नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday 31 October 2013

Must watch....

प्रत्येकाने/प्रत्येकीने बघायलाच हवी आणि आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर 'शेअर' करायलाच हवी अशी short film...

That day after every day






 

Sunday 20 October 2013

मॅरो डोनेशन...

डोळे थोडे उघडे ठेवायलाच हवेत. सत्तावीस इंची संगणक वा टीव्ही म्हणजे जग नव्हे. चोवीस तास त्याच्याकडे बघत राहिल्याने जगाकडे बघण्याची दृष्टी नासते. कारण आपण शेवटी जे तिथे मांडले आहे तेच बघायला बांधील रहातो. आपले आकाश विस्तारू शकत नाही. त्यातून आपल्या 'मिडीया'वाल्यांना एकूणच आपला देश पाताळात चालला आहे असेच दर्शवायचे असते. अर्थात लोकसत्ताचे 'सर्वकार्येषु सर्वदा' सारख्या सदराचा अपवाद धरावयास हवा. तरीही एकूण सगळ्यांचा सूर नकारात्मक असतो. रोजचे वर्तमानपत्र वाचून जर आपण त्यांच्या दृष्टीतून आपल्या देशाकडे बघावयास लागलो तर आयुष्य संपवण्यापलीकडे काहीही उपाय रहाणार नाही.

आज आयआयटी, पवई येथे जायला मिळाले. मित्राचे त्यासाठी आभार मानायलाच हवेत. सचिनने बोलावले होते ते आज तिथे मॅरो डोनेशन ह्याविषयी माहिती देण्यात येणार होती त्याकरिता. तिथे काही जगप्रसिद्ध डॉक्टर उपस्थित होते. काही व्हिडीओ दाखवले गेले. चर्चा झाली. श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. 

त्यावेळी तिथे दिलेली लिफलेट्स मी स्कॅन करून टाकली आहेत. माझ्या अज्ञानाला वेठीस धरून मी त्यांचे भाषांतर करण्यापेक्षा तेच जर वाचलेत तर तुम्हाला अधिक नीट माहिती मिळू शकेल असं मला वाटतं.














लिंक: http://www.mdrindia.org/

इयत्ता पाचवीत असताना जेव्हा मला आपल्याला जे फळ्यावर दिसते त्यापेक्षा शेजारीच बसलेल्या जुईला अधिक दिसते हे कळले तेव्हा मी एक क्लुप्ती काढली होती. दोन्ही हातांचे आंगठे आणि त्याच्या बाजूची दोन बोटे मी डोळ्यांसमोर जुळवे व बारीक अशी एक चौकट  तयार करीत असे. त्यातून बघितले असता, नजर एकत्रित आल्याकारणाने, मला त्या चौकटीसमोरचे सुस्पष्ट दिसत असे. मात्र त्यावेळी आपल्याला कमी दिसते आहे हे कळले. बाबांनी मला डोळ्यांच्या डॉक्टरकडे नेले. आता ह्यात सर्वात आधी 'आपल्याला मुळातच कमी दिसते' हे मान्य करणे आले. व त्यानंतरच चष्मा हा उपाय माझ्या डोळ्यांवर अडकवण्यात आला.

आपले हे जे जग आपण २४ X ७ आखून घेतले आहे ते आपल्याला संकुचित करून टाकीत आहे हे मान्य करणे आले.

आजचा माझा दिवस कारणी लागला. मॅरो डोनेशन संदर्भात असलेली वयोमानाची अट लक्षात घेता मी डोनेशन करू शकणार नाही हे लक्षात आलं. ही माहिती माझ्या कानी, समोर निदान काही वर्षे आधी यायला हवी होती. मात्र तरीही माझ्या कार्यक्षेत्राला धरून मी 'मॅरो डोनेशन' संदर्भात काम नक्कीच करू शकते. त्या दृष्टीने माझा मेंदू लगेच चालू लागला हे मात्र नक्की.

