नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday 30 March 2011

माझे घर...गुराखी कोण?

तशी गोष्ट जुनीच आहे.
दुचाकी वाहनावर डाव्या हाताने पुढे पुढे करत होते त्यावेळची.
दुसऱ्या दिवशी कसलासा सण होता. पिवळ्याधमक झेंडूच्या चिंचपेटीने प्रवेशद्वाराला नाही नटवलं तर तो सण कसला. म्हणून दादर स्थानकाच्या फुलबाजाराच्या दिशेने निघाले होते. कबुतरखान्यावरून सरळ गेलं की स्थानक आलंच. तिथे बाजूला दुचाकी लावावी आणि त्या फुलांच्या सुवासिक दुनियेत शिरावं असा विचार. गल्लीच्या तोंडाशी पोचले तर दिसत होतं...गल्ली सोन्याने मढली होती...झंडूच झंडू. दुचाकी म्हणजे काही चार चाकी नव्हे. त्यात काय डावी उजवी करत पोचेन मी दुकानापर्यंत.

"ए बाई! कुठे निघालीस?"
गल्लीच्या तोंडाशीच एक गुटगुटीत प्रश्र्न उभा होता. बाई रस्त्यावर तोरण विकत घेत होत्या. चष्मा नाकावर थोडा खाली घसरलेला, वय अदमासे ४५. मध्यमवर्गीय. माझ्यासारख्याच.
"मला पण तोरण घ्यायचंय!"
"मग घे की! पण ती स्कूटर हाकत कुठे निघालीस?"
"ही गल्ली काही 'नो एन्ट्री' ची नव्हे!"
"तर तर? मग काय झालं? गर्दी दिसत नाही का?"
"पण मला वाटतंय की ही गर्दी उगाच रस्त्यावर ह्या उभ्या असलेल्या फेरीवाल्यांमुळे झालेली आहे!"
फेरीवाले हा शब्द ऐकून बरेच कान टवकारलेले जाणवले. म्हणजे कधी राणीच्या बागेत गेलात तर दिसत नाही का, आपली चाहूल लागून तेथील प्राणी कसे कान टवकारून आपली दखल घेतात...तसंच काहीसं. फक्त इथले प्राणी मोकाट होते...कधीही हिंस्त्र होऊ शकणारे.
"बाईसाहेब, पण तुम्हांला असं नाही का वाटत की थोडंच पुढे गेलात तर आहेत ना छानपैकी दुकाने थाटलेली. का रस्त्यावरून घेताय फुलं? त्यात त्या दुकानवाल्यांचं देखील नुकसानच नाही का? आणि तुमच्यामुळेच तर रस्त्यावर नाहक गर्दी होत नाहीये का?"
"लागली शहाणपण शिकवायला!"
"एsss बाई! चल निघ इथून!" फेरीवाले आणि त्यांची एकजूट. ग्राहकांची एक नागरिक म्हणून एकजूट? शून्य.
स्वत:ला व रस्त्यावरील पादचाऱ्यांना सांभाळत दुचाकी गल्लीत घातली. शांतपणे. टोकाला जाऊन दुकानातून मस्त टवटवीत तोरण घेतलं आणि परतले.

दोन एक वर्षांपूर्वी. एमबीए झालेली एक मैत्रीण. विषय मुंबईतील फेरीवाल्यांचा. सुळसुळाट व त्यांच्यामुळे होणारा त्रास.
"आपणच नाही घेतलं पाहिजे गं त्यांच्याकडून सामान! आपल्याला सगळ्याचीच घाई. आपला वेळ वाचवायला आपण त्यांच्याकडून माल घेतो. आणि त्याचाच ते फायदा घेतात. आणि म्हणून तर आता त्यांची संख्या इतकी प्रचंड वाढलेली आहे."
माझं घोडं...मी दामटवलं.
"अरे! वेळ कोणाला आहे गं! पटकन सामान मिळून जातं! ही दुकानं किती दूर असतात!"
"एक भाजीवाला आमच्या घरी भाजी घेऊन येतो! आम्ही घेतो त्याच्याकडून!" चर्चेत भाग घेणारी माझी दुसरी सखी.
"अगं, पण सिटीलाइटचा बाजार तुमच्या हाकेच्या अंतरावर!"
"तर काय झालं?"
"म्हणजे आपणच दोषी नाही का ह्या फेरीवाल्यांच्या त्रासाला?"
"अरेच्चा! पण महानगरपालिकेची जबाबदारी नाही का त्यांना हटवायची? ते ह्यांच्याकडून हप्ता खातात. आणि म्हणून हे आता असे पसरलेत!"
"अगं बाई! पण साधं सरळ नाहीये का? तुम्ही मुळी घेऊच नका ना त्यांच्याकडून सामान! म्हणजे ह्याला आळा नाही का बसणार? जर त्यांचा माल खपलाच नाही, त्यांना ह्यातून पैसा मिळालाच नाही तर त्यांना इथून निघून जाण्यापलीकडे दुसरा काही पर्याय उरेल काय?"

