नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 4 January 2016

सामान्य माणसाच्या नजरेतून अनुत्तरीत प्रश्न

मित्रमंडळींशी whatsapp वर चर्चा ही फार त्रोटक व अपूर्ण होत होती. म्हणून…
सर्वप्रथम माझ्याबद्दल -
मी एक अतिसामान्य नागरिक आहे. माझे ऐतिहासिक वाचन अफाट वगैरे नाही. लहान होते त्यावेळी मला छावा, स्वामी वगैरे कादंबऱ्या अतिशय आवडत असत. ना. स. इनामदार ह्यांच्या कादंबऱ्या माझ्या संग्रही देखील मी त्यावेळेपासून ठेवलेल्या आहेत.
संजय लीला भन्साळीच्या अति सामान्य ताकदीनुसार बनवण्यात आलेल्या चित्रपटावर आधारित खालील लिखाण नाही. मात्र त्यातून सुरू झालेले वादंग वाचनात आल्याने मी बाजीराव पेशव्यांवरील माहितीपूर्ण पुस्तके (कादंबऱ्या नव्हेत) नक्कीच मागवली आहेत व वाचनास सुरवात देखील केलेली आहे.

आज अनेक वर्षांनंतर ह्या आधुनिक जगतात वावरत असताना मला एक प्रश्न पडला.

त्या प्रश्नाच्या पाठीमागे जी माहिती आहे ती ही अशी:

१. युद्धात मदत म्हणून छत्रसाल राजाने बाजीराव पेशव्यांना विनंती केली. (सत्य)
२. पेशवे आले आणि छत्रसाल राजावरचे संकट पळवून लावले. (सत्य)
३. हे करीत असता,
   अ) छत्रसाल राजाची अतिशय सुंदर, हुशार, विविध कलांमध्ये प्राविण्य असलेली सुकन्या मस्तानी पेशव्यांच्या प्रेमात पडली.
किंवा
    ब) शूर, रुबाबदार पेशवे मस्तानीच्या प्रेमात पडले.
किंवा
    क) बाजीराव व मस्तानी एकमेकांच्या प्रेमात पडले.
किंवा
   ड) पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे राज्याच्या भल्यासाठी विविध राज्यांत व हिंदू मुस्लिम विवाह लावून देणे घडत असे त्याप्रमाणे छत्रसाल राजाला देखील विविध धर्माच्या विविध बायका होत्या. त्यामुळे खुद्द छत्रसाल महाराजांना वाटले की 'माझ्या राज्याचे संरक्षणासाठी ह्या शूर योद्ध्याशी नाते जुळवणे मला अति गरजेचे आहे. व त्यामुळे माझी सुकन्या मस्तानी हिचा विवाह पेशव्यांशी मी लावून देणार आहे.' व त्यांच्या इच्छेप्रमाणे बाजीराव मस्तानीचा विवाह लावून देण्यात आला.

४. युद्ध आटपल्यावर पेशवे पुण्यास परतले. (सत्य)
  अ) त्यांनी येताना आपल्यासमवेत आपल्या नवपत्नीस आणले (छत्रसाल महाराजांनी त्यांचा विवाह लावून दिला होता हे इथे गृहीत आहे)
  ब) पेशवे पुण्यास परतले व त्यांच्यामागून त्यांच्या प्रेमात पडलेली मस्तानी देखील आली.
५. पुण्यात पेशव्यांच्या घरात त्यांच्या मातोश्रींनी, भावाने आणि बाहेर पुण्यातील ब्राम्हणांनी ह्या नात्यास प्रचंड विरोध केला. (सत्य)
६. बाजीराव मस्तानीला पुत्र झाला. सर्वांचा विरोध अधिकच बळावला.
७. अनेक प्रयत्न बाजीराव व मस्तानीने केले (गृहीत) परंतु त्यांच्या नात्याला समाजमान्यता मिळाली नाही.
८. वयाच्या चाळीशीत ह्या तरुण शूर योध्याचे निधन झाले.
 अ) हृदयाचा झटका
किंवा
  ब) उष्माघात
किंवा
  क) दारूचे व्यसन तू सोडलेस तर तुझ्या व मस्तानीच्या नात्याला मी परवानगी देईन असे त्यांच्या मातोश्रीने सांगितले व त्यामुळे दारूपान त्यांनी थांबवले. व त्यामुळे withdrawal Symptoms ला अनुसरून त्यांचा हा अकाली मृत्यू ओढवला.


संबंधित व्यक्तींनी ह्या नात्याविषयी केलेले विचार काय बरे असू शकतात ?

मस्तानी - 
मी एका पुण्याच्या ब्राम्हणाच्या तोही राज्याची धुरा वाहणाऱ्या अतिशय मोठ्या माणसाच्या प्रेमात पडले आहे. व त्या प्रेमामुळे मला त्याच्या सहवासात रहाणे ही मला त्याच्याविषयी वाटणाऱ्या गाढ प्रेमाची नितांत गरज आहे.

