नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 12 July 2011

वाफारा

मरणप्राय वेदना. डोकेदुखी. मेंदूत एखादी बारीकशी गाठ झाल्याने ज्या वेदना होत असतील त्या वेदनांचे भान ठेवून इतकेच म्हणेन की माझ्या डोकेदुखीच्या वेदना देखील थोड्या अती होत्या. एखादी तान मंद स्वरात कानी पडावी आणि हलकेच चढत जाऊन अगदी तारस्वरात जाऊन पोचावी अशी काहीशी ती वेदना होती. डोक्यात कुठे तरी काहीतरी गडबड चालू होती व त्याचे बाह्य स्वरूप म्हणून त्या कळा. नाहीतर त्या अंतर्गत घडामोडींचे ज्ञान मला कुठून होणार ? घसरत पलंगाखाली गेलेली एक सपाता काढण्यासाठी वाकणे देखील अशक्यप्राय. नुसती मान खाली केली तर सर्दी नसताना देखील सर्रकन नाकातून पाण्याची धार.

स्वत:साठी डॉक्टरांकडे जाणे हे एक स्वयंपाकघरात जाऊन
एकटीसाठी साग्रसंगीत जेवण करण्याइतकेच कठीण काम. कधीकाळी गेले होते त्यावेळी सायनसचे निदान केले होते व त्यानुसार औषधे लिहून दिली गेली होती. कपाळावरची कुठलीशी शीर हे असे पाणी साठवून घेत होती व मी वाकले की नळ सोडावा अशी धार सुटत होती. सर्दीबिर्दी थोडी देखील नाही.

औषधे नेहेमीच कोणी प्रेमाने दिली की त्या प्रेमाच्या धाकाने घेतली जातात. स्वत: उठून नियमित औषधे घेणे म्हणजे आपण जगण्याचा उगा हट्ट करतोय...असं काहीसं वाटू लागतं. अर्थात आपण जर नीट औषधे घेतली नाहीत तर आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना नसता त्रास होईल ह्याची एक बोच मनी असतेच. पण ती बोच नेहेमीच 'सेल्फ गिल्ट' ह्यात मोडते. अशा ह्या 'आत्म बोचणी' चा एक गगनचुंबी थरच माझ्या डोक्यात वास्तव्याला आहे. आणि ही बोच काही नियमित औषधे घेण्यास तितकीशी प्रवृत्त करत नाही.

आणि मग ती विचारांची घोडदौड...दिशाहीन.
गेल्याच महिन्यात सख्खी मैत्रीण मेंदूतील एका अशाच गाठीचं निमित्त होऊन सरळ निघूनच गेली आहे. मग काय ? कोण आवरणार त्या मोकाट घोड्याला ?
...आपण आता मेलो तर नक्की कोणाचं काय नुकसान होईल...आपल्या माणसांना आपण दु:खाची खाईत वगैरे ढकलू हे ठीक आहे...त्यावर काळ हे थोड्याबहुत प्रमाणात उत्तर असते...परंतु, आर्थिक खाईत तर आपण आपल्या माणसांना ढकलणार नाही ना...हे अधिक महत्त्वाचे. आपण आपले मृत्यूपत्र नेमके बनवले आहे की नाही...आपल्या जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या आहेत की नाही वगैरे वगैरे...दुखऱ्या मेंदूला अगदी किसणीवर घेतल्यासारखे...खरवडून बारीक कीस.

"मला जरा पाणी गरम करून देतेस का ? मी वाफारा घेते." दृश्य स्वरूपात नसलेल्या सर्दीला देखील वाफारा घेऊन बरे वाटेल अशी आपली एक आशा. लेकीने गरमगरम पाणी आणून दिलं. आणि एक पंचा. मी पंच्यात डोकं खुपसलं.

मंचावर बसलेल्या भांड्यातील पाण्यात
काही क्षण तरंग निर्माण होत होते. मग ते हलकेच स्थिर झाले. त्या ऊन पाण्यातून सगळी कोंदटलेली उष्णता हळुवार बाहेर पडू लागली. चेहेऱ्याला स्पर्श करू लागली. मी डोळे हलकेच मिटले. त्या दाटलेल्या उष्ण भावनांचा तो कोमट स्पर्श...दुखऱ्या कपाळाला झाला. आणि नस न नस मोकळी होऊ लागली...कोण ती कुठली एक सुजरी नस..त्या उबदार जिवंत ओंजारगोंजारण्याने सुखावली...मोकळी मोकळी झाली...हळुवार, शांत झाली.

हे इतकंच तर हवं असतं... त्या दुखऱ्या जाणीवेला.

Saturday, 9 July 2011

'वॉटरप्रुफ' यश

ब्रिटीश कॉन्सिलच्या भारतातील 'यंग क्रिएटिव्ह आंत्रप्रिनॉर' स्पर्धेत माझी मैत्रीण फायनलिस्टमध्ये आहे. वंदना नातू घाना. आणि त्या तिच्या प्रवासात माझा थोडा हातभार. म्हणजे खारीचा वाटाबिटा.

इथे ब्रिटीश कॉन्सिलची आणि आमच्या ज्या कामाचा तिथे उल्लेख आहे त्याची लिंक देत आहे. आधीही इथे ती लिंक दिली होती...परंतु, ह्या यशाबरोबर पुन्हा एकदा....
:)

