नमस्कार

नमस्कार

Pages

Friday 21 September 2012

निषेध

दरवर्षी ह्या सुमारास गणपती येतात. मुंबई नाचते, गाते, जुगार खेळते, दारू पिते. आणि त्यानंतर गणपतीचे दिवस भरले की त्याला समुद्रात सोडले जाते.
पहिल्या दिवशी मूर्तीत प्राणस्थापना केली जाते. ज्या मूर्तीमुळे पर्यावरणाची हानी होत असेल त्यात आधी गणपती येऊन बसेलच कशाला ? आता ह्यात पर्यावरण हानी कशा प्रकारे होते ह्यावर मी काहीही नवे सांगू इच्छित नाही. कारण लोकं अज्ञानी नाहीत. सर्वांना PoP च्या मूर्तीमुळे व त्यावरील कृत्रिम रंगांमुळे होणारी हानी ह्याची पूर्ण जाण आहे. आणि तरीही त्यांना असे वाटते की ह्या हानिकारक मूर्तीमध्ये येऊन देव बसतो. आणि मग ते त्याच्यासमोर बसून जुगार खेळण्यास व दारू पिण्यास मोकळे होतात.
मी माझ्या घरी गणपती आणते का ? अजिबात नाही. श्रद्धा तेथे देव ह्यावर माझा विश्वास आहे. माणुसकीवर माझी श्रद्धा आहे. त्यामुळे माणुसकीमध्ये देव आहे असे माझे मत आहे. उगाच त्याच्याच मूर्ती घेऊन त्यानेच तयार केलेल्या विश्वाची विल्हेवाट लावायला मी जात नाही.
मग आता ?
आता काही नाही.
ह्या गणपतीच्या प्रदुषणाच्या हानीविरुद्ध मी काय करू शकते ? असा प्रश्न मी स्वत:लाच परवा विचारला. मी सामान्य माणूस आहे. मात्र बदल घडवायचा तर तो सामान्य माणूसच घडवू शकतो ह्यावर माझा विश्वास आहे.
आणि शब्दापेक्षा कृती महत्त्वाची हे तर खरेच.
मग एकच निर्णय केला. ज्याची अंमलबजावणी करण्यासाठी मला दुसऱ्या कोणावरही अवलंबून रहाण्याची गरज नाही.

ज्यांच्याकडे 'पर्यावरणाला हानी' पोचवणारे गणपती वा त्याची सजावट असेल त्यांच्याकडे ह्यापुढे मी गणपतीच्या दर्शनासाठी जाणार नाही.

"तुझ्या मित्रमैत्रिणींच्या भावना दुखावतील." माझी एक मैत्रीण मला म्हणाली.
"हो दुखावतील ना. पण निसर्ग आणि मित्रमैत्रिणींच्या भावना ह्यात मला निसर्गाला अधिक महत्त्व द्यावयास हवे. कारण आता अति झाले आहे. कोणालाच मनावर घ्यावयाचे नसेल तर माझ्याकडे आता दुसरा कुठला उपाय आहे ?"

"तुझ्याकडे कसला गणपती आणलाय ?" मी माझ्या एका मित्राला विचारले.
"PoP."
"मी नाही येऊ शकत मग तुझ्याकडे. पुढल्यावर्षी जर तू निसर्गाशी जवळीक साधणारा गणपती आणलास तर मात्र नक्की येईन." सांगून टाकलं.

"तुमच्याकडे कसला गणपती आणलाय ?" दुसऱ्या एका मित्राशी झालेला संवाद.
"PoP."
"का ? तुला तर माहितेय किती हानी होते ते."
"अगं मी ठरवलेलं...पण वेळच नाही मिळाला !"
"वेळ नाही मिळाला म्हणजे ? मग नव्हता आणायचा ह्या वर्षी गणपती. तुला वेळ नाही ह्याची शिक्षा निसर्गाला का ? तू घे ना त्याची शिक्षा. आणू नकोस एक वर्ष गणपती !"

मला असं वाटतं की ज्या कोणाला पर्यावरणाची चाड असेल त्याने/तिने हा असा स्वयंघोषित निषेध व्यक्त करण्यास हरकत नाही.

आजपर्यंत मोजून दोन घरी गेले. मामेबहीण आणि एक मैत्रीण.
फायबर ग्लास.
गौरीने स्वत: खपून केलेला छोटासा शाडूचा गणेश.
हे तीनही सुंदर, मनमोहक स्वत:वर खुष झालेले आनंदी बाप्पा.

संतोष जाहला...


Saturday 15 September 2012

निर्वासित

एखाद्या साध्या दिवाणखान्यात जरी ते चित्र दिसलं असतं तरी ते मनात इतकं घर करून नसतं राहिलं. परंतु, त्या सुरेख चित्राची पार्श्वभूमी विसरता न येण्यासारखीच होती.

