगत होता.
"तू होतास काय तिथे ?" मी.
"होतो म्हणजे ? अरे, अख्खी रात्र होतो तिथे !" लालबागच्या राजाच्या विसर्जनाला न जाणे ह्यात काहीतरी अवमानकारक असावं.
"हो काय ? आम्ही काल सकाळी गेलो होतो तिथे ! सकाळी होतास तू ?" मी.
"सकाळी ? सात वाजता विसर्जन झालं...मग गेलो आम्ही तिथून !" तो
"अच्छा. आम्ही सकाळी सात वाजता पोचलो. समुद्र साफ करायला. तू नव्हतास त्यात." मी.
"मी कशाला असणार त्याच्यात ? मी केला नव्हता कचरा !"
"हो. पण जी अलोट गर्दी लोटली होती, त्याचा तू एक भाग होतास...आणि अवाढव्य मूर्तीचा एक समर्थक असल्याकारणानेच इतकी अख्खी रात्र तिथे घालवलीस ना ?"
"माझा त्या कचऱ्याशी काहीही संबंध नाही. तो मी केला नाही ! मी कशाला उचलू मग ?!" तो.

विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्राच्या होणाऱ्या हानीशी गणपती विसर्जनाचा काडीचाही संबंध नाही...त्यामुळे अवाढव्य मूर्ती, थर्माकोल, चड्डया, पारले ग्लुकोजची व गुटख्याची वेष्टणे, पाण्याच्या बाटल्या, चहाचे प्लास्टिकचे कप, पादत्राणे, सॉक्स...ह्या सर्वांची जबाबदारी कुठल्याही गणेश मंडळाची नाही ! ती जबाबदारी गणपतीने स्वत: उचलावी ! कारण हे सर्व त्याच्यासाठी होते. जबाबदारी टाळून स्वत:चे अवयव अस्ताव्यस्त किनाऱ्यावर टाकून इतर कचऱ्यात भर टाकणे हे मुळात त्याला शोभतच नाही !

दुसऱ्या दिवशी जाऊन कचरा गोळा करणे हे काही दूरदृष्टीचे लक्षण नव्हे ! तर मुळात ही समस्या का उभी रहाते ह्याचा विचार करण्याची गरज आहे. परंतु, गरज आहे...पण आमच्या एकाही पुढाऱ्याची तशी इच्छा नाही ! त्यामुळे कार्यकर्ते आपल्या कामांच्या यादीत हे धरतच नाहीत. त्यांच्या मते आम्ही XXX ठेवणार आणि ते साफ करणे ही फक्त महानगरपालिकेची जबाबदारी आहे...आणि त्यासाठीचा पगार त्यांना मिळतो तेव्हा त्यांनी ते काम केलेच पाहिजे ! कचरा गोळा करताना बरीच तरुण मंडळी दिसत होती. कचरा करणारे आणि कचरा गोळा करणारे असे दोन स्तर तिथे वावरत होते. 
वेगवेगळ्या पक्षांच्या पुढाऱ्यांच्या नावाचे कपडे घालून फिरणारे कार्यकर्ते...कचरा करणाऱ्या गटात मोडत होते !

गिरगाव चौपाटी हे मुंबईचं एक तृतीयांश रूप आहे. त्यापुढे जाऊन ही चौपाटी हे माझ्या देशाचे एक शतांश रूप आहे.
हा देश माझा आहे.
हे गाव माझं आहे.
हे शहर माझं आहे.
ही चौपाटी माझी आहे.
हा रस्ता माझा आहे.
ही आगगाडी माझी आहे.
हा बसथांबा माझा आहे.
वगैरे वगैरे.
ही कुठल्याही एका पक्षाची खाजगी मालमत्ता नाही.
हा रस्ता, ही चौपाटी, हे शहर हा माझ्यासाठी उपलब्ध करून दिलेला एक अजस्त्र कचऱ्याचा डबा नव्हे.
तिथे मी कचरा टाकणे आणि दुसरा कचरा टाकून जात आहे ह्याकडे मी दुर्लक्ष करणे हे दोन्ही गुन्हेच आहेत.
आसपासचा परिसर हा साफ आणि स्वच्छ असावा हे सामान्य ज्ञान आहे.
हे मला शिकवायला एखादा पुढारी मला लागत नाही.
माझे घर कसे साफ ठेवावे हे मला एखाद्या पुढाऱ्याकडून शिकण्याची गरज नाही !
माझा नेता मीच आहे.
माझा पुढारी मीच आहे.
कारण मला डोके आहे.
स्वत:चे भले कशात आहे इतपत कळण्याची सारासार विचारबुद्धी माझ्यात आहे.
मी माझी अक्कल कोणत्याही पक्षाला विकलेली नाही.
आणि ती केळी खायला तरी नक्कीच गेलेली नाही.
तुमची ?
गणपती 'मागील सजावटीच्या पाया पडणाऱ्या' अनेक भक्तांमधील एक बाई.