यंग क्रिएटिव्ह आंत्रप्रिनॉर
रेनोल्ड्स वॉटरप्रुफ मुंबई

Friday, 8 July 2011

डबके

ती मान खाली घालून फुटपाथावर बसली होती. पावसाची जोरदार सर नेमकी त्याच वेळी का यावी हा एक चिडका प्रश्र्न मनात घेऊन. कालच निळे प्लास्टिक कसेबसे मिळवले होते. गळणाऱ्या झोपडीवर घातले होते. पाण्याची डबकी अस्ताव्यस्त पसरलेली दिसत होती. त्यात पडलेली पिवळ्या दिव्यांची प्रतिबिंबे. गोल गोल..नाजूक. वाटले, ते उचलून घ्यावे...आणि बाजारात विकावे...पिवळे चमचमते हिरे. अचानक त्या डबक्यात वरून थेंब पडू लागले. उमटणाऱ्या लहरी. सगळे हिरेच फुटले. पाण्याने एक क्षण मन शांत करावे आणि वरून अजून एक थेंब टपकवा आणि पाणी थरारून उठावं...पुन्हा तेच...एक क्षण शांत व पुन्हा थैमान. तिची नजर पायाजवळील डबक्यावर पडली. तिला तिचे प्रतिबिंब दिसले...एकच क्षण आणि वरून अकस्मात चारपाच थेंब त्याकडे झेपावले आणि पाणी थरारून उठलं. त्या थेंबांना त्या शांत पाण्यात कोसळताना धीर नव्हता...ते डबकं आत्ता कुठे श्वास घेत होतं...एका संकटातून बाहेर आल्याच्या सुखात एक निश्वास टाकत होतं...आणि पुन्हा तेच...पुन्हा नवीन संकट...आणि पुन्हा उलथापालथ...
डाव्या बाजूने भर्रकन एक गाडी गेली व तिने ते अख्खं डबकं तिच्या अंगावर उडवलं...
एक डबक्याच्या आयुष्यातील सर्व थरार थांबले...ते आयुष्यातून उठलं...
पुढल्या क्षणाला दुसरीकडे जन्म घेऊन परत एकदा जगायचा प्रयत्न करू लागलं...
डबक्याचे आयुष्य ते...माझ्यासारखे उकिरड्याचे थोडे...माश्या घोंघावत. तिने तिरस्कारात मान झटकली.
समोर चार पोरं. आपण गोरे आणि ही सगळीच्या सगळी अशी काळी ठिक्कर. अंगावर घालायला कपडा नाही. नाचतायत पावसात. नुसता दंगा माजलाय ! खिदळतायत साली ! उड्या मारतायत !

...आता ह्या तुफान पावसात ह्या गळक्या घरात काय गिऱ्हाईक येणार ?

...हा साला पाऊस तर धंद्यावर येतो !

Monday, 4 July 2011

विषवल्ली...भाग ६

विषवल्ली...भाग १
विषवल्ली...भाग २
विषवल्ली...भाग ३
विषवल्ली...भाग ४
विषवल्ली...भाग ५

मग तशीही काही वर्षे उलटली. लीनाला ना कधी भाड्याने घर मिळाले. ना ती कधी प्राजक्ताला घेऊन एकटी कुठे राहू शकली. लीनाच्या वडिलांनी कधी नव्हे ते अनेक देव केले. लीनाच्या आईने लीनाच्या हातात रामरक्षा ठेवली. तिला मन शांत राखणे गरजेचे होते म्हणून. लीनावर अन्याय झाला की नाही ह्याचे उत्तर शोधायचा कोणी कधी प्रयत्न केला नाही.

जर आता मनीष परगावीच रहाणार आहे तर निदान म्हणून तरी लीना-प्राजक्ताला त्यांचे घर रहावयास मिळावे अशी मागणी मग लीनाने मनीषपुढे मांडली. कधीकधी नशिबाची चक्र वेगळी पडतात. काही वर्षांपूर्वी अशक्य वाटणारे दरवाजे आपोआप उघडताना दिसतात. मनीषने लीनाची विनंती मान्य केली. लीनाला तिच्या घराची किल्ली जवळपास / वर्षांनी मिळाली.
"आई, आता आपण इथेच राहायचं ?"
"हो बाळा. आपण आता आपल्या घरी राहायचं."

त्यानंतर किती प्रलय आले. किती भूकंप झाले. लीना नाही बदलली. मनीष प्रथम मनाविरुद्ध घरी परतला. पण आता लीनाने सर्व बळ एकवटले होते. घर, नोकरी आणि लेक ह्या सर्वांमधील तारेवरची कसरत तिने झेपवून नेली होती. मनीष सर्व बघत होता. प्राजक्ता तिच्या घरी खूष होती. अभ्यास, खेळ...बालपण सर्वांगाने फुलत होतं. त्या मायलेकींना पुन्हा घराबाहेर तो काय म्हणून काढणार होता ? जेव्हा प्राजक्ता बाळ होती तेव्हा आई बाबांना घट्ट मिठी मारायला सांगायची स्वत:ला मध्ये गुरफटून घ्यायची...आणि बोबड्या शब्दांत 'सॅन्डी सॅन्डी' करून टाळ्या वाजवत रहायची. आता बऱ्याच वर्षांनी जेव्हा प्राजक्ताला तिचं 'सॅन्डवि' परत मिळालं तेव्हाही ती तशीच टाळ्या वाजवत राहिली...तिचं कालियामर्दन सफल झालं होतं...जणू ती त्याच आनंदात होती.

काही वर्षे उलटली. मनीष, लीना प्राजक्ता ह्या तिघांनी मिळून जगभर भटकंती केली.

परंतु, बहुधा तो संसारच मुळी दृष्ट लागलेला होता. सुख हे धुके ठरावे असे मनिषचे दारूचे व्यसन हळूहळू वाढले. पुन्हा रोज पिऊन मनीष घरी परतू लागला. वा कधी त्याचे मित्र त्याला दारी आणून टाकू लागले. शेखर गौरी मनीषच्या आधीच परगाव सोडून शहरात परतलेले होते. मग लीनाने पुन्हा शक्ती एकत्र केली. डॉक्टर केले. इस्पितळे केली. दारू सोडवण्यासाठीचे सगळे उपाय केले. परंतु, दारू हे एक व्यसन नव्हे. तो एक रोग आहे. रोग सुटत नाही. तो बळावतो जीव घेऊनच विसावतो. ते मायावी द्रव्य मनीषच्या पोटाची चाळण करत होतं...आणि एक दिवस लीना प्राजक्ताच्या नशिबालाच छिद्रे पडली त्यातून मनीष निसटून गेला.

पुन्हा सर्व मित्र गोळा झाले. लीनाला भेटावयास आले. मनीषच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याच्या गोष्टी करू लागले. परोपरीने तिने एकच विनंती केली...मला थोडा वेळ द्या.

