नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 10 June 2013

देहदान

आपले आयुष्य हे दुसऱ्याचे ओझे होऊ नये.
आकाशातून पुढे सरकताना ढग मागे ओझे ठेवून जात नाही.

सभोवताली सगळे मर्त्य मानव जेव्हा माझ्या मरणाविषयी बोलू लागले त्यावेळी मला जाणवले. आपला अवतार आता संपवायला हवा. इतर कोणी येऊन घाव घालण्याआगोदर आपणच आपले मरण ठरवावे. जन्म ह्याच माणसांनी दिला खरा. पण त्याला आता पन्नास वर्षे उलटली. आपल्या जन्मदात्या वृद्ध आई बापांचा सहवास म्हणजे डोक्यावरचे ओझे मानणारा हा माणूस. त्याला माझे कसले सोयर ?

"पुन्हा अर्ज पाठवून बघा. आणि आता काय करणार ?"
आमच्या सोसायटीच्या अंगणात मी उभा होतो. ताडमाड. नित्य भरपूर नारळ देत असे. कधी कोणाला त्रास नाही. पण अडचण झालो खरा. संस्थापक सभासदांनी जेव्हा इमारत उभी केली त्यावेळी असे बरेच माड पेरले. सोसायटीला आयते उत्पन्न आम्ही मिळवून दिले. परंतु, आता काळाची गरज वेगळी होती. इमारतीचे जेष्ठ सभासदांना 'लिफ्ट'ची गरज भासू लागली. ज्यावेळी इमारत उभी राहिली त्यावेळी सर्वात वरच्या मजल्यावरची घरे त्यांनी घेतली खरी. परंतु, जसा मी पन्नाशीला जाऊन ठेपलो तशी ही मंडळी सत्तरीच्या पुढे गेली. मी वरून खाली बघितले तर मला इमारतीची गच्ची दिसते. पण इतके आता आमच्या जेष्ठ नागरिकांना नाही चढवत. मग वास्तूशास्त्रज्ञ बोलावले गेले. अभ्यास झाला, नकाशे काढले गेले. आणि त्यात माझे मरण ओढवले. महानगरपालिकेला अर्ज गेले. नकार मिळाला. माड असा तोडता येणार नाही, असे सांगितले गेले. पुन्हा अर्ज पाठविला गेला. पुन्हा नकार. माड तोडण्यासाठी लागणारा खर्च काढला गेला. अंदाज काढल्याशिवाय कोणत्याही गोष्टी पुढे सरकू शकत नाही. दहा हजाराचा एक अंदाज वर्तविला गेला. मरण महाग. पुन्हा एक अर्ज. पुन्हा नकार. हवं तर झाडाच्या फांद्या तोडा, पण तुम्ही झाड तोडू शकत नाही. महानगरपालिका म्हणाली. माझ्या भोवती बांधलेल्या लालचुटूक पाराभोवती जमून सर्व चर्चा होत. माझ्या कानावर तर पडतच. माझ्या अंगाखांद्यावर तुरूतुरू धावणारी खारुताई पण सर्व ऐकत असे. आणि मग कुजबुजे माझ्या कानात. मी विचार करू लागलो होतो. अगदी पहिल्या दिवशी जेव्हा एका वास्तूशास्त्रज्ञाने माझ्याकडे बोट रोखले होते, तेव्हाच खरं तर मी विचारात पडलो होतो. सरळसोट विचार. कुठेही गुंता नाही. भूमीत रोवलेला पारंब्यांचा गुंता नाही.

अनुभव बरेच शिकवतो. कोणी माझ्या झावळ्यांवर घाला घातला नाही. म्हणजे मला शरीरत्याग करणे भाग होते. मी अडचण झालो होतो. माणसांना जाचक झालो होतो. आपली माणसं प्रगती करू पहात असता घरातील वृद्ध माणसांनी काळाची गरज मानून दूर व्ह्यावयास हवे. असे काही तरी.

