नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday 23 August 2012

नाण्याच्या दोन बाजू

दशक उलटून गेले ह्या घटनेला.
त्यादिवशी इरॉसला सहा ते नऊचा 'रश आर २' बघून आम्हीं निघालो होतो. मी, माझी लेक आणि तिच्या दोघी मैत्रिणी. पोटपूजा आटपून घराच्या रस्त्याला लागेस्तोवर दहा वाजत आले होते. दिवस दुर्गाविसर्जनाचा होता. रस्त्यारस्त्यावर मिरवणुका निघाल्या होत्या. मुंबई, पुन्हां रंगली होती. नाचगाणे चालू होते. काही दिवसांपूर्वी गणेशविसर्जन आणि आता दुर्गा विसर्जन. आमचे देव सभ्य. आम्हीं भक्त असभ्य. मी गाडी चालवत होते. खिडक्या बंद होत्या. राणीचा चमचमता हार आम्हीं पार केला. पुढे सिग्नल. बाण हिरवा झाला आणि मी गाडी काढली. डाव्या हाताला बाबुलनाथ मंदिर. वेग तसा यथातथाच. आणि अकस्मात माझ्यासमोरील गाडीच्या काचेवर थाडकन काही आपटले आणि जमिनीवर कोसळले. ब्रेक आपोआप लावला गेला. गाडी थांबली. काचेचा पार कलायडोस्कोप झाला होता. मी दार उघडून उजव्या हाताने गाडीपुढे आले. समोर एक मानवी शरीर पडले होते. हातपाय तडफडत होते. गर्दी जमली. फुटकी काच इतस्तत: विखुरली आणि काही क्षणांपूर्वी रस्त्यावर इतस्तत: विखुरलेली माणसे, आता गाडीभोवती एकत्रित झाली. मी काही बोलेस्तोवर पडलेला माणूस उठून उभा राहू लागला.
"गलती हो गयी !"
"गलती ? पागल हो क्या ? अरे, तुम आये कहाँ से ??"
"वो मैं वहाँ से...."
माणूस शहरात नवा होता. त्या दिवशी सकाळीच दाखल झाला होता. दुर्गा विसर्जनाची गंमत पहाण्यासाठी म्हणून तो बाहेर पडला होता. उजव्या बाजूने रस्ता ओलांडण्यासाठी इतरांबरोबर जो सुसाट धावत निघाला तो मधल्या दुभाजकावर न थांबता तसाच पुढे आला. व गाडीवर आपटला. शहराची धावती वाहतूक अजून त्याच्या अंगवळणी पडणे बाकी होते. त्यामुळे, दुभाजकावर थांबून डावीकडून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज घेणे त्याला जमले नाही. मग त्याचा वेग आणि माझ्या गाडीचा वेग, त्याला भुईसपाट करून गेले. त्याला उभे फारसे रहाता येत नव्हते. गर्दीतून एक पोलीस पुढे आला.
"हा माणूस एकदम धावत आला आणि गाडीवर आपटलाच !" मी पोलिसाला सांगू लागले.
"मी बघितलंय काय झालं ते. तुमची चुकी नव्हती."
"पण आता काय करायचं ?"
"मी बघतो. तुम्ही निघा."
"नाही. तसं नको. मला सांगा तुम्ही ह्यांना कुठे घेऊन जाणार ?" माणूस तसा तिशीच्या आसपासचा वाटत होता. पायाने लंगडत होता त्या अर्थी पायाला काही मार लागला असावा. रक्तस्त्राव मात्र कुठेही नव्हता.
"केइएमला नेतो. सरकारी इस्पितळात न्यायला हवे."
"ठीक. मी ह्या मुलींना घरी सोडून येते तिथे."
"तुम्ही यायची काही तशी गरज नाही."
"नाही. मी येते. अर्ध्या तासात पोचते तिथे."
आम्हीं घरी गेलो. मुलींना सोडलं आणि मी इस्पितळाचा रस्ता धरला.
इस्पितळं रात्री उदास वाटत असतात. बायका पुरुष इथेतिथे घोळका करून उभे होते. आपापल्या रोग्याविषयी चिंतीत आणि गोंधळलेले. त्यांच्या डोक्यावर पडणारा पिवळा उजेड. पिवळ्या भिंती. गडद हिरवे जाडजूड पडदे. जणू वाऱ्याने पडदा सुद्धा हलू नये.
"मुझे माफ किजीये. गलती हो गयी." पिवळट चादरीच्या बिछान्यावर पडलेला तो माणूस वारंवार माफी मागत होता.
"वो ठीक है..."
त्या माणसाच्या पायाला फ्रॅक्चर होतं. तो पुन्हापुन्हा त्याच्या चुकीची माफी मागत होता. माझ्यासाठी माणुसकीची जबाबदारी ही कायद्याच्या वर आहे. मी त्याला रोख काही रक्कम दिली. तेथून निघाले तेव्हां दोन वाजून गेले होते.

परवा ह्या प्रसंगाची आठवण झाली. कारण निवेदिता नथानी. मोबाईलवर संभाषण करीत, मरीन ड्राइव्हवरील दुभाजकावर न थांबता, निवेदिता भर रस्त्यात खाली उतरली. आणि डाव्या बाजूने वेगात येणाऱ्या स्कोडा गाडीच्या पुढ्यात अकस्मात उभी राहिली. क्षणार्धात, गाडीने तिला आकाशात भिरकावले. ती जमिनीवर आपटली. बॉम्बे हॉस्पिटल येथे तिला नेण्यात आले व मृत म्हणून घोषित करण्यात आले. निवेदिताच्या आयुष्याची गोष्ट ही फक्त २३ वर्षांची होती. तिच्या वडिलांची कहाणी मात्र अजून पुढे चालू आहे. कोलकत्यावरून ते तिचे मृत शरीर घेऊन जाण्यासाठी मुंबईत आले होते असे वर्तमानपत्रात वाचावयास मिळाले. त्यांच्या कहाणीने हे एक दु:खद वळण घेतले आहे. त्यातून ते आता कधी आणि कसे बाहेर पडतील...वा कधी पडू शकतील की नाही हे देव जाणे.

हिंदुस्तान टाईम्समध्ये ज्यावेळी ही बातमी आली त्याचवेळी बातमी शेजारी त्यांनी तेथील रहिवाश्यांचे म्हणणे छापले होते. एक म्हणजे तिथे फार वेगाने वाहने धावतात. दोन, तिथे झीब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत. तीन, आम्हीं कर भरतो आणि त्यामुळे आमच्या मुलभूत गरजा पुरवल्या गेल्याच पाहिजेत.
त्याच बातमीत ट्राफिक पोलिसांचे काय म्हणणे आहे ते देखील छापले होते. सुविधा अधिक हव्यात हे मान्य. परंतु, पादचाऱ्यांसाठी तिथे पदपथ आहे. परंतु, ते त्यावरून चालत नाहीत. चालत्या वाहनांमधून शिवाशिवीचा खेळ करीत असतात. त्यांनी जबाबदारीने वागावयास हवे. निदान जिथे सतत वाहने वेगात जातयेत असतात त्या मार्गांवर पादचाऱ्यांनी स्वत:ची जबाबदारी ओळखावयास हवी. 

मुंबईची मी नागरिक आहे. आणि ह्याच मुंबईतील रस्त्यांवर पायी चालत लहानाची मोठी झाली आहे. त्यानंतर दुचाकी चालवली आहे. व आज चारचाकी चालवते आहे. आजपर्यन्तच्या आयुष्यात स्वच्छेने नव्हे परंतु, वाहतुकीतील अनेक कटू प्रसंगाना सामोरी गेले आहे. त्यामुळे दोन्ही बाजू मी समजून घेऊ शकते. एक जबाबदार नागरिक म्हणून मी नक्की कुठे कधी काय वागावयास हवे ह्याचे भान मी नक्की राखू शकते.

