नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 17 November 2013

एक मोती…

सूर्यास्ताच्या दरम्यान आम्ही दोघी समुद्र किनारी पुन्हा एकदा उभ्या होतो. तिचा हात हातात धरून चालताना माझ्या हातावर पडत असलेला दबाव मला जाणवत होता. संधिवातामुळे लंगडत चालणे तिचे. माझ्या विश्वासाने. समुद्र तोच होता. किती दशकांपूर्वीचा. लाट त्याच होत्या. सफेद पाणी देखील तेच होते. मात्र समुद्राच्या हृदयात आता मळमळ होती. त्याने कितीही कष्ट करून ती बाहेर फेकण्याचा प्रयत्न करावा. नशीब त्याला काहीच बाहेर फेकू देत नव्हता. वयोपरोत्वे माणसाचे अनुभवविश्व उंचावते आणि शरीर मातीच्या ओढीने वाकते. तशीच ती चालत होती. ओल्या वाळूतून. तिथे तिचा वाकडा झालेला पाय तिला रोवता येत होता. कोरड्या वाळूचा काय भरवसा ? कोरडे मन कधी कुणाचा आधार होते ? ओले मन, जगण्याचा कोंब, इर्षा उगवू देते. होय ना ?

कैक वर्षांपूर्वी आम्ही दोघी ह्याच किनाऱ्यावर चाललो होतो. माझा हात तेव्हाही तिच्या हातात होता. तिचा हात तेव्हा खंबीर होता आणि माझा चिमुकला बावरलेला हात. आयुष्यात पहिल्यांदा समुद्र मी तिच्याबरोबर बघितला होता. ती लाट आपल्या पायाशी येते, गुदगुल्या करते आणि निघून जाते. आपल्याला तिच्या बरोबर नेत नाही हे तिने माझा हात घट्ट धरून ठेवला होता म्हणून मला कळले. पायाखालची वाळू सरकण्याचा अनुभव आयुष्यात असंख्य वेळा घेतला. मात्र वाळू जरी सरकली तरी पाय रोवून मी उभी राहू शकले ते नक्कीच तिने नाळेतून दिलेले बाळकडू होते.

"आमचं दोघांचं लग्न ठरल्यावर आम्ही संध्याकाळी ह्याच समुद्रावर येत असू." आई म्हणाली.
मी मनात आईचा हात धरून दुडूदुडू वाळूत उड्या मारत होते. आणि आई, बाबांबरोबर त्याच किनाऱ्यावर मनाशी स्वप्ने घेऊन चालत होती. मला हसू आलं. 
"भाईमामा ओरडले नाही वाटतं कधी तुला ?" मी विचारलं.
"लग्न ठरल्यावर येत होतो अगं !" बिचारी उगा गांगरली ! आणि तसेही हुशार आणि रुबाबदार बाबांशी असलेल्या आपल्या मैत्रीचा माझ्या भाईमामांना अभिमान होता ! ते कसले आईला रागावतायत !
"अजून जाऊया का आई पुढे ?" मी तिला विचारलं.
"नको. आता बसुया तिथे. बरं वाटलं आज." थोड्या अंतरावर असलेल्या दगडी कठड्याकडे नजर टाकून ती म्हणाली.

"काल तुझ्या आईबरोबर मी समुद्रावर गेले होते ! खूप छान वाटलं हं मला !" आतल्या खोलीत मला ऐकू आलं. आई माझ्या लेकीला अगदी आवर्जून सांगत होती.

घराच्या मागच्या बाजूला पाच मिनिटांच्या अंतरावर असलेला समुद्र. रात्री सर्व सुस्तावलं की अजून कानी गाज पडते. कित्येक वर्षांनी मी तिच्याबरोबर समुद्रावर एखादा तास काढला.

ते क्षण ओल्या वाळूचे होते.
शिंपल्यात एखादा वाळूचा कण शिरावा...सर्वत्र पसरलेला काळोख त्या कणाने नाहीसा करावा…काळवंडून गेलेले मन उजळून टाकावे, किल्मिष नाहीसे व्हावे आणि त्या रेणूचा टपोरा मोती होऊन जावा…
...असे मला वाटले.

3 comments:

Gouri said...

तसं बघितलं तर फार अवघड नसतं ग ... पण हे मोती वेचायचा मुहूर्त क्वचित लागतो. आई बाबांना घेऊन खूप दिवसांनी टेकडीवर गेले होते. अगदी हेच जाणवलं तेंव्हा ... अर्थात तूच ते लिहिलंस फार बरं झालं ... तुझ्याइतक्या नेमक्या शब्दात पकडता आलंच नसतं.

तृप्ती said...

:) masta post agadee.

Shriraj said...

sundar... kunala hi vachun he jag sundar ahe ase vatel... arthat te ahech, pan tyachi punaha-prachiti yeil