काही महिने गेले. आजपर्यंत सर्व संकटात स्वत:ची नोकरी सांभाळण्याचे तंत्र म्हणजे लीनाच्या हातचा मळ झाला होता.
एक दिवस लीनाने घरातील उंच स्टूल खेचले वर चढली. उंच कपाटात व्यवस्थित ठेऊन दिलेली मनीषची चित्रे तिने खाली उतरवली. गादीवर सर्व मांडली. काही चित्रे होती. काही चित्रे लीनाकडे होती. जपून ठेवलेली. तर काही परगावी असताना मनीषने शेखरच्या ताब्यात दिली होती. लीनाच्या हे लक्षात आले.
"अरुण, सर्व चित्र नाहीयेत घरात. मला वाटतं काही शेखरकडे आहेत. त्याच्याकडून आणा मागून. मग सर्व नीट एकत्र करून भरवू आपण प्रदर्शन." तिने मनीषच्या दुसऱ्या एका जवळच्या मित्राला कळवले.
"हो काय ? चालेल. मी करतो त्याला फोन. आणतो त्याच्याकडून चित्र."
लगेच दुसऱ्या दिवशी अरुणने शेखरला फोन केला.
"अरे, तुझ्याकडे चित्र आहेत ना मनीषची ?
"हो. आहेत. काही चित्र आहेत माझ्याकडे."
"मग मी कधी येऊ तुझ्याकडे ? मी घेऊन जाईन ना चित्र. प्रदर्शन भरवायचंय त्याच्या चित्रांचं."
"देईन ना...मी चित्र नक्की देईन. पण एका अटीवर."
"अट ? ह्यात अट कसली ?"
"लीनाला सांग मला फोन करायला. मी फक्त तिच्याचकडे चित्रे देईन."

"लीना, त्याने तुला फोन करायला सांगितलाय."

लीनाने लाचार व्हायचे होते. गत नवऱ्याची चित्र शेखरकडे गयावया करून मागून घ्यायची होती. तिने शेखरवर केलेल्या मायेचा शेखरने एकदा अपमान केला होता. तिने शेखरसाठी एका वहिनीची, एका बहिणीची त्याचप्रमाणे एका मैत्रिणीची भूमिका अतिशय ताकदीने निभावली होती. त्याच शेखरच्या मनातील विषारी अजगराने लीनावर विखारी फुत्कार टाकला होता.

आज पुन्हा एकदा नियतीच्या परीक्षेत शेखर सपशेल नापास झाला होता.

एका अगतिक क्षणी लीनाचा फायदा उठवण्यास धजू शकणारा शेखर आज पुन्हा एकदा त्याच पायरीवर विषारी जीभ लवलवत अधाशी मनाने उभा होता...तिचा पुन्हा अपमान करण्यासाठी.
"आई, जाऊ दे. राहू दे बाबांची चित्रं."
आता मोठं झालेलं ते बाळ सर्व समजून गेल्यासारखं बोललं.
"बाळा, तुला वाटतं मी त्याला करेन फोन ? तो बाबांचा जर खरा मित्र असता तर हे असं तो वागलाच नसता नाही का ? हे मला कधीच कळून चुकलंय....बाबांनी हे समजून समजल्यासारखे केले...आयुष्यभर..."
प्राजक्ता आता मोठी झाली होती...जगाची बदलती गणित तिला लवकर समजून येत होती.

चित्रे ती. शेखरच्या कपाटात पडून राहिली. कधीतरी स्वत:च्या घरात परत जाण्याची वाट पहात. मरण का कोणाला टळले आहे ? जसे ते तिला येईल तसेच ते एक दिवस शेखरला देखील येईल. मधुमेहाने त्याला ग्रासले. एक पाय लंगडा झाला. दीड दिवसांचा गणपती तो लंगडत लंगडत घेऊन येतो, काय त्यावेळी त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीत जीव असतो ?

ही गोष्ट, कधीच मनीष आणि लीनाची नव्हती. ती शेखर लीनाची होती. ती प्रारंभी एका भाबड्या प्रेमाची होती. बहिणीने भावावर करावे तसे ते लीनाचे प्रेम होते. त्याच्या पडत्या काळात तिने ते नाते बहिणीसारखे जपले. परंतु, गोष्टीने एक वळण घेतले त्या प्रेमाचे निरागस पंख गळून पडले. आत इतकी वर्षे लपून बसलेले काटेरी पंख भस्सकन लीनाच्या अंगावर झेपावले. एका फटकाऱ्यासरशी त्या निरागस नात्याची राखरांगोळी झाली.

चूक कबूल करून ती सुधारू द्यावी जगू द्यावे हे एका स्त्रीने आपल्या जोडीदाराला केलेले आर्जव.
स्वत:ची काहीही चूक नाही ही अहं भावना गोंजारून तिला झिडकारून लावणारा एक पुरुष.
आणि निखळ मैत्रीचे नाते विसरून क्षणार्धात आपले असली रंग दाखवणारा दुसरा पुरुष.

डोळ्यांसमोर येतात ती काळी करडी धूसर चित्रे. कधी चित्रांमधून दिसणाऱ्या सैतानाची. तेच ते लपवलेले तीक्ष्ण दात, लालबुंद डोळे, वेडीवाकडी टोकदार नखे असलेली किळसवाणी बोटे.

ही माणसात लपलेल्या सैतानाची गोष्ट. घराघरात लपून बसलेल्या भेकड भस्मासुराची गोष्ट. फक्त वासनेची भाषा बोलणाऱ्या हैवानाची गोष्ट. बेसावध सावजावर झेप घालते...त्या हपापलेल्या पालीची ही गोष्ट.

कित्येक वर्षांपूर्वी, मनीषने काही बिया लीनाच्या हाती टेकवल्या होत्या...सुगंधी रोप आहे म्हणून सांगितलं होतं...लीनाने बिया कुंडीत पेरल्या...खतपाणी केलं...कोंब फुटला...आकाशात झेपावला.
आणि अकस्मात एक दिवस त्या रोपाने गाफील लीनावर झेप घातली होती...डंख मारला होता.
त्यावेळी लीनाला जाणवलं...मनीषने घरात आणलेलं रोप सुगंधी नव्हतं...ती विषवल्ली होती.
लीनाने ती वेल दूर भिरकावली...नजरेआड ढकलून दिली.
पण विषवल्ली ती...जिवंत राहिली...पुढील संधीची वाट पाहू लागली.
...ज्यावेळी त्या बिया हाती आल्या होत्या...लीना निरागस होती...मनाने नाजूक होती...पण आज ?
आज परिस्थितीचे आभार मानावे...लीना खंबीर झाली.
नियतीने तिला घाव झेलायला शिकवले...विषवल्लीचा आज काहीही परिणाम होणार नाही इतके तिला कणखर बनवले.
आणि ते लीनाला वाचवणारे चिमुकले हात...ते हात बियाणं आधीच ओळखायला शिकले. सुगंधी रोप विषवल्लीतील फरक दुरूनच समजून घ्यायला शिकले.

