नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 3 October 2011

धडाड !

"कसं होणार यार आपण मेलो तर ?"
"कोणाचं कसं होणार ?"
"अरे, म्हणजे मी मेलो तर माझ्या मुलीचं कसं होणार ?"
"काsssही होत नाही...सगळं व्यवस्थित होतं...तुम्ही तिची काही आर्थिक गडबड नाही करून ठेवलीत तर सरकेल तिची गाडी पुढे...!"
शांतता....काही क्षण.
"असं म्हणतेस ?"
"मग काय तर...? तेव्हढी काळजी घ्या...बाकी चालून जाईल !"

जोशी, थोडा वेळ उभे राहिले माझ्या टेबलापाशी...खिडकीबाहेर बघत. मग हसले बापडे..."खरं आहे"...असं पुटपुटत वळून लागले चालू. त्यांच्या जागेच्या दिशेने. माझ्याकडे पाठ फिरवून.

रोज सकाळी जोशी लवकरच येतात. बुटके. गोरे. गुटगुटीतच म्हणायचे. नाकावर चष्मा. वय असावे ४७/४८. डोक्यावरचं रान आता हळूहळू विरळ होत चाललं आहे. जमीन उघडी पडू लागली आहे. ठाण्याहून दुचाकी घेऊन येताना तापली उन्हं आता त्रास देऊ लागतील. अर्थात डोक्यावर शिरस्त्राण नाही घातलं तर.
कचेरीतील इतर जागा भरण्याच्या खूप आधी हे येतात. जरा तोंडावर पाणी मारून खुर्चीत स्थानापन्न होतात. आणि मग पुढचा अर्धा तास खास त्यांचा. कोण जाणे कोणाशी...पण रोज नियमित शेयर मार्केटविषयी त्यांची चर्चा सुरु होते. कधी रंगते. कधी विस्कटते. भाव...चढला...भाव...घसरला...घसरगुंडीवर आमचे जोशी अर्धा तास खेळत रहातात. बौद्धिक व्यायाम म्हणायचा का ?
मग थोड्याच वेळात हळूहळू रिकाम्या खुर्च्या भरू लागतात. जोशी रंगलेला खेळ आटोपता घेतात. व समोरील मॅकवर नजर आपटवतात.

हलतडुलत, विजार वर खेचत खुर्चीकडे जाणाऱ्या जोशींच्या पाठीकडे मी बघितले आणि वाटले...कसले कठोर झालोय आपण ! जरा बोलले असते गोडगोड तर नसतं का चाललं ?
म्हणजे...
"अहो, कशाला असं अशुभ बोलताय ? सकाळी सकाळी ? काsssही होणार नाही बघा तुम्हांला ! रग्गड जगाल तुम्ही ! अजून चांगले शंभ्भर वर्ष ! नातवंड...पतवंड खेळवाल मस्त ! !"
मग तेही गेले असते खुशीत जागेवर...दिवसाची सुरुवात छानच झाली अशी मनाची समजूत घातली असती व त्यांनी त्यांचा दिवस पुढे ढकलला असता. नाकावर चष्मा पेलवत.
पण नाही ना ! काही दयामाया नाही !
उगाच....धाडकन सत्य सांगायचं...म्हणजे सांगायचं नाही...खरं तर फेकायचं...सत्य म्हणजे जसा एक तापता तोफगोळा... एकदम म्हणजे टाकायचाच अंगावर !

तोफगोळ्यांचं कोठार अगदी उघडंच पडलंय ! माझ्या डोक्यात !
:)

17 comments:

Gouri said...

मी पण कित्येक वेळा असे बॉम्ब टाकत असते ... पण किती ठरवलं नको तिथे सत्य सांगायचं नाही, तरी ते सुटून जातंच नकळत! पण उगाच खोटं खोटं सांगण्यापेक्षा बरं ना ग हे? :)

हेरंब said...

जोशीबुवांची काही चूक नाही ग.. मार्केट बघत्येस ना किती पडतंय ते? बिचारे टेन्शनमधे असतील ;)

सौरभ said...

हाहाहाहाहाहा!!!! कायहो!! 40 चपात्या संपल्या का??? दिड तास जेवण!!! चपात्या होत्या की चिंगम!!! (अरे.. असा काय हा!! चांगलं बोल काहीतरी) नाय नाय... आपण असेच बझुका घेऊन फिरायचं.. शाब्बास... आता तर तुम्हीपण तोफ काढलीये... उडवून टाकायचं एकेकाला...

अपर्णा said...

तोफगोळ्यांचं कोठार अगदी उघडंच पडलंय ! माझ्या डोक्यात !
:)

तृप्ती said...

साखरेत घोळवून बोलायला मला पण जमत नाही. निष्कारण मनं दुखावली जातात अशाने :(

Raindrop said...

me zaata hoil kaay kaay....jag pal bhar mhanatil haay haay....eternal truth! sooner people accept...better it is. ekadha tof gola lagatoch to bring this into people's senses :)

Shriraj said...

:D बाप रे! बरंय मी लांब आहे तुझ्यापासून... नाहीतर मीसुद्धा जखमी झालो असतो सत्याच्या स्फोटाने :P

सुप्रिया.... said...

'मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तोही, पुढे जात आहे.'
मृत्यु इतक कठोर सत्य नाहीच ना ग कुठलं.....

Anagha said...

मला पण असंच वाटतं गं गौरी....फक्त हल्ली शब्द पण तसेच चालवते मी. म्हणून मला त्या दिवशी ऑफिसमध्ये एक मुलगी म्हणालीच..."लगेच तलवार नका काढू !" :)

Anagha said...

हेरंबा, :)

Anagha said...

हे हे ! सौरभा ! बझुsssका ! :D

Anagha said...

अपर्णा... :)

Anagha said...

अगं तृप्ती...रोज उठून गोड गोड बोलणे म्हणजे कठीणच गं ! त्यापेक्षा खरं खरं बोलणं बरं ! त्यात आता मनं दुखावली जातात त्यात आपला नाईलाजच आहे ! नाही का ?
कसला सल्ला देतेय मी ! फटके मारतील ना मला तुझ्या आजूबाजूची लोकं ?! :p

Anagha said...

हो गं वंदू, जाग येण्यासाठी एखादा टोफागोला तरी लागतोच ! :)

Anagha said...

सत्याचा स्फोट ?! श्रीराज ! आणि काय रे ? घाबरतोयस का त्या स्फोटाला ?? सांग सांग ?
;) :D

Anagha said...

खरं आहे सुप्रिया...त्याहून दुसरे काय सत्य ?
ह्याची जाणीव ठेवलेली बरी...
आभार गं...

आनंद पत्रे said...

ते त्यांनाही माहिती होतंच.. पण आपली गरज कुणालाही नाहीये ही भावना खूप त्रासदायी असेल ...