नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 31 March 2013

वरून कीर्तन...

आपल्या देवाने काय पाप केलंय कोण जाणे.

निदान पंधरवड्यातून एखादा दिवस तरी काढावयास हवा आणि आपल्या वातानुकुलित कचेरीतून बाहेर पडावयास हवे. त्यासाठी फार पैसे खर्च करण्याची किंवा पैसे बाजूला ठेवण्याची वगैरे गरज नसते. फक्त जमिनीवरचे पाय जमिनीवरच ठेवण्याची गरज. आपली जी काही लहानथोर पदवी कचेरीत आहे ती देखील घरी उशीखाली ठेवावी. सोमवारी सकाळी ती टोपी पुन्हा डोक्यावर घालता येते. त्याने होते काय की आपण हे पृथ्वीला पडलेले एक मनोहारी स्वप्न आहे हा भ्रम दूर होऊन, रोज कचेरीत बसून संगणक बडवण्यापेक्षा, आपल्याला मिळालेल्या दोन हातांनी बरेच काही करता येण्यासारखे आहे ह्याची जाणीव होते.

कधीही, कुठेही बाहेर पडले तर माणसांनी स्वत:ला भोवती बसवलेल्या धर्माची चौकट ही सापडतेच सापडते. चर्च, मशीद किंवा मंदिर.
मात्र...एक नक्की...मुसलमान किंवा ख्रिश्चन...दोघांनीही आपापल्या देवांना स्वच्छ घरे बांधून दिली आहेत. मशिदी ? शांत. 'मशिदीच्या आवारात कचरा फेकू नये. तसे करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.' चर्चेस ? देखणे बांधकाम. आवार साफसुधरे. 
देवावर विश्वास ठेवायचा म्हटला, तर ह्या घरांमध्ये त्यांचे देव रहात असतील असे वाटू शकते.

आपल्या देवांची घरे उकिरडे आहेत.
हे सत्य आहे. आपल्या कुठल्यातरी कर्माची शिक्षा देव भोगत आहेत. आज आपण आपला धर्म म्हणून तावातावाने भांडत असतो, कधी जाळपोळ करतो, खूनखराबे होतात. परंतु ज्या देवासाठी आपण हे सगळे इतके करत असतो, त्या देवाला कुठल्या पापाची शिक्षा आपण देत असतो ?

तो देव जाणे आणि त्याचे 'so called' भक्त जाणोत.

आम्ही काही मित्रमंडळी वेळ मिळेल तेव्हा सकाळी घर सोडतो. व आपल्या कॅमेऱ्यातून जे नजरेसमोर येईल ते व त्यामागे समाजाची भावना दिसून येते ते...टिपत असतो.

आज बाणगंगा.
इतकी वर्षे मुंबईत राहून देखील इथे जाणे झाले नव्हते.

अदमासे दहाच्या सुमारास आम्ही तेथे पोचलो. डाव्या हाताला काही श्राद्धे चालू होती. समोर हिरव्या तलावात करडी पांढरी बदके पोहत होती. तरुण, लहान मुले बदकांना खाद्यपदार्थ भरवित होते. उजव्या हाताला एक पन्नाशीच्या आसपासचा पुरुष खराटा हातात घेऊन मन लावून पायऱ्या झाडत होता. बाकी ? गलिच्छ. तलावाच्या काठाकाठाने प्लास्टीकच्या पाण्याच्या शीतपेयांच्या बाटल्या, बिस्किटांची वेष्टणे...हे आणि ते. तलावाच्या पाण्यात ज्या वस्तूंचे स्थानच नाही अशा असंख्य वस्तू. हे कोणाच्याही नजरेस का खटकत नाही ? ह्यावर कोणी काहीच करू का इच्छित नाही ? इथे 'हे सगळं फक्त मलाच दिसतं आणि मीच फक्त ह्यावर काही करू शकते, वा मीच करू इच्छिते असा माज मला अजून तरी आलेला नाही. हळूहळू तोही येईल बहुदा.