समाप्त

Sunday, 3 July 2011

विषवल्ली...भाग ५

विषवल्ली...भाग १
विषवल्ली...भाग २
विषवल्ली...भाग
विषवल्ली...भाग ४

मनीष पुरता कोसळला होता. आजवर लीना ही त्याने आयुष्यात गृहीत धरलेली गोष्ट होती. पूर्ण रंग भरत चित्र न्यावं आणि अकस्मात पाण्याचं भांड कलंडावं सर्व रंग विस्कटून जावेत. कचेरीत उच्च पदांवर तो सरकत होता आणि लीनाने त्याला कड्यावरून खाली ढकलून दिलं होतं. तिला माफी नव्हती. त्या दिवशी तो कामासाठी कुठे निघाला होता. नेहेमीसारखी गाडी चालवत. संध्याकाळ नुकतीच झालेली होती. त्याचे जग अंधारलेले होते पण अजून बाहेर उजेडच होता. सिग्नलला तो गाडी वळवणार तेव्हढ्यात त्याला लीना दिसली. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने अचानक गाडीचा वेग वाढवला. क्षणभराची खोटी लीनाच्या अंगावर गाडी जावी. त्याची लीनाची नजरानजर झाली. बावचळून लीना एकदम रस्त्याच्या कडेला सरकली. पडता पडता वाचली. गाडीच्या बोनेटचा तिने आधार घेतला स्वत:ला सावरले. पुन्हा वर बघितलं तर एका क्षणात पूर्ण तिरस्काराने तिला फाडून मनीष पुढे निघून गेला होता. तो तिरस्कार तिला कोसळवून गेला. एक अतिशय प्रखर वीज कोसळली होती तिच्या अंगावर. भडकत्या आगीचा जाळ तिला भेदून गेला होता. आणि कधी नव्हे इतक्या वेगाने मनीषाने गाडी त्या गल्लीत घुसवली. त्याला जिथे काम होतं ती इमारत गेऊन गेली तरी मनीषने गाडी नाही थांबवली. कोणी ढकलून दिल्यासारखा तो निघाला. त्याच्या हातून मृत्यू लिहिलेला नव्हता म्हणून आज त्याच्या गाडीपुढे अजून कोणी नाही आलं.
कधीतरी एक मांजर आडवं गेलं होतं... त्यानंतर अजून कोणीही आडवं गेलं नाही.

गौरी लीना ह्यांचे कधीही सख्य नव्हते. एकमेकांना त्या ओळखत होत्या इतकेच. त्यामुळे ना ती कधी लीनाकडे धावून आली ना लीना कधी गौरीकडे गेली. मात्र मनीष, दारू शेखरगौरी ह्यांच्यावर आता अधिकाधिक अवलंबून राहू लागला.

इथे लीनाची नोकरी चालू होती. अनेकदा भावनिकदृष्ट्या कोसळून देखील तो नोकरीचा लढा मात्र तिने चालू ठेवला होता. तसेही तिला गत्यंतर नव्हते. पैसे कमावणे भाग होते. प्राजक्ता व तिचा स्वत:चा खर्च ती तिच्या आई वडिलांवर कसा टाकू शकत होती ? त्यांनी तिला बिनतक्रार घरात घेतले हेच खूप झाले. इतक्या मोठ्या चुकीनंतर देखील त्यांनी त्यांच्या घराचे दरवाजे तिच्यासाठी उघडले ही मोठी गोष्ट नव्हती काय ? त्या दोघींच्या खर्चाचा भार मनीष काही आता सोसणार नव्हता. लीनाचे वडील ह्या सर्व घटनेने खचून गेले. त्यांनी एकदा परोपरीने मनीषची हात जोडून माफी मागितली. त्यांच्या कन्येच्या चुकीसाठी. बाप लाचार झाला. तिला माफ करा. ती तिच्या तोंडाने तिची चूक मान्य करतेय म्हणून तरी तिला माफ करा...बाप व्याकुळतेने सांगत होता. परंतु, मनीष व त्याच्या बरोबरीने आलेला शेखर तिथून तडकाफडकी निघून गेले. त्या पुण्यवान म्हाताऱ्याच्या विनवण्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करून. आभाळ वाकलं होतं. मनीषने आपलं अंग चोरलं. तो दरवाजाकडे वळला त्यावेळी त्या बंद दरवाज्यापाशी हात जोडून लीना विनवण्या करत होती. आक्रोश चालू होता. शेखर व मनीष निघून गेले आणि लीना मटकन खाली बसली. तिला हे सर्व खरंच घडतंय ह्यावर विश्वास नव्हता बसत. आता आपल्याला वेड लागेल...आपण नाही ह्यातून जिवंत बाहेर पडू शकणार....नाही पडायचं ह्यातून जिवंत. गल्लीतील रोजच्या केमिस्टकडून लीनाने झोपेच्या गोळ्या जमवायला सुरुवात केली. दोन तीन दिवसांतून ती एकदा तिथे जाई व एकदोन गोळ्या मागून आणे. आज काय तर डॉक्टरांचा कागद घरीच राहिला तर उद्या म्हणे आहे पर्समध्ये..आत्ता सापडत नाहीये. केमिस्ट लहानपणापासून तिला ओळखणारा. त्याला काय माहित लीना सरसोट कड्याच्या टोकाशी उभी आहे. आणि वर्तमानकाळ व भूतकाळ ह्यात असा कितीसा अवधी ? एक तर पळ. पापणी लवेस्तोवर तेव्हढाच तर वेळ जातो.

कचेरीतून मध्येच उठून लीना जवळच असलेल्या समुद्रापाशी जाऊन बसे. शून्यात नजर लावून. पर्समधून झोपेच्या गोळ्या काढे..आणि हातावर घेऊन मोजत बसे. पण तिला हे करवत नव्हतं..आपण अजून किती त्रास देणार आहोत आपल्या आई वडिलांना...आपण मरून गेलो तर मग काय करेल प्राजक्ता....मनीष थोडी सांभाळणार आहे तिला...अधिकाधिक दारू पीत राहील...आणि मग काय होईल प्राजक्ताचं. एक दिवस अशीच लीना वाळूत पाय अंगाशी घेऊन बसली होती. सूर्यास्त होत आला होता. आकाश ना लाल होतं. ना तांबूस. सगळं जसं करडं, रंगहीन. कातरवेळेची हल्ली लीनाला भीती वाटे. तिरमिरीत येऊन लीनाने सगळ्या गोळ्या समुद्रात फेकून दिल्या...एक गोळी हळूच तिच्या पावलाशी येऊन पडली...लीना वाकली. गोळी हातात घेतली. वाटलं, देव काय सांगतो आहे...काय तो तिची परीक्षा घेतो आहे...? हे असे आत्महत्या करणे म्हणजे का केलेल्या चुकीची शिक्षा ? की शिक्षेपासून पळ ? लीनाने वाकून तळहात पाण्यात धरला...हलकेच लाट गोळीवर फिरली. खारट पाणी हातात गोल फिरलं. बुडबुडे उठले. पाण्याने गोळीला फेरे धरले. लीनाने विरघळेस्तोवर तिला तळहातात धरून ठेवलं...ती हलकेच आक्रसत जाते ना जाते तोच पुढच्या लाटेने गोळीला खेचून नेलं. जशी त्या लाटेने लीनालाशिक्षा फर्मावली...जा...जगणे हीच तुझी शिक्षा...

