नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 28 February 2011

नाती व चव्हाटा.

आज चव्हाट्यावरच मांडायचं ठरवलंय...
उगीच नाही...गरज दिसली म्हणून.

प्रसंग एक.
"मामा, आज ह्या घराची पुर्नबांधणी होणार आहे...मग तू तुझ्या भावंडांबद्दल काय ठरवलं आहेस?"
"तू कोण मला विचारणारी? निघ! निघ इथून!"
"आई सध्या अमेरिकेत आहे. तिच्या सांगण्यावरून हे मी तुला विचारतेय. आणि तुझा गैरसमज होतोय मामा. मी तुझ्या घरात उभी नाही. मी माझ्या आजीआजोबांच्या घरात उभी आहे. ज्या घरावर माझ्या आईचाही तितकाच हक्क आहे, जितका तुझा आहे."
"चालती होतेस की धक्के मारून बाहेर काढू तुला!"

हे घर दादरमधील. जवळजवळ १२०० स्क़े.फीट. एक बंगला. त्यातील तळमजला माझ्या आजोबांनी भाड्याने घेतलेला. ज्यावेळी हा माझा धाकटा मामा जन्माला होता की नाही हीच शंका. ३ मुलगे, पाच मुली असा पूर्वी चालून जाणारा, आजीआजोबांचा मोठा परिवार. त्या त्या वेळी घरातील मोठ्या व्यक्तींनी अपुऱ्या ज्ञानामुळे म्हणा वा आपल्या माणसांवरील अवाजवी विश्वासामुळे म्हणा, कायद्याची मदत घेतलेली नाही. मुलींची लग्न झाली. मुलगे आपापल्या व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थाईक झाले. मग घरात राहिला कोण...तर धाकटा मामा. मध्यंतरीच्या काळात मोठ्या मामाने परत येण्याची इच्छा दर्शवली, पत्राद्वारे. परंतु त्या पत्रांना कचऱ्याचा डबा दिसला. त्यांना कधीही प्रत्युत्तर मिळाले नाही. प्रत्येक भावंडं आपापल्या संसाराचं रहाटगाडगं चालवत राहिलं...आपापल्या कुवतीनुसार. कित्येक रक्षाबंधने आली, कित्येक भाऊबिजी गेल्या. मामाने सहकुटूंब बहिणींकडे जेवणे झोडली. (हो. आता वेळच अशी आली आहे की त्या आनंददायी क्षणांचा हिशोब काढावा) मग आता काय झाले? काय बिघडले?

आमचे वकील म्हणतात...हा दादरमध्ये जागा असण्याचा तोटा आहे. जागा आणि नाती....जागांच्या भावांचा आलेख चढता आणि नातीगोती? आलेख उतरता...अगदी रसातळाला.

मामाने आता मुंबई कोर्टाला काय सांगितले?...बहिणींची लग्ने होऊन त्या दुसऱ्या घरी गेल्या...आता त्यांचा ह्या जागेशी काय संबंध?
...पुढे काय? पुढे फक्त वाद आणि भांडण.
परिणाम? मनं दुखावणे...रक्ताची नाती दुरावणे.

प्रसंग २.
"आमची अहमदाबादमध्ये मोठी जागा आहे. आम्ही दोघे भाऊ. आणि आम्हांला एक बहिण आहे."
"मग?"
"म्हणजे तुला म्हणायचंय की आमच्या लग्न झालेल्या बहिणीचा देखील त्या जागेवर आमच्या इतकाच हक्क आहे?!"
"अर्थात! भारतीय कायद्यातील सुधारणेनुसार आता वारसाहक्काने येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर मुलाइतकाच मुलीचाही अधिकार आहे!"
"ह्म्म्म"
"नाहीतर त्याच न्यायाने तुला आज एक मुलगी आहे आणि दोन मुलगे आहेत. मग उद्या तुझ्या मुलांनी तुझ्या लाडक्या लेकीचा हक्क नाकारला तर चालेल काय तुला?"
वरील संवाद मी व माझा एक जुना मित्र यांमधील.

