नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 16 March 2015

गुलाबी

चंदेरी गाडी घरून निघाली.
रस्त्यातलं ओळखीचं झाड कालपरवापर्यंत रिकामं झालं होतं.
पिंपळाचं.
आज त्यावर गुलाबी स्वप्न उगवली होती.
नाजूक.
सूर्य ती स्वप्न जपेल.
जोपासेल.
कधी ना कधी ती स्वप्न जून होतील.
सूर्य कठोर होईल.
स्वप्न उखडून टाकेल.
पुन्हा नवी स्वप्न उगवायला…
त्या झाडात तेव्हढी ताकद तरी शिल्लक राहील का ?

गाडी पुढे निघाली.
गल्लीत ती नटून उभी होती.
त्याच पिंपळी गुलाबी रंगाचं आवरण…
ओठांवर चढवून.
तो रंग ओरबाडून टाकणारा…
मात्र तिचं पोट भरणारा…
कोणी गिऱ्हाईक तिला आज मिळेल काय ?



Saturday 7 March 2015

दोरी...

वेगवेगळे विचार ऐकायला मिळतात.
त्यावर थोडा विचार केला की त्यातला कुठला विचार आपल्या मनाला पटतो आहे हे कळतं.
आणि मग आपण नक्की कुठल्या बोटीत बसलो आहोत ह्याची जाणीव होते.

देशभरात बंदी घातलेली डॉक्यूमेंटरी काल बघितली.
'India's daughter'

ही डॉक्यूमेंटरी बघितल्याने मला काही नवे ज्ञान झाले काय ?
माझ्या देशातील पुरुषांबद्दल मला काही नवीन कळले काय ?
ह्या डॉक्यूमेंटरीमुळे जे आजपर्यंत कोणालाही ज्ञात नसलेले ज्ञान आता जगाला मिळाले काय ?
फक्त माझ्याच देशातील पुरुष डॉक्यूमेंटरीमध्ये दाखवल्याप्रमाणे विचार करतात काय ?
पुरुष ह्या प्रकारे विचार करतात त्यामागे जबाबदार कोण ?
एखादा मुलगा जन्माला येऊन तो समाजात वावरायला लागण्यापर्यंत, त्याच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी कोणाची ?

त्या मुलीला धडा शिकवण्यासाठी तिचे असे हाल केले गेले असे तो फाशीची शिक्षा झालेला गुन्हेगार म्हणाला.
तिने जर विरोध केला नसता तर ती आज जिवंत असती. इतक्या उशिरा ती तिच्या मित्राबरोबर बाहेर काय करत होती ? हे वागणंच चुकीचं आहे. त्याचे विचार आजही कायम आहेत.
आणि समजा ह्याचे शिक्षण वा वावर रंजल्यागांजलेल्या वस्तीत झाला असे म्हटले तर ह्या गुन्हेगाऱ्याच्या वकिलाचे विचार देखील तेच होते. त्याची मुलगी समजा हे असे काही करताना जर आढळली तर तिला तो जाळून टाकेल असे काहीसे तो म्हणाला. तिला शिक्षा करणे ही त्यांची नैतिक जबाबदारी.

आपल्या आई, बहिण वा पत्नीला समाजात वावरताना कुठलेही भय वाटू नये असे वातावरण निर्माण करणे ही मात्र कुठल्याही पुरुषाची जबाबदारी नाही.

शीला दीक्षित म्हणाल्या, "तुम्ही मुलांना वाढवीत असताना तुमचा मुलगा आणि मुलगी ह्यात कायम फरक करीत असता. त्याला पेलाभर दुध आणि तिला निम्म्याहून कमी दुध हे प्रकार सर्व घरात सर्रास चालतात. ह्यातून तुम्ही त्या मुलीपेक्षा तो श्रेष्ठ आहे हेच तर त्याच्या मनी बिंबवत जाता ना ?"

ह्यामागे काय असावे ?

म्हातारपणी मला मुलगाच बघणार आहे. 
मुलगी तर लग्न करून दुसऱ्या घरी जाणार आहे.
हा विचार ?

"मेरे दो बेटे हैं." मेरठवरून दिल्लीला परतताना मला देण्यात आलेल्या गाडीचा चालक गप्पा मारत होता.
"बडा थोडा खेलकूद में ज्यादा वक्त गुजारता हैं. पर छोटा पढाई में एकदम आगे है. क्लास में दो लडके हैं. पहला नंबर लाने के लिये इन दो बच्चों में आगे पीछे चलता रहता है."
"बढीया है. पर जो बडा बेटा है उसे कौनसे खेल में ज्यादा दिलचस्पी है ?"
"ज्यूडो कराटे."
"हमको ये ध्यान में रखना चाहिये कि हम जिनको बडा कर रहे हैं वो थोडेही सालों में घर के बाहर कदम रखने वाले हैं और बाहर कि दुनिया को हमारे बच्चो से कोई खतरा ना हो." हे माझ्या तोंडून बाहेर पडलं ह्याच्या मागे काय कारण असावं ? विचारल्याच्या पुढल्या क्षणाला मी विचारात पडले होते.
"हा… हा… वो बात तो एकदम सही हैं. हमें सिर्फ अपने बुढापे में देखभाल करने के लिये अपने बच्चों को बडा नही करना चाहिये. संस्कार तो देनेही चाहिये."

