नमस्कार

नमस्कार

Pages

Friday 2 September 2011

जय...पराजय

तो किनारा होता.
अथांग पसरलेल्या समुद्राचा किनारा.
अथांग...थांग नसलेला. तळ नसलेला.
यासम समुद्राचा किनारा होणे महाकठीण.
समुद्र...कधी भरकटलेला. समुद्र...कधी थकलेला. खोल गाभ्याशी त्याने लोळत पडावं. कूस वळवावी. वर एक लाट उसळावी. त्याला मन:शांती नाही. तळमळ तळमळ. किनाऱ्यावर लाटांचे थैमान. लाटा कधी हलकेच येत. किनाऱ्याला हळुवट स्पर्शत. किनारा शहारे. लाटेला कवटाळे. शांत करे. पुन्हां माघारी धाडून देई. जसे त्या लाटेचे, किनारा माघारपण करी. मायेने, ममतेने. पुन्हा सिद्ध राही. पुढल्या लाटेसाठी. लाट. तरुण. मदमस्त. समुद्राने दूर सारलेली. किनाऱ्याच्या कुशीत काही क्षण विसावलेली. लटका रुसवा घेऊन. लाटा किनाऱ्याकडे झेपावत राहिल्या. मन:शांतीसाठी...काही क्षणांच्या सोबतीसाठी.

समुद्र आणि किनारा.
गहिरे त्यांचे नाते.
समुद्र मौजा. किनारा योगी.
त्यांचा संवाद...कधी अभंग...कधी लावणी.
समुद्राच्या त्या लाटा...कधी मायेने तर क्वचित कधी हिंसेने...किनाऱ्याला ओरबाडी. ते उमटलेले ओरखडे...किनारा हसत झेली...क्षणात निपटून टाकी.

परंतु, प्रत्येक गोष्टीला शेवट असतो.
चांगले कोणाला बघवते ?
किनाऱ्यापाशी कोणी दगड लावले. एकावर एक चढवले. अगणित....दूरदूर. दगडांचे एक भिंताडच उभे राहिले.
बेभान समुद्र...त्याच्यासाठीच पसरलेला खंबीर किनारा व आज त्यापुढे ही सैतान भिंत.
त्रांगडं.
मग आता काय उरले ? योगी किनारा खचला. तसे बघता, जन्म होताच मरण अटळ. किनारा संपून गेला...दिसेनासा झाला. एकही अश्रू न ढाळता. मूक तो किनारा. युगानयुगे दोघांनी एक प्रौढ नाते जपले होते. आज जन्मलेली, व तरीही माजलेली भिंत अशी उभी राहिली. डोळे वटारून बघू लागली. विनाश आता अटळ होता. कोणी चांगदेव येणार नव्हता.

काय तळाशी भोगविश्वात गढलेला समुद्र जागा झाला ? काय त्याला कळले ? कोणी त्याला सांगितले ? त्याचा सखा मृत्यू पावला. कोणी ही दुवार्ता त्याच्या कानी घातली ? दुसरे कोण ? अशीच एक नाजूक लाट. झेपावली होती योगी किनाऱ्याकडे. आणि तिच्या हाती काय लागिले ? एक दोन रिकामे शिंपले.
ती पुन्हा माघारी धावली. जशी वेगात आली त्याच वेगात परतली.
"समुद्रा....त्याचा अंत झाला. तो कुठे दिसेना. तो अंतर्धान पावला."
सागर क्रोधला. माझा किनारा संपला ? असे कसे झाले ? तिथे आता कोण आले ?
भिंताड ? तिची ही मजाल ?

मग आता काय होणार ? ह्या सत्यकथेचा शेवट काय ?
लाटा आता कोणाकडे झेपावणार ? कोण त्यांना बाहू पसरून आलिंगन देणार ?
काय समुद्र हार मानणार ?
समुद्र निसर्गाचे रूप. कधी सौम्य. कधी उन्मादलेले.
आता उत्पात होईल.
आता प्रलय येईल.
उन्मत्त समुद्र. मदमस्त त्याच्या लाटा.
त्यांचा समुदाय उसळेल. उंच उंच झेप घेईल. रौद्र समुद्राचे ते सैन्य. आकाशातून पृथ्वीवर झेपावे.
हाहा:कार उडेल.
त्या मूर्ख भिंतीची काय कथा ? भिंताड ती. उद्ध्वस्त होईल.
किनारा नकळत हरवला. अहिंसेने अंतर्धान पावला. परंतु, तेव्हढे भान आता समुद्राला नाही. सूडाला भानच नसते. सूड फक्त हिंसा जाणते. रक्ताची चव ओळखते. किनारा त्याचा सखा होता. तोच नाहीसा झाला. आता त्याचे गूज कोण ऐकिल ? काय ती भिंताड ? छे ! तिची कुठली इतकी बुद्धी.
समुद्र तिला उद्ध्वस्त करेल...क्षणार्धात. होत्याचे नव्हते.
समुद्र थैमान. असंख्य हस्त...असंख्य जिव्हा...
भक्षाच्या शोधात. सूड इतकेच जाणतो...