हेही नसे थोडके...
:)

Saturday 19 October 2013

निवड

रामाने रावणाचा वध केला.
सीतेची सुटका झाली.
रावणाची दहा डोकी धरतीवर पडून राहिली.
किडे पडले. 
मांस संपून गेले.
त्यानंतर झाले काय… 
ते किडे गाभण राहिले.
त्यातून असंख्य किडे जन्माला आले.
वळवळत जगू लागले.
रावणाचे अंश असे पृथ्वीवर अस्ताव्यस्त पसरले.

सूडाला मृत्यू नाही.
सूड अमर आहे.
तो पुनर्जन्म घेतो.
असंख्य रावण मोकाट सुटले.
रामावरचा सूड घेत नाचू लागले.
राम पुण्यवान होता.
त्याला सद्गती मिळाली.
त्याचा आत्मा मुक्त झाला.
मग आता पुन्हा राम जन्माला येणार कुठून ?
असंख्य रावणाचे वध करणार कोण ?

सीता…
अशोकवन…
भकास अश्रू.
लक्ष्मीबाई…
पाठंगुळीस नारायण…
उसळती आग.
सीतेचा धावा,
लक्ष्मीचा लढा.
कोमल सीता,
सौदामिनी लक्ष्मी.
निवड माझी
मी सीता ?
की
मी लक्ष्मी ?

Monday 14 October 2013

अरेरे !

आपल्या मातेकडे संपूर्ण दुर्लक्ष करावयाचे.
आणि तिच्यावर अत्याचार झाले की म्हणावयाचे 'हिच्या पोटी मी जन्म घेतला ह्याची मला शरम येते.'
काय म्हणावयाचे ह्या वागण्याला ? 
ह्या  विचारधारेला ?
बेजबाबदार ?
आचरटपणा ?
की बालिशपणा ?
हे विधान मी माझ्या घरात बसून केले तर ते निदान जगाच्या नजरेआड तरी राहिले असते. परंतु, तसे न करता जालावर टाकावे ? ह्या कृतीकडे बालिश म्हणून दुर्लक्ष काय म्हणून करावे ? जालावरच जाऊन मी ह्या कृतीचा तीव्र निषेध काय म्हणून करू नये ?

दिल्लीतील पाशवी बलात्कार व त्यानंतर मुंबईतील बलात्कार. ह्या दोन बातम्या अमेरिकेत बसून तू वाचल्यास. तू सुन्न झालीस आणि मानसिक धक्यातून तू जालावर लिहिलेस…
'ह्या देशाची मी नागरिक असल्याची शरम वाटते.'

तो देश फक्त तुझा नाही. माझा देखील आहे. कोणत्याही फोटोफ्रेममध्ये वा मूर्तीत बसलेल्या देवापेक्षा वा फक्त देवच कशाला, माझ्या प्रत्यक्ष आईवडीलांपेक्षा देखील जिला मी माझे आयुष्य वाहिले आहे अशा माझ्या भारतमातेविषयी हे असे कोणी विधान करावे ? मी ते काय म्हणून सहन करावे ?

आता तुझी ही भावना आणि माझे जाज्वल्य देशप्रेम हे दोन्ही बाजूला ठेवू.
खडे सत्य बोलू. माझ्या वाचनात आलेले तुझ्या समोर ठेवते.
आधारसामुग्री (data) दाखवते, जे देश दुसऱ्या देशातील स्त्रियांना कशा प्रकारची वागणूक मिळते ह्याविषयी बोलतात त्या देशांमध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार हे इतर देशांपेक्षा अधिक असतात. उदाहरणार्थ, अमेरिकेमधील लैंगिक गुन्हेगारीचे प्रमाण हे २७.३, युनायटेड किंगडममध्ये २८.८, फ्रांन्समध्ये १६.२. इतर प्रगत राष्ट्रामध्ये स्विडनचे प्रमाण ६३ आहे. ह्या तुलनेमध्ये सर्वात कमी प्रमाण हे लेबेनॉनमध्ये दिसून येते. ०.५. ह्या तुलनात्मक अभ्यासामध्ये भारतातील बलात्काराचे प्रमाण हे १.८ आहे.