हनुमान गल्ली. एकदोन वर्षांपूर्वी दोन्ही बाजूच्या पदपथावरील झोपड्या महानगरपालिकेने उठवल्या होत्या. तो इतिहास झाला. सद्य परिस्थितीत निळे छप्पर डोक्यावर ओढून घेऊन संसार मांडले गेले आहेत. सकाळी कचेरीत जातेवेळी मी त्या गल्लीत शिरते त्यावेळी काही माणसे रस्त्याच्या कडेला लावून ठेवलेल्या गाड्या धूत असतात. जाताजाता एका क्षणाची नजर कुठल्या झोपडीत गेलीच तर एखादी बाई, काळे केस मोकळे सोडून फणी फिरवत बसलेली आढळते. बाहेर रस्त्यावर एखादा पुरुष बालदीतील पाणी डोक्यावर ओतून घेत असतो. लहान पोरं इथेतिथे उड्या मारीत असतात. हे झालं नेहेमीचं चित्र. मग त्या दिवशीच्या चित्रात वेगळेपण काय होते ?
खरं तर मला तिथून दिसेनासे होण्यास काही क्षण पुरतात. तरी त्या दोघांनी माझं लक्ष वेधून घेतलंच. सातेक वर्षांची फिकट गुलाबी रंगाचा झगा घातलेली एक मुलगी. तिच्या डाव्या हाताला पाचसहा वर्षांचा मुलगा. दोघेही रस्त्याच्या कडेला फतकल मारून बसलेले होते. त्या ताईने जमिनीवर एक पुस्तक पसरले होते. आणि ती हातवारे करून तिच्या त्या छोट्या भावाला त्या पुस्तकातील काही वाचून दाखवीत होती. दोघेही अगदी दंग झाले होते. भाऊ आणि बहिणीचा नातं कोणी सांगावे नाही लागत. ते उमललेलं दिसून येतं. त्या निळ्या प्लास्टिकमधून लटकलेलं दारिद्र्य, खाचखळग्यांनी फुटलेला ओला रस्ता...आणि आपले दोन्ही हात पसरवून रस्त्यावर पसरलेले, आभाळ अंगावर घेणारे ते ज्ञान. 
काही चित्रं भान हरपवून टाकणारी असतात.

अंदाज असा आहे मुंबईतील इतर अनेक झोपडपट्टींप्रमाणे ही झोपडपट्टी देखील निर्वासित बांगलादेशी लोकांनी वसवलेली आहे. त्यांचा काळा रंग, चेहेऱ्याची ठेवण. हा अर्थात माझा अंदाज आहे. आणि आता आजूबाजूच्या अनेक गावागावांतून, देशांतून मुंबईत शिरकाव करणाऱ्या लोकांबद्दल प्रेमभाव मनात आणण्याची ताकद माझ्यात शिल्लक राहिलेली नाही. वाढती गुन्हेगारी, जाळपोळ...हे सर्व माझ्यासारख्या सामान्य माणसांना भयावह आहे. हतबल करणारे आहे. त्यामुळे एखादी तरुण मुलगी एक पोर कुशीत घेऊन गाडीपाशी भीक मारायला उभी राहिली....बंद काचेवर ठोठावू लागली...की आता मला दयेचे पाझर नाही फुटत. तर अकस्मात तिरस्कार उफाळून येतो. दुसऱ्याच क्षणाला माझ्या ह्या भावनेचा त्याग करावासा वाटतो. आणि हे जे दंद्व माझ्या मनात काही क्षण सुरू रहाते त्याची पूर्ण जबाबदारी मला आमच्या निलाजऱ्या पुढाऱ्यांना द्यावीशी वाटते. शहरभर लटकलेले त्यांच्या थोबडांचे फलक दिसतात आणि तोंडात शिव्या येतात...किडे पडतील !

तसलीमा नसरीन ह्यांचे 'फेरा' मध्ये वाचले. बांगला देशाची फाळणी. पाकिस्तान फाळणी वेळच्या भयंकर कथा 'सादत हसन मन्टो' ह्या उर्दू लेखकाच्या पुस्तकांतून वाचनात आल्या होत्या. कधीतरी वाटतं आपण स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेण्यास जन्मास यावयास हवे होते. त्यानंतर मंटोच्या कथा वाचून धस्स होतं. वाटतं कदाचित आपण जन्म घेतला तोच काळ ठीक होता.

