नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 30 July 2011

Product development...

ते शाळेतले दिवस होते.
वर्गातील प्रत्येक विद्यार्थी हा शाळेसाठी एक 'प्रॉडक्ट'. शाळा हा एक मोठा 'ब्रँड'. शाळेचे 'प्रॉडक्ट डेव्हलपिंग' चालू होते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा, कार्यक्रम रचले जात होते. कोण कशात चमकेल, कोणाचा कुठला 'यु.एस.पी.' (unique selling point) म्हणजेच विशिष्ट गुण झळाळून दिसू लागेल काही सांगता येत नव्हते. कारण हे सर्व प्रॉडक्ट्स देखील अतिशय कोवळे, अजाणच होते. नाही का ? स्वत:च्या गुणांची त्यांना काय जाण ? प्रॉडक्ट, बाजारामध्ये उतरवायला तर अजून बराच कालावधी होता. एखादे प्रॉडक्ट कुठे कुठल्या स्पर्धेत झळाळले तर शेवटी 'शाळा' ह्या ब्रँडचेच नाव मोठे होणार. त्यातून अधिकाधिक विद्यार्थी शाळेला मिळणार. म्हणजेच मोठे चित्र बघण्यासाठी अगदी छोट्यात छोट्या गोष्टीवर लक्ष देणे महत्त्वाचे. समजा, शाळा म्हणजे 'हिंदुस्तान लिव्हर' व मुले म्हणजे कोणी लक्स, कोणी सनसिल्क तर कोणी रिन.
हे सर्व आता कळतं. आपलं स्वत:चं एक 'प्रॉडक्ट' जन्माला घातल्यावर व 'डेव्हलप' करावयास घेतल्यावर.

शनिवारी, शाळा सकाळी लवकर सुरु होई व दहा वाजेपर्यंत संपून देखील जाई. आमच्या शाळेत २ तास सांस्कृतिक कार्यक्रमाचे असत. दर शनिवारी. मग आमचे वर्गशिक्षक वा शिक्षिका जे काही ठरवत ते आम्हीं करत असू. त्यात एकदा शाळेसमोरील रस्ता देखील झाडून काढला होता आम्हीं. किती मजा आली होती ते करताना. मला वाटतं घरून झाडू घेऊन आलो होतो आम्हीं सर्व. रस्ता चकचकीत झाला...आमच्या मनात अभिमान झळाळला...काही मिनिटांतच. एका दगडात दोन पक्षी. अतिशय सोप्प्या रीतीने.

"आता पुढले काही शनिवार तुमच्यातील प्रत्येकजण इथे वर्गासमोर येऊन काही करून दाखवणार आहे. गाणे, निबंध वाचन, नृत्य...काहीही. पण नियम असा आहे की प्रत्येकाने काहीनाकाही तरी केलेच पाहिजे." मला वाटतं डेरे बाई होत्या तेव्हा. गोऱ्या, सुंदर दिसणाऱ्या.
धस्स. धस्स झालं माझ्या मनात ! आली का पंचाईत ? आजपर्यंत मी आले कधी आणि गेले कधी हे वर्गात कोणाला कळण्याची सूतराम शक्यता नव्हती. चमकणारी मुले व मुली वेगळेच. ते सर्व नियमितरीत्या दहाच्या आत क्रमांक मिळवत. त्यांची नावे वारंवार शिक्षकांच्या मुखी ऐकू येत. जसे डोळे दिपवणारे यश मिळवले नाही तसेच कधीही वाईटही काही केले नाही. त्यामुळे माझी कोणी दखल घेण्याची शक्यता शून्य.