37 comments:

Suhas Diwakar Zele said...

ह्म्म्म... आता जे सुरु होतं मी ते स्वत: तुझ्यासोबत अनुभवलं आहे. त्यामुळे अजून वेगळं काही सांगत नाही. एक सांगतो. पुढच्यावर्षी आपण ब्लॉगवर ऑफिशियली घोषणा करून मराठी ब्लॉगर्स आणि वाचकांना आवाहन करायचे. कोणी नाही आलं, तरी मी आहेच तुझ्यासोबत :) :)

Gouri said...

तुझ्या या पोस्टीशी २००% सहमत! उत्सव साजरा करण्यातच बदल व्हायला हवाय, पण उत्सव या पद्धतीनेच साजरा करायचाच असेल, तर सगळ्या गणेशभक्तांचा मिरवणुकीत दिसणारा बेभान उत्साह नंतरच्या या सफाईतही दिसायला हवा.

aativas said...

अनघा, एका चांगल्या कामाची सुरुवात केली आहे तुम्ही लोकांनी. पुढच्या वेळी आधी इको-मूर्तींचा प्रसार आणि मग सफाईत सहभाग - या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणावर - म्हणजे अजून काही लोकांच्या सहभागासह - नक्की करता येतील.

Sanhita / Aditi said...

आमच्या गावात पुढच्या विकेण्डला एक म्युझिक फेस्टीवल आहे, आपला उरूस, जत्रा टाईप गर्दी जमेल. कचरा तिथेही साठेल म्हणून उद्यानाचा तो भाग पुढचे चार दिवस बंद असणार आहे. महानगरपालिकाच साफसफाई करेल. गणेश मंडळांमुळे कचरा होतो तर त्यांच्याकडून पैसे घेऊन साफ करवता येतोच की! कोणाला तरी रोजगारही मिळेल. हे कचरा करण्याचं समर्थन नाही, अगदी वार्‍यामुळेही कचरा होतो त्याचं व्यवस्थापन पैसे घेऊन करावं याचं समर्थन आहे.

Anonymous said...

गौरी +१ .... आदल्या दिवशी उत्साहाने वावरणारे ’भक्त’ दुसऱ्या दिवशीच्या सफाई अभियानातही सामील झाले तर उत्सवाची शान आणि वाढेल !!

अनघा, सुहास, अर्चना तुमचे कौतुक !!

Mahendra Kulkarni said...

लोकांची ही मनोवृत्ती वाईट आहे, की स्वच्छता ठेवणे हे मनपाचे काम आहे,त्यामुळे ते कुठेही कचरा करतात. .
मुंबई आपली आहे, ही जाणीव एकदा झाली, की आपोआपच सगळं काही स्वच्छ राहिल.

Abhishek said...

लेख आणि विचार योग्य आहेत.

सागर पुन्हा नवीन..... said...

आम्हीही नाशिक मध्ये गोदातीरी गणपती विसर्जनाच्या दिवशी नगरपालिकेच्या कर्मचार्यान सोबत पीओपी च्या मूर्ती आणि निर्माल्य संकलन केलं, ह्या वर्षी बराच चांगला प्रतिसाद भेटला , बदल हा स्वतःपासूनच व्हायला हवा.. बाकी तुझ्या पोस्टशी १००% सहमत ..

Anagha said...