'जेव्हा देशातील विशिष्ट विचारसरणीची काही माणसे इतरांवर दबाव आणून आपल्या सुंदर मायभूमीला अक्षरश: उद्ध्वस्त करतात, 'माणुसकी'सारख्या परमोच्च मूल्यालाच मूठमाती देतात, तेव्हा घडणारे बदल हे त्या देशाला प्रगती ऐवजी अधोगतीकडे नेणारे असतात.' तीच कथा आहे 'फेरा'ची.
त्यातील प्रस्तावनेत लेखिका मृणालिनी गडकरी म्हणतात...'तसे पाहिले तर आपल्या मायभूमीबद्दल प्रेम असणे, आपल्या मायभूमीच्या मातीची ओढ असणे स्वाभाविक आहे. अशी ओढ, असे प्रेम माणसात उपजत असतेच. म्हणूनच तर माणसाने जन्मभूमीला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ मानले आहे. मातृभूमीचे पोवाडे माणूस पिढ्या-न-पिढ्या गात आला आहे. काही वेळा माणसाला मायभूमीपासून दूर जाण्याचा कटू निर्णय घ्यावा लागतो; पण मायभूमीपासून दूर गेल्यावर, त्याच्या मनात खोलवर रुजलेल्या ह्या मातीच्या ओढीची त्याला विशेषत्वाने जाणीव होते. मायभूमीपासून दुरावणे माणसाला फार यातना देणारे ठरते.' कादंबरीची नायिका कल्याणी म्हणते, "वृक्ष एका जागेवरून उचलून दुसऱ्या जागेवर लावला, तर कदाचित तो जगेल, पण रुजणार नाही."
कथा मोजून नव्वद पानांची आहे. मात्र त्यातील नायिका आपल्याला बांगलादेशातील खळाळत्या ब्रम्हपुत्राच्या काठाशी तिच्याबरोबर बसवते, माडाच्या झावळ्यांमधून झिरपणारे तिच्या लाडक्या देशातील ऊन अंगावर घेऊ देते, जास्वंदीची लाल टपोरी फुलं....गेटवर फुललेली मधुमालती, हवाई मिठाई घेऊन दारावर येणारा फेरीवाला...सारवलेली अंगणं...पत्र्याची घरं....तळं...तळ्याकाठचा रानटी गुलाब...हिंदू कल्याणी आणि तिची सख्खी जिवाभावाची मुसलमान मैत्रीण शरीफा. 
भारताची फाळणी...नाला झालेली कल्याणीची क्षीण ब्रम्हपुत्रा.
त्यातील एक संवाद पार हबकवून टाकतो...
"त्या मुलांबरोबर काय खेळलास रे तू ?" कल्याणीने तिच्या छोट्या लेकराला, दीपनला, विचारले.
दीपन चिरक्या आवाजात म्हणाला," मी नाहीच खेळलो त्यांच्याबरोबर ते 'मुंग्या मुंग्यां'चा खेळ खेळत होते.'
'मुंग्या-मुंग्या' ? हा कसला खेळ ? मी तर कधीच नाव ऐकलं नाही ते !'
'अगं, भिंतीवर मुंग्यांची ओळ लागलेली असते ना, त्यातल्या निवडून निवडून लाल मुंग्या ती मारत होती आणि काळ्यांना सोडून देत होती. मी त्यांना 'असं का करता' म्हणून विचारलं, तर ते सगळे म्हणाले की काळ्या मुंग्या मुसलमान आहेत, म्हणून त्यांना सोडून द्यायचं आणि लाल मुंग्या म्हणजे हिंदू. त्यांना मारायचं.'
फाळणीत कल्याणीचा बळी पडू नये म्हणून कल्याणीच्या आईवडिलांनी तिला कलकत्याला पाठवून दिले आहे. मामाकडे. मात्र बांगला देशातील ब्रम्हपुत्रा नदीकाठी वसलेल्या हिरव्यागार गावात लहानाची मोठी झालेली कल्याणी कधीही कलकत्यात रमू शकलेली नाही. ते तिला धुळीने कळकटलेले, गर्दीने घुसमटलेले शहरच वाटत राहिले.

'फेरा' वाचले.
हजारो निर्वासित, ठाईठाई, भारतीय म्हणून मुंबईत नांदताना दिसतात त्यावेळी ते हे स्वखुशीने करीत नाहीत हे मला पहिल्यांदाच जाणवले.
मात्र...
कल्याणी जेव्हा एकवार भेट देण्यासाठी म्हणून बांगला देशी परत येते त्यावेळी तिला जसे तिचे लाडके गाव बकाल दिसते...तशी मला माझ्याच देशात....माझ्याच शहरात राहून...माझीच मुंबई दिवसागणिक क्षीण होत असलेली दिसते. कर्करोगाने ग्रासलेली...तीळतीळ संपत चाललेली...जिवंत असल्याचं न झेपणारं सोंग वठवणारी निर्वासितांची मुंबई. 
हे माझे दुर्दैव.

कधीतरी किडे पडलेले एक मृत शरीर नजरेस पडले होते.
जेव्हा ते शरीर पलटवले गेले त्यावेळी लाखो हजारो किडे विस्कटलेल्या पाठीतून भस्सकन बाहेर पडले होते...
चोहो दिशांना अस्ताव्यस्त फुटले होते.

तशीच ही मुंबई.

लहान बहिणभावांचं पुस्तकांत बुडून गेलेलं रस्त्यावरचं चित्र बघितलं...
पुस्तकात दोघेही बुडून गेले होते.
तिला वाचता येत होतं...आणि भावाला गोष्ट वाचून दाखवत होती. यांची शिक्षणाची आस, बंद काचांतून माझ्यापर्यंत झिरपली. ना तिचा चेहरा स्पष्ट दिसला...ना त्याचा. पण त्याने काय अडले ?
मीही अशीच माझ्या धाकट्या बहिणींना विंदा करंदीकरांच्या कविता वाचून दाखवत असे. हेंगाड वेंगाड...फेंगाड भेंगाड...आली आली भुताबाई....चार माणसे रोज खाई....असं काहीसं. दिवाणखान्यातील थंड लादीवर बसून वेडेवाकडे चेहेरे करत मी एक भारी नाटयप्रवेश करीत असे. आणि माझ्या दोघी बहिणी आठवड्यातून किमान एकदा तरी हा प्रयोग करण्यास मला भाग पाडीत असत.

निर्वासित...हा शिक्का.
माणूस...ही जात.
माझा केविलवाणा निर्वासित देश.
आणि दिवसागणिक माझ्या शरीरातून झिरपत, खाली मातीत मिसळून नाहीशी होत चाललेली माझी माणुसकी.