प्रसंग ३.
"ताईचं लग्न झालं यार! ती गेली अमेरिकेला! आता तिचा काय हक्क ह्या घरावर?"
"का म्हणून? हे घर तिच्या आईवडिलांचं आहे...मग तिचा वारसा हक्क का नाही लागू होणार इथे?"
...पुढे काय? फक्त वाद आणि भांडण.
परिणाम? मनं दुखावणे...रक्ताची नाती दुरावणे.

प्रसंग ४.
एका इस्टेटीचे भागीदार किती?
५७!
चार बहिणी. पाच भाऊ. एका जोडप्याच्या मूळ वृक्षाच्या ह्या ५७ फांद्या.
भागीदारीची वेळ आली. त्यातील काही भाऊ व बहिणी हयात नाहीत. तरी देखील, जी वाटणी झाली तिचे पूर्णपणे ५७ भाग झाले. आपापसात ते वाटून घेतले गेले...नाती पुढे चालू राहिली. आनंद दिवसागणिक द्विगुणीत झाला...कसलेही गालबोट न लागता.

नाती महत्वाची.
आहेत ना? आपली मुले...गुण्यागोविंदाने, एकमेकांना धरून पुढे जावीत...असं मनापासून वाटतं ना?
आपला भाऊ, आपली बहिण...जसे आपण एकत्र लहानाचे मोठे झालो...तसेच आता आयुष्यात येणाऱ्या बऱ्या व वाईट प्रसंगांना एकत्रित सामोरे जावे, अशीच भावना आहे ना?
कोर्टाची पायरी चढावी लागू नये असेच वाटते ना?
मग, मी माझे इच्छापत्र तयार केले ह्याचा अर्थ माझा माझ्या मुलांवर अविश्वास आहे, असा का होतो?
ह्या उलट, माझे माझ्या मुलांवर जीवापाड प्रेम आहे...आपापसात बेबनाव न होता, त्यांनी आयुष्यात एकमेकांना धरून राहावे असेच मला वाटते आणि म्हणून मी माझे इच्छापत्र तयार करून ठेवेन, असा नाही का होत?
म्हणजेच माझ्या प्रेमाला, कायद्याची जोड देऊन ते प्रेम मी अधिक दृढ नाही का करत?

इथे मी माझ्या आदरणीय आजोबांना अपराधी ठरवत आहे काय? त्यावेळी ह्या गोष्टी इतक्या सहज आणि सोप्प्या नव्हत्या हे मला लक्षात घेतलेच पाहिजे. त्यांचे मरण आले अकस्मात. परंतु कोणीच कधीही कायद्याचे भान न ठेवल्याने आता एक कुटुंब वृक्षच मुळापासून उखडला गेला. मनं दुखावली...वर्षानुवर्षे जे आनंदाचे क्षण एकत्रित अनुभवले होते, ते सर्व खोटे ठरले...दांभिकता बाहेर आली. वरून रसरशीत दिसणारं सोनेरी सफरचंद...आत पूर्ण किडकं निघालं.

आजही माझे समकालीन देखील तसाच चुकीचा विचार करताना दिसतात. म्हणून ही सुचनेची घंटा.

माझा धडा मी अतिशय दु:खदरित्या, अपमानकारकरित्या घेतला. आजही दर महिन्याला 'तारीख पे तारीख' गेली की जखम अधिकाधिक खोलच होते. जसं कोणी ड्रील मशीन चालवावे.

...म्हणून आणली आज नाती...
चव्हाट्यावर.

Saturday 26 February 2011

कि की की?

