नमस्कार

नमस्कार

Pages

Friday 23 October 2015

थोडा है थोडे कि जरुरत है…३

मंडळी,
आपण हातात घेतलेलं हे तिसरं काम.

पहिलं काम होतं छोट्या मुलामुलींच्या गणवेषांचं.
म्हणजे शिक्षण.

दुसरं एका पाड्याच्या पाणी साठवणकरिता टाकीचे बांधकाम.
म्हणजे पाणीव्यवस्थापन.

आणि काल जे एक पाऊल टाकलं ते...मानसिक व शारीरिक अत्याचारातून गेलेल्या व नशीब बलवत्तर म्हणून 'मुक्ता बालिकाश्रम' येथे पोचलेल्या मुलींपाशी.
म्हणजे स्त्रीला सक्षम बनवण्यासाठी हातभार.

मंडळी,
आपण नक्की कुठे पैसे पाठवत आहोत व त्याचा विनियोग नक्की काय व कसा होणार आहे ह्याची माहिती, संबधित व्यक्तींना प्रत्यक्ष भेटून त्यानंतर मदतीचा निर्णय  घेण्याचा आपला प्रयत्न कायम राहिला.

कमीतकमी शब्दांमध्ये सांगायचं म्हटलं तर…
भयानक परिस्थितीतून बाहेर पडून इथे पोचलेल्या मुलीला फक्त खाऊपिऊ घालून 'मुक्ता बालिकाश्रम' थांबत नाही. अशा अनेक संस्था असतात ज्या सरकारकडून मिळणाऱ्या पैशासाठी वयाच्या अठरा वर्षांपर्यंत मुलाना सांभाळतात व त्यानंतर बाहेर सोडून देतात. इथे तसे होत नाही.
मनावर झालेल्या आघातांची तीव्रता आपण देऊ केलेल्या प्रेमातून कमी करून, त्या आघातांवर मात करून, जगात ठामपणे मुलींना उभे करणे हे मुक्ता बालिकाश्रामाचे कार्य. आपण जसे आपल्या मुलांचा कल ओळखून त्याला/ तिला पुढील आयुष्यात आपल्या पायावर उभे रहाण्यास मदत करतो, अगदी त्याच विचाराने ही संस्था चालवली जाते. इथे स्त्रीला सक्षम बनवले जाते.

कोणाला चित्रकलेची आवड, कोणाला अभ्यासाची आवड, कोणाला बुद्धिबळाचे अंग, कोणाचा आवाज डबिंगमध्ये जोरकस. सहा मुलींची लग्न करून दिली गेली आहेत. एक बालिका MBA करून आज नोकरीला लागली आहे. संस्थेच्या कार्यात तिचा हातभार हा नियमित असतोच. दुसरी ब्युटीशियनचा कोर्स करून आज स्वत:चा LAPTOP हातात घेऊन स्वतंत्र व्यवसाय व्यवस्थित सांभाळते आहे. प्रत्येकीमागे मुक्ता बालिकाश्रम उभा राहिला आहे. मुली स्वत:ची आर्थिक काळजी घेऊ शकल्या आहेत. आणि बाहेर पडल्या म्हणून मागे असलेल्या आपल्या बहिणींना त्या विसरलेल्या नाहीत. आजही एकमेकींशी सतत संवाद साधत असतात.

२००५ पासून संस्था कार्यरत आहे.
आज आपण त्यांच्या ह्या कामात खारीचा वाटा उचलला आहे.
एकूण ८४००१/- आपण गोळा केले. काल त्यांच्याकडे आपण सर्व चेक्स सुपूर्त केले.
प्रत्येकाच्या नावाच्या रीसिटा आम्ही आणल्या आहेत.
८०G समवेत.

आणि हो !
एक सुंदर शुभेच्छापत्र व डोलणारे कानातले देखील मिळाले !














ह्या संस्थेबरोबर पुढील तीन वर्ष आपण काम करावयाचे आहे. आपण एक लक्षात ठेवायचे आहे. ते म्हणजे त्यांची गरज ही फक्त पैश्यांची नाही.
दिवाळीच्या सुट्टीत मुलींना इंग्रजी बोलणे शिकायचे आहे.
एका मुलीला UPSC ची परीक्षा द्यावयाची आहे.