कुठल्याश्या एका गल्लीत दोन पुरुष लहानाचे मोठे होत आहेत.
त्यांना चांगले नागरिक घडवण्याची जबाबदारी ज्याने मोठ्या आत्मविश्वासाने अंगावर घेतली आहे; असा माझ्या देशाचा एक नागरिक माझ्या समोर बसला होता.

माझ्या मनावर भयाचा पगडा अधिक आणि व इतरांवरच्या विश्वासाला उतरती कळा लागली आहे.
माझ्या बोलण्यातून हे माझ्या लक्षात आले. 

मला मुलगी आहे.
तिला वाढवताना आपण धोकादायक समाजात वावरत आहोत हे भय वा ही जाणीव ठेऊनच मला तिला वाढवायला लागलेलं आहे.
पण हे तर जगाच्या पाठीवर मला कुठेही करायलाच हवंय नाही काय ?
दुबईत असताना काय माझी लेक सुखरूप होती ?
आम्हा दोघींच्या बाजूने जाताना अरबी माणसाने त्याच्या भाषेत काहीतरी अश्लील शब्द उचारले आहेत हे ती भाषा न समजून देखील मला आणि तिलाही कळले.
हा अनुभव एकदा वा दोनदा नव्हे, तर आम्ही दोघींनी बऱ्याचदा घेतला.

"ज्यांची मुले हे अशा प्रकारचे घृणास्पद गुन्हे करतात त्यांच्या आयांना शिक्षा द्यायला हवी." माझी मोठी बहिण ताडकन म्हणाली.
"सकाळी मुलाला उशिरापर्यंत झोपून देणे आणि मुलीला मात्र लवकर उठून काम करायला लावणे, जेवायला वाढताना त्याच्या ताटात कोंबडीचे तुकडे देणे आणि लेकीला फक्त रस्सा देणे, हे काय आहे ? ह्याच विचारांतून तर हे असे पुरुष तयार होतात !"
"मला वाटत नाही की आपल्या मुलाला कसे वाढवायचे ह्याचे विचारस्वातंत्र्य कुठल्या बाईला मिळत असेल." मी म्हटले.

एकदा कानावर पडलेली लघुकथा आठवली. त्यातली एका भावाची शिक्षणासाठी झुरणारी बहिण आणि तिचे दु:ख समजून घेणारा भाऊ. त्यांचे वडिलच तर त्या मुलीच्या शिक्षणाच्या आड येत होते. आणि त्यांच्या आईला तिचे दु:ख कळून देखील आपल्या नवऱ्यापुढे तिचे काहीही चालत नव्हते.

'आपल्याला मुलगा आहे आणि आपल्या बहिणीला फक्त तीन मुलीच आहेत' ह्याच्यात आपण काही फार मोठा तीर मारला आहे अशा पद्धतीत माझ्या सख्ख्या मावशीने माझ्या आईचा केलेला अपमान मी स्वत: अजून विसरले नाही. बहुधा माझी आई हे कधीच विसरून गेली असावी. शेवटी आईच्या तिन्ही मुली स्वत:च्या पायावर व्यवस्थित उभ्या राहिल्या आणि मावशीचा मुलगा दारू पिऊन अवेळी मरून देखील गेला. त्याला वाढवताना मावशीने आणि तिच्या नवऱ्याने केलेल्या चुका तेव्हा नाही पण आता कळतात. आणि माझ्या आईवडिलांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय त्यावेळी जरी अजिबात आवडले नाहीत तरी आज त्या निर्णयांमागची भूमिका कळते.

म्हणतात वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत जे संस्कार होतात ते आयुष्यभर आपल्या बरोबर रहातात. आणि त्या कालावधीत मूल आपल्या आईच्या कुशीत अधिक असते. 

म्हणजे त्याच्यावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी फक्त तिची ?
सगळ्या वाईटाचे ओझे तिचेच ?

अशा बलात्कारी मुलाला वाढवण्यापेक्षा त्याच्या जन्माक्षणी मी त्याच्या नरडीला नख का लावले नाही असे त्या मातेला का वाटू नये ?
त्या उलट 'माझ्या मुलाला / नवऱ्याला फाशी दिल्याने काय बलात्कार थांबणार आहेत' ? हे असे उफराटे प्रश्न तिला व त्याच्या बायकोला पडावेत ?

आणि… ही बंदी का ?
तुम्हाला तुमचा चेहरा समोरच्या आरशात दिसला म्हणून ?

हल्ली कोणाच्या पोटी जिजाबाई जन्माला येत नाही.
त्यामुळे शिवाजी जन्माला येण्याचा प्रश्न उद्भवत नाही !

वाटतं...

जिच्या हाती फाशीची दोरी ती जगाते उद्धारी !