वाद...विवाद...आणि डोक्याला शॉट!

माझ्या घरात कोणी घुसतो...त्याची गरज? पैसा. माझ्याकडे आहे? आहे. माझ्याकडे वेळ नाही! मी त्याचा माल उचलायला मदत करावी...मग त्याने हातपाय पसरवावेत! माझ्या घरात कधीकाळी कोपऱ्यात पडलेलं हे जनावर. आता त्याने अजस्त्र हातपाय पसरवावेत. जसा एखादा अजगर. आणि मग माझी उलटी बोंबाबोंब. मला पडलेला विसर....ह्याचे आगतस्वागत तर मीच नाही का केलेले?

वैताग आहे यार! माझी जबाबदारी कशातच नाही! माझेच घर..माझेच गाव...पण त्याचे रक्षण करायची जबाबदारी माझी नाहीच!
परवा एक बातमी होती....'Stations to be no-hawker zones. Pedestrian-friendly. The BMC plans to start drive against encrochments at Dadar, Kurla and Andheri stations.

Pedestrian-friendly?
Pedestrians ना विचारा एकदा! ते किती ह्या hawkersच्या friend's list मध्ये आहेत!

ह्या पादाचाऱ्याला त्रासाची कटकट करता येते...परंतु स्वत: जबाबदारीने वागण्याची तयारी नाही!

माझे घर?
...BMC ने सांभाळावे यार!
प्लीज!

14 comments:

Raindrop said...

ise kehte hain 'pair ki jooti sar pe'.

Sometimes pedestrians are also at fault. Majhi Mahim chi neighbour. Tichya barobar walk la zaayla mala ajibaat avadayach nahi. Karan - sundar footh paath aahe. Tyavar ti chalayachi naahi. nehemi rastyawar. Vicharla tar mhanayachi "footpaath kitti up-down aahet ani madhe zhad pan. Kitti ti kasrat".

सौरभ said...

आज लोअर-परळला गेलो तेव्हा हाच विचार डोक्यात आला. आणि मी एका फेरीवाल्याकडून सरबत घेतलं.

Anagha said...

:) चला तर सौरभ बुवा, फक्त फुटपाथच बांधू...मैदान, पटांगणं, बागा काही काही नक्को! नाही का? म्हणजे हाताच्या अंतरावर कसं सगळं मिळेल! सरबत, भाजी, खेळणी, कपडे, पुस्तकं, भांडीकुंडी...सगळं सगळं.... :)

Anagha said...

sometimes कसलं ग वंदू...बहुतेक बऱ्याचश्या गोष्टींना आपणच जबाबदार असतो....सगळी आपल्याच कर्माची फळे...दुसरं काय? :)

सौरभ said...

हम्म्म्म... टोमणा माऱ्या ना मेरेकू... ठिकाय ठिकाय...

Shriraj said...

अनघा, नको ग त्रागा करून घेऊस... आपण आपल्यापरीने प्रयत्न करतोय ना.... बघूया काय होतंय ते :)

Anagha said...

सौरभ, लोअर परेल का टोमणा हमने आपको सिर्फ वापस किया! ;)

Anagha said...

श्रीराज, त्रागा नाही...पण आपण स्वत:ला सुशिक्षित समजतो..आणि ही इतकी साधीसुधी गोष्ट जबाबदारीने करायची तयारी नाही आपली...इतकंच! :)

हेरंब said...

खरंय.. अगदी विचार करायला लावणारा लेख !

Anagha said...

आपण आपलीच जबाबदारी ओळखत नाही हेरंब! सगळी समोरच्याची जबाबदारी असते!
आभार रे.

रोहन... said...

इतका त्रास नको करून घेउस... १०० पैकी ९५ लोकांना हे असंच वागायचे असते. त्यांना फेरीवाल्यांचा नाही तर ५ लोकांचा त्रास असतो... :)

Anagha said...

खरंय रोहन ! :(

THEPROPHET said...

उगा डोक्याला शॉट कशाला लावून घेतेस..
'मस्त रहनेका'.. BMC है ना! :D

Anagha said...

खरंच आहे हा विद्याधर ! डोक्याला शॉट ! :)