गौरी बार्गी, नीता नायक, हेरंब ओक, सागर नेरकर, धुंडीराज सकपाळ , सचिन पाटील, भाग्यश्री सरदेसाई, अॅडव्होकेट राजीव फलटणकर, डॉ. कुंदाताई जोगळेकर, दीपक परुळेकर, हेमंत आडारकर, हिनल जाधव, सुचेता पोतनीस, सौरभ बोंगाळे आपण सर्वांनी एकत्र येऊन हे कार्य हातात घेतलं आहे.
विश्वासाने पुढे जाऊ हे नक्की.

आज आपण पैसे दिले…कोणी वेळ देऊ शकत असेल तर बाहेरच्या जगात खंबीरपणे उभे रहाण्यासाठी आपल्या मुली शिकायला आनंदाने तयार आहेत !
:)














Tuesday 16 June 2015

माझी मी...

हल्ली रडूबिडू येत नाही असं एक क्षण वाटतं…

आणि स्वत:बद्दल तशी खात्री होताहोता एखादा चित्रपट समोर येतो आणि अख्खं थेटर जिथे खदखदुन हसत असतं तेव्हा हमसाहमशी रडताना माझी मीच मला सापडते…

आणि मग काही कळेनासं होतं.

दुसऱ्यांना ओळखायचं राहिलं बाजूला, आपण स्वत:ला ओळखत नाही हेच खरं.
समोरच्याला ओळखणं थोडंफार जमू शकतं कारण आपल्या समोर ती व्यक्ती असते.
त्याचा/तिचा चेहरा, त्याचे/ तिचे शब्द आपल्या समोर कानात रुंजी घालत असतात. 
आपण त्याचं विश्लेषण करण्याचा निदान प्रयत्न करू शकतो.

पण आपला चेहरा हा नेहेमीच आपल्यापासून लपून बसलेला असतो.
आपले डोळे आपल्याशी तर कधी बोलत नाहीत.

आपणच आपला मेंदू कापून, चिरफाड वगैरे करून आपल्या समोर मांडला तर काही हाती लागण्याची शक्यता कमी आहे. तठस्थ रहाता आलं पाहिजे.

हे सगळं अर्थहीन विचारमंथन का बरं ?
सगळीकडे बांडगुळासारख्या फुटलेल्या झोपड्या बघून मी उद्गारले, "गरिबांबद्दलचा माझा कळवळा वगैरे आटला आहे  !"

आणि मग ?

मग काल तमिळ सिनेमा बघितला.
काका मुत्ताय ( उच्चार चुकला असण्याची शक्यता मोठी )
सिनेमागृह हसत होतं.
टाळ्या वाजवत होतं.

मी हमसाहमशी रडत होते.
हुंदके मला आवरत नव्हते.
ते काय ते काजळ वगैरे लावलं होतं ते बहुधा काळ्या ढगातून पाणी कोसळल्यावर ढग जसे विस्कटून जातात…तसंच झालं असणार.

त्या पिल्लुच्या थोबाडीत लगावली गेली...
...आणि माझी खुर्ची हादरली.
त्याचा तो एक अश्रू मला कोसळवून गेला.
वाटलं…. वाटलं ते पिल्लू माझ्या कुशीत हवं…

आता माझ्या घशाखाली कधीही पिझ्झा जाऊ शकत नाही.

मी मला ओळखत नाही...


Friday 12 June 2015

भोग...

त्या थेंबाची गेल्या वर्षी जन्माला आलेली भावंडं नशीबवान होती म्हणायची.
ती मुक्त, मोठ्या ओढीने झेपावत. लाल मातीत मिसळून जात.
माती शहारे. थेंब आणि माती एकजीव, एकरूप होऊन जात.
त्यांचे ते मूक मिलन मला आनंद देऊन जाई.

परंतु…
आज ती माती राहिली नाही.
ओरबाडून टाकली गेली. होत्याची नव्हती झाली. 
सिमेंटची करडी, टणक जमीन आली.

वेडे थेंब मात्र त्याच ओढीने झेपावले.
जमिनीवर आदळले.
कपाळमोक्ष झाला.

कर्म कोणाचे…
भोग कोणाला…

आंधळे थेंब !


Friday 24 April 2015

एक दिवस

खरं तर रोजच्यासारखा एक दिवस.
म्हणजे अगदी वाऱ्याची एक झुळूक आली.
आणि एक पिंपळ पान हललं.
मग दुसरी झुळूक आली.
आणि दुसरं पान हललं.
हा असा एक दिवस.
कालचा.