Wednesday 12 September 2012

बेकरी

"चार रुपयांना तीन पाव."

पूर्वी रस्त्यावर असलेली बेकरी आता सिमेंटच्या उंच इमारतीच्या तळमजल्यावर वसू लागली आहे.
त्या काळी मागेच त्यांची भट्टी असे. व दिवसाच्या ठराविक वेळी तिथे गेलं तर गरमागरम पाव मिळत. ते असे नुसतेच खाण्याची मौज काही औरच. रोज संध्याकाळी आई मला ऑफिसमधून येताना आजीकडून घेऊन निघे. आणि आमच्या घरी पोचण्याच्या रस्त्यावर उजव्या हाताला ही बेकरी होती. आई पाव घेई आणि त्यातला एक मी रस्त्यातच खायला सुरवात करत असे. किरणांचा पिसारा आवरत सूर्य आपला परतीच्या मार्गी लागलेला असे. रस्त्यावरील दिव्यांचा उजेड पुस्तकावर अंधुकसा पडे. पण कॉमिक्स नेहेमीच अशी वेड्यावाकड्या परिस्थितीत वाचली की त्यात अधिक गंमत येते. म्हणजे अगदी आरामात ऐसपैस कोचावर बसून ते वाचणे आणि अर्धवट प्रकाशात, रस्त्यावरून चालता चालता ते वाचणे. अकस्मात वेताळाने त्याची कवटी शत्रूच्या हनुवटीवर उमटवावी आणि बरोबर त्याच वेळी आईने माझ्या पाठीत एक धपाटा घालावा ! डाव्या हातात वेताळ आणि उजव्या हातात गरमागरम पाव. आईला हे फारसे काही कौतुकाचे वाटत नसे. कारण माझे डोळे पुस्तकात आणि दोन्ही हात कामात गुंतलेले. त्यामुळे एकतर तिला हातात धरायला माझा हात मिळत नसे. आणि मी स्वत:च्या डोळ्यांनी रस्ता बघत नसे ! त्यामुळे बखोटीला धरून फरफरटत मला घरी घेऊन जाण्यापलीकडे तिच्याकडे दुसरा मार्ग नसे.

त्यावेळी हा पाव नक्की कितीला मिळत असे ? कोण जाणे. 

परवा मी तिथेच तीन पाव विकत घेतले तेव्हा त्याचे चार रुपये झाले. माझ्या उजव्या हाताला एक लहान अंगच
टीच्या बाई देखील पाव घेत होत्या. लालसर पातळ अंगावर गुंडाळलेलं होतं. आर्थिक परिस्थिती तशी बेताची वाटत होती. त्यांनी चार रुपये दिले. बेकरीवाल्याने जुन्या वर्तमानपत्रात तीन पाव गुंडाळले आणि त्यांच्या हातात दिले. तिथेच उभे राहून बाईंनी कागद उघडला व पाव हातात घेतले. पाव वरखाली केला आणि त्या बेकरीवाल्याला म्हणाल्या,"पाव किती लहान झालाय."
मी माझ्या हातातल्या पावाकडे बघितले. खरंच पाव जणू आक्रसला होता. लहानपणी इथून घेतलेला पाव मला दहा मिनिटांवर असलेल्या घरापर्यंत पोचेस्तोवर पुरत असे. पण हा पाव तर बेकरीतून निघून खाली पायऱ्या उतरेस्तोवर संपून देखील गेला असता. मी बाईंकडे बघितलं. त्या अजूनही पाव हाताळत होत्या. कोण जाणे त्यांच्या मनात काय वादळ उठलं होतं. तीन पाव....तीन लेकरं....कसे पुरणार...अजून एखादा घ्यावा का...मग पैसे ? चेहेऱ्यावर गोंधळ होता.
"माझे चार आणे तुझ्याचकडे राहिले की रे !" वर बघत
त्या बेकरीवाल्याला म्हणाल्या. चार आणे शेवटचे बघून काही वर्षे उलटली. त्यामुळे पुढल्या खरेदीत ते धरले जातील असा हिशेब असावा.
माझ्या पोटात खड्डा पडला. त्यांचे माझ्याकडे लक्ष गेले.
मी त्यांच्याकडे बघून हळूच हसले. त्यांनी पुन्हा कागदात पाव गुंडाळून घेतले आणि हसल्या. त्यांच्या मऊसूत चेहेऱ्यावर ते हास्य हलकेच पसरत गेलं. काही ओठ नुसतेच हसतात. असे हसतात की ते हसलेत ह्याचा त्यांच्याच डोळ्यांना सुगावा देखील लागत नाही. बाईंचं हसू तसं नव्हतं. त्या इतक्या सुरेख हसल्या की त्यांचे डोळे देखील हसले.
"फारच झालेय ना महागाई ?" मी हळूच म्हटले.
"नाहीतर काय !" बाईंनी उजवीकडे मान उडवली व हसल्या.
मी पायऱ्या उतरून खाली आले. हातातील चार पाव गाडीतील सीटवर जाऊन बसले. आताही बेकरीपासून घर दहा मिनिटांवर आहे. पण पाव गाडीत बसले होते. आणि माझ्या हातात कॉमिक नव्हतं !