सुहास, नक्की. फक्त राहून राहून मनात येतंय की हे झालं कचरा झाल्या नंतरच्या गोष्टी. पण कचरा होऊ नये किंवा त्यावर काहीतरी ताबा रहावा ह्यासाठी काहीतरी करायला हवंय. आपण सगळे मिळून ह्यावर विचार करायला हवाय.

Anagha said...

गौरी, उत्सवाचा बाजार झालाय.
आपण खरं तर म्हणतो ना की शिकल्याने माणूस शहाणा होतो. पण तसं चित्र दिसत नाही आहे. ही घाण करून ठेवणारे सगळे चांगले शिकलेलेच आहेत !

Anagha said...

सविता, बरीच लोक ह्यात काम करतायत. त्यांना भेटून, त्यांच्याशी बोलून, त्यांच्या अनुभवातून शिकून काहीतरी करायलाच हवं आहे.
समाजाची घोर अधोगती दिसून येते आहे.

Anagha said...


संहिता/अदिती, माणसाने कुठेही कचरा करू नये. तो कोणी उचलावा ही दुय्यम बाब आहे. तो कोणीही करू नये हे महत्त्वाचे.
आपलाच देश उत्सवप्रिय आहे, व बाकी जगात कुठेही 'फेस्टीवल्स' होत नाहीत असे तर नाही. त्यामुळे समाजातील प्रत्येक माणसाने जबाबदारीने वागावयास हवे. 'मी पैसे दिले की काम व्ह्यावयास हवे' ह्या विचारधारेमध्ये आपण आपली जबाबदारी झटकत तर नाही आहोत ह्याचा नागरिक म्हणून विचार करावयास हवा. तरच स्वत:ला सुजाण नागरिक' असे म्हणवून घेता येईल. माझं म्हणणं पटतंय ना तुम्हांला ?

Anagha said...

तन्वी, कचरा केला जातो हे तर झालेच. पण तो उचलण्याच्या कामात कार्यकर्ते सहभागी झालेले दिसत नाहीत ह्या मागचे त्यांचे कारण म्हणजे 'रात्रभर जागरण झालंय. आता अजून काही कामं शक्यच नाहीत' असे असते. सगळ्यांनाच उत्सवात सहभागी व्ह्यावयाचे. त्यापुढची घाण काढणे कदाचित कमीपणाचे वाटत असावे.

Anagha said...

महेंद्र, अगदी बरोबर बोललात तुम्ही. 'हा देश, हे गाव, हा रस्ता हे सर्व माझं आहे...त्यामुळे ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही माझीच आहे' हा विचार प्रत्येकाने करावयास हवा. नाहीतर बरी ही लोक 'माझं शहर...माझं शहर' करीत मारहाणीवर येतात ?!

Anagha said...

अभिषेक, विचार योग्य वाटले...बरं वाटलं.

Anagha said...

सागर, मला माहितेय...बरीच लोकं ह्यावर काम करतायत. आणि त्यातून तरुण मंडळी सहभाग घेताना दिसली की फारच बरं वाटतं...आशा शिल्लक रहाते. सुशिक्षित म्हणवून घेणारे ह्या सर्व विनाशक कामात हातभारच लावताना दिसली की हे सुधारणार तरी कधी आणि नक्की काय विनाश होण्याची हे वाट बघतायत हे कळेनासं होतं. साधी गोष्ट आहे ना रे...आपण जाऊ मरून..पण आपलीच मुलबाळं ह्या आपल्याच मूर्खपणाला बळी पडणार आहेत...नाही का ? हे सांगायला कोणी पुढारी, नेता कशाला हवाय ? स्वत:चं स्वत:ला कळत नाही काय ?

Sakhi said...

मस्त पोस्ट नेहमीप्रमाणे...

पण .. निर्माल्य जमा करणे अन गर्दीचे नियोजन करणे या दोन गोष्टी आता इतक्या वर्षाने गणपती मंडळांनी बर्यापैकी जमवल्यात.. पण अजून बराच टप्पा बाकी आहे हे मात्र खरे...

पण तू अन बाकी कमेंट्स मध्ये बाकीच्यानी लिहिल्याप्रमाणे स्वत:पासून सुरु करणे हे महत्वाचे...