जिवंत पुरुषी अहंकारच ह्यापुढे मनीषला जिवंत ठेवणार होता. लीनाने तिची चूक मान्य केली. तिला माफी नव्हती. मनीषने त्याची चूक मान्य केलीच नव्हती. त्यामुळे त्याला माफ करण्याचा प्रश्र्नच कुठे उद्ध्भवत होता ?

लीना त्या नात्यातून जी बाहेर पडली होती ती कधीही न परतण्यासाठी. ते तिने कधीच तोडलं होतं...तडकाफडकी बाहेर येण्यासाठी नक्की काय घडलं ? तिचं मन प्रेमासाठी आसुसलेलं...पण एक क्षण असा आला व अकस्मात त्या नात्याचं चित्र स्पष्ट झालं. तू घटस्फोट घे व तुझं घर ताब्यात घे...मग आपण लग्न करू...हे ज्यावेळी वाक्य तिच्या कानावर आलं त्यावेळी तिला जी खाडकन जाग आली ती त्या वरून मलमली दिसणाऱ्या स्वप्नात पुन्हा कधीही न शिरण्यासाठी. जसा एखादा सुंभ जाळून त्याचे टोक अगदी बंद करून टाकावे. कधीही न उस्कवटण्यासाठी. किंवा एखादे उगाच उगवलेले बांडगुळ कोणी उपटावे, त्याची मुळे जाळावीत व झाडाची ती जागाच खरवडून खरवडून नष्ट करावी. वादळात भरकटलेली तिची नाव लीना खेचून किनारी आणत होती. तिच्या हाती एक चिमुकला हात होता. आणि त्या हातात जी ताकद होती ती जगात कोणाकडेही नव्हती. तोच जीव आता तिला ह्यातून बाहेर काढणार होता. मात्र तो किनारा खरोखर कधी अस्तित्वात होता की तो एक भासच होता...

ह्याला जीवन ऐसे नाव. नाही का ?

आणि शेखर ? तो आज काय भूमिका खेळत होता ?

मनीषला परत मिळवण्याची आशा मात्र अजून लीनाने जिवंतच ठेवली होती. किती पत्रे लिहिली. किती फोन केले. सगळे दरवाजे ठोठावले. किती दिवस आईवडिलांकडे रहाणार म्हणून मग भाड्याचे घरही शोधू लागली. अंधेरी, गोरेगाव, वांद्रे. कधी कुठे गॅरेजमध्ये तर कधी रेल्वेपासून अतिशय जवळ. मुंबईकरांच्या विधींची दुर्गंधी त्या घराला कायम लाभलेली. भाड्याने घर घ्यावे आणि मग प्राजक्ताला कसे सांभाळावे ? दिवसभर तिला कुठे ठेवावे ? प्रश्र्न नाना. उत्तरे शून्य.

एक दिवस लीनाला कचेरीत फोन आला. शेखरचा. तो म्हणाला तू घरी ये. त्याने लीनाला, तिच्याच घरी भेटायचे आमंत्रण दिले. मनीषने त्याच्याकडे किल्ली दिलेली होती. लीना गेली. मनीष घरात नव्हता. तिच्याशी बोलण्यासाठी शेखरने तिला मुद्दाम बोलावले होते. सूर्यास्त होऊन दोनतीन तास उलटून गेलेले होते. घरात अंधार पडू लागला होता. घर खरे तर लीनाचे. परंतु, आता तिथे मनीषच्या मित्रांचा वावर अधिक दिसत होता. घरातील दिवेलागण आज बऱ्याच दिवसांनी तिच्या हातून झाली होती. दिवाणखान्यात लीना बसली. जमिनीवर. समोर शेखर मद्याचा ग्लास भरून. ह्यात नवीन ते काय ? मनीषच्या घरात नेहेमीच ह्याला मुभा होती. शेखर तर घरचाच होता. आता काय करता येईल व मनीष पुन्हा लीनाला घरात घेईल हा प्रश्र्न होता. लीना पुन्हा पुन्हा एकच विचारत होती. काय करू मी आता ? काही बोलतो का तो तुझ्याशी ? कसा आहे तो ? काही विचारतो का माझ्याबद्दल ? हे आणि असेच निरर्थक प्रश्न.
अकस्मात शेखरने लीनाच्या मांडीवर डोके ठेवले.
"आता तू काही मनीषची बायको राहिली नाहीस. आपल्यात आता काहीही होऊ शकते." शेखर म्हणाला.
लीनाचा चुकलेला हृदयाचा ठोका पुन्हा कधीही ठिकाणावर नाही आला. ती तिरमिरीत उठली. आणि दार उघडून चालू पडली. वडिलांच्या घरी आली आणि प्राजक्ताला मिठी मारून हमसाहमशी रडू लागली. तिच्या आईवडिलांना त्यात काय नवीन होते ? चुकलेल्या नशिबाची लीना आज फिरून एकदा रडत होती. इतकेच काय ते त्यांच्यासाठी होते.

पुढचे तीनचार दिवस रोज लीनाच्या कचेरीत शेखर तिला फोन करत होता. आणि त्याचे नाव देऊन तिने रीसेप्शनिस्टला सांगूनच ठेवले होते तिला तो फोन न देण्याबद्दल. एकदाच तिने चुकून फोन घेतला. "हे तू काय चालवलं आहेस ? भेट मला. बोलायचंय मला तुझ्याशी. तिथे येऊन खेचून घेऊन जाईन तुला ! कळलं ना ?"
तिने न बोलता फोन ठेवून दिला. तोही तिच्या अब्रूचे अजून धिंडवडे काढायला कधी तिच्या कचेरीत अवतरला नाही.