"काका हे काम तुम्ही रोज करता ?"
"हो तर. रोज करतो."
"तुम्हाला पगार मिळतो ?"
"हो. बाराशे रुपये मिळतात. ट्रस्ट देतो."
"पण इथे येणारी लोकं हा कचरा करूच कशी शकतात ?"  हे असे मुर्खासारखे प्रश्न विचारण्याची माझी खोड जित्याची आहे. त्यामुळे मी मेल्याशिवाय ती जायची नाही.
"काय करणार त्याला ? हे लोकांनी समजून घ्यायला नको ?"
"मला द्या एक झाडू ! मी पण काढते तुमच्याबरोबर कचरा. ह्या इथल्या दहा देवळांत जाऊन मुर्खासारखा नमस्कार ठोकण्यात मी माझा वेळ आणि शक्ती अजिबात फुकट घालवू शकत नाही ! त्यापेक्षा मी हे तळ थोडं साफ केलं ना तर माझा केविलवाणा देव थोडा तरी उठून बसू शकेल !"
मी झाडू मारायला घेतली. कचरा उचलायला सुरवात केली.
माझी मित्रमंडळी देखील कामाला लागली.

"तुला हे काम केल्याने पुण्य मिळेल."
मी वळून बघितले.
वरच्या पायरीवर काही लोकं चालली होती. त्यातले भटजी मला आशीर्वाद देत होते. माझ्या डोळ्यांना त्यांच्या हातात काही सामान दिसले.
"आणि तुम्ही इथे कचरा करता तेव्हा तुम्हाला पापच लागेल."
अगदी मुख्यमंत्री देखील मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू शकत नाहीत.

मी हे काम केलं हा माझा मोठेपणा सांगायला इथे टंकित करत बसले नाहीये. फक्त तुमचे सगळे देव...तुम्ही मानत असलेले तुमचे सगळे देव...सध्या मानवनिर्मित उकिरड्यात रहातात. आणि जे देव तुम्हाला परके वा उपरे वाटतात ते अगदी शांत आणि स्वच्छ घरात वसन करतात.
हे फक्त सांगायचा पुन्हा एक प्रयत्न करते आहे.

परवा आम्ही कान्हेरी गुंफा पहाण्यासाठी गेलो होतो. तळाशी एक छोटेखानी हॉटेल होतो. घरातून लवकर बाहेर पडलो होतो. त्यामुळे चहा न्याहारी वगैरे न करताच निघालो होतो. मस्त कांदे पोह्यांच्या फोडणीचा वास येत होतो. टेबलावर आम्ही जागा पकडून बसलो. बाजूच्याच झाडावर वानरे देखील बसली. म्हटलं चहाबरोबर ग्लुकोजची बिस्किटे खावीत. तिथल्या मुलाकडे मागितली. त्याने अख्खा पुडा आमच्या हातात देण्यास सपशेल नकार दिला.
"नाही. पुडा नाही देऊ शकत तुम्हाला. हवी तितकी बिस्कीटं देतो. सांगा किती हवीत."
"का रे बाबा ?" आम्ही त्याला विचारलं.
"आमच्यावर बंदी आहे. लोकं वेष्टन कुठेही टाकतात."
झक्कास. मला एकदम भरून आलं. गणपती विसर्जनाच्या वेळची गिरगाव चौपाटी आठवली. पारले जीची अगणित वेष्टने उचलली होती आम्ही. कारण तिथे मुळातच लोकांना प्लास्टीकच्या कपात चहा आणि पारले बिस्किटे भरभरून दिली जात होती.
पाप धुण्यास गणपती होताच.

घ्यायचं तर मनावर घ्या.
नाहीतर सोडून द्या.
'स्वच्छतेमध्ये देव आहे' असे आमचे बालमोहनचे मुख्याध्यापक आम्हाला शिकवीत असत.
आणि ते मनावर कायमचं कोरलं गेलं आहे.
तुम्हाला तुमच्या शाळेत काय शिकवलंय हे त्या तुमच्या देवास ठाऊक.

अस्वच्छतेचा उबग आल्याने देवांनी कधी धर्मांतर केले तर त्यात काही वावगे वाटू नये.

काही सांगता येत नाही...आता आमच्या देवाची मंदिरे घाण आणि उकिरडा म्हणून दुसऱ्यांची भक्तिस्थळे घाण करण्यास लोकं कमी करणार नाहीत.