पुढच्या वर्षी खरेच सुहासने सुचवल्याप्रमाणे थोड्या मोठ्या प्रमाणात करता येईल का ... अन फक्त चौपाटी साफ करण्या पेक्षा आधी काही करता येईल का हे ही पाहता येईल...
खारीचा असला.. तरी वाटा असेल महत्वाचा ..

Anagha said...

भक्ती, जे काही डोळ्यांना दिसते ते हताश करणारे असते.
आणि हे फक्त गणपतीच्या दिवसांचे चित्र नाही. अंगारिका येऊन गेली ना की तू सिद्धीविनायकाकडे जाणारे रस्ते बघायला हवेस. हे पुढारी रात्री भक्तांना चहा वाटतात...आणि सगळे हे कथित भक्त जिथे उभे असतील तिथे ते प्लास्टिकचे कप टाकून निघून जातात ! ह्याची ना देणाऱ्याला लाज ना टाकणाऱ्याला ! देवानेच उभी केली ना की काय ती दुनिया ? आणि ती घाण करायला ह्यांना पाठवलेय काय ? असे वाटायला लागते !

Sanhita / Aditi said...

अनघा, जागोजागी कचरा कुंड्या न ठेवणारी महानगरपालिका योग्य वागते का? शाळांमधे याचं योग्य शिक्षण न देणारं सरकार यात योग्य वागतं का? (अमेरिका आणि इंग्लंडमधे शाळांमधे मुलांना पाकटवून स्वच्छतेचं महत्त्व पटवतात हे तिथल्या लहान मुलांशी बोलल्यावर समजतं.)

एवढ्या गर्दीमधे कचरा न होणं जगात कुठेही गेलं तरी शक्य नाही. कोणाचा तरी धक्का लागून कचरा कुंडी लवंडणार, कुठे कुंडी भरली की त्यातून कचरा सांडणार, कुठे वार्‍याने कागद, प्लास्टीक उडणार, कुठे कोणाच्या हातून चॉकलेटची रॅपर्स उडणार. अगदी ९९% समाज सुशिक्षित असला तरी अशा गोष्टी गर्दी आहे तिथे होतातच. (१००% समाज सुशिक्षित करू/होऊ शकत नाही.)

तर लोकांनी केलेल्या कचर्‍यासाठी आपण स्वतःलाच का बडवून घ्यायचं? गणेश मंडळांच्या मोठ्या मिरवणूका असतात, त्यांना परवानगी देताना त्यांच्याकडून आधीच साफसफाईचे पैसे का घेऊ नयेत? लोकं पेटीत जर देखावे आणि मंडपांसाठी पैसे टाकतात तर त्यातले थोडे पैसे साफसफाईसाठी खर्च करावेत. रस्त्याला तंबूंमुळे पडणारे खड्डे बुजवायला वापरावेत. विसर्जनाच्या दुसर्‍या दिवशी पैसे देऊन चौपाट्या आणि तळी, आणि त्यांचे काठ साफ का करू नयेत? आपल्याकडे तसंही ह्यूमन लेबर प्रचंड स्वस्तात उपलब्ध आहे. ज्याला पैसे देणं परवडतं त्याने ते द्यावेत, ज्याला साफ करून पैसे हव्येत त्याने ते मिळवावेत आणि अश्रद्धांनी सुखाने विसर्जनाच्या तिसर्‍या दिवशी चौपाटीचा, तळ्यांचा आनंद लुटावा.

Dhaval Ramtirthkar said...

एका मराठी ने दुसर्‍या मराठींची लखतरे तर काढून झाली या कचर्‍याच्या निमित्ताने... आणि ते बरोबर ही आहे. पण आता या तळपत्या ब्लॉग वर परप्रांतीयांनी मुंबईची जी दुर्दशा केली आहे याचा ही प्रत्यय आला तर पारडं एकतर्फी झुकत नाही असं वाटेल :)

उदा. नवरात्रीत गुजराथी लोकांची दादागिरी आणि सर्रास डेसिबल आणि कायद्याची उडवलेली खिल्ली, परप्रांतीयांनी आपल्या मिठी नदीची केलेली दुर्दशा... बहुतांश परप्रांतीयांनी बळकावलेल्या झोपडपट्टयातील गुन्हेगारी संस्कृती... परप्रांतीय रिक्शा-टॅक्सीवाल्यांनी सर्रास चालवलेली लूट वगैरे वगैरे...

rajiv said...