ज्यावेळी मी जे करीत असेन त्या कालावधीसाठीचे वाहतुकीचे नियम हे माझ्यासाठी लागू होतात. म्हणजेच, ज्यावेळी मी माझ्या दोन पायांनी चालत असेन तेव्हां, माझ्यासाठी पदपथ असतो, व रस्ता ओलांडताना झीब्रा क्रॉसिंग असते. बऱ्याचदा असे होते, की पदपथ असतो, परंतु, आपल्याच कृपेने तेथे फेरीवाले नांदत असतात. त्यामुळे आपल्याला त्यावरून चालणे अशक्य बनते. मात्र शक्य असल्यास मी तरीही त्यातूनच मार्ग काढीत पदपथाचा वापर करते.
ज्यावेळी मी वाहन चालवत असते, त्यावेळी फुका कर्कश भोंगा वाजवणे मला स्वत:ला कानाला फार त्रास देऊन जाते. एकदाही भोंगा न वाजवता मी बऱ्याचदा कचेरीत जाते आणि तशीच आवाज न करता परत देखील येते. तो दिवस माझा फार आनंदाचा असतो. झीब्रा क्रॉसिंग ही गोष्ट चार चाकांसाठी नाही ह्याची मला खात्री आहे. आणि सिग्नलमधील हिरवा रंग प्रेमाचा. लाल रंग धोक्याचा व पिवळा रंग हा धोक्याची ताकीद देणारा असतो हे मला माझ्या शाळेने शिकवले आहे. आणि माझी स्मरणशक्ती शाबूत आहे. पादचाऱ्यांचा मी मान ठेवला तर ते माझा मान ठेवतील इतकी ही गोष्ट माझ्यासाठी साधी आणि सरळ आहे. चालत असताना भर रस्त्यात, एखाद्या गाडीला हात दाखवून माझ्यासाठी थांबण्यास भाग पाडणे हे म्हणजे 'मी कोणी म्हातारी, वा अशक्त किंवा रुग्ण आहे...आणि ते बघून तुम्हीं गाडीवाले माझ्यासाठी थांबा', अशी मी भीक मागत आहे असे मला वाटते. भीक मागण्याचे क्षेत्र माझे नव्हे.
एखादी चारचाकी गाडी कधी पदपथावर जाऊ शकते का ? नाही. तेव्हां मी माझ्या दोन पायांनी भर रस्त्यावर रमतगमत चालत नाही.

हक्कांची जाणीव आपली फार तीव्र आहे...मग कर्तव्याची इतकी बोथट का ?
हक्क आणि कर्तव्य नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र हक्काची बाजू अतिशय ठसठशीत आहे. त्याउलट कर्तव्याचे चित्र पुसट होत गेले आहे. मुलभूत हक्क फार काळ डावलले गेले असल्याने ही परिस्थिती ओढवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, जितके एक नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य नाकारू, आणि ही कर्तव्ये म्हणजे काही मोठे सीमेवर जाऊन शत्रूशी लढणे ह्यासारखे जीवावर उदार होण्यासारखी देखील नाहीत...तितकेच आपले आपणच आपल्या हक्कांपासून दूर फेकले जाऊ...असे नाही का वाटत ?

कर्तव्य बजावणे व हक्क मिळवणे ह्या दोन्ही गोष्टी, इंग्रजी अक्षर 'v' सारख्या संलग्न आहेत.
त्यामुळे त्यांना समान महत्त्व आपण दिले तरच एक नागरिक म्हणून आपण जगताना  'V for Victory' असे म्हणू शकू.

Friday 17 August 2012

लक्ष्मी...दर्शन

"हजर ? सुट्टीवर होतात ना ?"
"हो. तिरुपतीला गेलो होतो."
"अरे व्वा ! कोणकोण ?"
"आम्हीं तिघे...बायको, मी आणि लेक."
"मस्त !"

"तिरुपतीला गेला होतास ?"
"हो...तेच सांगत होतो हिला...म्हणून टाकली होती सुट्टी."
"छान !"
"खूप गर्दी हो पण ! तीनशे रुपये भरले मी ! दर्शनासाठी...!"
"मग झालं का...दर्शन...?"
"थोडं थोडं !"
"तंत्र आहे ते !...मी तीनदा गेलोय !"
"हो काय ?"
"म्हणजे ते तीनशे बिनशे ठीक आहे...ते द्यायचे हवं तर बाहेर...पण आत आलं की समोर...तिरुपती...!"
"हो..."
"मग ते डाव्या बाजूने ढकलायला सुरवात करतात...लगेच...दाराबाहेर !"
"हो ! तसंच झालं ना !"
"मग जायचं असं आपण...उजव्या हाताला सरकत सरकत...हळूहळू..."
"आणि ?"
"आणि काय ? तिथे कोपऱ्यात असतो एक उभा...त्याच्या हातात असे हळूच पन्नास रुपये सरकवायचे..."
"हो काय ?"
"मग काय तर ! मग हवं तितका वेळ रहा उभे ! घ्या दर्शन !"

"म्हणजे देवदर्शनासाठी लाच...?"
"अगं, त्याशिवाय मिळत नाही दर्शन ! विचार ना ह्याला...मिळालं का ? इतका तिरुपतीला गेला ! पण मनासारखं दर्शन मिळालं का ?"
"हम्म्म्म...मग झाला का तुला कधी देव प्रसन्न ? मला शंकाच आहे...लाच देऊन तू दर्शन घेतलंस...तो कसला प्रसन्न होतोय तुला ? काय उपयोग तीनतीनदा इतक्या दूरवर जाऊन ?! ही जर तिथे प्रथाच असेल तर मला शंकाच आहे की तो तिरुपती तिथे असेल ! तो गेला असेल कधीच सोडून !"
"दर्शन झालं ना ! मग झालं काम !"
"ते मूर्तीचं...ते तुला कम्प्यूटरवर पण मिळालं असतं..."
हास्य.
"ह्याला पण देशद्रोहच म्हणतात...लाच देणे हा पण देशद्रोहच आहे ! आणि त्यासाठी कोणीही पाकिस्तानी येण्याची गरज नाही...तुम्हीं स्वत:च आपल्या देशबंधूला फितवता...छोट्या छोट्या गोष्टींसाठी...! आणि देशद्रोह करण्याच्या मोहात पाडता ! आणि मग भ्रष्ट्राचार वाढलाय म्हणून बोंबाबोंब करता ! आणि त्या भ्रष्ट्राचाराच्या भस्मासुरापासून मला वाचव म्हणून त्या देवालाच साकडं घालता ! ह्याला चोराच्या उलट्या बोंबा...असं म्हणतात !"

पांगापांग.

आपण घसरगुंडीवरून पूर्ण घसरलो आहोत.
आता पुन्हां वर चढायचं म्हटलं तर परत मागे वळावयास हवे !
पायऱ्या तर समोर हजर आहेत...
पण मनात इच्छा ?
आणि तेव्हढा वेळ ?

त्या वेंकटेश्वरालाच माहित !

Thursday 16 August 2012

श्रीराम जयराम...जयजय राम...

आज खरं तर देशप्रेमाची गीते गुणगुणावीत, गपगुमान भाषणे ऐकावी. 
उगाच स्वत:ला सुजाण समजू नये. 
डोक्याचा भुसा करून घेऊ नये.

रोज सकाळी मी वर्तमानपत्र उघडते.
एक नागरिक म्हणून वाचू लागते. जीवाचा संताप होतो.
एक स्त्री म्हणून वाचू लागले. जीव धास्तावतो.

पंचवीस वर्षीय पल्लवीचा खून होतो त्यावेळी मी माझ्या घरात निवांत झोपलेली असते. त्या रात्री दोनवेळा तिच्या घराची वीज तोडली जाते, दोन वेळा तिच्याच बोलावण्याने घरात प्रवेश मिळवला जातो. तिसऱ्या वेळी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न होतो. तिने तीव्र विरोध केला म्हणून तिला मारून टाकले जाते. म्हणे पल्लवी तोकडे कपडे घाली. सरळ तळघरातील तिच्या गाडीपाशी जाई. म्हणे इमारतीत कधी कोणाशी ती बोलत नसे. रात्री तिने चौकीदाराला वीज केली म्हणून बोलावून घेतले आणि त्यावेळी ती त्याच्याशी घरातील गेलेल्या विजेविषयी त्याच्याशी बोलली. मुंबई शहरात कधीही कुठल्याही स्त्रीशी तो बोलत नसे. ती त्याच्याशी बोलली त्यावरून म्हणे त्याला असे वाटले की पल्लवीला त्याच्यात 'इंटरेस्ट' आहे...म्हणे सुमारे पाच वर्षांपूर्वी जम्मू काश्मीर येथून ह्या माणसाला घरातून हाकलून देण्यात आले आहे...गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे !

शहराची मनस्थिती काही ठीक नाही. शहर निराश आहे. शहर वैफल्यग्रस्त आहे. शहराच्या डोक्यात लाव्हा आहे. कल्लोळ आहे.

काल सौतीचंदचे नाव घेऊन एका माणसाचा मला फोन आला. सौतीचंद रंगारी. माझ्या मामेबहिणीने सर्वप्रथम त्याची माझ्याशी ओळख करून दिली होती. अतिशय विश्वासू. एकदोनदा त्याच्याकडून घराला रंग मी लावून घेतला आणि सौतीचंद घरचाच झाला. काही कालावधी लोटल्यानंतर तर त्याच्यावर घर सोपवून मी बाहेरगावी जात असे. सौतीचंद मन लावून प्रामाणिकपणे काम करी. पंधरा दिवसांनी मी परतत असे. माझे घर नवा रंग अंगावर पांघरून प्रसन्न हसत माझे स्वागत करी. गावी बायकापोरे सोडून मुंबईत आलेला सौतीचंद त्यानंतर कधीतरी आपल्या गावी परतला. मग परत पोटापाण्यासाठी म्हणून कधी मुंबईकडे फिरकला नाही. मात्र त्याच्या ओळखीने असे कोणी त्याच्या गावचे रंगारी फोन करीत. एके वर्षी मी त्याच्या मेव्हण्यावर रंगकाम सोपवले देखील. पण ते तितकेच. काल जेव्हां पुनश्च सौतीचंदचे नाव घेऊन कोणी मला फोन केला, त्यावेळी सध्या काही मला रंगकाम काढावयाचे नाही असे मी सांगितले. फोन ठेवला. माझे उत्तर तर खरेच होते. पण काय माझ्या भिंतीच्या रंगाचे पोपडे उडालेले असते, तर त्या अनोळखी माणसाला घरात घेण्याइतके धैर्य आता माझ्या अंगात अजूनही शिल्लक आहे ?

मध्यंतरी दोन अनोळखी फोननंबरवरून माझ्या मोबाईलवर फोन येत होते. वेळ वाटेल ती, बोलणे अश्लील. शेवटी, पोलीस स्टेशन गाठले. त्यांना ते नंबर दिले. माझ्यासमोर पोलिसाने त्यातील एक फोन लावला. त्यानंतर त्या क्रमांकावरून पुन्हा कधी फोन नाही आला. दुसरा क्रमांक, अंधेरीचा कुठल्या दुकानातील. दुकानाचा मालक नसला की तेथील हा कामगार म्हणे माझा नंबर लावत असे. आणि कल्पनाशक्ती लढवत, तोंडाला येईल ते बोलत असे. पोलिसांनी त्याला धमकावले. मला फोन येणे थांबले.

परवा, कार्यालयातून बाहेर पडत असताना, मी लिफ्टने जाण्यापेक्षा जिना धरला. तिसऱ्या मजल्यावरून तळमजल्यापर्यंत जाण्यासाठीचे जिने दोन मिनिटांचे आहेत. आमच्या मजल्यावरून खाली उतरू लागलो की मागे दरवाजा बंद होतो. तळमजल्यावरचा दरवाजा बहुधा उघडा असतो. सध्या आमच्या पाच मजली इमारतीत कुठल्यातरी कार्यालयाचे नुतनीकरण चालू आहे. मी उतरू लागले त्यावेळी जिन्यात माणसांचे बोलण्याचे आवाज कानावर पडू लागले, आणि काही माणसे वर येऊ लागली. मी खाली मान घालून उतरत होते. सबंध त्या अरुंद परिसरात घामट, कुबट असा सिमेंटमिश्रित वास पसरलेला होता. आपण जरी मान खाली घातली तरी बहुतेकवेळा तरी आपल्याकडे एकटक लागलेल्या नजरा आपल्याला जाणवतात. तसेच माझे झाले. हातात घमेली, फावडी घेऊन चाललेली ती माणसे म्हणजे चेहेरे नसलेली एक अदृश्य शक्ती वाटू लागली. ती टाळून लवकर तळमजला येईल तर बरे असे मला वाटू लागले.

आसपास वावरणाऱ्या अपरिचित माणसांची ही वाढती संख्या मनातील भीतीला खतपाणी घालते.
"Mama says...don't talk to strangers." ह्याची आता सतत आठवण होते.
कोण जाणे, मुंबईचे सुजाण नागरिक, कुठून धैर्य गोळा करतात आणि रस्त्यावर जागोजागी बसलेल्या अनोळखी माणसांकडून खरेदी करतात. अनोळखी माणसांच्या गरजा भागवतात. जोपर्यंत या ना त्या मार्गे त्यांची पोटे आम्हीं भरणार तोपर्यंत हा मुंबईचा वाढता लोंढा कसा कमी होणार ?
हल्ली पायी जाण्याचे प्रसंग कमी येतात. परंतु, रस्त्यात तिरस्काराची भावना सगळीकडे तरंगत असल्यासारखे वाटते. तिरस्कार, असंतुष्टता...एक तवंग सर्वत्र पसरलेला. एक ठिणगी पडायची खोटी...भडका हा उडणारच.

इजिप्तमध्ये समजू लागले की माणूस आपला पिरॅमीड बांधू लागे...भावेल ती जागा...झेपेल तो आवाका. आपला आपण सुंदर पिरॅमीड उभारायचा. मोठा स्वावलंबी माणूस म्हणावयाचा ! हे सदगृहस्थ जेव्हां देवाला प्यारे होत...तेव्हां त्याला मंचावर घ्यावयाचा...सर्वात आधी टोचणीने खरवडून त्याचा मेंदू बाहेर काढावयाचा. सुगंधी तेलमालिश करावयाचे. त्याच्या सुरेख पिरॅमीडमध्ये न्यावयाचे. सोनेनाणी, दासदासी, कुत्रे, मांजर, माकड, बिकड. त्याचे संगती आत नेऊन बसवायाचे.

फरक आहे...आमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे...
आम्हीं आता प्रेते आहोत...रिकाम्या डोक्याची प्रेते...जिवंतपणी आम्हीं आमचे डोके रिकामे केले आहे...आमचा मेंदू कधीच काढून आम्हींच समुद्राला वाहिला आहे...स्वत:च आता अंगाला तेलमालिश करीत आहोत.
आमची प्रेते कालातीत...
आमचे मरण अबाधित...
मुंबई...स्वरचित पिरॅमीड.

Tuesday 14 August 2012

दाता

माझ्या दारी हिरवं वैभव आहे. आंबा. आणि आंब्याला कुशीत घेऊन माझं घर विसावलं आहे. माय जशी बाळाला कुशीत घेते, एक हात उशाशी घेते, तृप्त मनाने झोपी जाते तसंच. माझं छोटंसं नाजूक तांबूस घर त्याच्या आंब्याला कुशीत घेतं आणि शांत माझी वाट बघत बसून रहातं. कसली तक्रार नाही, कसले दु:ख नाही. आयुष्याची बोट वल्हवण्याच्या घाईगर्दीत, मला महिनामहिना माझ्या ह्या आंबेघराकडे फिरकायला वेळ मिळत नाही. मग काय माझं घर रुसतं ? अजिबात नाही. मी दुरून देखील दिसले की आंब्याची सळसळ वाढते, घराला ते हलकेच गुदगुल्या करू लागतं. जागं करतं. मग माझ्या घराला बरोबर माझी चाहूल लागते. हलकेच ते सुद्धा हसतं, आणि मी कडीकुलुप उघडून आत शिरले की खुदुखुदू हसू लागतं.