तुझ्या विधानान्तर्गत एक तुलना लपलेली आहे. ह्या देशाची नागरिक होण्याची शरम वाटते असे म्हणताना अमेरिकेत तुझे असलेले वास्तव्य बघता; त्या देशाचे नागरिकत्व बहुधा तुला अभिमानाचे वाटत असावे. कुठल्या ना कुठल्या देशाचे नागरिकत्व असणे हे गरजेचे. आज भारताला बलात्कारी देश म्हणून बोंबाबोंब करताना पृथ्वीवरील इतर देशांकडे देखील नजर टाकावीच लागेल. एखाद्या भारतीयाने विश्वविक्रम केला की माझा देश म्हणून छाती पुढे काढून मिरवायाचे व अशी घृणास्पद घटना घडली की मला शरम येते की मी भारताची नागरिक आहे…असे विधान करावयाचे…ह्याला दुटप्पीपणा म्हणू नये काय ? काही चांगले घडले तर मान ताठ करून चालणे व ज्यावेळी आपला परदेशी मित्र आपल्या मातृभूमीला बलात्कारी म्हणत आहे तेव्हा आपणही त्यात सामील व्हावे व जालावर घोषित करून टाकावे…मला लाज वाटते मी भारताची नागरिक आहे…हा कुठला न्याय ?

मला हे लिहायलाच हवं होतं. ती गरज होती. माझा देश उघड्यावर पडलेला नाही. त्याचे नागरिकत्व घेणे वा असणे ही कोणावरही जबरदस्ती नक्कीच नाही. उलट अशी जबरदस्ती होऊ नये. कुठलही नातं बळजबरीने नाही तग धरू शकत. आपण कुठे आणि कोणाच्या पोटी जन्म घेऊ ह्यावर आपला ताबा नक्कीच नसतो. मात्र आपण ज्या भूमीवर जन्म घेतला त्या देशाला अभिमान वाटावा असे आपण नक्कीच काही करू शकतो. ते आपल्या हातात नक्कीच असते. मात्र दुसऱ्या देशात राहावयाचे, तेथील सुखसोयींचा उपभोग घ्यावयाचा आणि मग जगभरातील लोकांना नाहक माझ्या मातृभूमीची मला कशी लाज वाटते असे सांगणे हा मात्र गुन्हा आहे. अक्षम्य गुन्हा.

ह्या दोन्ही बातम्या जशा मला सुन्न करतात तशीच जगाच्या पाठीवर असंख्य स्त्रियांवर होणारे पाशवी अत्याचार जेव्हा माझ्या वाचनात येतात तेव्हा मी एक माणूस म्हणून सुन्न होते. माणूस म्हणून जन्माला आल्याची घृणा मनात दाटते. आज भारतीय स्त्रिया धीर एकवटायला शिकल्या आहेत, बलात्कार झाला ह्याचा अर्थ आपले आयुष्यच संपून गेले, आता समाजात तोंड दाखवायला जागा उरली नाही वगैरे गैरसमजातून हळूहळू बाहेर पडत आहेत. पोलिस स्टेशनावर पोचत आहेत. घडलेल्या गुन्ह्यांची नोंद होऊ लागली आहे. मग अगदी छेडछाडीची देखील. हे बळ आम्ही भारतीय स्त्रियांनी नक्कीच मिळवले आहे. आमचे ओझे पेलण्यास आम्ही समर्थ आहोत. आमच्यावर बलात्कार झाले म्हणून परदेशात बसून ज्या माणसांची मान 'अरेरे, मी भारतात जन्म घेतला' असे विचार मनात येऊन खाली जाते, अशा दुतोंडी, स्वार्थी परदेशस्थ स्वदेशीयांची भारताला गरज काय ?