"धवल, जिथे स्वतःलाच स्वतःच्या घराच्या स्वच्छतेची पडलेली नाही....ती बाहेरच्या पाहुण्यांना का पडावी ?
आणि स्वतःचे घर/गाव घाण ठेवणे हिच जर मराठी माणसाची अंगभूत वृत्ती असेल ..तर तिचा सोयीने वापर परप्रांतीयांनी केला तर कशाला बोंब मारावी ?

Anagha said...

संहिता/अदिती, तुमच्या ताज्या प्रतिक्रियेवर उत्तर लिहायला घेतले आणि त्यातून नव्या पोस्टने आकार घेतला. वेळ मिळेल तेव्हा जरूर वाचा.

Anagha said...

धवल, फलटणकरांनी तुझ्या विचारावर काही विचार मांडले आहेतच. त्यावर मला असे वाटते की 'मी कुठेही गेले तरी कचरा करणार नाही' हे तत्व महत्त्वाचे. त्यामुळे मी उद्या उठून बिहारमध्ये गेले म्हणून तिथे कचरा करेन असे नाहीच. जगाच्या पाठीवर कुठेही कचरा करणार नाही.
त्यातून फलटणकर म्हणतात तसं तर आहेच. 'मीच जर माझं घर उकिरडा केला तर मग पाहुणा कशाला ते स्वच्छ ठेवेल ? नाही का ?

Anagha said...

राजीव, सूचक प्रतिक्रियेबद्दल आभार.

Dhaval Ramtirthkar said...

मान्य आहे. पण हे आत्मघातकी प्रवृत्ती सारखे नाही का? दोन मित्रांचं भांडण होतं, पण आई आपल्या मुलालाच बजावते, मला काही सांगू नकोस, पण त्याने काहीही केलं तरी तू संयम बाळगला पाहिजेस. अशानेच पुढच्याला अधिक बळ चढते आणि तो पुढच्या वेळी घरात घुसून दादागिरी करायला मागे पुढे पाहत नाही,कारण त्याला माहीत आहे...

Anagha said...

धवल, तुम्ही इतकी स्वच्छता राखा, की पाहुण्याची हिंमत नाही होणार तुमच्या गावात कागदाचा एक तुकडा टाकायची ! हो ना ?

Mohana Prabhudesai Joglekar said...

<<>> असं वाटायला नको. पुढच्यावेळेस असा प्रसंग आला तर, तुम्हीच त्यांना विचारा की त्यांच्या देशात अशा समस्या असतीलच ना, त्यावर ते काय करतात? आपण इतर देशांच्या स्वच्छतेचे गोडवे गातो (योग्यंच आहे) पण अमेरिकेत मी गेली सतरा अठरा जे निरीक्षण केलं आहे त्यावरुन असं लक्षात येतं की इथेही मोठ्या शहरांमध्ये आपल्यापेक्षा कमी प्रमाणात असेल पण हीच समस्या आहे. आणि इथेही तुमच्यासारखे स्वयंसेवक असा पुढाकार घेत असतात. अर्थात जात्याच या लोकांच्या रक्त्तात स्वत:ची कामं स्वत: करायची सवय असल्याने कचर्‍याच्या बाबतीतही तेच लागू होतं. तो करुच नये किंवा केला तर स्वच्छ करावं ही जाणीव आपल्यापेक्षा जास्त आहे.

Anonymous said...