मग जेव्हा गेल्या आंब्याच्या मोसमात माझ्या लाडक्या झाडाला शेजारणीने लुटलं, त्यावेळी त्याला नक्की काय वाटलं ? आंबा नुसता लगडला होता. ओझ्याने फांद्या वाकल्या होत्या. मी मुंबईहून मुद्दाम रिकामे खोके घेऊनच तिथे पोचले होते. वाटलेलं भरभरून आंबे घेऊन परतू. सगळ्या मित्रमंडळींच्या घरी तळहाताहून मोठा मधुर आंबा पोचेल. सगळे कसे खूष होतील. हे म्हणजे आपण काही मनात मांडे खावेत, आणि व्हावं काही भलतंच. घराच्या पायऱ्या उतरता उतरता आंब्याकडे माझं लक्ष गेलं. आंबा रिकामा होता. जणू, एखाद्या सौंदर्यवतीने, अंगभर ल्यायलेले दागिने साजण न आल्याच्या रुसव्याने उतरून ठेवावे. संन्यासिनीगत रिकामं कोपऱ्यात बसून राहावं. पंधरवड्यापूर्वीच मी इथे चक्कर टाकली होती. त्यावेळी काही आंबे खाली उतरायला अधीर झालेले दिसत होते. नुकतंच पाय फुटलेलं बाळ जसं आईच्या कडेवरून जमिनीकडे झेप घेत रहातं. आंबा अंगाने भरला होता. भांगात भरलेल्या कुंकवाचा हलका रंग खाली उतरू पहात होता. आज मात्र झाडावर एकही आंबा शिल्लक नव्हता. मी दत्ताला हाक मारली. दत्ता माळी. तिशीच्या आसपास वय. दत्ता बाग सांभाळतो आणि त्याची देवकी घर सांभाळते. देवकी सतरा वर्षांची होती तेव्हा त्यांचं लग्न झालं. एकोणीसाव्या वर्षी पदरात एक बाळ आलं. "अगं, सतराव्या वर्षी कसं लग्न लावून दिलं बाई तुझं ? कायद्याने गुन्हा आहे !" मी माझी शहरी अक्कल एकदा पाजळली होती. "ताई, आमच्याकडे असंच होतं." काळीभोर देवकी तिचे टप्पोरे काळे डोळे उघडझाप करीत शांतपणे मला म्हणाली होती.
"दत्ता, आंबा कुठेय ? तू उतरवून ठेवलायस का ?" येऊन समोर पायरीवर उभ्या राहिलेल्या दत्ताला मी विचारलं. गेल्यावेळी देखील दत्ताच वर चढला होता व आकडा लावलेल्या काठीने त्याने आंबे उतरवले होते.
"नाही ताई, मी नाही उतरवला."
"मग ?"
"समोरच्या मॅडमनी उतरवला."
"म्हणजे ?"
"आज दुपारी त्या आल्या, आणि काठी लावून सगळा आंबा त्यांनी काढून घेतला."
दत्ता मला काय सांगतो आहे हे मला अजूनही कळतच नाही.
"दत्ता, कोण मॅडम ? कोणी काढून घेतला आपला आंबा ?"
"त्यांना सांगितलं मी ताई, पण त्यांनी ऐकलं नाही माझं."
"पण कोण ह्या मॅडम ?"
"त्या...त्या समोरच्या घरात रहातात त्या..."
समोरची जुनी मालकीण माझ्या ओळखीची होती. ती ह्या संपूर्ण कलाकार लोकांच्या वसाहती सुरवातीपासून होती. त्यामुळे हे स्वप्न सत्यात आणताना ज्या काही अडीअडचणीना तोंड द्यावं लागलं त्यात आम्हां सर्वांबरोबर ती देखील होती. पण तिने हे घर विकून टाकलं होतं..आणि आता कोणी नवी मालकीण आली होती. आणि माझ्या स्वभावधर्माला धरून, ती नवी मालकीण काळी का गोरी...हे मी आजवर शोधलंच नव्हतं !
"म्हणजे काय ? असं का केलं तिने ?"
गेली दहा बारा वर्ष आम्हीं सगळे सभासद फार गुण्यागोविंदाने इथे नांदत होतो. आम्हीं अदमासे पन्नासेक सभासद आहोत. त्यामुळे डोंगरावर पन्नासेक घर आहेत. टुमदार, लाल विटांची आणि लाल छपरांची.
मुंबई इथून फार दूर नाही. गाडी घेऊन गेलं तर दोन तासांवर मुंबई. दर शनिवार रविवार आमच्यातलं कुणीतरी गजबजलेल्या मुंबईहून येतं. त्याचं गोजिरं घर जागं होतं. दोन दिवस, घराचं लाडकौतुक होतं आणि मग कष्टकरी माणूस आपला मुंबईला निघून जातो. त्याचं घर पुन्हां विसावतं.
"काय माहित नाही. मी त्यांना सांगत होतो...तुम्हीं आंबे काढायला येणार आहात म्हणून...त्यांनी ऐकलं नाही माझं ! मी इथेच होतो उभा...त्यांनी माझ्या डोळ्यादेखत आंबे काढले."

शेजार कधीतरी वेगळाच मिळतो. कोणाच्या झाडावरचा फणस, कोणाचा आंबा...म्हणे हे नवीन नाही.
...'मलाच का बरं अशी माणसं भेटतात' हा एक असा प्रश्र्न आहे जो बहुतेकवेळा प्रत्येक माणसाच्या मनात येतो. म्हणजे मी हा इतका चांगला आणि ही अशी माणसे माझ्याच नशिबी का येतात..असा विचार जर प्रत्येक माणूस करत असेल...तर खरं तर जग चांगल्या माणसांनीच बहरलेलं असायला हवं. पण तसं काही चित्र नाही. त्यामुळे कोणी काही चुकीच्या गोष्टी करणार आणि मग अगदी सत्य आणि असत्य ह्यांचे तुंबळ युद्ध माजणार...आणि सत्याला धीर धरता आलाच तर शेवटी त्याचा विजय होणार.

तसंच झालं. कडाक्याचं भांडण झालं. आपल्याला हे असं अगदी नळावर पाण्यासाठी भांडल्यासारखं देखील भांडता येत ह्याचा मला शोध लागला. स्वत:ची नव्याने ओळख वगैरे.

मग इतकं तारस्वरात ओरडून आंबे परत मिळाले का ?

सूर्य मावळत आला होता. इतका चढा आवाज तसाही आमच्या वसाहतीत आजवर कधीही झाला नसावा. शेजारीण तरातरा निघून गेली. परसात रिकामा आंबा शांत उभा होता. पाने सळसळ होत होती. आता अंधार पडणार होता. हिरवा आंबा काळोखात एखाद्या सावलीसारखा उभा रहाणार होता. मी पायऱ्या उतरत अंगणात आले. अंगणात बसण्यासाठी लाल रंगाचे सिमेंटचे बाक आहेत. त्यावर जाऊन बसले. शांत. इतकी निरव शांतता...आणि त्या तिथेच काही मिनिटांपूर्वी आपणच केलेला आरडाओरडा. त्या शांततेत रातकिडे गप्पा मारू लागले. डोळा लागण्याआधी पक्षी सहचाऱ्याशी सुखदु:ख वाटून घेऊ लागले. बाकी तर आसमंतात शांतताच. समोर पुसट पिवळी छटा असलेला चंद्र साक्षात उभा. गाव तर डोंगराखाली खूप दूरवर आहे. त्यामुळे तशीही फारशी जाग नसतेच. निसर्गाची जी काय जाग असेल ती तितकीच. रक्त तापवून घेऊन केलेले भांडण, शेजारणीचे आततायी वागणे, हातात दगड घेऊन दत्तावर तिने चढवलेला हल्ला. सगळंच भयानक. आणि त्याच्याच पुढल्या क्षणाला ही इतकी निरव शांतता. चंद्र जेव्हा आकाशात संथ उगवत होता, तेव्हां आम्ही भांडत होतो. सगळंच फोल. कोण जाणे ती जेव्हा आंबे काढत होती, त्यावेळी माझ्या आंब्याला कळले तरी का...की ही चोरी आहे...आणि ती चोरी आहे कारण आंबा माझ्या दारी उगवला आहे...आणि त्या अंगणावर माझा मालकी हक्क आहे ! लाललाल मातीच्या ह्या डोंगराची ही ३ गुंठा जागा माझी...त्यावरचा हा आंबा माझा...हे माझे...ते माझे...सर्व हिणकस...क्षुद्र...!

विषण्ण.