आडनाव 'पाटील' असल्यामुळे माझा क्रमांक नेहेमीच पाचाच्या घरात असे. ५२, ५३ वा ५४. म्हणजे बरेच शनिवार मिळणार होते इतरांचे कौशल्य बघावयास. आता मी काय करू ह्या माझ्या प्रश्र्नाला २ शनिवार काही उत्तरच सापडेना. सुजाताने 'केशवा माधवा' गायले. मिलिंदने बोंगो वाजवला. टाळ्यांचा आवाज चढता असे. सगळ्यांच्या कौतुकाच्या नजरा झेलत एकेक मुलंमुली जागेवर जाऊन बसत होते. काहीजण भाषण देखील करत होते...स्वत: विषय निवडून त्यावर स्वत: लिखाण वगैरे करून. "बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हांला...वगैरे वगैरे. ह्यातून काही सुटका नव्हती. एक ओझे झाले डोक्यावर. झोप लागेना. काहीच सुचेना. अंगात कुठलीही कला सापडेना. जी सर्वांसमोर पाच मिनिटांत करून दाखवता येईल. व मलाही वाहवा मिळवता येईल. बाईंची कौतुकाची नजर माझ्यावरही पडेल. खूप विचार केला. शेवटी बसून एकटीनेच तोडगा काढला. सोप्पं आहे. विनोद. विनोद सांगूया आपण. छोटुसाच असेल व सर्वजण हसू लागतील. बाईंना पण मजा येईल. उगाच कोणी गांभीर्याने घेणार नाही. मग शोधाशोध केली. सरदारजीचा एक विनोद हाती लागला. मोजून पाच वाक्यांचा. त्यावेळी तरी बऱ्यापैकी विनोदी वाटला. रात्रंदिवस बसून विनोद पाठ केला. घोकला. कविता घोकावी तसा. हिरवे हिरवे गार गालिचे, हरिततृणांच्या मखमालीचे....त्या सुंदर मखमालीवरती...एक होता सरदारजी...तो त्याच्या मित्राला म्हणाला की...बारीकसा सावळा चेहेरा. नाकावर घसरता जाडा चष्मा. खांद्यावर लांब वेण्या. कपाळावर लाल बारीकसं कुंकू. अ, क, घ, न...आडनावांची यादी पुढे सरकत होती. तसे बरेच दिवस मिळाले. विनोद पाठ करावयास. घरात उभं राहून.

तो आठवडा फारच लवकर संपला. म्हणजे आदल्या शनिवारी चाळीसपर्यंत आकडे झाले. चाळीस नंतर दहा बारा मुलंमुली गेल्यावर माझा क्रमांक येणार. बाई, माझे नाव पुकारणार. शनिवार उजाडला. डोळे उघडल्यापासून विनोद लिहिलेलं ते छोटं चिटोरं हातात पकडून ठेवलं होतं. शाळेची बस धावत धावत पकडली. कोपऱ्यात जाऊन बसले. घोकंपट्टी चालू. कागद आत्तापर्यंत अगदी चुरगळून गेला होता. वर्गात गेले. जागेवर बसले. कागद हातात घट्ट. बसल्या जागेवर चुळबूळ. मधूनच कागद उघडावा, विनोदावर नजर टाकावी, डोळे मिटावे...एक होता सरदारजी...तास सुरु झाला. एकेकजण पुढे आले. आपापल्या कला दाखवू लागले. टाळ्या वाजू लागल्या.
"अनघा पाटील" बाई उद्गारल्या.
मी उठले. चिटोरं मुठीत पकडून वर्गासमोर गेले. आजपर्यंत कधीही मी अशी ढळढळीत सर्वांसमोर उभी राहिले नव्हते. तिथे उभं राहिलं की वर्ग फार म्हणजे फारच भयंकर दिसतो. समोरची चुन्याची पांढरी भिंत. त्यावरील सुविचार. पाठीशी भिंत असली की नेहेमी तर आधार वाटतो पण तीच अशी पसरट समोर आली की आता पुढे सरकणार आपल्याला चिरडून टाकणार असेच काहीसे वाटते. वर्गात सत्तरच्या आसपास मुले बसलेली व बाजूला खुर्चीत बाई बसलेल्या. आपण एकटेच उभे. सर्व शांत. अगदी टाचणी पडली तर आवाज ऐकू येईल इतकी शांतता. पण माझं हृदय कधी पडलं कोण जाणे. सरदारजी मित्राला काय म्हणाला...मग त्यावर मित्र काय म्हणाला...त्यावर सरदारजी काही विनोदी बोलला...आणि एक विनोद तयार झाला. पण नाही. अश्रू तयार झाले. समोर चष्मा. डोळ्यांत पाणी. चष्म्यावर वाफ. समोरचे सगळे अदृश्य. घशात हुंदका. रडू फुटले. बाईंनी जागेवर पाठवून दिले. जागेवर बसले. ठरवलं. पुन्हां कधीही मी सर्वांसमोर एकटी उभी रहाणार नाही. ते खूप भयंकर असतं. खूप भीती वाटते. काहीच बोलता येत नाही. मग सगळे आपल्याला हसतात. आपणच एक विनोद बनून जातो. सगळ्यांसाठी.