अनघा, सुहास, अर्चना तुम्हा सगळ्यांचे कौतुक आणि खूप आभारसुद्धा.
खूप चांगलं काम केलं आहे तुम्ही. आणि सगळ्यांत मला काय महत्त्वाचं वाटलं किंवा आवडलं सांगू का, की
तुम्ही तुमच्या मनात आलं की एक चांगल काम करायच आहे आणि लगेच धडाडीने त्याची अंमलबजावणी केली.
मग हा विचार केला नाही की तिघंच आहोत, फक्त आपण हे काम करून काय होणार आहे वगैरे.
नाहितर खूप वेळा नुसत्याच गप्पा होतात, तावातावाने ... पण पुढे कृतीत फार कमी गोष्टी येतात.
'आधी केले मग सांगितले' हे फार आवडलं.
आणि आपल्याकडे विविध संघटना, पक्ष हे सगळे लोक डिस्ट्रक्टिव काम सांगा एकाला शंभर लोक तयार होतील.
पण कन्स्ट्रक्टिव, मेहनतीचे, विनामोबदल्याचे काम (तेही स्वतःहून) करायला बोटावर मोजण्याइतके लोक राजी असतात.
पोस्ट आवडली. परत एकदा तुमचे कौतुक !!
यासंदर्भात काम करणारी फेसबूकची एक कम्युनिटी आहे. ती पण मला आवडते.
http://www.facebook.com/pages/The-Ugly-Indian/123459791046618

अनघा, कमेंट अप्रूव्ह करताना खालच्या लाइन्स काढल्यास तरी चालेल.
मी स्वतःसुद्धा कुठेही गेले तरी माझ्याकडे २-३ कॅरिबॅग्ज ठेवते.
खाद्यपदार्थाचे रॅपर, कागद, बिल, तिकिटं असा कोणताही कचरा नेहमी कचर्‍याच्या डब्यात टाकते.
आणि जिथे डस्टबीन अवेलेबल नसतील अशा वेळी जवळच्या कॅरीबॅगमध्ये कचरा ठेवते
आणि घरी आल्यावर किंवा येताना वाटेतल्या डस्टबीन मध्ये टाकते.

Anagha said...

मोहना, हे मात्र अगदी खरं. अमेरिकेत त्यांना मुळातच स्वत:ची कामे स्वत: करण्याची सवय असते. आपण कचरा करू नये व केला तर ती जागा सोडताना स्वच्छ करून निघावं हा नियम ते आपल्यापेक्षा तरी बराच गंभीरतेने पाळतात.

Anagha said...


टिवटिव, ( :) ) शेवटच्या चार ओळी मला फार भावल्या ! म्हणजे माझ्याच सारखं वाटलं मला ! मी पण ठेवून देते पर्समध्ये काय असेल तो कचरा ! आणि हे इतकंच तर करायचंय आपल्याला नागरिक म्हणून...सतत. मग त्यात काय कठीण आहे ? नाही का ?
आणि त्या दिवशी चौपाटीवर अजून काही गट होते. आणि काम इतकं प्रचंड पडलेलं दिसत होतं, की एकटेपणा कुठल्या कुठे पळून गेला ! :)
आणि खूप खूप आभार. अजून पुढे जाऊन काही करायचा विचार आहे. बघू...कसं काय जमतं ते. :)

Anonymous said...

<>

सुहासची ही कल्पना आवडली.

रोहन... said...

अनघा.... सुशिक्षित म्हणजे सुसंस्कृत असे होत नाही आपल्याइथे.. :( दुर्दैवाने तसे संस्कार सर्वांवर होत नाहीत.. :) तुम्ही खुप छन काम केले आहे. मी तिथे असतो तर नक्की आलो असतो. आता ह्यात मी सहभागी होता येणार नसल्याने खरतर मला बोलायचा अधिकार तसा नाहीच म्हणा... की हे करायला पाहिजे आणि ते करायला पाहिजे वगैरे...

Anagha said...

मला वाटत नाही तसं रोहणा, कारण तुझ्या अनुभवातून तू काही प्रस्ताव मांडू शकलास चांगलंच होईल नाही का ? आणि तू जेव्हा इथे येशील तेव्हा तू सहभागी होऊ शकतोसच की ! :)

हेरंब said...

मला तुझं आणि संहिता/आदिती दोघींचंही म्हणणं पटतंय. काहीतरी सुवर्णमध्य काढता यायला हवा.

Anagha said...


हेरंबा, प्रयत्न चालू केला आहे... :)

Suhas Diwakar Zele said...

यावर्षी काय करायचं? काही ठरवूया का लवकर... :) :)

Suhas Diwakar Zele said...

काही कल्पना डोक्यात असतील तर नक्की सांग.... करू आपण ..