मी गोंधळले होते. मी उजवी की डावरी? म्हणजे गेलं जवजवळ एक वर्ष मला दोन्ही बाजूने कामाला जुंलं गेलं. तक्रार आहे ही माझी. कोणाकडे? ते नाही माहित. पण आहे...आणि तक्रार करून ठेवलेली बरी, म्हणून सांगतेय. कधी डाव्या बाजूला तर कधी उजव्या बाजूला. म्हणजे मला जिने असं ठेवलं, तिला तर वाटत होतं की मी मुळी उजवी आणि डावरी...दोन्ही आहे. म्हणजे तेच ते...अँबीडेक्सट्रस. म्हणून मग केलं मला...कधी डावरं तर कधी उजवं! आणि मला बोलता येत नाही. त्यामुळे जसं मला ठेवलं गेलं तशीच मी बसले. कधी डावरी कधी उजवी! वैताग यायचा! एक वर्ष हे मी सहन केलं! कोणीही ह्याबद्दल काहीही केलं नाही. बघणारे बघत राहिले. मनोमन हसत राहिले. पण केलं मात्र काही नाही! मग काय? मी काय करणार बिचारी? मुकी!

पण दिवस बदलले! कसे कोण जाणे पण माझे दिवस बदलले! ही जी बाई आहे ना...हा असा माझ्या आयुष्यात गोंधळ घालणारी...तिला शेवटी एकदाचे कळून चुकले! कसे देव जाणे! आणि आपल्याला ते काय करायचंय? नाही का? शेवटी आपण झालं काय ते बघायला हवं! ते का झालं आणि कसं झालं त्यात पडू नये! ज्याचा शेवट गोड ते सारंच गोड!

तर एके दिवशी ही बाई मला समोर घेऊन बसली! आणि मी म्हणजे काही एक दोन नाही...अहो, मी म्हणजे जवळजवळ आठशे तरी आहे...म्हणजे हिच्या जवळ मी निदान तेव्हढी तरी आहेच! तर जवळजवळ तीन दिवस ही स्वत:ची चूक सुधारत बसली होती! हे तरी तुम्ही मान्य केलंच पाहिजे! एकदा चूक कळल्यावर ती अगदी पार पहिल्या दिवसावरच पोचली! चूक सुधारायला! म्हणजे अगदी आरंभापासून इतिपर्यंत तिने मला सुधारलं. सगळीकडे उजवं केलं. म्हणजे काय केलं? अहो मी सर्वात उजवीच आहे! कळलं का तुम्हांला? अजून नाहीच का कळलं? कम्मालेय!

अहो, मी म्हणजे 'की'!
म्हणजे तुम्हीं जेव्हा मराठी लिहिता, त्यावेळी बरेचदा तुम्हीं मला वापरता...म्हणजे समजा तुमचं वाक्य आहे...मी असं म्हणालो 'की'...मी असं ऐकलं 'की'.....
ती मी 'की'!! आता तरी कळलं?

तर, गेलं वर्षभर ह्या अनघाबाई मला कधी ऱ्हस्व (हे जोडाक्षर नीट टाईप होतच नाहीये! पंधरा मिनिटं घालवली मी त्यावर!) तर कधी दीर्घ करून ठेवत होत्या! म्हणजे कधी 'की, तर कधी 'कि'! आणि बिचारी मुकी मी! मी काय करणार? बसले चरफडत! म्हणजे तिच्या एका पोस्ट मधील हे वाक्यच घ्या...'पण जर देवाला वाटतंय कि मी त्याची बसण्याची नीट व्यवस्था केलेली नाही...' ह्यातील 'कि' दिसला? असा होता! आता नका अगदी मुद्दाम जाऊन बघू! बाईंनी केलंय आता मला दुरुस्त!