हे शेखरचे धक्कादायक वागणे लीनाने मग फक्त एका मित्राला सांगितले. त्याने मनीषच्या कानावर घातले. परंतु, मनीषला ना त्याचे सोयर ना सुतक. शेखर व गौरी आपल्या लेकाला घेऊन परगावी निघून गेले. व त्यांच्या मागोमाग मनीषदेखील तिथे निघून गेला. त्यांच्याचकडे तो आता राहू लागला. महिना १०,००० रुपये शेखरला भाडे म्हणून देऊन. तेव्हढाच म्हणे शेखरला हातभार. कधी काळी त्यांच्या चार आण्यांच्या संसारात लीनाने शेखरला आपला मोठा भाऊ मानून सांभाळले होते. कधी ते नाते पैश्यात नव्हते मोजले. त्याची आठवण कोणाला ? आणि का बरं असावी ?

भयानक वादळ...जीवघेणं थैमान...रोजची काळरात्र आणि विजांचं रोजचं तांडवनृत्य...
बाल्य नकळत एका भयानक वादळाला थोपवायला निघालं होतं. त्याचं कालियामर्दन चालू होतं.

Saturday, 2 July 2011

विषवल्ली...भाग ४

विषवल्ली...भाग १
विषवल्ली...भाग २
विषवल्ली...भाग ३

लीनाने रात्रंदिवस विचार केला. न सांगणे तिला जगू देईना. आणि कसे सांगावे हे कळेना. रोज पाच वाजत होते. पहाट होत होती. लीना यंत्रागत दिवस सुरु करत होती. दिवस पुढे सरके...पण तिचे विचार मात्र जसं शिवणयंत्र अचानक अडकून पडावं...किती पाय मारावेत...किती चाक हाताने ढकलावं...ना सुई पुढे सरके...ना टाका मारला जाई...सुई फक्त वरखाली होत होती आणि कापडावर एकाच जागी नुसत्याच गाठी पडत होत्या...नुसती गुंतागुंत. काय होईल नाही सांगितले तर ? आपण हा चुकीचा रस्ता तर बदलू...जिथे आहोत तिथूनच परत फिरू....पण कधीतरी एक वळण चुकीचे घेतले होते त्याचे हे जड ओझे आता कुठे टाकू ? प्राजक्ताला तयार करे...शाळेत त्या दोघी नेहेमीच चालत जात. आणि त्यावेळच्या त्यांच्या गप्पा तर किती रंगत. पण आता गेले काही दिवस फक्त लीना हुंकार भरत होती...आणि हे असे फक्त हुंकार भरणे देखील तिला त्रास देत होते...लीनाला मोकळा श्वास हवासा होता...पुन्हा एक मोकळा श्वास...तोच एक श्वास तिला तिच्या जोडीदाराकडे मागायचा होता.

ती आधी शेखरला भेटली. मुंबईतील एका गजबजलेल्या हॉटेलमध्ये. चारच्या सुमारास. चहा पीतपीत त्याला तिने सर्व सांगितले. हे सर्व कसे घडले. ती कशी त्यात वहावत गेली हे व असेच बरेचसे. मनीषला हे सर्व सांगण्यात धोका आहे हे शेखरने तिला सर्वप्रथम बजावले. परंतु, हा असा खोट्या पायरीवर पुढील संसार नाही उभा करता येणार हे तिने त्याला सांगितले.
ठीक आहे. मग सांग. शेखर तिला म्हणाला.

सकाळी चालायला जाणे हा मनिषचा रिवाज. त्यादिवशी तो जेव्हा फेरफटका मारायला गेला त्यावेळी लीना घरात बसून सगळे बळ एकवटत होती. धावपळ करून प्राजक्ताला शाळेत सोडण्याचे रोजचेच तिचे काम आजही तिने सवयीने केले होते. त्या कामात मनीषने काही हातभार लावावा असे तिला सुरुवातीला फार वाटे. जगभरातील अनेक स्त्रियांप्रमाणे तिलाही त्यातील फोलपणा जाणवला. मग एकदा मनाची समजूत घातल्यावर सगळी कामे एकटीनेच करणे तसे तिला सोपे गेले.

आज मनीषची वाट बघत ती दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचण्याचे सोंग करत होती. सांगायचे हे एकदा ठरवल्यावर त्यावर तिने तसा काहीही विचार केला नव्हता. म्हणजे प्लान ए नीट नाही झाला तर प्लान बी काय असेल हे तिच्या डोक्यात काहीही तयार नव्हते. तो काय म्हणेल काय करेल काही अंदाज बांधता येत नव्हता. घरात कोणी मोठं नव्हतं ज्यांच्यासमोर हातून घडलेली अक्षम्य चूक मान्य करून माफी मागता येईल. वा पुढे काय करावे ह्याचा सल्ला घेता येईल. तिच्या आईशी इतकी जवळीक तिची कधीच नव्हती. खरं तर एखाद्या रात्री मनीषला सांगणे हे सोप्पे गेले असते. नवरा बायको ह्यांचे खाजगीतील संवाद खरे तर बिछान्यात होणे हे अधिक उचित असते काय ? ती नाना विचार करीत होती. परंतु, मनिषशी संवाद असा कधी केलेला तिला आठवेचना. इकडचे तिकडचे बोलणे होई. परंतु, कधी कुठल्या गंभीर विषयावर बोललेले नव्हते आठवत. म्हणजे मग आपण गेली इतकी वर्षे करत काय होतो ? असा विचार येऊन तिने फटकन वर्तमानपत्र समोरील टेबलावर आपटले आणि तेव्हढ्यात दारावरची घंटा वाजली.