काल मुंबईत पाऊस सुरू झाला. माझ्या विचारांना दिशा मिळाली. मी शरीर झोकून दिले. शरीर त्यागिले. जेव्हा समोर रस्त्यावर आडवा झालो तेव्हा एक मात्र केलं. पदपथाला लागून असलेल्या दोन गाड्यांच्या मधोमध जाऊन विसावलो. विजेचा खांब जपला. आपल्यामुळे कोणाचेही नुकसान व्हायला नको….देता येईल तितके द्यावे…कोणाचे देणे डोक्यावर ठेवू नये. कुठून कुठून तरुण मंडळी धावली. दहा बारा नारळ हाहा म्हणता गायब झाले. कोणा तहानलेल्याच्या तोंडी पाणी आणि भुकेल्या पोटी खोबरे.

फायर ब्रिगेडची गाडी आली. माझे अवयव वेगवेगळे झाले. तुकडे केले गेले. 
झावळ्या, शहाळी आणि लांबसडक मजबूत खोड.
मी देहदान केले.

जसे जीवन तसे मरण कामी आले.

वरून कोसळणाऱ्या पावसाच्या त्या धारा अंगावर घेत आमची कावरीबावरी खारुताई थरथरत उभी होती.
आवरता न येणारं खारं पाणी पावसाच्या धारेत कधीच मिसळून गेलं.


18 comments:

Shishir said...

Sundar Kharach Shabdach Apure aahet....

sheetal said...

Sundar...Shabdach Apure aahet manatalya bhavana mandayla...

Pankaj - भटकंती Unlimited said...

जगणंच माड व्हावे !

Gouri said...

सुंदर! त्याला खरंच असं वाटलं असेल ग!
एक सुभाषित आठवलं तुझ्या माडावरून. लहानपणी माणसांनी घातलेल्या थोड्याश्या पाण्याचं ओझं माड आयुष्यभर डोक्यावर बाळगतात, आणि म्हणून मरेपर्यंत अवीट गोडीचं मुबलक पाणी देतात असं काहीसं:
प्रथमवयसि पीतं तोयमल्पं स्मरन्ताः
शिरसि निहितभारा नारिकेला नराणाम् ।
ददति जलमनल्पास्वादमाजीवितान्तं
न हि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति ॥

Abhishek said...

माज्यावरती 'कोणी मी', राख राख बनताना
धूर सोडत हळुच म्हणेन -

"बरं झालं मी झाड झालो
अगदीच कुजून मराण्यापेक्षा....."

"बरं झालं मी झाड झालो
अगदिच काही नसण्यापेक्षा...!"

संदीप खरे

Ketaki Akade said...

शेवटच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फुलोरा
थकले पाऊल सहज उठावे
आणि सरावा प्रवास सारा

खूप छान लिहिलंएस..

Shriraj said...

sundar!

रोहन... said...

मी म्हणालो ना तुला. ते माडाचे तुकडे ठेवून घे हवतर. :) आठवण म्हणुन.

भानस said...

म्हणूनच नं माडाला ‘सत्य सृष्टीतील कल्पतरू’ म्हणतात.

Anagha said...

शिशिर, धन्यवाद. :)

Anagha said...

शीतल, आभार :)

Anagha said...

पंकज, खरोखर. :)

Anagha said...

गौरे, शतश: प्रणाम ! :)
मला नेहेमी वाटत असतं, संस्कृत सुभाषितमालेमध्ये एकापेक्षा एक सरस उपमा दिलेल्या असतात…आता खरं तर काही नवीन उरलेलंच नाहीये. :)

Anagha said...

भारी !
अभिषेक, :)

Anagha said...

'शेवटच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फुलोरा
थकले पाऊल सहज उठावे
आणि सरावा प्रवास सारा'…

केतकी, सुंदर गं !

Anagha said...

श्रीराज, आभार. :)

Anagha said...

रोहणा ! :) :) :)

Anagha said...

अगदी खरंय भाग्यश्री. :)