माझ्या दारी पेरू देखील आहे. गेल्यावेळी गेले होते तेव्हा किती पेरू लगडले होते. काल बघितलं तर बहुतांशी पेरू, पक्ष्यांनी टोचले होते, अर्धे अर्धे खाल्ले होते. आता काय पक्षांशी जाऊन भांडू ? पेरू तिळमात्र देखील दु:खी वाटला नाही. चांगला खुशीत होता. अंगाखांद्यावर टोचा मारलेले कच्चे पेरू मिरवत होता. किती पाखरांचं त्याने पोट भरलं, वाटलं झाड आपलं सुखावलेलंच आहे. दु:खी नक्की नाही. बाजूला करंबळाचं झाड. ते देखील असंच ओझ्याने वाकलेलं. "आई, मला खूप आवडता हा ते स्टार फ्रूट ! घेऊन ये तू जर आली असली तर फळं !" लेक गेल्या वेळी म्हणाली होती. दत्ता पटकन शिडी घेऊन बाहेर आला. चांगली आठ दहा फळं काढून त्यानं माझ्या हातावर ठेवली. झाड आपलं पुन्हां खुष !

काही कळत नाही...'कोणाच्या ना कोणाच्या तोंडी माझं फळ लागावं...कोणाचे ना कोणाचे दोन क्षण आनंदाचे जावेत...'इतकीच माझ्या झाडांची अपेक्षा असावी बहुतेक !

काल ताटात तिखटमीठ घेऊन आम्ही मायलेकी बसलो. चांगली चार करंबळं ताटलीत घेतली होती. आंबट आंबट ! डोळे मिचकावीत, हसतहसत आम्ही फळं फस्त केली !

मी दूर मुंबईत असले तरीही तेव्हा माझं परसात उभं असलेलं झाड खुशीत डोललं...दूर उभा असलेला आंबा सर्व समजगल्यागत मोठ्या माणसासारखा मान डोलवू लागला.

ह्या वर्षी भरपूर आंबे आले होते...म्हणजे पुढल्या वर्षी तर माझा आंबा विश्रांती घेईल...त्याच्या पुढल्या वर्षी मोहोर बहरेल...तो पुन्हां फुलेल....हिरव्या कैऱ्या फुटतील...त्याच्या अंगाखांद्यावर झोका घेऊ लागतील...पक्षी बागडतील...आंबा इथेतिथे चाखून बघतील...बाळ कैऱ्या उगाच जमिनीकडे झेपावतील...आंबा खुशीत येईल...हसू लागेल...प्रेमाने भरभरून आंबा देईल.

सखी शेजारीण त्यावेळी तरी माझ्या हाती आंबा लागू देईल काय ?

Friday 10 August 2012

कोडं

:) मी खालील पोस्ट लिहिली किंवा लिहायला घेतली त्यावेळी त्यावर गैरसमज होऊ शकतील हे कळले नव्हते. पण तसं होताना दिसू लागलं. म्हणून मग माहिती काढली. तेव्हा ही माहिती मिळाली. तेव्हा मला वाटतं आधी लिंक बघून घ्या आणि मगच पोस्ट वाचा....कदाचित गैरसमज कमी होतील. :)

काही प्रसंग एका क्षणात घडून जातात. आपल्याला चमकवून जातात. आणि विचारात पाडतात.

आमच्या कार्यालयामध्ये प्रत्येकाच्या हुद्द्यानुसार जागा ठरलेल्या आहेत. सरसकट एकत्र बसणे हे इथल्या तत्वज्ञानात बसत नाही त्यामुळे ते आचरणात आणण्याचा काही संबंध येत नाही. माझ्या पाठी माझा एक मित्र बसतो व पुढे एक. अर्ध्या उंचीच्या छोट्या छोट्या काचेच्या भिंती आमच्यातील अंतर ठरवतात. माझ्या उजव्या हाताला छतापासून कमरेच्या उंचीपर्यंत आलेली खिडकी आहे. निळसर झाक असलेली काचबंद. संपूर्ण कार्यालय वातानुकुलीत असल्याकारणाने ती कायम बंद असते. वरून खालपर्यंत पोचणारा केशरी रंगाचा पडदा प्रत्येक खिडकीला आहे. भल्या मोठ्या प्रशस्त अशा दालनाला अंदाजे नऊ खिडक्या आहेत. आणि बारा महिने चोवीस तास फक्त माझा पडदा वर जाऊन छताला चिकटलेला असतो. कारण बाहेरून माझ्या अंगावर येणारा सूर्यप्रकाश मला आवडतो. अगदी ऊन काही येत नाही, पण नक्की बाहेर काय चालू आहे ते आत कळू शकते. म्हणजे माझे आकाश आक्रसत नेणाऱ्या उंचच इमारती आहेत. तसेच नजर खाली उतरवली, तर लाल कौलारू घरे देखील आहेत. माझ्या अगदी खिडकीपाशी कधी एखादा कावळा येऊन मला हाक मारून जातो, तर कधी एखादी चिमुकली चिमणी तिची ख्यालीखुशाली कळवून जाते. मग मीही त्यांना काहीबाही सांगत बसते. त्यासाठी आम्हांला कुठलीही भाषा यावी लागत नाही हे आमच्या मैत्रीचे वैशिष्ट्य. आमची आपली मौनीभाषा. आपले नाही परंतु, सूर्यदेवाचे काम आटपत आलेले आहे, काळोख पसरू लागला आहे, आकाश भरून आले आहे, प्रचंड वादळ सुटले आहे, हे सर्व मला माझी खिडकी सांगत असते.

माझ्या पुढे बसणारा माझा मित्र हा तसा मला सतत दिसून येत नाही. कारण तो आमच्या मधल्या भिंतीमागे असतो. मात्र सकाळी हजर झालो की 'सुप्रभात' अशी हाळी एकमेकांना आम्हीं नक्की देतो. तोही मराठी आहे आणि मग त्या 'गुड मॉर्निंग'पेक्षा मला आपलं सुप्रभात अधिक जवळचं वाटतं. त्यामुळे हा माझा मित्र जेव्हा नव्याने आमच्या कंपनीमध्ये दाखल झाला, त्यावेळी मी आपला हा मराठी पायंडा घालून टाकला. नाहीतर आंग्लाळलेल्या आमच्या कार्यालयात, संवाद, परिसंवाद, शिवीगाळ, स्तुतिसुमने इत्यादी इंग्रजी भाषेतील वेगवेगळे प्रकार त्यात्या गरजेनुसार वापरले जातात. माझ्या मित्राचे नाव काय ? तसेही नाव कळल्यानेच ही गोष्ट पुढे सरकणार आहे अशा काही ह्या घटनेला मर्यादा नाहीत. कारण त्याचे नाव गणेश, राहुल, वा अमित असले तरीही घटना तशीच रहाते. फक्त मराठी असल्याकारणाने आमचा संवाद हा मराठीत झाला हे नक्की.

मला वाटतं फार पूर्वापार एक ठराविक प्रकारची काळ्या तिळांपासून बनवलेली सुपारी खाण्याची माझ्या ह्या मित्राला सवय आहे. त्यामुळे त्याच्या मंचावर उजव्या हाताला एक चांगला अर्धा फुट उंचीचा प्लास्टिकचा डबा ह्या सुपारीने कायम भरलेला असतो. मित्र उदार अंत:करणाचा असल्याकारणाने, आत कडीकुलुपात सुपारी लपवून ठेवणे हे काही त्याच्या स्वभावधर्मात बसत नाही. येण्याजाण्याच्या रस्त्याच्याच बाजूला त्याने आपला हा डबा ठेवला आहे. व तिथून येताजाता सर्वचजण दिवसातून कमीतकमी चार ते पाच वेळा तो डबा उघडून त्यातील सुपारी आपल्या मुखात टाकीत असतात. आतील सुपारी कमी कमी होत जाते ती बंद डब्याच्या बाहेरून खालीखाली जाणाऱ्या तपकिरी रंगावरून कळते. मग हा आपला नवीन पाकीट विकत आणून त्यात सुपारी भरून टाकतो. आणि द्रौपदीच्या थाळीप्रमाणे आम जनतेला दिवसभर चघळायला सुपारीचा पुरवठा विनासायास मिळत रहातो. ही सुपारी खाल्याने आपण करीत असलेल्या ठराविक 'डाएट' वर काही विपरीत परिणाम तर होत नसेल ना अशी एक चर्चा स्त्रीवर्गात चालू रहाते. अधूनमधून गुगलवरती काळे तीळ हा शब्द टाकून त्यावर माहिती मिळवली जाते व मिळालेल्या माहितीची आपापसात देवाणघेवाण होते. बाकी पुढे सुपारीचे चर्वण मात्र चालूच रहाते.

