नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 24 June 2013

किंवा…कदाचित…

वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि त्यातून पराकोटीची घटना घडते. मृत्यू. कधी एखादा तर कधी असंख्य. त्याला कारण कधी आपला स्वत:चा निष्काळजीपणा वा कधी दुसऱ्या कोणाचा. उदाहरणार्थ, कधी मी सिग्नल तोडून माझे वाहन पुढे आणलेले असते वा बागेत चालल्यासारखी मी भर रस्त्यात चालत असते. अशी अनेक कारणे असतात मृत्यू ओढवायाला. कधी भीषण तर कधी एखाद्या माणसाला शांत मरण येऊन जाते. म्हणतात ते त्याचे पुण्य असते.

मृत्यू हे सत्य आहे आणि तो वेगवेगळ्या स्वरूपात येतो.

मला फार लहानपणी माझ्या माणसांच्या मृत्यूची भीती वाटत असे. पराकोटीची भीती. बाबा कधी झोपलेले दिसले की मी वारंवार त्यांचा श्वास चालू आहे की नाही ह्याची खात्री करून घेत असे. त्यांच्या मृत्युच्या भीतीने मला रात्ररात्र झोप लागत नसे. कधी माझ्या स्वप्नात माझे बाबा मेलेले असत तर कधी माझी बहिण. रोज रात्री माझ्या रडत उठण्याला माझे बाबा सोडून सगळे कंटाळलेले होते. शेवटी बाबांनी माझ्या उशाखाली छोटा चाकू ठेवायला सुरवात केली आणि कसं कोण जाणे पण मला मृत्यूविषयी भीतीदायक स्वप्नं पडणे बंद झाले. हा बाबांचा कोकणातील रामबाण उपाय.

मग कधी बालपणीची मैत्रीण, कधी सख्खी आजी, कधी  एखाद्या मैत्रिणीचे बाबा, नेहेमी घरी येणारे एखादे काका असं करत करत मृत्यू आमच्या दारात आला आणि माझ्या बाबांना घेऊन गेला. ते फार भयंकर झाले. म्हणजे एखाद्या माणसाची नुसती ओळख होणे वेगळे आणि एखादा माणूस अगदी आरपार आपल्या घरात शिरणे वेगळे. हा तर कधीच नकोसा असलेला पाहुणा…
पण मग हे आयुष्यातील सत्य वळलं. त्यातील टाळता न येण्याचा अविर्भाज्य घटक कळला. हळूहळू एखादी मैत्रीण, शाळेतल्या एखाद्या लाडक्या बाई, मामेबहीण, मावसबहीण…काळाच्या ओघात नाहीसे होणाऱ्या माणसांची ही यादी वाढतीच असते…तेव्हा शेवटी त्याला इत्यादी इत्यादी लागू शकते हे पण जाणवले. कारणे वेगवेगळी. कधी हृदयविकाराचा झटका, कधी एखादा अपघात, इथेतिथे कर्करोग अशी विविध कारणे. बाबा गेले तेव्हा एक डॉक्टर मावशी म्हणाली, "मरायला शेवटी एक कारण लागतं." त्यावेळी हे असं मावशी कसं काय बोलू शकली वगैरे वगैरे वाटलं. बुद्धी थोडी बाल होती. आयुष्यात अजून बरंच काही शिकायचं होतं.

मृत्यू ही एक अंतिम आणि अटळ घटना असते. आणि तो शरीराचा होत असतो. आपल्या वागण्याने आपण आप्तांच्या आत्म्याला रोज जे क्लेश देत असतो तो त्या आत्म्याचा ऱ्हास अधिक वाईट. तीळतीळ मरण. आत्म्याचे.
हे झाले विषयांतर.