मनीष परत आला होता. घामेजलेला. बूट काढीत कोचावर बसला. शिरस्त्याप्रमाणे लीनाने त्याच्या हाती पाण्याचा ग्लास दिला. त्याने ताजे वर्तमानपत्र हाती धरले व नेहेमीप्रमाणे तो बाथरुमच्या दिशेने जाऊ लागला.
"मला तुझ्याशी काही बोलायचंय."
"बोल ?"
"बस ना तू. इथे. माझ्याजवळ."
धीर एकवटून. बळ गोळा करून. वगैरे वगैरे. शेवटी लीनाने मनीषला सर्व सांगितले. कुठल्या सुंदर स्वप्नात ती होती कोण जाणे. ह्या सर्व प्रसंगातून तिने काय आशा धरली होती हे देवच जाणे. पण त्यानंतर मनीष सकाळी जो कचेरीत गेला तो रात्री घरी फिरकलाच नाही. रात्री उशिरा प्राजक्ताला घेऊन लीना त्याच्या ऑफिसला पोचली. खूप काम आहे ते आटोपले की येईन असे त्याने तिला सांगितले व घरी परत पाठवून दिले. दोन दिवस उलटले. मनीष घरी आला नाही. चवथ्या दिवशी मनीषचा निरोप घेऊन ज्यावेळी शेखर लीनाकडे पोचला त्यावेळी लीना अंथरुणाला खिळली होती. तीन दिवस पोटात अन्नपाण्याचा थेंब नव्हता गेला.
त्याने तुला घरातून निघून जायला सांगितलेले आहे. प्राजक्ताला घेऊन.
पण का ? मला त्याच्याशी बोलायचंय.
ते आता कधी होईल नाही माहित. तू तुझ्या आईवडिलांकडे निघून जा. त्याशिवाय मनीष घरी नाही परतणार. गेले तीन दिवस तो आमच्याकडेच आहे.

मनीष किती हट्टी आहे हे तिला वेगळे कोणी सांगायची गरज नव्हती. हा निर्वाणीचा निरोप ऐकल्यावर लीनाच्या हाती काय उरलं होतं ? ती तिच्या माहेरी गेली. त्यावेळी प्राजक्ता पाच वर्षांची होती. आजी आजोबांकडे रहायला जायचे म्हणून ती खुष होती. रस्त्यात उड्या मारीत असलेल्या प्राजक्ताचा थकलेल्या लीनाला उगाच राग येत होता. आता पुढे नशिबी काय वाढून ठेवले होते कोण जाणे.
ह्या सर्वात प्राजक्ताचा विचार कोणी केला होता का ? कुठलेतरी बंड डोक्यात घेऊन चुकीचे पाऊल टाकताना लीनाने वा ह्या लीनाच्या चुकीत आपला सहभाग किती ह्याचा तिळमात्र विचार न करता तिला घराबाहेर काढणाऱ्या मनीषने. कोणी त्या चिमुरडीचा विचार केला का ?

हे सर्व घडून जवळजवळ महिना दोन महिने उलटले. लीना माहेरी रहात होती. लेकीबरोबर. आता ती तिथे किती दिवस राहील कोण जाणे. ह्या विचाराने लीनाच्या आईने तिला तिच्या कपाटात एक खण रिकामा करून दिला. धुसफुसत. त्यात लीनाने स्वत:चे व लेकीचे कपडे पुरवून बसवले. वाहते डोळे व वाहून ओसंडून चाललेले कपाट. सगळीच आता अनिश्चितता. मधल्या काळात कित्येकदा लीना तिच्या घरी गेली. बाहेर उभे राहून वारंवार मनीषच्या विनवण्या केल्या. दार उघड मनीष. मला आत येऊ दे. मला तुझ्याशी बोलू दे...अगदी धाय मोकलून रडून झालं. परंतु ते दार म्हणजे जशी काय चीनची भिंतच उभी. असंख्य आक्रोश गिळंकृत करून अभेद्य उभी रहाणारी. मनीषच्या मित्रांचे मग फावले. त्यांच्या ओल्या पार्ट्या त्याच्या ह्या मोकळ्या घरात विनासायास झडू लागल्या. सकाळी ज्यावेळी कामवाली केर लादी करावयास येई त्यावेळी तिच्यासाठी दारुच्या इतस्तत: विखुरलेल्या बाटल्या उचलणे हे पहिले काम असे.

ताजी जखम अशीच उसकवत मनीषने आपल्या कॉलेजमधील जवळच्या मित्रांना एक दिवस गोळा केले. त्यांच्या रोजच्या हॉटेलमध्ये तो त्यांना घेऊन गेला. प्रत्येकाने आपापल्या आवडीची दारू मागवली. बिलाची चिंता नव्हतीच. नेहेमीच त्यांची बिले मनीषच भरत होता. दारू आली. ग्लास उंचावले गेले. मद्य हिंदोळले. मद्य चढले. व लीनाचे वस्त्रहरण केले गेले. लीनाने एक लफडे केलेय. आणि ते तिने नको तितके पुढे नेलेय. आणि म्हणून मी तिला घराबाहेर काढले आहे. कायमचे. मनीषने आपल्या सर्व मित्रांसमोर हे जाहीर केले. आज मुळी त्याला मित्रांना सगळे सांगायचेच होते. जखम उघडी करावयाचीच होती. मित्र हादरले. खरे तर लीनाला तेही ओळखत होतेच. तीही त्यांच्याच तर कॉलेजची होती. पण बायकांचे काय सांगता येते. तू दारू पितोस म्हणून काय तिने असे करायचे...वगैरे वगैरे...मनीषवर झालेला अन्याय सर्वांनी पटवून घेतला. त्यालाही तो अधिक पटवून दिला गेला. व हे जे तू तिला घराबाहेर काढले आहेस ते तू बरोबरच केले आहेस असा त्याच्या वागण्याला दुजोरा दिला गेला. हे घर तू तुझ्या कष्टाने घेतले आहेस. लीनाने आता असे केल्यावर तिला तिथून बाहेर काढणे हे बरोबरच आहे इत्यादी. शेखर मद्याचे घुटके घेत शांतपणे ऐकत होता.