आता कधी कोणी वर्गातील भेटलं आणि त्यांना मी विचारलं...रूपा, आठवतं तुला...असं असं झालं होतं...हेमंत, तुला आठवतं का रे...तर नाही आठवणार कोणाला....कारण कोणी लक्षात ठेवावं...असं मी काहीच केलं नव्हतं...
माझ्या आत्मविश्वासाच्या चिंधड्या झाल्या होत्या.
एक 'प्रॉडक्ट' पहिल्याच पायरीवर 'फेल' गेलं होतं.

झाली ह्या घटनेला काही दशके...

क्रमश:

15 comments:

आनंद पत्रे said...

तेंव्हात आणि आता मध्ये जमीन-अस्मान चा फरक असेल नाही?

अगदी कॉलेजपर्यंत मला स्टेज फिअर कायम होतं ...

Raindrop said...

mala asa watatay ke he 'kramasha' kuthe chalala aahe mala ek andaaz yet aahe....mhanun my comments aRE reserved for the last bhaag :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

एक 'प्रॉडक्ट' पहिल्याच पायरीवर 'फेल' गेलं होतं.
मला ते तत्त्व आठवले, अपयश हे...
पुढे जे काही घडलंय ते दिसतंच आहे आम्हाला !

Shriraj said...

ताईसाहेब, पुढे काय जाहले? :)

हेरंब said...

वेडीच आहेस. त्या शनिवार आजारी नाही का पडायचंस? ;) :P

भानस said...

बयो, यशाचा पाया होता की तो. :) आता लिहीतानाही डोळ्यातून पाणी काढलसं की काय... वेडी कुठली !

Anagha said...

त्या त्या वयात त्या त्या काळज्या येतात. आजूबाजूची परिस्थिती थोडीफार बदलली असली तरीही. आणि ह्या अश्या परीक्षेतूनच तर व्यक्तिमत्व घडत जाते. नाही का आनंद ?
धन्यवाद रे. :)

Anagha said...

वंदू...नकळत मनात काही समज गैरसमज करत जातो आपण स्वत:बद्दल. ते कधी दूर होतात तर कधी रहातात चिकटून घोरपडीसारखे. :)
अश्याच माझ्या काही समज गैरसमजांची ही गोष्ट. :)

Anagha said...

ह्म्म्म. पंकज, खरंय...धडपडत चढलेला जिना आणि सुर्रकन छताला पोचलेली लिफ्ट...सांग बरं गंमत कशात आहे ? :)
धन्यवाद रे प्रतिक्रियेबद्दल. :)

Anagha said...

श्रीराज, अरे मला खरं तर वाटलं नव्हतं की इतके भाग पाडावे लागतील...पण झाले खरे. :)
प्रयत्न चालू आहे पटापट लिहायचा. धन्यवाद. :)

Anagha said...

हेरंबा, पळपुटेपणा करायचा का रे ?? मग धडा अर्धाच गिरवला गेला असता ना ! :D

Anagha said...

भाग्यश्री, अगं खरंच गं, अजून आठवतं ते रडू रडू झालेलं ! :)
पाया घातला जातोय हे तेव्हा जाम कळत नाही ना ! म्हणून तर ! :)

विनायक पंडित said...

almost same here Anagha! आज वाचायला घेतलंय.आता लगेच दुसर्‍या भागात जातो.:)

Anagha said...

:) आभार विनायक.

सौरभ said...

lol lol lol... :))