आपले आप्तस्वकीय गेले की होणाऱ्या दु:खाला सीमा नसते. आणि त्यात कुठलीही तुलना नसते. म्हणजे आज माझा नवरा गेला तेव्हा माझे दु:ख अधिक तुझा तर काय बाबाच गेलाय…असे काही डोक्यात येणे हा तद्दन मूर्खपणा. तसेच आज एखाद्या माणसाचे आईवडील वारले तर त्याला होणारे दु:ख; हे मला अनोळखी असेल वा माझ्यापर्यंत ते पोहोचूच शकत नाही…असे म्हणणे हे कितीसे बरोबर ? प्रत्येकाच्या आयुष्याला हा मृत्यू स्पर्श करून गेलेलाच असतो. काल, आज ना उद्या. आपल्या माणसाची चिता पेटवणे, ते कायदेशीर कागदपत्र तयार करून घेणे, मृतदेहाची ओळख पटवून देणे, आपल्या माणसांची  कुजलेली, किडे पडलेली शरीरे ताब्यात घेणे, त्यावर ते सोपस्कार करून त्यातून थंड डोक्याने बाहेर येऊन पुढले आयुष्य काहीच झाले नाही असे जगू लागणे हेच तर आयुष्य असते. शेवटी परीक्षा जिवंत माणसाची असते. मृत नाही. एकदा का हे कळले आणि वळले की जगता येते. त्यासाठी मरणाचे सगळेच प्रकार समजून घेण्याची गरज पडत नाही.

सध्या उत्तराखंडामधील मृत्यूच्या बातम्या आपण ऐकत आहोत. बघत आहोत. त्यात कोणाची चुकी ह्यावर चर्चा होत आहेत आणि काही दिवस होत रहातील. चर्चा करणे हा मनुष्याचा स्वभावधर्म आहे. प्राण्यांची भाषा मनुष्याला अवगत नसल्याकारणाने तिथे वाहून गेलेले घोडे, हरणे ह्यांच्या विषयी त्यांच्यात चर्चा झाली की नाही हे समजायला मार्ग नाही.

माझा स्वत:चा कर्मावर फार विश्वास आहे. थोडंफार वाचन आणि वडिलांच्या विचाराचा प्रभाव हे कारण असू शकेल. आज जे काही बरं म्हणा वा वाईट म्हणा माझ्या कुठल्या ना कुठल्या तरी कर्माचे ते फळ आहे. कधी गोड तर कधी कडू. महाभारतामध्ये ज्यावेळी द्रौपदी कृष्णाला विचारते," माझ्यावर हा असा भयानक प्रसंग ओढवला (वस्त्रहरण) त्यात माझी काय चूक ?" त्यावरचे कृष्णाचे उत्तर मला माझी प्रत्येक कृती ही माझी जबाबदारी आहे हे समजून, जाणून घेण्यास भाग पाडते. आणि हलकेच हसू देखील आणते. "जातीचे कारण देऊन तू कर्णाला नाकारलेस. त्याचा अपमान केलास. कर्णाला वरले असतेस तर त्याने तुला वाटून घेतले नसते, असे द्यूतात लावले नसते. तेव्हा तू जे कर्म केलेस त्याची जबाबदारी उचल. ती नाकारू नकोस."
हे असे स्पष्ट उत्तर कृष्णाच्या जिवाभावाच्या सखीला, द्रौपदीला, फारसे आवडले नाही म्हणे.
तसेही समोरच्याने आपली चूक दाखवून दिलेली कोणाला आवडते ?

मग आता उत्तराखंडातील महाप्रलयामध्ये जी मनुष्यहानी झाली त्यात त्या माणसांचा दोष काय ?
कदाचित…
ह्याचे उत्तर ज्यात्या आत्म्याने शोधावयाचे असेल.