आता विचारा, कशा काय सुधारल्या ह्या बाई! अहो, अमेरिकेहून सांगावा धाडला गेला! अगदी पत्रच आलं म्हणे! मॅडमच्या मैत्रिणीने वाचवलं शेवटी! अपर्णा! ओळखता ना तिला? तिचं पत्र आलं! सक्काळी सक्काळी! मोठ्या एक पोस्ट तयार करून घेऊन आल्या होत्या....गरमागरम! हापिसात! आधी पत्रपेटी उघडली तर तिथे हे प्रेमपत्र! मग काय? बालमोहनच्या ना बाई?! पायाखालची जमीन सरकली! हापिसात तर बाईंचा शब्दकोश नव्हता हाताशी! गोंधळल्या! मग लावला त्यांनी त्यांच्या आदरणीय गुप्ते सरांना फोन!
"सर!"
"अरे व्वा! आज सकाळी सकाळीच कशी म्हाताऱ्याची आठवण झाली?!"
"काय हो सर!!?"
"अगं, गंमत केली! बोल बोल! काय झालं?"
"सर...आपण बोलतो ना...की मी असं म्हणतेय की...त्यातील 'की' आपण लिहिताना दीर्घ लिहितो की ऱ्हस्व?"
"दीर्घ! आमच्या वेळी तर त्यावर एक अनुस्वार पण असे आणि पुढे एक स्वल्पविराम. पण हल्ली अनुस्वार कमी केल्याकारणाने आता फक्त दीर्घ की लिहिला जातो! पण आता तुला का हा प्रश्न पडला?"
"अहो नाही सर...मी तुम्हांला म्हटलेलं ना की मी हल्ली मराठी ब्लॉग लिहिते...त्यात ना, मी गेलं वर्षभर की हा शब्द, कधी दीर्घ आणि कधी ऱ्हस्व लिहून ठेवलाय! आणि आज ना सक्काळी सक्काळीच मला माझ्या एका नव्या मैत्रिणीचं पत्र आलंय...ह्याबाबत!"
"हो का? अरे व्वा! मला आधी ह्याचाच आनंद झालाय की तुला शुद्धलेखनाची एव्हढी पर्वा अजूनही वाटतेय!"
"म्हणजे काय सर!? अहो, बालमोहन! विसरलात का?"
"अरे नाही! ते नाही विसरलो! पण हल्ली सगळीकडे 'आर्शिवाद' वाचून मी आता ह्या अशुद्ध लेखनाचा त्रास करून घेणंच सोडलंय!...मग काय आता....घालीन लोटांगण! चूक मान्य करून टाका!"
"हो! ते तर करेनच मी सर! पण आता सगळं सुधारल्याशिवाय नाही लिहिणार पुढे!"
"अगं, मला ना ते तुमचं इंटरनेट नाही कळत आणि ते तुमचं मोबाईल प्रकरण पण नाही कळत! म्हणून मग वाचलं नाही जात तुझं लिखाण!"
'माहितेय ते मला सर....मी ना त्यातल्या त्यात जे बरं लिहिलं गेलंय, त्याचे ना तुम्हांला प्रिंट आउटच पाठवते!"
"हा! ते बरं होईल बघ!"

तर असा काहीसा संवाद, गुरु शिष्येत घडला...

मग बाईंना शाळेतील दिवस आठवले...अशुद्धलेखनावर, शिक्षा काय? तर तो शब्द काढा लिहून वहीच्या पानभर! मग काय? बाई दिवसभर वेळ मिळेल तसा, ब्लॉगवर मागेमागे जाऊन माझे हातपाय धड करत गेल्या! डावीकडचा पाय उजवीकडे!...कॉपी पेस्ट...कॉपी पेस्ट...कॉपी पेस्ट...एक दिवस...दोन दिवस...आणि तिसरा दिवस! बाई तीन दिवस हे एव्हढंच करत होत्या! जवळजवळ २८८ पोस्टा त्यांना सुधाराव्या लागल्या! केलं त्यांनी! न करून सांगतायत कोणाला....