शरमच जर वाटायला हवी आहे तर ती घडलेल्या घटनेची वाटायला हवी !
मी ह्याबाबत काही करू शकत नाही वा करू शकणार नाही ह्याबाबत स्वत:ची शरम वाटायला हवी !
आज ह्या प्रयासात आपला म्हणावा असा कुठलाच देश आपल्याकडे उरला नाही ह्याची शरम वाटावयास हवी !
अरेरे !

Friday 11 October 2013

'सकाळ'च्या तनिष्कामध्ये हजेरी !

आपल्याबद्दल, लिखाणाबद्दल काही लिहून आलंय असं कोणी सांगितलं तर मनातील पहिली प्रतिक्रिया काय असते ? भीती. 'कोण जाणे काय लिहिलं असेल ?! बरं लिहिलंय की वाईट ?' इत्यादी ! म्हणजे आधी भीती नंतर चिंता ! मग जे काही लिहून आलंय ते नजरेसमोर आलं की धीर एकवटून वाचणे ! आणि मग एकंदर बरंच लिहून आलेलं दिसलं तर हुश्श !

खरं तर असं होता कामा नये ! आपण कोणाला खुष करायला तर लिहित नाही ! सर्वसामान्य आयुष्य जगत असताना जे जे प्रसंग समोर येतात त्यातून जाताना आपण नक्की कसे सामोरे जातो, हे मागे वळून बघितले तर आपलीच ओळख आपल्याला होऊ लागते. आणि स्वत:शी खरं बोलता आलं नाही, सोंगं आणावी लागली तर जगणे अवजड होईल ! समोरच्याला सोडा, इथे स्वत:ला आपण ओळखू शकलो तरी खूप झाले ! त्यामुळे घडले तसे, त्यात्या वेळी वा नंतर मनात झालेल्या उलाढाली ह्या स्वच्छ, सुलभ मराठीत लिहिण्याचा प्रयत्न असतो. जेणे करून वाचणाऱ्याला त्या प्रसंगामध्ये स्वत:ला उभं करता यावं. मग हातून मूर्खपणा झाला असला तरी तो तसाच उभा करणे हेही आलेच ! नसते सोंग आणा कशाला ?!
नाही का ?

…तर झालं असं की तुम्हा सर्वांसारखीच पुण्याची माझी एक मैत्रीण. तिने मध्यंतरी सांगितलं की 'सकाळ'च्या तनिष्का सदरामध्ये तुझ्या ब्लॉगवर लिहून आलंय… ब्लॉगचं नाव नाही दिलेलं पण लिखाणातून ओळख पटतेय.
धाबं दणाणलं. काय आलं असेल ? तिला विचारलं. ती म्हणाली चांगलंच आलंय ! मग ऑनलाईन तनिश्काचा शोध वगैरे. नाही लागला. मग पुन्हा तिच्याकडे वळले ! तिला थोडा त्रास देणे आता भाग होतं ! नाही मिळत म्हटलं… स्कॅन करून पाठव बाई तूच आता !

काल खरं तर दिवे मालवून गादीवर पडले होते. पण का कोण जाणे झोप लागेना. झोप न लागणे म्हणजे नाहक आयुष्याची चिंता वगैरे माझ्या डोक्यात शिरू लागते. म्हणून म्हटलं बघू… फेसबुकवर कोणी चकाट्या पिटत असेल तर आपण देखील थोड्या पिटू ! म्हणून विश्वाचे द्वार उघडले ! 
तेव्हा द्वाराबाहेर मैत्रिणीचे मेल विसावले होते ! मेल थोडी फुगीर होती. त्यात दोन जेपेग्स ज्या बसल्या होत्या !  
धाबं !
डाउनलोड होत होत्या तेव्हा मनात आलं…
बारा महिने तेरा काळ जाहिरातक्षेत्रात असते खरी…ग्लॅमर अवतीभवती फिरत असतं…ते खरं तर आपल्या स्वभावाविरुद्ध…लेक तर म्हणतच असते…'तुला तत्व धरून जगायचं तर असतं…पण जे फिल्ड तू निवडलंयस ते तर खोटं…किंवा मुलामा चढवलेलं…तरी तू कशी काय रमू शकतेस कोण जाणे ?!'

