नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday 28 August 2013

का कोण जाणे...

आकाश स्वच्छ होतं. निळसर काळं. चंद्र गोल होता. वाटोळ्या दिव्यासारखा. दिवा आहे पण खांब नाही. असा. त्याच्या जवळचे आकाश उजळलेले. दूरचे ? अंधारलेले. काळोखी. त्या काळोखात एकही चांदणी नाही. का ? कोण जाणे. तो सगळा अवकाश त्या एकट्या चंद्राचा होता. कधीकधी आपल्याला नाही का वाटत ? एकटं असावं. गुमान बसावं. आतला आवाज ऐकावा. वगैरे वगैरे.
काल चंद्र दिसला. बऱ्याच महिन्यानंतर भेटला. असं होतं. साधी मान उंचावून वर करून बघण्याची तसदी घेतली नव्हती. त्याने एखाद दिवशी यायचंच नाकारलं असतं की मग धाबं दणाणलं असतं.
आयुष्यात वारंवार अमावस्या कोणाला हवी असते ?
चंद्राने रात्री उगवावं.
सूर्य येईस्तोवर दिवा चालू ठेवावा.
मग सूर्याने यावं.
प्रकाश, जीवन वगैरे द्यावं.
आम्ही जगावं.
घेत जावं.
देणं हे काम नेहेमी समोरच्याने करावं.
हे आमचं आयुष्याचं गृहीत आहे.
चंद्राच्या उपकाराचं मला ओझं झालं.
सूर्याचे उपकार कसे फेडू कळेनासं झालं.
उगाच मनात आलं…
दोघांना पोत्यात घालावं…
एक टेबल टेनिसचा चेंडू…
दुसरा फुटबॉलचा.
पाठीवर घ्यावं…
कुठे निघून जावं…
एकटं…
समुद्रात दोघांना भिरकावून द्यावं…
…मग आहेच…
रोजची अमावस्या. 

Sunday 18 August 2013

थोड़ा है थोड़े कि जरुरत है...

मंडळी,
आपल्या छोट्या मित्रमैत्रिणींना गणवेष पाठवण्याचे ठरवले आणि तुम्ही सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. गणवेषांची खरेदी झाली, पोच झाली आणि तरी आपले पैसे उरले ! मग आपण काही वेगळेच करण्याचे ठरवले. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र दुष्काळाची बोंब सतत ऐकू येत होती. मग जरा आसपास चौकशी केली. शबरी सेवा समितीच्या श्री. करंदीकरांना भेटलो आणि एक वेगळंच काम हाती लागलं.

पाण्याची साठवण. ज्या भागात पाऊस पडतो अशा भागात जर टाक्या बांधल्या तर त्यात पडणारा थेंब झेलता येईल, साठवता येईल ही संकल्पना.

आपण बहुतेकजण शहरात रहातो त्यामुळे आपले अज्ञान अफाट आहे ह्याची जाण होतीच. मग श्री. करंदीकरांच्या मदतीने एक पाडा गाठला. आणि तुम्हा सर्वांचे उरलेले पैसे पाण्याची साठवण करण्याच्या कामी लावले. १०,००० लिटर पाणी साठवले जाऊ शकते. ज्यावेळी कधी टाकीतील पाणी संपेल त्यावेळी पाणी मागवावे लागले तरी टँकरमधून येणारे पाणी पाड्यातील लोकं ह्या टाकीमध्ये साठवू शकतात ही अशा प्रकारे टाकी बांधण्यामागची अजून एक जमेची बाब.



महत्त्वाचे म्हणजे ही टाकी पूर्णत: लाभार्थींच्या श्रमदानाने उभी राहिली आहे. आपण ह्यात फक्त सामान पुरवले आहे. 

ह्या वर्षाचे आपण अंगावर घेतलेले काम फक्कड पार पडले आहे. तेव्हा ह्यातून स्फूर्ती घेऊन आपण पुढल्या वर्षी कोणते काम हाती घ्यावे…ह्याबद्दल सर्वांनी विचार करा…आणि अर्थात आम्हाला तुमच्या कल्पना कळवा.
ह्या अनुभवातून जे काही शिकलो, तुमचा विश्वास संपादन केला…त्यातून अशीच काही कामे अजून पार पाडू शकलो तर जगण्याला थोडा अर्थ प्राप्त करून देऊ शकू…
असे वाटते.

 
कामाची सुरवात… 







टाकी बांधताना वापरले गेलेले साचे

उरलेले पैसे सुपूर्त