जसे समुद्राने ठरवले तसेच एक दिवस घडले. त्या काळरात्री, त्याच्या तळाशी आकांत झाला. आता कसली निद्रा ? आता कसली विश्रांती ? भडकलेले माथे. सैन्याला त्याने ललकारी दिली. आवेशपूर्ण, भावपूर्ण संवाद साधला. हजारो, लाखो सैनिक गोळा झाले. योगी किनाऱ्याची त्यांनी आठवण काढली. एक क्षण शांतता पाळली.
...ती वादळापूर्वीची शांतता होती.
समग्र क्षूद्र मानवजात...संपायला कितीसा वेळ ?
सैन्य उसळले...सैन्य भिडले.
सगळे होत्याचे नव्हते झाले.

दूरदूर, साक्षीला चंद्र होता.
भीषण घटनेचा फक्त तोच एक साक्षीदार होता.
...दुरून काय दिसत होते ?
मानवजातीचे भग्न अवशेष. कुठे एखादे फळकुटे...कुठे कधीतरी, गगनाला भिडलेल्या एखाद्या इमारतीचा तुटका कठडा.
माणूस ? छे ! त्याला लाटेचा एक फटकारा पुरेसा. गणती नव्हती. असंख्य अगणित प्रेते, दिमाखात डोक्यावर घेऊन बेभान समुद्र नाचत होता. तीच त्याची विजय पताका होती. आकाशपाताळ एक करणारे ते आसुरी हास्य...त्याचे रौद्र रूप...विजयी थैमान घालणाऱ्या त्याच्या त्या लाटा.

त्या काळरात्री, चंद्र न्यायाच्याच बाजूने होता...तरीही...तरीही तो सर्वसाक्षी, एकटाच अश्रू ढाळत होता. अश्रू, खारे अश्रू...ते झेलून, समुद्र अधिकच पिसाटत होता.

सूड समुद्राचा.
किनाऱ्याच्या हत्येचा तो विधिलिखित सूड.

23 comments:

Volante said...

every wave travels miles to come and kiss the kinara....poor bhint n the people who built it had to bear the brunt of it :(:(

rajiv said...

वा : ! अनघा ... वा :!! समुद्र ..लाटा ...व किनारा यांचे एक वेगळेच नाते समोर आणलेस !!
....जसे त्या लाटेचे, किनारा माघारपण करी. मायेने, ममतेने. ...
समुद्र मौजा. किनारा योगी.....

निसर्गाचे एक सर्वशक्तिमान असे व त्याचवेळेस चंद्राचे हळवे असे ...
हि दोन्ही रूपे अनोख्या शब्दांत मांडून एक अप्रतिम शब्दचित्र उभे राहिलेय !!

खूपच सुंदर !!

BinaryBandya™ said...

समुद्र अन किनारा यांच्या नात्यातून छान विचार मांडलेत..
भिंती घालणारे आपण स्वार्थासाठी किती निसर्गाची हानी करतो ना.

मुंबईचे कसे होणार , तिथे तर किती भिंती घातल्यात लोकांनी. किनारा तर सोडाच समुद्रच गिळंकृत करायचा प्रयत्न ..

मस्त लिहलंय ..

Raindrop said...

what a day to write this post ya...coincides perfectly with what I am feeling right now....apan aplya hopes, expectations, enthusiasm chya samudra la bhint war bhint bandhat zato karan aplyala sangitla zata.....samudra pasun door raha, u will drown....ek diwas hi bhint khoop bhari padnaar aahe :(:(

Anagha said...

राजीव, खूप खूप आभार ! मी लिहायला घेतलं...आणि २/३ वेळा लिहिल्यावर चवथ्यांदा हे असं चित्र तयार झालं... :)

Anagha said...

बंड्या, अरे दादरचा समुद्रकिनारा कुठे गायबच झालाय ! कधीतरी आम्हीं मस्त चालत चालत दूरवर जात असू...कुठे गेला तो आमचा किनारा...कोण जाणे ! :'(

भानस said...