माझ्या लिखाणातील खरेपणा हा माझा आहे…समोरच्याला भावला असेल का…कुठे लागट लिहिलं असलं तर ? टीका झेपवून घेता यायला हवी !

वाचा आता तुम्हीच !
ब्लॉगच्या नावाचा स्पष्ट उल्लेख नसल्याकारणाने 'रेस्टइजक्राईम' बद्दलचं लिखाण मी सोयीसाठी वेगळ्या रंगात केलं आहे.
केतकी, धन्यवाद गं !  :)


Wednesday 9 October 2013

माझा गणपती

गेल्या वर्षी म्हटल्याप्रमाणे आम गणपतींचं दर्शन घ्यायला मी जात नाही. कारण एखाद्या ठिकाणी आपण उपस्थित राहिलो, तेथील भक्त गणतीमध्ये आपण एक आकडा वाढवला तर त्याचा अर्थ त्या गणपतीचे भक्त ज्या विचारांनी उत्सव साजरा करितात त्याला आपला पाठींबा आहे असा होतो. मी नसत्या फंदात पडत नाही. ह्याचा अर्थ असा अजिबात होत नाही की 'मी' न गेल्याने सार्वजनिक मंडळांना काही फरक पडतो. पण प्रश्न मला रात्री शांत झोप लागण्याचा असतो. आणि मला झोपायला फार म्हणजे फारच आवडतं. इतकं की लहानपणी मी झोपून कित्येक तासांनी उठले की मला पत्ता नसायचा…तोच दिवस आहे की रात्र उलटून गेली आहे आणि दुसरा दिवस उजाडला आहे ! तर मला शांत झोपायला आवडतं आणि दिवसभर उगाच चुकीच्या गोष्टी करून गादीवर पडलं की डोक्यात भुंगा शिरतो. 
म्हणून माझ्या स्वत:च्या मन:शांतीसाठी, चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या उत्सवांच्या फंदात मी पडत नाही.

असो.
तर गेल्या वर्षीपासून मला एक अतिशय सुंदर गणपती सापडला आहे. आमच्या ऑफिस समोरच्या रुस्तम चाळीतला गणपती. हा नवसाचा गणपती आहे. दोन तीन दशकांचे वय ह्या गणपतीचे आहे. चाळीतील लहान मुले त्याची सजावट करतात. चाळीतला चित्रकार एका ठराविक भिंतीवर गणपतीचे सुंदर, रेखीव चित्र काढतो. त्याच्या पुढे टेबल टाकून मुले एखादी कल्पना घेऊन भन्नाट सजावट करतात. विसर्जनाच्या दिवशी नारळाच्या पाण्याने भिंत पुसून काढली जाते. 
बस. 
इतकं सहज. इतकं सुंदर
ना ढोल ताशा ! ना भक्तीचा तमाशा ! 

मला त्या चित्रातील गणपतीच्या अस्तित्वाविषयी तिळमात्र देखील शंका नाही. बाकीचे राजेबिजे, जेव्हा विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्राला त्सुनामी येऊन गेल्याचं भग्न रूप देतात तेव्हा हा गणपती शांत चित्ताने लाकडी कठड्याला लटकणाऱ्या डालडाच्या डब्यातल्या तुळशीच्या हिरव्या रोपाच्या शीराशीरांतून वहात असतो !
















आत्ताच बातमी वाचली !!!!!
'लोकसत्ता गणेश मूर्ती स्पर्धे'तील 'पर्यावरणस्नेही' सजावटीचे विशेष पारितोषिक लोअर परळ येथील रुस्तम रहिवाशी गणेशोत्सव मंडळाला मिळाले.
खूष ! एकदम खुष !