एकदा कुत्र्यासारखी रस्त्यावर XXXची सवय लागल्यावर मग काहीही फरक पडत नाही.
जिथे आहोत तो संडास.

बहुतेक तुम्ही आता म्हणाल...तू घरातच बस...कुठेही बाहेर पडू नकोस.















छायाचित्रे दीपककडून साभार...

16 comments:

रोहन... said...

:)

Deepak Parulekar said...





खरंच वीट येतो यार! त्यादिवशी पण नाही का आपण कुलाबा किल्ल्यावर पाहिलं, जागोजगी खाउन टाकलेला कचरा, घाण, दारुच्या बाटल्या पण तिथला दर्गा मात्र अगदी स्वच्छ! तिथे घाण करण्यास सक्त मनाई! खरं तर ना सरकार, सिस्टम, यांना दोष देण्यात काही अर्थ नाही आपल्या लोकांची मानसिकताच स्वच्छ नाही! देव फक्त पोट बहरण्याचे निमित्त आहे. अरे पण निदान त्या निमित्ताला तरी रिस्पेक्ट द्या !

श्रद्धा said...

Zakkas :)

Anonymous said...

:)

Proud !!

नामधारी विनवी (प्र)सिद्धासी... said...

"पार्ले टिळक" म्हणजे "पाटी" (ऱ्हस्व दीर्घ गौण मानून) असा एक विचार मनात आला, त्यातून गेले काही दिवस मी बालमोहन ह्या विषयावर काहीतरी चिंतन करत होतो त्यातच आपण तिथे शिकलात हे काल-परवा सहज वाचताना लक्षात आले..

वैचारिक मंथनाचे कारण अद्यपी अज्ञात...

पण दोन्ही गोष्टींचा तार्किकदृष्ट्या संबंध असूही शकतो, तसा नसूही शकतो...

Suhas Diwakar Zele said...

:) :)

aativas said...

<< अगदी मुख्यमंत्री देखील मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू शकत नाहीत.>>

हे आवडलं.मस्त एकदम :-)

आणि कान्हेरीच्या त्या मुलाचं कौतुक वाटलं - काहीतरी रुजतं आहे तर!

Abhishek said...

देवांच धर्मांतर! उत्तम आयडिया!
अगदी सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोकं सुद्धा (कदाचित स्वताच घर सोडून) जगाला कचराकुंडी समजणारी अशी पाहिली आहेत...
देव देव्हाऱ्यात नाही, हे 'लिटरली'(अर्थात शब्दशः) सिद्ध करण्यासाठी सरकार(!) आणि हातात हात घेऊन जनता तयारच/तत्पर आहे...

तृप्ती said...

Very inspiring Anagha. Keep it up.

भानस said...

Ho na, kiti virodhabhaas hota Killyavar. :( Jar Darga swachacha rahu shakato ter...

Dhaval Ramtirthkar said...

aaplya devlaat ghaan aste ani ti saaf asayla pahijet yaat kahi dumatach naahi.
Pan jya mashid ani church che godve gaile jaatayt asha swaccha devanchya jaagi dushit vicharach pasravle jataat. Ani jithe aaple dev rahtaat... tithe ukirda asun hi swaccha manachi loka nirmaan hotaat

Shriraj said...

Mi tasa dusryanchi mate khodnara manus nahiye, pan dhaval che mat mla titkese patle nahi... mhanje masjidit kiwa church madhye 'dushit. Vichara-ch' pasravle jatat hey asa kasa mhanu shakto kunhi.. ani te titkasa khara nahi ... mhanje kahi thikani hot hi asel , mahit nahi mla...pan he asa apan saral sot generalization nahi karu shakat... mi church chya baher ubha rahiloy nidan tithe tari mla ase kahi adhalle nahi.

Anagha said...

सेनापती कशाचे हसू आले ? आमच्या असहायतेचे का ?

Anagha said...

"देव फक्त पोट बहरण्याचे निमित्त आहे." एकदम खरे दीपक !

Trupti said...

sahi ch :)

BinaryBandya™ said...

Inspiring :)