शहराच्या टोकावरचा समुद्रासमोर रस्त्याचा, अंधारा कोपरा.
एका लांबसडक गाडीच्या पाठीवर पहुडलेला एक कुत्रा.
आणि त्याच्या अंगावर अतीव ममत्वाने हळुवार हात फिरवणारा त्या गाडीचा तरुण मालक.
कुत्र्याचे अर्धोन्मिलित डोळे.
आणि तरुणाचा हलके स्मित फुटलेला चेहरा.
जलरंगाचाचा एक नाजूक ठिपका ओल्या कागदावर सोडून द्यावा.
आणि क्षणार्धात तो कागद पांढरा न रहाता त्या रंगाचा होऊन जावा.

स्पर्श.
 
परतीचा रस्ता.
समुद्राला डाव्या हाताला पकडून.

लांबसडक रस्ता रात्रीच्या अकरा वाजता एका रांगेत भरून गेलेला.
समुद्राकडे तोंड करून असंख्य माणसे. 
मी गाडीतून उतरले.
बघ्यांच्या गर्दीत शिरले.
खाली पसरलेल्या दगडांच्या विसाव्याला एक मृत शरीर आलं होतं.
कुठला माणूस ?
कुठला किनारा ?
आणि कुठले दगड !
त्या दगडांनी त्या माणसाचे मरणोत्तर वहावत जाणे थांबवले होते.
अर्धी चड्डी. 
उघडे शरीर.
फुगलेले. 
पोलिसांनी टाकलेल्या प्रकाशात स्पष्ट दिसणारे.
ओला मानवी देह.
पातळ हातमोज्यांमधले पोलिसांचे सुरक्षित हात.
मृत देहाचा स्पर्श मर्यादेत ठेवणारे.

स्पर्श.

"जरा बोटं मोड ना !" तू.
पायाची बोटं खेचली की हाडं वाजतात.
त्यातून तुला काय बरं वाटायचं कोण जाणे.
कधीकधी हातात नेलकटर घेऊन तुझी पायाची नखं एकाग्र चित्ताने कापणारी मी.
तो तुझ्या पायांचा स्पर्श.


आणि मग शरीर झाकलेल्या चादरीवरून, माझ्या हाताने चाचपडलेली तुझ्या पायाची बोटं.
परदेशातील पोलिसांसमोर.
'हा माझाच नवरा'…
संपूर्ण झाकलेले शरीर देखील माझ्या नवऱ्याचेच आहे असे सांगणाऱ्या कागदावर खात्रीपूर्वक सही करणारी मी.

आणि तीरपांगडा दिवस अंगावर झेलून, रात्रीच्या मिट्ट काळोखात पांढरेशुभ्र कुरमुरे एकेक करत तोंडात टाकणारी मी.



Monday 16 March 2015

गुलाबी

चंदेरी गाडी घरून निघाली.
रस्त्यातलं ओळखीचं झाड कालपरवापर्यंत रिकामं झालं होतं.
पिंपळाचं.
आज त्यावर गुलाबी स्वप्न उगवली होती.
नाजूक.
सूर्य ती स्वप्न जपेल.
जोपासेल.
कधी ना कधी ती स्वप्न जून होतील.
सूर्य कठोर होईल.
स्वप्न उखडून टाकेल.
पुन्हा नवी स्वप्न उगवायला…
त्या झाडात तेव्हढी ताकद तरी शिल्लक राहील का ?

गाडी पुढे निघाली.
गल्लीत ती नटून उभी होती.
त्याच पिंपळी गुलाबी रंगाचं आवरण…
ओठांवर चढवून.
तो रंग ओरबाडून टाकणारा…
मात्र तिचं पोट भरणारा…
कोणी गिऱ्हाईक तिला आज मिळेल काय ?



Saturday 7 March 2015

दोरी...

वेगवेगळे विचार ऐकायला मिळतात.
त्यावर थोडा विचार केला की त्यातला कुठला विचार आपल्या मनाला पटतो आहे हे कळतं.
आणि मग आपण नक्की कुठल्या बोटीत बसलो आहोत ह्याची जाणीव होते.