बारा इंची ताट...त्यात तीन इंची पाव...चार रुपये...आणि बाईंची ती सुहास्य मुद्रा.
कशाचाच
ताळमेळ नव्हता.
मात्र त्या महागाईच्या ज्वा
ळांतून तावूनसुलाखून आलेले ते एक हास्य लाखमोलाचे होते.

Wednesday 5 September 2012

हट्ट


मज...
सोनेरी चाफ्यास रातराणीसम गंध हवा...
त्या क्षितिजावरल्या इंद्रधनूसी कोकिळेचा गळा हवा

मज...
वेड्याखुळ्या पाऊसथेंबांत मोरपिशी छटा हव्या...
उसळत्या समुद्राला धीरगंभीर तळ हवा

मज...
गर्द निळ्या आकाशाला कधीतरी अंत हवा...
दुधाळ वाटोळा चंद्र नितळ हवा

मज...
आयुष्याच्या जोडीदारात उबदार सखा हवा !

Saturday 1 September 2012

वाचन आणि चित्रपट

एखाद्या पुस्तकाचा आस्वाद घेत असता आपण आपल्या कल्पनांचे वारू, लेखकाच्या सामर्थ्यानुसार, उधळून लावू शकतो. आपले आपण विश्व बनवतो. त्यात रममाण होतो. तर चित्रपट बघत असताना, आपल्यासमोर कलादालन उघडलेले असते. आणि कॅमेरामन व दिग्दर्शक ह्यांच्या कुवतीनुसार आपण त्यामधून आनंद मिळवतो. त्यांना एखादी कथा सादर करीत असताना जी काही भावना अभिप्रेत असतील त्या भावनांशी आपण समरस होण्याचा प्रयत्न करू लागतो. काही कथा वाचताना, आपल्या नजरेसमोर, उलगडत जातात. कारण आपण कधी ना कधी त्या परिसरात गेलेले असतो. तर कधी तिथे जाण्याचा योग आजपर्यंतच्या आपल्या आयुष्यात आलेला नसतो. व पुढे येण्याची देखील फारशी संभावना दिसत नसते.

मध्यंतरी, एका मित्राबरोबर 'पुस्तक व चित्रपट ह्या दोन वेगवेगळ्या माध्यमांचा आपल्यावर होणारा परिणाम' ह्यावर चर्चा करीत असता तो म्हणाला..."मध्ये माझ्या वाचनात आले...चित्रपट, आपण बरीच लोकं आजूबाजूला जमवून बघू शकतो. आणि जितकी आपली लोकं आपल्याबरोबर तो चित्रपट बघण्यासाठी हजार, तितका अधिक आनंद आपण त्या चित्रपटातून मिळवू शकतो. पण तसे पुस्तक वाचीत असताना होत नाही. उलट, आपण वाचीत असता जर दुसरा कोणी त्यात डोकावू लागला तर ते आपल्याला नकोसे होऊन जाते. असे का बरे ? तर पुस्तक वाचीत असताना त्यातील शब्दसामर्थ्यानुसार आपले आपण आपल्यापुरते एक विश्व बनवतो. त्यात कोणी दुसऱ्याने डोकावणे हे आपल्याला घुसखोरीसारखे वाटू लागते व आपण चिडतो. परंतु, चित्रपट हे आपल्या डोळ्यांसमोरील पडद्यावर एक स्पष्ट चित्र उभे केलेले असते. म्हणजे 'आटपाटनगर'...हे माझे वेगळे आणि तुमचे वेगळे...पुस्तकात. मात्र तेच आटपाटनगर समोर पडद्यावर उभे केले गेले रे गेले की संपलेच सारे. आपले कल्पनास्वातंत्र्य संपुष्टात."
यावर ह्याही पुढे जाऊन चर्चा झाली लेकीबरोबर. मानसशास्त्र हा तिचा विषय. ती म्हणाली...पुस्तक व चित्रपट ह्या दोन्ही गोष्टी एकतर आपल्याला एखादी गोष्ट सांगतात किंवा काही माहिती देतात. आपण पुस्तक एकांतात व चित्रपट घोळक्यात पाहू इच्छितो त्या मागे एक कारण असू शकते. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये साम्य काय आहे ? तर दृष्टी. दोन्ही गोष्टी करण्यासाठी आपल्याला दृष्टीची गरज असते. मात्र पुस्तक वाचीत असताना आपल्याला अजून एक गोष्ट 'आपल्याकडून' त्यात घालावी लागते. व ती म्हणजे, अवधान. त्यातील शब्द, एकेक करून आपल्या मेंदूमध्ये जमा झाले, की त्यानंतर आपल्यासाठी एक चित्र तयार होते. या उलट, चित्रपटात आपण फक्त आपली दृष्टी कामाला लावली की निदान वरवर तरी समोर सांगण्यात आलेली गोष्ट आपल्याला समजू शकते. व एकाच वेळी आपली मित्रमंडळी ते बघत असल्याने आनंद वा दु:ख ह्या भावना आपल्याला एकत्र अनुभवता येतात. वाचन करीत असताना मात्र दृष्टी व अवधान ह्या दोन्ही बाबी कामाला लावाव्या लागतात. व त्यातील एखाद्या गोष्टीत जरी बाधा आली तरी आपल्याला तो उपद्रव वाटू लागतो....असे असू शकते.