त्या दिवशी अशीच मिटिंगवरून माझ्या जागेवर परत येत असताना मी मित्राच्या मंचापाशी मधेच थबकले. तो त्याच्या कामात मग्न होता. डबा उघडून मी सुपारी हातावर घेतली. आणि त्याला म्हटले, "तू असलास वा नसलास, आम्हीं आपले सगळेजण तुझ्या सुपारीवर येताजाता ताव मारीत असतो."
तो हसला व म्हणाला,"अरे ! ठीक आहे ना."
मी त्यावर म्हटले,"कोणी डबा उघडून घेताना इथेतिथे पाडलेले काळे तीळ मी आपली साफ करून ठेवते हा. मी पाडले नसले तरीही. उगाच तुझं टेबल अस्वच्छ नको दिसायला. नाही का?"
तो हसला. चष्म्यातून त्या डब्याकडे बघत तत्परतेने उद्गारला,"अच्छा ! म्हणजे तू पुरावा नष्ट करतेस तर !"
मी चमकले. मला एक क्षण काही कळले नाही. नक्की त्या त्याच्या विनोदावर हसावयाचे आहे, की आपली कृती ही चोरीत मोडली गेली ह्याचा धक्का मला बसला आहे, हे त्या क्षणी कळले नाही. मी हं हं केले आणि जागेवर जाऊन बसले.

काय आपल्या तोंडून प्रतिक्षिप्ततेने निघालेले उद्गार, हे आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या; परंतु कालौघात खोल मनाआड दडलेल्या घटनांची एक प्रतिक्रिया म्हणून नकळत बाहेर पडतात ? नाहीतर 'पुरावा', 'चोरी' हे शब्द असे अचानक कसे उद्गारले जात असावेत ?

आम्हीं आमच्या कार्यालयात एक वर्कशॉप बऱ्याचदा करतो. 'फ्री असोसिएशन' असे त्याचे नाव आहे. म्हणजे समोरील फलकावर एकेक शब्द लिहिले जातात. आपण तो शब्द वाचल्यावर पहिल्या क्षणी कुठला दुसरा शब्द येतो, तो सांगायचा असतो. जसं इथे मित्राने 'स्वच्छ' आणि 'पुरावा नष्ट करणे' ह्या दोन शब्दांची जोड केली. आपल्या ह्या मनाच्या खेळाचे आपल्यालाच बऱ्याचदा आश्चर्य वाटू लागते. कारण कधी एखादा शब्द वाचून असा काही वेगळाच शब्द आपल्या डोक्यात येतो की आपणच चकित होतो. आणि मग कधी त्यावर आपण विचार केला तर आपल्याच काही आत दडून गेलेल्या त्या शब्दाशी निगडीत अशा आठवणी जाग्या होतात.

ही घटना घडली त्यावेळी मला त्या वर्कशॉपची आठवण झाली. ह्यात माझी त्या मित्राशी असलेली मैत्री तुटण्याचा प्रश्र्न नव्हता. फक्त हे असे का होत असेल ह्यावर विचार मात्र जरूर करावा वाटला. आपल्या मनातील गुंतागुंत, ही इतकी एकमेकांत गुरफटलेली असते, की त्यापुढे कदाचित गुंतून गेलेला एखादा लोकरीचा गोंडा देखील सोपा वाटून जावा.

(मी ही पोस्ट प्रसिद्ध केली व नंतर वाटू लागले की मला काय म्हणायचे आहे ते नीट स्पष्ट नाही झालेले. आणि म्हणून शेवटची चार/पाच वाक्ये मी पोस्ट एडीट करून वाढवली आहेत. मला आशा आहे की काहीही गैरसमज न होता आता मला काय म्हणायचे आहे ते अधिक स्पष्ट होईल. :) )
 

Sunday 5 August 2012

'टूर'की...भाग १३ (अंतिम भाग)

पहाटे, तीन वाजता उठून अगदी तयारी वगैरे. आजपर्यंत बऱ्याच वेळा आकाशात उडालो होतो. त्यात काय विशेष ? पण बंद विमानात आत सुरक्षित उडणे वेगळे आणि एखाद्या पक्ष्यासारखे मोकळा श्वास घेत आकाशात विहार करणे वेगळे. त्यामुळे वर आकाशात नक्की किती थंडी असेल, ह्याचा तसा काही पूर्वानुभव नव्हता. हा स्वेटर, ही शाल...ही कानटोपी..अशी चर्चा रात्री झाली होती. आणि रात्रीच कपडेबिपडे, स्वेटरबिटर खुर्चीवर अगदी तयारीत बसले होते. आम्हीं उठण्याची वाट पहात. मी आधी तयार झाले आणि चार वाजता कपाडोक्यिया कसे दिसते हे बघायला दार उघडून बाहेर आले. सगळं स्वप्नवत. गडद निळं आकाश. काळे डोंगरांचे सुळके. नजरेस आजूबाजूला दिसणाऱ्या अनेक गुहा. आम्हीं एका गुहेत, जशी अस्वले. लेक बाहेर आली. गुहेच्या पायऱ्या उतरून खाली आलो. खालील मोकळ्या चौकात शांतता होती. हलका वारा वहात होता. बाजूच्या भिंतीवरील गुलाबाची वेल व त्यावरील टप्पोरे लाल गुलाब डुलक्या काढत होते. मुख्य दरवाजा उघडून आम्हीं बाहेर पडलो. तिथे छोटी बस उभी होती. आत आधीच काही पर्यटक बसलेले होते. वातावरणात एक उत्सुकता होती.
अंधारातून बस निघाली. अरुंद गल्ल्या, चढउतार. बस पुढेपुढे जात होती. शहर मागे मागे पडत होते. आता क्षितिजावर फुगे दिसू लागले. दूर अंतरावर बोटाच्या एका पेराएव्हढे. आकाशात आपोआप वेगवेगळे स्तर तयार होत होते. काही फुगे अगदी नजरेपार. तर काही थोडे जवळ. नजीकच्या फुग्यांवरचे वेगवेगळे रंग, अजूनही न उजाडलेल्या आकाशात धूसर दिसून येत होते. रंगीत फुग्यांचे नवथर आकाश अनोळखी. बस थांबली. आम्हीं सगळे पक्षी तुरूतुरू खाली उतरलो. समोर एक प्रशस्त दिवाणखाना दिसत होता. तिथे सर्वांनी एकत्र जमावयाचे होते. अदमासे शेकडा पक्षी जमा झाले होते. आत थोडी उबदार हवा. गरमागरम तुर्की चहा आणि बिस्किटं आमची वाट बघत होते. आम्हीं दोघी हातात चहाचा ग्लास घेऊन बाहेर आलो. ढग बाजूला सारून सूर्य पुढे सरसावत होता. क्षितिजावरचे पाय उचलून एखाददुसरा फुगा प्रवासास निघाला देखील होता. आम्हांला आमची व आमच्या हॉटेलची नावे विचारण्यात आली. गर्दीत एक भारतीय तरुण जोडपं होतं. आमची नजरानजर झाली. देशी नात्याचं एक स्मितहास्य मी दिलं. प्रत्युत्तर यथातथा. विविध रंगांचे बिल्ले वाटले जात होते. आम्हांला केशरी रंगाचा बिल्ला देण्यात आला. दोघींनी बिल्ला गळ्यात अडकवला.
"Orange." आमच्या रंगाचा पुकारा झाला. आम्हीं दहा केशरी पक्षी होतो.
"That one is yours." एक अवाढव्य फुगा आडवा झोपला होता. त्याच्या पोटाशी अडकवलेल्या वेताच्या टोपलीत एक अनुभवी माणूस बसला होता. त्याच्या हाताशी चार गॅस सिलिंडर्स होती. आगीच्या ज्वाळा फुग्याच्या पोटात शिरत होत्या. फुग्याच्या पोटात हवा भरली जात होती. भक्भक आवाज निघत होता. असे बरेच फुगे आडवे झोपले होते. जणू एखाद्या शर्यतीआधीचं 'वॉर्म अप' चालू होतं. 