छत्रसाल - 
मी माझ्या राज्यात राजा आहे. आज माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या मदतीला हा आला परंतु तसाच भविष्यकाळात देखील येईल ह्याचा काय भरवसा. तेव्हा पुढील संरक्षणासाठी ह्या शूर पेशव्याशी नाते जोडणे फार गरजेचे आहे. माझ्या मुलीचे मी ह्याच्याशी लग्न लावून देतो जेणेकरून पुढची चिंता कमी होईल. मुलीबरोबर इतर वैभव, गावे वगैरे तर आभारदर्शक म्हणून मी देईनच.

पेशवे -  
मी पेशवा आहे व माझ्या घरगुती, व सामाजिक जबाबदाऱ्या मी चोख पार पाडत आहे. तेव्हा मी एका यवनी स्त्रीशी विवाह केला तर त्याला समाजाचा व माझ्या घरच्यांचा विरोध का बरे करावा ? तेव्हा हे मी करणार आणि ते तुम्ही आनंदात स्वीकारा.

आता ह्या तीन व्यक्तींना हे प्रश्न पडले नाहीत काय ?


मस्तानी -
१) मी यवनी आहे. माझे व माझ्या प्रियकराचे लग्न हे पुण्यासारख्या शहरात मान्य होईल काय ?
२) हट्ट धरून वा माझ्या वडिलांनी माझे लग्न लावून दिले म्हणून मी पुण्यात गेलेच तर ज्याच्यावर माझे गाढ प्रेम आहे त्याचे त्यात भले आहे काय ?
३) त्याला होणाऱ्या मनस्तापामुळे त्याच्या राज्याचे नुकसान नाही होणार काय ?
४) मग मी आणि मला वाटणारे नितांत प्रेम ह्यात त्यागाच्या भावनेला प्राधान्य देऊन आहे तेथेच रहाणे हे सर्वांच्या व राज्याच्या देखील भल्याचे नाही काय ?

छत्रसाल -
१) माझी लेक अतिशय सुंदर, अतिशय हुशार, अतिशय शूर आहे. ब्राम्हण पेशव्याशी तिचे लग्न लावून देऊन त्याच्या पुण्यात पाठवले तर नक्की तिचे भले होणार आहे काय ?
२) पेशव्यांना त्यांच्याच माणसांकडून प्रचंड मनस्ताप होईल असे काहीतरी करून त्याने माझ्यावर केलेल्या उपकारांची फेड वाईट रीतीने मी का करावी ? मला इतकी साधी दूरदृष्टी नसावी ?

पेशवे -
मी ह्या नात्यातून नक्की काय साधतोय ? कोणाचे भले होणार आहे ? मस्तानीला होणाऱ्या पोराबाळांचे ? माझ्या राज्याचे ? माझी बायको काशी हिचे ? मी पेशवा आहे व माझ्यावर असंख्य जबाबदाऱ्या आहेत. मग मी हा हट्ट का धरावा ? आपण जे करीत आहोत त्याचे पुण्यात स्वागत होईल, आपल्या मातोश्री आपल्या ह्या कृत्याने खुश होतील व आपले बंधुराज आपले स्वागतच करतील असे पेशव्यांना वाटले होते काय ? आणि असे वाटले असेलही तर मग हा शूर योद्धा आपल्याच माणसांना ओळखू शकला नाही काय ?

आता माझा प्रश्न -

१. माणूस कितीही थोर असला तरीही घरीदारी होणारा प्रचंड विरोध त्याला मनस्ताप देणाराच ठरतो ह्यावर दुमत नसावे. व प्रचंड मनस्ताप आपले आयुष्य आखूड करतो हे देखील आपण जाणतोच.
२. प्रेमात कोणी कधी पडावे ह्यावर नियम नसतात. ते कधीही उगवू शकते.
३. वाटलेल्या प्रेमाला मी काय रूप द्यावयाचे आहे हा मात्र माझा निर्णय असू शकतो.

शाहू महाराज पेशव्यांचे महत्त्व जाणून होते. त्यामुळे त्यांनी बाजीराव मस्तानी नात्याला मान्यता दिलेली होती असे वाचनात आले. बाजीरावांकडून अजून बरेच काही घडू शकत होते.

वर उल्लेखलेल्या तीन व्यक्तींच्या एका हट्टापायी व दूरदृष्टी न ठेवता घेतलेल्या निर्णयापोटी राज्याचे कार्य अधुरे राहिले नाही काय ?


2 comments:

अनघा said...

वो कहते है सोच लेना था मोहब्बत करनेसे पहले
अब उन्हे क्या बताये सोच कर तो साजीश की जाती है ||

Anagha said...

ज्याज्या व्यक्तींवर, त्यांच्या देशाची वा राज्याची जबाबदारी असते त्यांच्या आयुष्यात त्याग हा मला वाटतं अटळ असतो. मोठ्या गोष्टी कशाला…प्रत्येक सैनिक हा देखील त्याग ह्या भावनेलाच कवटाळून नसतो काय ?