देशभरात बंदी घातलेली डॉक्यूमेंटरी काल बघितली.
'India's daughter'

ही डॉक्यूमेंटरी बघितल्याने मला काही नवे ज्ञान झाले काय ?
माझ्या देशातील पुरुषांबद्दल मला काही नवीन कळले काय ?
ह्या डॉक्यूमेंटरीमुळे जे आजपर्यंत कोणालाही ज्ञात नसलेले ज्ञान आता जगाला मिळाले काय ?
फक्त माझ्याच देशातील पुरुष डॉक्यूमेंटरीमध्ये दाखवल्याप्रमाणे विचार करतात काय ?
पुरुष ह्या प्रकारे विचार करतात त्यामागे जबाबदार कोण ?
एखादा मुलगा जन्माला येऊन तो समाजात वावरायला लागण्यापर्यंत, त्याच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी कोणाची ?

त्या मुलीला धडा शिकवण्यासाठी तिचे असे हाल केले गेले असे तो फाशीची शिक्षा झालेला गुन्हेगार म्हणाला.
तिने जर विरोध केला नसता तर ती आज जिवंत असती. इतक्या उशिरा ती तिच्या मित्राबरोबर बाहेर काय करत होती ? हे वागणंच चुकीचं आहे. त्याचे विचार आजही कायम आहेत.
आणि समजा ह्याचे शिक्षण वा वावर रंजल्यागांजलेल्या वस्तीत झाला असे म्हटले तर ह्या गुन्हेगाऱ्याच्या वकिलाचे विचार देखील तेच होते. त्याची मुलगी समजा हे असे काही करताना जर आढळली तर तिला तो जाळून टाकेल असे काहीसे तो म्हणाला. तिला शिक्षा करणे ही त्यांची नैतिक जबाबदारी.

आपल्या आई, बहिण वा पत्नीला समाजात वावरताना कुठलेही भय वाटू नये असे वातावरण निर्माण करणे ही मात्र कुठल्याही पुरुषाची जबाबदारी नाही.

शीला दीक्षित म्हणाल्या, "तुम्ही मुलांना वाढवीत असताना तुमचा मुलगा आणि मुलगी ह्यात कायम फरक करीत असता. त्याला पेलाभर दुध आणि तिला निम्म्याहून कमी दुध हे प्रकार सर्व घरात सर्रास चालतात. ह्यातून तुम्ही त्या मुलीपेक्षा तो श्रेष्ठ आहे हेच तर त्याच्या मनी बिंबवत जाता ना ?"

ह्यामागे काय असावे ?

म्हातारपणी मला मुलगाच बघणार आहे. 
मुलगी तर लग्न करून दुसऱ्या घरी जाणार आहे.
हा विचार ?

"मेरे दो बेटे हैं." मेरठवरून दिल्लीला परतताना मला देण्यात आलेल्या गाडीचा चालक गप्पा मारत होता.
"बडा थोडा खेलकूद में ज्यादा वक्त गुजारता हैं. पर छोटा पढाई में एकदम आगे है. क्लास में दो लडके हैं. पहला नंबर लाने के लिये इन दो बच्चों में आगे पीछे चलता रहता है."
"बढीया है. पर जो बडा बेटा है उसे कौनसे खेल में ज्यादा दिलचस्पी है ?"
"ज्यूडो कराटे."
"हमको ये ध्यान में रखना चाहिये कि हम जिनको बडा कर रहे हैं वो थोडेही सालों में घर के बाहर कदम रखने वाले हैं और बाहर कि दुनिया को हमारे बच्चो से कोई खतरा ना हो." हे माझ्या तोंडून बाहेर पडलं ह्याच्या मागे काय कारण असावं ? विचारल्याच्या पुढल्या क्षणाला मी विचारात पडले होते.
"हा… हा… वो बात तो एकदम सही हैं. हमें सिर्फ अपने बुढापे में देखभाल करने के लिये अपने बच्चों को बडा नही करना चाहिये. संस्कार तो देनेही चाहिये."

कुठल्याश्या एका गल्लीत दोन पुरुष लहानाचे मोठे होत आहेत.
त्यांना चांगले नागरिक घडवण्याची जबाबदारी ज्याने मोठ्या आत्मविश्वासाने अंगावर घेतली आहे; असा माझ्या देशाचा एक नागरिक माझ्या समोर बसला होता.