हळूहळू आमचा फुगा जागा झाला. आम्हीं सगळे त्याच्या अवतीभोवती गोळा झालो. कोणी लहान कोणी मोठे, कोणी जेष्ठ नागरिक. काही पुरुष काही महिला. वेगवेगळ्या देशांतून त्यावेळी एकत्र झालेले, आकाशात तरंगण्याची एक हौस मनात धरून. फुग्याला कठडा होता. त्यावर हातांचा जोर देऊन आत उतरावयाचे होते. फुग्याचे नेहेमीचे मित्र आम्हांला मदत करत होते. आधी लेक आणि नंतर मी. आम्हीं दोघी आत उतरलो. आत टोपलीचे दोन विभाग केले होते. मध्ये एक आडवी काठी टाकून. आमच्या बाजूला आमचा पायलट उभा होता. थोडा स्थूल पन्नाशीच्या आसपासचा अँड्र्यूज. सुरवातीच्या काळात वैमानिकाचे काम करणारा अँड्र्यूज आजपर्यंतच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या देशांत पर्यटकांना आकाशात तरंगवत होता. आणि आमच्या हॉटेलच्या ऑस्ट्रेलियन तेसप्रमाणेच गेली काही वर्षे तुर्कस्तानात स्थायिक झाला होता.

अँड्र्यूज फुग्याची तपासणी करत होता. त्याच्या मदतीला जमिनीवर चार तरुण होते. त्यांना बाहेर काही सुचना देत आत इथे तिथे वाकून बघत तो मोठ्या बारकाईने फुग्याचे तब्येतपाणी बघत होता. अखेर सगळे त्याच्या मनासारखे झाले. आणि आमचा फुगा उड्डाण करावयास तयार झाला. आम्हीं पक्षी आपापल्या जागा पकडू तयार उभे होतो. अकस्मात एक छायाचित्रकार आम्हांला हाळी देत आमच्या बाजूला येऊन उभा राहिला. कॅमेरा आमच्यावर रोखून खटखट आमचे फोटो काढले गेले. आता उत्सुकता शिगेला पोचली होती. सगळ्यांचा उत्साह भरभरून वाहू लागला.

आणि शेवटी आमच्या फुग्याच्या दोऱ्या जमिनीवरून सोडण्यात आल्या. फुग्याने भुईवरचे पाय वर ओढून घेतले. आणि आमच्या नकळत आम्हीं फूट दर फूट वरवर जाऊ लागलो. काही क्षणापूर्वी नजरेसमोर उभ्या असलेल्या गाड्यांची छते दिसू लागली. आणि डोंगर वर नव्हे तर नजरेसमोर दिसू लागले. रस्ते, डोंगर, दऱ्या, अँड्र्यूजचे चार मदतनीस...सर्वच एकदम गलिव्हरच्या गोष्टीतील ठेंगू. ठेंगू देश. ते चौघे आम्हांला हात करू लागले. आम्हीही हात उंचावले. अस्पष्ट हास्य त्यांच्या चेहेऱ्यावर देखील दिसले.
"Let's kiss that balloon!" अँड्र्यूज म्हणाला. आम्हीं खालची नजर उचलून आता समोर बघितलं. कोणाला किस करायचंय ते कळेना. आमचा फुगा समोर तरंगणाऱ्या फुग्याच्या दिशेने झेपावत होता. हलकेच जाऊन त्या फुग्याला टेकला. जसे काही एका मैत्रिणीने आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या गालावर आपले गाल हलकेच टेकवावे. दोन अवाढव्य फुग्यांचे मुलायम चुंबन. हळूहळू आम्हीं त्या फुग्यापासून दूर जाऊ लागलो.
कालपर्यंत उंच दिसणारे सुळके आता खाली होते. खोल खाली लाल दरी होती. आम्हीं कपाडोक्यियातील प्रसिद्ध 'रोज व्हॅली' वरून चाललो होतो. 'रोज व्हॅली'चे असे नामकरण होण्यामागे कारण तिथला लाल दगड. वेगवेगळे ज्वालामुखी आणि त्यातून निर्माण झालेले विविध प्रकारचे दगड. कपाडोक्यियाचे वैभव. खाली पृथ्वीवर अगणित दऱ्या दिसत होत्या. फार पूर्वी अस्तित्वात असलेल्या वस्तीच्या खाणाखुणा दिसून येत होत्या. भूतकाळ आणि वर्तमानकाळ मनात एकत्र झाला. वाटलं, समजा पृथ्वीवर ह्या घटकेला कास्य युग चालू असते, आणि आकाशात एकविसावे शतक. दऱ्याखोऱ्यांतून खडतर जीवन जगणाऱ्या त्या वस्त्यांमधील समजा एखाद्याचे लक्ष वर गेले असते...आणि उजाडता उजाडता त्याला आम्हीं असे तरंगत जाताना दिसलो असतो...तर त्याच्यासाठी काय आम्हीं पुष्पक विमानातील माणसे झालो असतो...? "आई, कायपण हा !" लेक हसायला लागली. 
आम्हीं अजून वर गेलो. संपूर्ण शहर आता दृष्टीक्षेपात येत होते. जुने कपाडोक्यिया आणि त्याला लगटून वसलेले नवे कपाडोक्यिया. आमचा फुगा मधेच स्वत:भोवती हळूवार गिरकी होत होता. त्यामुळे आम्हां सर्वांना भोवतालचे संपूर्ण दृश्य दिसत होते. एका क्षणी पाठ असलेले आमच्या पुढ्यात उभे राही...आणि मग आम्हीं तिथून पुढे सरकू...अजून वर...वर...अजून वर.  समोर रंगीबेरंगी काही फुगे. खाली ? अधिक काही फुगे. वर ? अजून काही फुगे. फुग्यांचे आकाश...फुग्यांची दुनिया. मी एक फुगा. तरंगता...हलकीफुलका. भाषा विविध...आम्हीं मराठी, कोणी इंग्रजी...कोणी कळती...कोणी नकळती. श्वास हलका...मन हलकं...शरीर तरंगतं. अंगावर एखादी उबदार शाल पसरावी तसे सूर्याचे कोवळे सोनेरी ऊन ढगांआडून आमच्या अंगावर पसरले. कोणाचा गोरा चेहेरा अधिकच उजळला...कोणाचे सोनेरी केस चमकू लागले. विमानासारखे नव्हे...आकाशात उड्डाण केल्यापासून एकाच प्रकारचा प्रकाश. खिडकी बंद केलीत तर बाहेर काय आहे पत्ता लागणार नाही...सकाळ की संध्याकाळ. 
आज आम्हीं शब्दश: हवेत होतो. तरंगता तरंगता अँड्र्यूज आम्हांला आजूबाजूच्या परिसराची माहिती देत होता. आम्हांला आमचा हात फुग्याबाहेर काढता येत होता. अजून थोडं पुढे गेलो तर डोंगर हाताशी होता. हवा सुखद थंडगार होती. माऊथ पीस मधून अँड्र्यूजचा आजूबाजूला उडणाऱ्या फुग्यांबरोबर संवादबिंवाद चालू होता. त्याच्या मित्रांना तो त्यांचा फुगा नक्की कुठे आहे...त्या त्या मित्राचा फुगा आत्ता नेमका कुठे आहे ही देखील माहिती देत होता. मी उगाच कठड्यावरून खाली वाकते. कठडा कमरेच्या वरपर्यंत होता. म्हटलं तरी पडणे कठीण. तरी लेक ओरडते ! "आई, खाली वाकू नकोस !" खाली नजर टाकली तर एकदम काही काळे दिसले...म्हटलं मला काही प्राचीन काळचं फक्त मलाच वगैरे दिसत असावं....पण नाही ! कुठल्याश्या गाडीचा तो काळा टायर होता ! तिथे येऊन कसा काय पडला होता तो ? कोण जाणे. माझ्या मनात आपले 'एका टायरचे आत्मचरित्र' सुरू होते. मी लेकीला काही बोलत नाही...नाहीतर उगाच 'आई, कायपण हा !' असे ती परत म्हणाली असती !

