नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday 28 May 2013

मैत्री आणि अर्थ

मैत्री, प्राजक्ताचं फूल वगैरे...
की मैत्री, सूर्याचे किरण ?
अंधारात प्रकाशाची ती रेघ…
की उन्हाची एक तिरीप आणि मैत्रीच्या नाजूक फुलाचा अखेरचा श्वास.

आयुष्यात मित्रमैत्रिणींची गरज कोणाला नसते ?
काही नाती आपल्याला चुकीचा मार्ग दाखवतात तर काही खोल गर्तेतून देखील सहजगत्या बाहेर काढतात.
आपल्या हातून सत्कृत्ये घडवून आणतात.
जगण्याला दिशा देतात.

मला दोन्ही अनुभवयास मिळाली.
आयुष्याचे धडे घेतले.
शहाणी झाले.
थोडीफार.

कुंभार घड्याला आकार देत असतो, त्यावेळी घडा किती वेदना सहन करतो.…कोण जाणे.

कठीण प्रसंगांमध्ये कोणत्याही मैत्रीकडून अर्थसहाय्य न लागणे हे उत्तम.
नाही तर आयुष्यभर जपलेल्या मैत्रीची नको इतकी लक्त्तरे निघतात.
कारण त्या 'अर्था' वर आपण मैत्रीतील 'अर्था'चे ओझे लादतो.

आपल्या भविष्याची, पुर्वसुचना न देता येणाऱ्या वावटळींसाठी आपण आपली कवचकुंडले निर्माण करावी.
आपल्या लाडक्यांना, आपल्यासाठी, आपल्या मैत्रीपुढे हात पसरायला आपण भाग पाडू नये.
अर्थात भाग आपण पाडत नाही.
भाग परिस्थिती पाडते.
मात्र अशी हतबल परिस्थिती आपली होण्यास आपणच जबाबदार नसतो काय ?

आपली मैत्री आपल्या माणसांशी असते.
आपल्या जिवाभावाच्या ह्या माणसांनी त्यांच्या आयुष्याची गणिते मांडलेली असतात.
तशीही सध्याच्या काळात प्रत्येकाने आपले, आपल्या कुवतीप्रमाणे गणित हे मांडलेलेच असावे.
आपल्या चुकलेल्या गणितांसाठी, वा आपण कधी गणित मांडलेच नाही म्हणून, कोणा मित्राकडे 'हातचा' मागावा लागू नये.  मैत्रीखातर आपल्याला 'हातचा' पुरवण्याने मग एकतर त्याचे त्याने मांडलेले गणित चुकते…
वा…
आपली इतक्या वर्षांची मैत्री…आणि त्यातून एक हातचा देखील उसना मिळू नये ?
असे घातकी विचार आपल्या मनात येऊ लागतात.

तशीही आयुष्य ही एक वजाबाकी.
आयुष्याच्या दिवसांची, रोजची वजाबाकी.
आणि परिस्थितीने निर्माण झालेली आपल्या भोवतालच्या मित्रांची वजाबाकी.
आपण थोडे जबाबदारीने वागलो, तर मात्र ही दुसरी वजाबाकी आपण थांबवू शकतो.

मैत्री आणि अर्थ.
मैत्रीचा अर्थ.
अर्थपूर्ण मैत्री.
मैत्री.
आयुष्याचा अर्थ.

तात्पर्य:
अर्थ आणि मैत्री.
आपण आपले दोन ध्रुवांवर ठेवावे.
खिळा मारून.
अढळ.

नाहीतर हातातील मधुर पेयामध्ये, आपल्याच हाताने विष मिसळल्यासारखे.

Sunday 26 May 2013

जिवंतपणाचे लक्षण...

तर मंडळी,
१३ मार्चला तुम्हाला हाक मारली होती. त्याला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. आणि म्हणून आपण हे काम पार पाडू शकलो.
सोबत फोटो जोडलेले आहेत. एकजुटीने आणि विश्वासाने एक मोठं काम हाती घेऊन ते पार आपण पाडू शकलो आहोत ह्याचा निखळ आनंद.

एक मात्र खरंच…आपली ६५० मुलं छानपैकी नवा गणवे
ष घालून शाळेत जाणार आहेत. आणि नवा कोरा गणवेष अभ्यास करायला कसा हुरूप देतो हे आपल्याला कोणी सांगण्याची गरज नाही. नाही का ?

मंडळी, ह्या
उपक्रमातून कमावलेला आत्मविश्वास, एकमेकांवरील विश्वास; गाठीशी धरून नव्या आव्हानांचा असाच पुढे शोध घेऊ…आयुष्याला अर्थ देऊ…

बस्स… अजून काय हवं ?



 
 
 
गणवेष मुलामुलींच्या अंगावर चढले ! शोभून दिसले !

Friday 10 May 2013

तत्त्वज्ञान !

का जे देवावर विश्वास ठेवतात, वार पाळतात, उपासतापास करतात, त्यांनाच नेमकी देवाची कार्यपद्धती पटताना दिसत नाही ? का त्यांना देवाची एखाद्या कृतीमागची भूमिका आवडत नाही ? देवाने हे असं का केलं ह्या विचारावर आपला वेळ व शक्ती वाया घालवताना ते का दिसतात ?

आणि त्या उलट उपासतापास, देवळेमंदिरे न करणारी माणसे; देवाचे विचार समजून घेऊन त्यानुसार आपले आयुष्य जगण्याचा प्रयत्न करताना का आढळतात ?

शेवटी देव हे एक आयुष्य जगताना मदत करणारे तत्वज्ञान आहे. देव कायम आपल्यावर लक्ष ठेवून आहे. तो कधीही आपल्याला एकटं टाकत नाही. फक्त तो जे आपल्या आयुष्यात घडवून आणतो, ते त्याने का घडवून आणले असावे, त्याची त्यामागची भूमिका काय असावी व जे काही घडतं त्यातून; आपण आपलं व्यक्तिमत्त्व, आपल्या माणसांच्या, समाजाच्या भल्यासाठी बदलू शकलो, घडवू शकलो तर आपल्या बऱ्यावाईट अनुभवांतून आपण काही शिकलो असे म्हणता येईल.

असो. 
मी समोरच्याला समजण्यासारखं काही लिहिलं आहे की नुसताच माझ्या विचारांचा गुंता समोर ओतला आहे…कोण जाणे !

शेवटी प्रत्येकाचं आयुष्य तेच ते जुनं तत्वज्ञान ओतत घोळत असतं.
पेला अर्धा रिकामा की भरलेला…वगैरे वगैरे.
फक्त हे तत्वज्ञान आपण आपल्या आयुष्याच्या कुठल्या पानावर शिकतो हे महत्त्वाचं.
नाहीतर पुस्तक छप्पन पानांचं.
आणि आयुष्याची ओवी पंचावन्न पानावर !