माझ्या मनावर भयाचा पगडा अधिक आणि व इतरांवरच्या विश्वासाला उतरती कळा लागली आहे.
माझ्या बोलण्यातून हे माझ्या लक्षात आले. 

मला मुलगी आहे.
तिला वाढवताना आपण धोकादायक समाजात वावरत आहोत हे भय वा ही जाणीव ठेऊनच मला तिला वाढवायला लागलेलं आहे.
पण हे तर जगाच्या पाठीवर मला कुठेही करायलाच हवंय नाही काय ?
दुबईत असताना काय माझी लेक सुखरूप होती ?
आम्हा दोघींच्या बाजूने जाताना अरबी माणसाने त्याच्या भाषेत काहीतरी अश्लील शब्द उचारले आहेत हे ती भाषा न समजून देखील मला आणि तिलाही कळले.
हा अनुभव एकदा वा दोनदा नव्हे, तर आम्ही दोघींनी बऱ्याचदा घेतला.

"ज्यांची मुले हे अशा प्रकारचे घृणास्पद गुन्हे करतात त्यांच्या आयांना शिक्षा द्यायला हवी." माझी मोठी बहिण ताडकन म्हणाली.
"सकाळी मुलाला उशिरापर्यंत झोपून देणे आणि मुलीला मात्र लवकर उठून काम करायला लावणे, जेवायला वाढताना त्याच्या ताटात कोंबडीचे तुकडे देणे आणि लेकीला फक्त रस्सा देणे, हे काय आहे ? ह्याच विचारांतून तर हे असे पुरुष तयार होतात !"
"मला वाटत नाही की आपल्या मुलाला कसे वाढवायचे ह्याचे विचारस्वातंत्र्य कुठल्या बाईला मिळत असेल." मी म्हटले.

एकदा कानावर पडलेली लघुकथा आठवली. त्यातली एका भावाची शिक्षणासाठी झुरणारी बहिण आणि तिचे दु:ख समजून घेणारा भाऊ. त्यांचे वडिलच तर त्या मुलीच्या शिक्षणाच्या आड येत होते. आणि त्यांच्या आईला तिचे दु:ख कळून देखील आपल्या नवऱ्यापुढे तिचे काहीही चालत नव्हते.

'आपल्याला मुलगा आहे आणि आपल्या बहिणीला फक्त तीन मुलीच आहेत' ह्याच्यात आपण काही फार मोठा तीर मारला आहे अशा पद्धतीत माझ्या सख्ख्या मावशीने माझ्या आईचा केलेला अपमान मी स्वत: अजून विसरले नाही. बहुधा माझी आई हे कधीच विसरून गेली असावी. शेवटी आईच्या तिन्ही मुली स्वत:च्या पायावर व्यवस्थित उभ्या राहिल्या आणि मावशीचा मुलगा दारू पिऊन अवेळी मरून देखील गेला. त्याला वाढवताना मावशीने आणि तिच्या नवऱ्याने केलेल्या चुका तेव्हा नाही पण आता कळतात. आणि माझ्या आईवडिलांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय त्यावेळी जरी अजिबात आवडले नाहीत तरी आज त्या निर्णयांमागची भूमिका कळते.

म्हणतात वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत जे संस्कार होतात ते आयुष्यभर आपल्या बरोबर रहातात. आणि त्या कालावधीत मूल आपल्या आईच्या कुशीत अधिक असते. 

म्हणजे त्याच्यावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी फक्त तिची ?
सगळ्या वाईटाचे ओझे तिचेच ?

अशा बलात्कारी मुलाला वाढवण्यापेक्षा त्याच्या जन्माक्षणी मी त्याच्या नरडीला नख का लावले नाही असे त्या मातेला का वाटू नये ?
त्या उलट 'माझ्या मुलाला / नवऱ्याला फाशी दिल्याने काय बलात्कार थांबणार आहेत' ? हे असे उफराटे प्रश्न तिला व त्याच्या बायकोला पडावेत ?

आणि… ही बंदी का ?
तुम्हाला तुमचा चेहरा समोरच्या आरशात दिसला म्हणून ?

हल्ली कोणाच्या पोटी जिजाबाई जन्माला येत नाही.
त्यामुळे शिवाजी जन्माला येण्याचा प्रश्न उद्भवत नाही !

वाटतं...

जिच्या हाती फाशीची दोरी ती जगाते उद्धारी !