"Now we will be going back..." अँड्र्यूज जाहीर करतो. एक तास संपला ? आयुष्यातील एक तास उडून गेला ? कधी आणि कुठे ? आकाशात उडाला की कुठल्या दरीत सांडला...कोण जाणे.
कपाडोक्यिया आकाशात आम्हीं हजेरी लावून गेलो...कपाडोक्यियाच्या आकाशाला स्पर्श करून गेलो.
दहा दिवसांपूर्वी तुर्कस्तानात प्रवेश केल्यापासून... जमीन. डोंगर. नदी. गुहा. समुद्र. दऱ्या. झाडे. वृक्ष. फुले...आणि आज पहाटे पहाटे...मोकळे आभाळ.
  


वाऱ्यासोबत फुगा वहात होता. काल जेव्हां चिरालीत अकस्मात पाऊस दाखल झाला होता, त्यावेळी तिथल्या ओझेलच्या मनात एक शंका आली होती. कपाडोक्यियामध्ये देखील पाऊस पडू लागला तर फुगे नाही उडवले जाणार. आम्हीं थोडे हिरमुसले होतो. वाटलं होतं,  आलो खरे इथपर्यंत, पण निसर्गाने साथ नाही दिली तर ?  तसे घडणार नव्हते. कपाडोक्यियामध्ये संध्याकाळी पाऊस सुरू होत होता. पहाटे मात्र वहाता वारा...जो फुग्याला समवेत घेऊन हलकेच आसमंतात तरंगत होता. फुगा जिथून उडाला तेथेच त्याच जमिनीवर तो परत उतरेल ह्याची काही शाश्वती नाही. वारा नेईल तेथे...ती त्याची दिशा. आणि ती त्याची त्या क्षणापुरती जमीन. वर आमच्याकडे लक्ष ठेवत खाली जमिनीवर अँड्र्यूजचे चार मित्र गाडीत बसून आमचा पाठलाग करत होते. जसजसा फुगा खाली उतरू लागला, तसतशी त्याची उतरण्याची जागा त्यांना कळत गेली. भराभर आपापली जागा पकडून ते जय्यत तयारीत जमिनीवर उभे राहिले. सगळ्यांनी आपापले कॅमेरे आत ठेवावेत. कठड्याला घट्ट पकडावे आणि गुढघ्यात वाकून उभे राहावे. जर चुकून फुगा वेगात खाली जमिनीवर आदळला तर कोणाच्याही पाठीच्या मणक्याला काही इजा पोहोचू नये ह्यासाठी ही अँड्र्यूजने घेतलेली काळजी. आज्ञाधारक मुलांसारखे आम्हीं सगळे उभे राहिलो. फुगा खाली खाली उतरू लागला. हलकेच एका क्षणी फुग्याने जमिनीला पाय टेकवले, आणि त्याने सरळ अंग सोडून दिले. आमच्या डोक्यावरचा फुगीर घुमट आता खाली वहात गेला. अँड्र्यूजच्या मित्रांनी फुग्याचे सगळे दोरखंड ताब्यात घेतले. फुगा देखील शहाणा मुलगा होता. दमूनभागून भुईवर आडवा झाला. आम्हीं एकेक करून बाहेर आलो. कुठल्या वेगळ्याच ठिकाणी आम्हीं उतरलो होतो. आजूबाजूला झाडे...दगड...आणि ते सुळके. बाजूला मित्रांनी एक टेबल टाकले होते. जमिनीवर झालेल्या सुरक्षित आगमनाबद्दल आता जल्लोष होता. शॅम्पेनची बाटली उघडली जाणार होती.

अँड्र्यूजने बाटली हातात घेतली. अजून सकाळचे फक्त सात वाजले होते. ऊन कोवळे होते. बाटलीचा छोटा बिल्ला उडाला आणि एक क्षण उन्हात चमकत अलगद बाजूला दगडावर विसावला. कुठेही लहानसा देखील कचरा सोडायचा नाही...ह्या तत्वाने अँड्र्यूजच्या एका सहकाऱ्याने बिल्ला उचलून तात्पुरत्या तयार केलेल्या कचरापेटीत टाकला. अँड्र्यूजच्या हातातील हिरवी बाटली उत्साहात उसळत होती. फेसाळते मद्य उन्हात चमकू लागले होते. अँड्र्यूज एकेक ग्लास भरू लागला. सगळेच वातावरण हलके होते...आनंद..जल्लोष. आकाशात केलेला एक तासाचा प्रवास सगळ्यांची मने हलकी करून गेला होता.


रस्त्यावर आमची छोटी बस आमची वाट बघत उभी होती. आम्हीं परतीच्या रस्त्याला लागलो त्यावेळी घडयाळामध्ये आठ वाजत आलेले होते. दूर रस्त्यावर अँड्र्यूजची पत्नी गाडी घेऊन त्याच्यासाठी आली होती. हसत हसत अँड्र्यूजने व तिने आम्हांला हात केला. आमची बस रस्त्याला लागली...आणि ते व त्यांची गाडी नजरेआड गेले. जसे काही क्षणांपूर्वी जमिनीवरील गाड्या क्षणार्धात ठिबक्यांमध्ये रुपांतरीत होत होत्या.

आमचा आजचा तुर्कस्तानातील शेवटचा दिवस होता. सहल संपत आली होती. उद्या मुंबईचे आकाश आणि मुंबईची जमीन गाठावयाची होती.

नेहेमीच एखादी सहल ठरवत असताना त्या संपूर्ण सहलीचा सर्वोच्च आनंदाचा क्षण काय असेल ह्याची थोडीबहुत कल्पना आपल्याला असते. तसेच ह्यावेळी आमचे झाले होते. हॉट एअर बलून राईड हा आमच्या तुर्कस्तानातील प्रवासाचा असाच एक अत्त्युच्च आनंदाचा क्षण असेल अशी आमची पक्की खात्री होती. कारण ह्या आधी कधी हे केले नव्हते. बालीला असताना तेथील समुद्रावर पॅरासेलिंग केले होते. ते देखील एकट्याने. पण तरी देखील हा अनुभव अवर्णनीय. मात्र तुर्कस्तानात आल्या दिवसापासून प्रत्येक दिवस हे असेच आनंदाचे अनेक क्षण देऊन जात होता. एक नव्हे. कित्येक. कधी इतिहासातील अजब कहाण्या तर कधी भौगोलिक आश्चर्ये. कधी जिभेचे चोचले, तर कधी मन:शांतीचा एखादा हलकासा क्षण.

कुठलाही देश असा दहा दिवसांत संपूर्ण बघून होणे अशक्य. त्यातून तो तुर्कस्तानासारखा, इतिहास, भूगोल संपन्न असेल तर अशक्यप्रायच. भारतात आयुष्य गेलं तरी देखील त्यातला एखादा वाळूचा कण काय तो हाताशी लागला असेच म्हणावे लागेल. मात्र आम्हीं जे ठरवले जसे ते झाले...तुर्कस्तानातील दोन शहरे, एक गाव आणि भूमध्य समुद्रात डुबकी. हसतमुख प्रेमळ रहिवासी, खाण्याची रेलचेल, स्वच्छ रंगीबेरंगी शहरे. सुरक्षित गावे. एखादा पर्यटक, उंचउंच डोंगर पायदळी तुडवणारा. कोणी पट्टीचा पोहणारा. कोणी आळशी, कोणी जिभेचा शौकीन, कोणी संगीतप्रेमी, कोणी इतिहास प्रेमी. तर कोणी आमच्यासारखे...सगळ्यांत थोडीथोडी गोडी. तुर्कस्तान. जो जे वांछिल तो ते लाभो...राहून राहून हे मनात येते. पर्यटकांसाठी पर्वणी.

दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्हीं आकाशात होतो. मात्र आज आभाळ आमच्यापासून दूर होते. परके परके. हातात न येणारे. पहाटे छत्रपती शिवाजी विमानतळावर पोहोचलो, तेव्हां अनेक आनंदाचे क्षण खाती जमा झाले होते. मायलेकी दहा दिवस सतत एकत्र होतो. आयुष्यातील बेरीज वाढली होती. वजाबाकी थोडी कमी झाली होती हे कबूल करावयास हवे.

देव बरेच काही काढून घेतो...मात्र जगण्यासाठी काही देत देखील रहातो. त्यासाठी अहोरात्र मेहेनत करावी का लागेना.
उलट कदाचित आनंद जर स्वकष्टाने मिळवता आला तर तो अत्युच्चच.
नाही का ?

समाप्त !
:)