आपला किर्ती कॉलेजच्या गल्लीतून दिसणारा किनारा अगदी आत्ता आत्ता पर्यंत होता गं... या अश्या भिंती उभारून उभारून समुद्राला आत लोटायला पाहतात आणि मग तो दर पावसाळ्यात मिळेल तिथून घुसतो... :(:(

समु्द्र.. किनारा.. लाटा.. चंद्र... यांची भावपूर्ण गुंफण! सुंदर!

Anagha said...

किर्ती कॉलेजच्या गल्लीला आहे किनारा...पण चैत्यभूमीपुढे चालत चालत जायचं म्हणशील तर भरतीच्या वेळी एक नाव घेऊन वल्हवत जावं लागेल आपल्याला ! वैताग आहे गं हा ! :(

भाग्यश्री, ही मला पोस्ट लिहिताना मला काही वेगळंच वाटलं गं...एखादं जलरंगातील चित्र... :)

हेरंब said...

वरच्या सगळ्या कमेंट्सकर्त्यांशी पूर्णतः सहमत.. समुद्र, लाटा, किनारा यांची एकदम मस्त सांगड घातली आहेस... :))

आणि प्रतिक्रिया द्यायला उशीर झाल्याबद्दल स्वारी..

सुप्रिया.... said...

वाचताना दादरचा समुद्रकिनारा डोळ्यासमोर आला गं .....तिथे किनारा उरलाच नाहिये ना आता???

पोस्ट खुप सही.... :)

Anagha said...

सुप्रिया, आहे आहे....थोडा आहे...थोडा हरवलाय ! :(
आभार गं प्रतिक्रियेबद्दल. :)

Anagha said...

:) हेरंबा, गणपती हेच कारण असणार असे वाटले होतेच.

sanket said...

अप्रतिम ! अप्रतिम !! अप्रतिम !!!
कसलं सुंदर लिहलंय ! सागर-किनारा-लाटा यांचे नाते, वेगळ्या आणि सुंदर शब्दांत मांडलंय..
ललित न होता छोटीशी कथाच तयार झाली , नाही का ? काय म्हणतात बरे ह्याला ? रुपककथा, नाही का?
अप्रतिम !
किनारा गेला, खारफ़ुटीची बने गेली, माणूसही जाईल असाच...

Anagha said...

वंदू,
आयुष्य म्हणजेच तर...आकांक्षांच्या लाटा...आणि त्यांना घालाव्या लागणाऱ्या भिंती.
:(

Anagha said...

संकेत, लिहायला सुरु केलं तेव्हा काही कळलं नव्हतं....फायनल प्रॉडक्ट नक्की काय तयार होतंय ते ! :p

तुझी अगदी मनापासूनची दाद मात्र मला बळ देऊन गेली. :)

माणूस एकूणच विनाश बरोबर घेऊन जन्माला आलेला आहे...

सौरभ said...

ग्रेटच बरं का!!! खासच एकदम!! एका दुसऱ्या ऍन्गलने असंपण म्हणता येईल की किनाऱ्याचं रुप बदललं. समुद्रात दगड टाकून समुद्र थोपोवतायत... तिकडे किनाऱ्याची काय गाथा..

Anagha said...

सौरभ, म्हणजे एकूण नाशच....आणि शेवटी आपला नाश !

Prof. Narendra Vichare said...

अनघा, आपल्या इच्छा आकांक्षा याना आपल्या मनाविरुद्ध कोणी अडवू पाहातो तेंव्हा त्या अतिक्रमणाची आपल्याला जी भयंकर चीड येते, ती तुझ्या या शब्दा शब्दात सामावलेली मला भासली. पण त्याच वेळी तुझा मेंदू किती भन्नाट वेगात मांसाहारी विचार तुझ्या मनात साठवतोय याची मला थोडीशी भीती वाटते... :-)

Anagha said...

:) मांसाहारी...सर ? ह्म्म्म...फार झालाय वाटतं मांसाहार ? :)

आनंद पत्रे said...

खूप खूप सुंदर लिहिलंय.. जाम आवडेश!!

Shriraj said...

अनघा, अप्रतिम... अशा नजरेने मी कधीच बघितलं नव्हतं समुद्राला, त्याच्या लाटांना, किनाऱ्याला...

Anagha said...

आनंद, आभार ! :)

Anagha said...

श्रीराज, लिहायला सुरुवात केली आणि असं पुढेपुढे जात राहिलं....लाट जणू !
:)