किंवा…
कदाचित…
देवाला, जो संदेश मनुष्यजातीपर्यंत पोहोचवायचा होता; तो संदेश पोचवण्याची कामगिरी…हेच त्या अनेक जीवितांचे कार्य असेल. आणि त्याचा संदेश फक्त एखाद्या व्यक्तीमार्फत नव्हे तर अनेक व्यक्तींमार्फत, तो मनुष्यजातीपर्यंत त्याने पोहोचवला असावा. मृत व्यक्तींचा आकडा जितका मोठा तितका त्या देवलोककडून आलेला संदेश महत्त्वाचा नव्हे काय ?

किंवा…
कदाचित…
ज्या देवावरील अतीव विश्वासाच्या आधारे; आत्यंतिक कष्ट सहन करीत त्याचे भक्त त्याच्या द्वारी पोहोचले होते…त्याच्या द्वारी शरीरत्याग करिता येणे…आत्मा अनंतात विलीन होणे हे एका परीने पुण्यच नव्हे काय ?

किंवा…
कदाचित…
भौगोलिकदृष्ट्या नाजूक व देवाचे वास्तव्य जेथे आहे ( असे मानले जाते आणि म्हणूनच तर तेथे रीघ लागते ) अशा परिसरात, बेसुमार व निसर्गाचे भान न ठेवता बांधकामे केली जात आहेत, त्याच्या वास्तव्याचे बाजारीकरण केले आहे; आणि असे असूनही तेथे श्रध्देच्या भावनेने जाणे म्हणजेच तिथे चालू असलेल्या पापामध्ये वाटेकरी होणे, असे त्या देवाचे म्हणणे असेल व त्या 'कर्मा'ची ही फळे नसतील असे कशावरून ?

किंवा…
कदाचित…
मनुष्यजातीकडून नित्य होणाऱ्या असह्य शारीरक क्लेशामुळे देव तिथून कधीच निघून गेला असेल.

किंवा…
कदाचित…
परवाचा महाप्रलय हा त्याचा कोप असेल….
"आता मला एकट्याला, शांततेने जगू द्या !" असा हा त्याचा आकांत असेल.

कोण जाणे. 


7 comments:

Gouri said...

अनघा, तुझी ही पोस्ट, मागची पोस्ट दोन्ही वाचल्या. काय प्रतिक्रिया देऊ कळत नाहीये. निरुत्तर केलं आहेस तू!

Abhishek said...

असे अजून कितीतरी 'किंवा' असतील, आणि त्यांना मानणारे लोक असतील... म्हणून कदाचित मनुष्यात थोडा माणूस अजून असेल ... नाहीतरी संगणकोबांची संख्या हल्लीच्याने वाढतेच आहे

Shriraj said...

kharay! mrutyu hi marnarysathi shiksha nastech muli.... tyachyavachun jagnaryansathich ti kharitar shiksha aste. Pan nisarg kopachi karan mimavnsa karne kharetar khup kathi ahe... tyala baryach shakyata jodta yeu shaktat

Anagha said...

कोण जाणे गौरी, कदाचित मला स्वत:ला दुसऱ्याला दोष देण्याआधी आत्मपरीक्षण करण्याची सवय लागली असावी. त्यामुळे आपल्या आयुष्याचे खापर समोरच्याच्या डोक्यावर मारण्यासारखा सर्वात सोपा उपाय जमत नाही. आणि असं वाटतं की जोपर्यंत आपण असा विचार करीत नाही तोपर्यंत आपण सुधरत नाही. आणि सुधारणार तरी कसे ? कारण आपलं काही चुकतंय हेच आपल्याला मान्य नाही.

Anagha said...

अभिषेक, मनुष्यात माणूस ? सध्या वेगवेगळी वर्तमानपत्र वाचताना बरीच 'माणसे' भेटतात आणि धीर देऊन जातात. :)

Anagha said...

श्रीराज, अगदी खरं. मात्र त्या सगळ्या शक्यता आपल्यापर्यत पोचतात…मनुष्यापर्यंत.

रोहन... said...

सुंदर... पटलं आणि भिडलं देखील. विशेष करुन पहिला अर्धा भाग खासच.