असो.

'माय नेम इज रेड' हे ओरहान पमुक लिखित पुस्तक माझ्या हातात पडले त्यावेळी मी रुग्णालयात भरती होते. व तुर्कस्तानात, पमुकच्या देशात जाण्याची सुतराम शक्यता कुठेही दृष्टीक्षेपात नव्हती. पुस्तक मला अतिशय आवडले. तो देश मी बघितला नसल्याकारणाने मला हवे तसे चित्र मी डोळ्यांसमोर उभे करू शकले. हे माझे स्वातंत्र्य. एकेक पान मला त्या लघुशैली (मिनीएचर) चित्रकारांबरोबर त्यांच्या नजरेतून चित्र बघण्यास शिकवत होते. एकातेक गुंफलेल्या कित्येक कथा. त्यानंतर, काही महिन्यांतच त्या देशात जाण्याचा योग आला. आणि ते पुस्तक मला वेगळे जाणवले.
परवा मी त्याच लेखकाचे 'स्नो' वाचावयास घेतले. पहिल्या पुस्तकाची सर ह्या पुस्तकाला नाही. अजून वाचून संपलेले नाही. परंतु, तुर्कस्तानातील मुस्लिम धर्माची ओळख मला इथे पानोपानी दिसते. त्या देशात असताना त्याचा धर्म त्रासदायक वाटला नाही. माणसांची नावे सोडल्यास तो फारसा जाणवला देखील नाही. बाकी अगत्य, प्रेमळ स्वभाव असेच देशाचे दर्शन होते. तेथील स्त्रिया विमानतळावर मोठ्या बॅगांबरोबरच छोट्या बॅगा आणि छोटी बोचकी घेऊन फिरत होत्या. आणि इथेतिथे बागडणारी, त्यांच्या हाताला झोके देणारी, दोनतीन गोजिरवाणी गोंडस बाळं. एका सारखंच दुसरं. म्हणजे हिचं बाळ आणि तिचं बाळ...शेम टू शेमच ! आपलं कसं मेलं ओळखायचं ते त्याची आईच जाणे. बाप तर मला वाटतं दुसरीचच उचलून चालू पडत असत्याती !  भाषा नाही कळली म्हणून काय झालं....बायका बायकांची ती मनं कुटबी जुळत्याती !  यसटीथांब्यावर यसटीची वाट बघत....मालवणला निघाल्यागत... तस्सच मेलं !
ही माझी तिथल्या बायकांची तिथे झालेली ओळख.

'स्नो' मात्र वेगळं चित्र दाखवतं. बर्फ पडायला सुरवात झालेली आहे...आणि त्या शुभ्र बधीर वातावरणात एक वार्ताहर पोहोचला आहे. तुर्कस्तानाच्या सीमारेषेवर. कार्स ह्या शहरात. तेथे अकस्मात तरुण स्त्रिया आत्महत्या करू लागल्या आहेत...'का' हे नाव असलेला हा वार्ताहर कवी मनाचा आहे. त्याच्या कविता, तुर्कस्तानातील काही प्रसिद्ध मासिकांतून छापून आलेल्या आहेत. मूळचा जरी तो तुर्क असला तरीही तो मोठा मात्र झाला आहे जर्मनीमध्ये. त्यामुळे पाश्चात्य मोकळ्या वातावरणाची विचारधारा त्याच्या अंगवळणी पडलेली आहे. धर्मनिरपेक्ष व मूलतत्ववादी ह्या दोन परस्परविरोधी दिशा एकमेकांशी सतत भिडताना ह्या पुस्तकात आपल्याला दिसतात. एका परिच्छेदापर्यंत मी पोचले आणि विचार कुठल्या टोकाला जाऊ शकतात असे वाटले. दोन तरुण व वार्ताहर 'का' ह्यांमधील हा संवाद आहे. ते दोघे 'का'ला प्रश्र्न विचारीत आहेत. धर्म ह्या गहन विषयावरील त्याचे विचार जाणून घेण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.

“Please don’t misunderstand us,’ said Necip. ‘We have no objection to anyone becoming an atheist. There’s always room for atheists in Muslim societies.’
‘except that the cemeteries have to be kept separate,’ said Mesut. ‘It would bring disquiet to the souls of believers to lie in the same cemeteries with the godless. When people go through life concealing their lack of faith, they bring turbulence not only to the land of the living, but also to the cemeteries. It’s not just the torment of having to lie beside the godless till Judgment Day. The worst horror would be to rise up on the Judgment Day only to find ourselves face to face with a luckless atheist. Mr Poet, Mr Ka, you’ve made no secret of the fact that you were once an atheist. Maybe you still are one. So tell us, who is it who makes the snow fall from the sky? What is the snow’s secret?’

कादंबरीतील प्रत्येक घटनेला, शहरात पडणारा बर्फ साक्षीदार रहातो. काच्या नजरेतून, त्याच्या सुखदु:खातून, आपण बर्फाचे नाजूक हलके कण अनुभवतो. पुस्तकात तारुण्य आहे, सौंदर्य आहे, सूड आहे, वैर आहे...धर्मांध खून आहेत. श्रद्धा, विश्वास ह्यांविषयीचा दुराग्रह आहे.