Friday, 1 July 2011

विषवल्ली...भाग ३

विषवल्ली...भाग १
विषवल्ली...भाग २

आणि एक विचित्र घटना घडली. गौरीकडे दोन्ही मुलांना सोपवून एका मोठ्या कार्यक्रमाला तिघे गेले होते. कार्यक्रम रात्री उशिरा संपणार होता. ह्या अशा कार्यक्रमात शेखर व मनीषचे मन फार रमत असे. नृत्य दारू, गप्पा आणि टप्पा. लीनाचा जीव काही फारसा त्यात न रमणारा. तिने प्रथमच गौरीकडे प्राजक्ताला असे सोडले होते. प्राजक्ता सहा सात वर्षांची व राहुल चार वर्षांचा. कार्यक्रम अर्धवट टाकून काही मनीष शेखर तिथून निघणार नव्हते. मग रात्री अकराच्या सुमारास लीना एकटीच तिथून निघाली व गौरीकडे गेली प्राजक्ताला घ्यायला. प्राजक्ता झोपेला आलेली. राहुल कधीच झोपून गेलेला.
"आज आमच्या पलंगाखाली प्राजक्ताने राहुलला नेले"
"अं ?"
"काही विचित्र विचित्र ती त्याच्याशी बोलू लागली. विचित्र काही वागू लागली."
ह्या वाक्याने हादरलेली लीना, कशीबशी घरी पोचली. मनीष रात्री उशिरा घरी परतला. अशा कार्यक्रमांवरून थोडीच कोणी कोरडे परत येते. ती वेळ नव्हती मनीषशी काही बोलण्याची. रात्रभर लीनाच्या डोळ्याला डोळा लागेना. सकाळी त्याला जाग आल्यावर तीने घडलेला प्रसंग मनीषच्या कानी घातला. गौरी हे असं काही मला सांगत होती.
वर्तमानपत्रात मान डोकावून मनीष शांत.
लक्ष नको देऊस तू. सोडून दे.
पण रात्री मनीष कामावरून घरी आल्यावर सकाळची गोष्ट लीनाने पुन्हा छेडली.
कसं सोडून देऊ ? मी तुला आधीही एखादा म्हटलं होतं. मला कालही नाही आवडलं. गौरी आपल्या लेकीबद्दल खोटं व घाणेरडं बोललीय. ते आपण कसं सोडून द्यायचं ? आणि तुला का सतत ते दोघे लागतात ?
लीनाने ताटात वाढलेली तळलेली चमचमीत कोलंबी लक्षपूर्वक खाणे मनिषसाठी अधिक आनंददायी होते.

तसाही संसार म्हणजे मुळातच ठिगळं लावलेली एक गोधडी. मग एकदा एक ठिगळ लागल्यावर त्यात अजून दहा लागली तरी काय फरक पडतो. बहुधा संसारात ज्यावेळी एक चुकतो त्यावेळी मुळातच त्या चुकीला दुसऱ्याचा हातभार लागलेला असतो. म्हणजे हमालाच्या डोक्यावर 'पँडोराचा बॉक्स' आपण द्यावयाचा..व मग त्या उघड्या फटीमधून विषारी सर्प बाहेर पडू लागले की हमालाच्या नावाने बोंबाबोंब करावयाची. तसं काहिसं.

एकदा एका मंगळवारी मनीष लीना दुपारी जेवायला भेटले. दोघेही कचेरीतून मधेच निघून एकत्र भेटले होते. लीनाला आठवले त्यांचे कॉलेजचे कोवळे दिवस. कॉलेजमध्ये असताना कॉलेज बुडवून ते असेच फिरत असत. खिशात ना फुटकी दमडी. मग चालणे आणि फक्त चालणे. आई लीनाला महिना दहा रुपये पॉकेटमनी देई व मनीषने मागितले की ते त्याला ती देऊन टाकी. त्याच्याकडे कुठून येणार पैसे म्हणून. मग हिचा खिसा रिकामा. ती दुपार लीनाची खूप छान गेली. तिच्या मनीषबरोबर. ते एकत्र जेवले. एकत्र फिरले. काम आटोपल्यावर ती घरी आली व तो आपल्या कचेरीत परत गेला. पण ते तेव्हढेच. रात्री जेव्हा मनीष घरी परतला तेव्हा तो नेहेमीसारखाच पिऊन आला होता. मग तिने त्याला विचारले.
"दुपारी आपण भेटलो तेव्हा तुला नाही का छान वाटलं ? मला तर आपले कॉलेजचे दिवस आठवले. पण मग आता तू कशाला पुन्हा पिऊन आलायस ?"
इत्यादी इत्यादी. अगदी प्यायलेल्या नवऱ्याला एखादी वैतागलेली बायको जे जाब विचारेल ते सर्व तिने विचारले. त्यावर मनीष तिला एकच म्हणाला.
"तू फक्त ती दुपार लक्षात ठेव ना मग ? रात्र कशाला धरून बसतेस ?"
नवऱ्याबरोबरची रात्र लीनाची नसे. रात्र वैऱ्याची असे.

कोवळ्या वयात असल्यापासून मनीषवर जीवतोड प्रेम करणारी लीना आता आयुष्याच्या दुसऱ्या पायरीवर एकटी उभी होती. त्या पायरीसमोर पूर्ण अंधार. त्यामुळे पुढे काय वाढून ठेवले आहे ह्याबद्दल ती स्वत: पूर्णत: अनभिज्ञ. दुसरा पुरुष आयुष्यात येणे हे काही सरळ मनाच्या लीनाला फारसे आनंददायी नव्हते. परंतु, ते घडले. वा ती ते टाळू नाही शकली. जे घडायचे ते नेहेमीच घडते. जर टाळले गेले असते तर त्याचाच अर्थ ते घडणारच नव्हते असा नव्हे काय ? आणि मग त्यात एक प्रामाणिकतेचा तिला लागलेला शाप. वा वरदान ?

हे आपण जे मनीषला फसवत आहोत ते काही बरोबर नाही. त्यात त्याची किती चुकी आहे हे आपण जाणतो तसेच तोही जाणत असेल. आपण त्याच्यावर किती प्रेम केले. व त्याने आपल्या सर्वच गरजांकडे पूर्ण दुर्लक्ष केले...हे असे नाना विचार तिच्या मनी येऊ लागले. आता जर हा सर्व प्रकार थांबवायचा असेल तर सर्वात प्रथम घडलेली घटना आधी मनीषच्या कानावर घालणे भाग आहे. त्यातच आपले दोघांचे, नव्हे तिघांचे भले आहे असे लीनाला वाटू लागले. तरच आपण आपला संसार पुन्हा कोऱ्या पाटीवर रेखू शकू, ही तिची भावना. तेच ते तिचं गणित...एक अधिक एक दोन.
दारू पिऊन घरी उशिरा परतणे हे तर मनिषचे रोजचेच झाले होते. कॉलेजमध्ये बऱ्याचदा मनीष म्हणाला तर होता...लग्न झालं की मी सोडणारच आहे...पण आता तर हे नेहेमीचंच झालं...आपण न्यायालयात गुन्हेगाराच्या चौकटीत उभे रहायला निघालो आहोत खरे....पण ज्याच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे तो ह्या खटल्यात मुख्य गुन्हेगार आहे त्याचे काय ?

आता हे सर्व मनीषला सांगायचे तरी कधी व कसे हा लीना पुढील यक्षप्रश्न.