Tuesday 8 October 2013

ढेप

रोजच्या आयुष्यात पानंफुलं, इंद्रधनुष्य, फुलपाखरं वगैरे लिहिणं फार कठीण. खरं तर मागे वळून पाहिलं असता स्वत:ची ओळख स्वत:ला पटत नाही. अर्थात ह्या सर्व त्यात्या वयातील गोष्टी असतात. निदान सोळाव्या वर्षात तरी मला जग सुंदर दिसू शकलं हे माझं भाग्यच म्हणायचं. परंतु, सध्या लिहायला सुरवात केल्यावर मला मार्गावर दवबिंदू दिसत नाहीत. सामान्य माणसाने सामान्य जगण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या वाट्यास कुठले दवबिंदू ?

तत्वांना धरून जगायचं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या मित्र मंडळींचा रोष ओढवून घेणे.

मजल्यावर तीन लिफ्ट्स. आमचा मजला तिसरा. फारफार तर पन्नास सेकंद तिष्ठत उभं राहावं लागतं. अशाच एके दिवशी आम्ही दोघी वाट  बघत उभ्या होतो. मुंबईतील लोकलमधील लोकं रोज चेहेरा दिसतो म्हणून नाही का नजरभेट झाली की हसून निदान मान तरी डोलावत ? मला तिचं नाव नाही माहित…चेहेरा मात्र खात्रीदायक ओळखीचा. मनातील चढउतार चेहेऱ्यावर दिसावेत त्याप्रमाणे लिफ्टच्या डोक्यावरील दिवा आतील हालचाल दर्शवित होता. एक लिफ्ट उघडली. दोनतीन माणसे बाहेर पडली.
माझी बिननावाची मैत्रीण चापल्याने आत शिरली. तिने बटण दाबून धरलं. लिफ्ट आ वासून स्तब्ध.
"Come!" मला तिने इशारा केला.
"But that one is going up." मी म्हटलं.
"That's okay ! We will take it down !" आत्मविश्वासाने ती उद्गारली. एकदा मिळालेल्या आदेशानुसार वर निघालेल्या लिफ्टला अधोमार्गावर नेणे तसे फारसे कठीण कुठे ? फक्त एक लाल बटण दाबावे. आणि तिला खाली जाण्याचा आदेश द्यावा.
"But…people must be waiting upstairs."
"That doesn't matter!"
"No…I can't do that."
वरच्या मजल्यावरची माणसं काही माझी मित्र नव्हती. पण मित्र असण्याचा संबंध आलाच कुठे ?
तिने खांदे उडवले. कुठून मी या बाईला विचारलं असं काहीसं. तिच्यासाठी बाब फार शुल्लक होती. दार बंद करून घेतले. वर आकडा दोन पेटला. लिफ्ट मान खाली घालून निघाली. तिच्या हातात तसेही काही नसतेच.

एखाद्या लहानश्या गोष्टीत आपण आपला स्वार्थ बाजूला ठेवू शकत नाही. मग आयुष्यात कधी एखादा मोठा लाभ समोर आला तर आपण कसे घट्ट उभे रहाणार ?

नाही म्हणणे कठीण असते काय ? वाल्याच्या बायकापोरांनी वाल्याला नकार नव्हता का दिला ? दुसऱ्याच्या ताटातले आपल्या ताटात ओढून घेणे ही एक वृत्ती नव्हे काय ? कधी छोट्या तर कधी मोठ्या प्रसंगातून ती बाहेर डोकावते. आपल्या डोक्यात हे असले कृमी अंडी घालीत तर नाहीत ना ह्यावर आपण लक्ष ठेवले पाहिजे. नाहीतर डोके भ्रष्ट व्हायला फार काळ नाही लागायचा.  आपण जगात एकटेच आहोत व ह्या जगाचा जन्मच मुळात माझ्यासाठी झालेला आहे असा भ्रम करून घेण्याचे आपण बंद करावयास हवे.
आपली कृती, ही येणाऱ्या पुढल्या क्षणाची जबाबदारी पेलत असते.
Trying to see a bigger picture….असं काहीसं.

तत्त्व म्हणजे गुळाची ढेप...
आपण…