कादंबरीची मूळ भाषा तुर्क आहे. तुर्कस्तानला जाण्याआधी माझ्या हातात ही कादंबरी पडली नाही हे बरेच झाले. उगाच मनात एक शेवाळ पसरलं असतं.
बघू...कथा पुढे कसे वळण घेते.

हे वाचन चालू असतानाच एक चित्रपट बघण्यात आला... द वेव्ह. मूळ जर्मन नाव. Die Welle.
सन १९७१ मध्ये, कॅलीफोर्निया मधील स्टॅण्डफोर्ड विद्यापीठ येथे एक प्रयोग केला गेला. तो प्रयोग ओळखला जातो 'स्टॅण्डफोर्ड प्रिझन एक्सपरिमेन्ट' ह्या नावाने. मानसशास्त्रज्ञ फिलीप झिम्बार्डो व त्यांचे सहकारी ह्यांनी एकत्रित होऊन ज्यावेळी ह्या प्रयोगाची आखणी केली गेली त्यावेळी तो प्रयोग सलग चवदा दिवस चालणार होता. परंतु, जसजसे दिवस पुढे सरकू लागले तसतसे तो प्रयोग भयानक रूप धारण करू लागला. व अखेर सहाव्या दिवशी हा प्रयोग बंद करण्यात आला. 'प्रसंगानुसार ( situational ), माणसाच्या वागण्यात होणारे बदल वा परिवर्तन' हा ह्या प्रयोगाचा विषय होता. सर्वप्रथम, स्टॅण्डफोर्ड विद्यापीठामधील मानसशास्त्र विभागामध्ये संशोधकांनी एक नकली तुरुंग तयार केला. त्यानंतर २४ विद्यार्थ्यांची निवड केली गेली. त्यातील १२ विद्यार्थ्यांना कैद्याची व १२ विद्यार्थ्यांना पहारेकऱ्याची भूमिका देण्यात आली. प्रयोग संपेपर्यंत चोवीस तास ह्या तुरुंगात रहाणे त्यांना सक्तीचे होते. हळूहळू, ह्या भूमिका जगता जगता १२ पहारेकरी शिवराळ करू लागले, हिंसक बनू लागले. त्याउलट, कैदी तीव्र चिंतेमध्ये डुबून मानसिक ताण अनभवू लागले. सतत रडू लागले. दडवलेल्या कॅमेराच्या सहाय्याने स्वत: संशोधक ह्या सर्वांच्या वागण्यावर लक्ष ठेवून होते. मात्र शेवटी हे इतक्या पराकोटीला जाऊन पोचू लागले की प्रयोगाचे संशोधक देखील सत्यापासून दूर जाऊ लागले. मानसशास्त्रज्ञ फिलीप झिम्बार्डो आपल्या 'The Lucifer effect' ह्या पुस्तकात म्हणतात, "सत्तेने दिलेल्या प्रासंगिक मोहावर, नैतिकता वा सभ्यता सतत जागृत ठेवून, फार कमी माणसे विजय मिळवू शकतात. अवधान व जाणीवा सांभाळू शकतात."
पूर्णतः ह्या संशोधनावर बेतलेला चित्रपट म्हणजे 'द एक्स्परिमेंट'. परंतु, 'द वेव्ह' मध्ये देखील हा असाच एक फसलेला प्रयोग आपल्याला दिसून येतो. हा चित्रपट घडतो जर्मनीमध्ये. एक प्राध्यापक, वर्गातील काही मुलांना हुकूमशाहीचे परिणाम दाखवून देत असता त्याचा वर्ग त्याच्या हुकुमाखाली कसा झुकू लागतो हे आपल्या डोळ्यांदेखत घडत जाते. काही चित्रपट आपल्याला फक्त घडलेली एखादी गोष्ट, हलत्या चित्रस्वरूपात दाखवतात. तर काही चित्रपट आपल्याला विचार करावयास भाग पाडतात. आपल्याला अवाक करून जातात. 'द वेव्ह' हा चित्रपट आपल्याला विचार करण्यास भाग पाडतो. चर्चा करण्यास प्रवृत्त करतो.
ह्यामध्ये दाखवलेला प्रयोग सुरु करण्याआधी, त्यातील मुख्य पात्र, प्राध्यापक, विद्यार्थ्यांना काही प्रश्र्न विचारतो. त्यावेळी त्यांनी दिलेली वेगवेगळी उत्तरे ऐकून आपण चकित होत जातो. पुढे एका आठवड्याभरात त्या गटाचे 'द वेव्ह' हे नाव ठरते, त्यांचे बोधचित्र तयार होते, व एक प्रकारचा मुजरा देखील तयार होतो. एकेक करून सर्व विद्यार्थी ह्या गटात सामील होतात. शहरभर बोधचिन्ह डकवले जाते. जीवावर उदार होऊन उंच उंच चढून भिंती रंगवल्या जाऊ लागतात. परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ लागते. मुले हिंसक बनू लागतात. एकमेकांचा जीव घेण्यास देखील पुढेमागे पहात नाहीत. हुकुमशाहीचा दुष्परिणाम मुलांना दाखवून देण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत असे म्हणता म्हणता हातात काही दिवस का होईना आलेली सत्ता प्राध्यापकाच्या रक्तात भिनू लागते.
चित्रपट ज्यावेळी संपतो त्यावेळी जे घडते, ते अशक्यप्राय वाटत नाही...शेवटी हेच घडणार होते असे वाटते.

अमेरिकेत घडलेल्या झिम्बार्डो ह्यांच्या अपयशी प्रयोगानंतर, मानसशास्त्रामधील घडवल्या जाणाऱ्या प्रयोगांवर काही बंधने, नियम घातले गेले. त्या प्रयोगामधील कैदी, तिथून बाहेर पडल्यावर नक्की काय मानसिकतेतून गेले असतील ? आपण मानसिकरीत्या किती दुबळे ठरलो ह्या धक्क्यातून बाहेर येणे त्यांना किती कठीण गेले असेल ? तीच परिस्थिती पहारेकऱ्यांची...समाजात जगत असता, आजवर अंगात बाणलेली सभ्यता इतक्या सहजासहजी आपण कशी काय विसरून गेलो, आपण काय आणि कसे इतके हिंसक वागलो...ह्या धक्क्यातून ते विद्यार्थी कसे बाहेर आले असतील ?
झिम्बार्डो म्हणतात, "खूप कमी माणसे तो तोल सांभाळू शकली, व दुर्दैवाने मी त्या थोर माणसांमध्ये नव्हतो."

'द वेव्ह' बघितल्यानंतर माझे मन त्या धक्क्यातून बाहेर पडल्यावर हादरलेल्या विद्यार्थ्यांकडे ओढ घेत होते. प्रयोगाच्या सुरवातीला, प्राध्यापक विद्यार्थ्यांना फक्त ताठ बसावयास सांगतो. खोल श्वास घ्यावयास सांगतो. आणि विद्यार्थ्यांना जाणवते की हे असे आपण केले की आपल्यालाच बरे वाटते. बस...तिथूनच हळूहळू प्राध्यापक आपला पगडा त्यांच्यावर जमवू लागतो. शिस्त शिकवतो. काही दिवस का होईना, परंतु, एकजूट ही आपली शक्ती आहे, हे अनुभवांतून त्या मुलांना पटल्यानंतर, ज्यावेळी हे सर्व चुकलेले गणित होते, आपण भलतेच काही करावयास लागलो होतो...'सत्ता हातात आल्यावर आपण त्याचा दुरुपयोग करू पहात होतो...ह्याची जाणीव भयानक नसेल का ठरली ? म्हणजेच आपल्यातही एक हिटलर आहे हे मान्य करण्यासारखेच हे नव्हे काय ? आणि आपल्या मित्रपरिवारासमोर आपण केलेल्या भयानक चुकीची उघड उघड मान्यता. मग ही मुले ह्या धक्क्यातून कशी सावरतील...? आता त्यांना बरोबर मार्ग दाखवणारा, शिस्त ही कुठल्या मर्यादेपर्यंत योग्य हे समजावून सांगणारा वेड्या वयात कोणी भेटेल काय...?

मी फ्लीपकार्टच्या साईटवर गेले व मानसशास्त्रज्ञ फिलीप झिम्बार्डो यांचे 'The Lucifer effect' हे पुस्तक मागवले.

...माझे बाबा मानसशास्त्राचे गाढे अभ्यासक होते ह्याचा अर्थ ह्या कुटील विषयावर बोलण्याचा मला अधिकार प्राप्त झाला असे नव्हे. जसे पुढाऱ्याचा मुलगा पुढारी..तसे काही हे नव्हे. परंतु, मला हा विषय आवडतो, त्यावर वाचावयास आवडते. माणसाचे बोलणे, वागणे हे त्याने त्याच्या आजवरच्या आयुष्यात घेतलेल्या अनुभवांवर बेतलेले असते असे मला वाटते. अगदी लहान होते, त्यावेळी बाबांची मित्रमंडळी घरी येत. तासनतास मोठमोठ्या गंभीर विषयांवर त्यांच्या चर्चा चालीत. मी फक्त बाबांच्या मांडीवर तिथेच बसून राही. आणि मग कधीतरी त्यांच्या कुशीत शिरून झोपून जाई. म्हणजे बाबांच्या कुशीत बसून जे काही अर्धवट ज्ञान कानात शिरले असेल त्याचा हा परिणाम झाला काय...असे आता उगीच वाटते. म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे वगैरे नव्हे...पण आवड निर्माण झाली हे मात्र खरेच.

'स्नो'...आणि त्यानंतर 'द वेव्ह'.
एक पुस्तक. एक चित्रपट.
पुस्तक अजून वाचून संपलेले नाही. परंतु, जितके वाचून झाले आहे त्यात व चित्रपटात, काही एक समान धागा जाणवतो आहे.
आत्ता ढोबळ वाटू शकेल, परंतु काही साम्य आहे हे खरेच.
कैदी...पहारेकरी.
विद्यार्थी...प्राध्यापक.
आस्तिक...नास्तिक.
सामर्थ्य...सामर्थ्यहीन.

मध्येच अजून एक पुस्तक हातात आलं.
तस्लीमा नसरीन यांचे 'फेरा'.
बंगालची फाळणी.
धर्म...सत्ता...मी...माझे.
सत्ता...हिंसा.
माणसात दडलेला पशू.

'फेरा' विषयी पुढील भागात.