तर मंडळी, आशा आहे की आता बाई पुन्हा कधीही अशी चूक करणार नाहीत आणि 'मी' जी उजवी आहे...ती उजवीच तुमच्या समोर येईन! आता नवीन चुका केल्या तर काही सांगता येत नाही हा! पण असं काही मिळालं तर वेळीच सांगा! असे थांबू नका १००० होईस्तोवर! कारण 'की' हा शब्द तुम्ही इतक्या वेळा वापरता...की बाई जवळजवळ २८८ X २ (कमीतकमी!!) कॉपी पेस्ट करत होत्या!! :)

आता जरा व्याकरण बघुया का 'की' ह्या शब्दाचं?
की:
१) उभयान्वयी अव्यय - अथवा, किंवा. (अ+व्यय - कधीही न बदलणारा)
संशयबोधक अव्यय - 'की माझे दुर्दैव प्रभूच्या मार्गात आडवे पडले?'
२) प्रश्नावर जोर देण्याकरिता प्रश्नाच्या शेवटी पुष्कळदा योजतात. जसे: मी देतो की, येतोस की, जातोस की.
३) स्वरूपबोधक अव्यय. जे, असे. 'ते बोलले की आम्हांस यावयास बनणार नाही.'
हा शब्द एक अव्यय असल्याकारणाने कधीही बदलत नाही। त्याआधी स्त्रीलिंग वा पुल्लिंगी काहीही आले तरी देखील 'की' हा दीर्घच रहातो.
(संदर्भ, गुप्ते सर!)
किं:
कोण? कोणाचा? काय? हा शब्द बहुव्रीहि समासात नेहेमी येतो. जसे- किंकर्तृक= कोणी केलेले? कोण कारण झालेले? किंप्रयोजक= कोणत्या कामाचा किंवा कोणत्या उपयोगाचा?
(संदर्भ- महाराष्ट्र शब्दकोश. महाराष्ट्र कोश मंडळ लि. पुणे.)

:)

Wednesday 23 February 2011

इस शहर में...

गेला शनिवार कुतूब शहाच्या शहरी गेला. आंध्र प्रदेशाची राजधानी. हैदराबाद. पहाटे आकाशात तरंगायला सुरुवात केली साडे सातच्या सुमारास पाय तिथे टेकवले. मी माझा कॉपिरायटर मित्र. एक भेट ठरवलेली होती....पोटापाण्यासाठी. आधीही एकदा गेले होते त्यामुळे अतिशय सुंदर, एखाद्या परदेशीय विमानतळाच्या बरोबरीचा हैदराबाद विमानतळ बघितलेला होता. अभिमान, वाटावा असा. बाहेर झकासशी बस, शहरात शिरण्यासाठी. रिक्षांना, टॅक्स्यांना आसपास प्रवेश मनाई. लांबसडक गुळगुळीत रस्ते, फुलझाडांनी सुशोभित. हल्ली आपण फक्त परदेशीय फुलझाडे लावतो, मूळ भारतीय वृक्ष लावणे आपण बंदच केलेले आहे. हे वृक्ष तोडायचे आणि त्यांचा वारसा चालू राहील असे देखील काही करायचे नाही. म्हणजे दुबईचा विमानतळ देखील हल्ली ठिबकसिंचनाच्या मदतीने असाच कायम फुललेला दिसतो. अगदी हीच फुले आणि हीच पाने. इथे पक्कं भारतीय असं साधं एक पान देखील शोधून सापडलं नाही. एकूणच परदेशी आल्याचा एक भास, दूर शहरात शिरेपर्यंत कायम.

जवळजवळ एका तासाच्या प्रवासानंतर पोचलो हैदराबादच्या जुळ्या भावंडाकडे...सिकंदराबादमध्ये.
भेट संपेपर्यंत दुपार झाली होती. मग पोटपूजा. परतीचा प्रवास उशिराचा होता. आता वेळ काढणे आले. मग केली एक रिक्षा आणि चालकाला सांगितले पुढचे तास दोन तास फक्त शहर दाखवायचे.

कुतूब शहाने उभारलेले शहर...म्हणे एके काळी भारतातील सर्वात श्रीमंत शहर. आम्ही आधी शिरलो जुन्या शहरात. चारमिनार. शोधली इथे तिथे विखुरलेली ती लपून बसलेली प्राचीन श्रीमंती. कधी कुठे एखादा सज्जा, तर कधी एखादा खांब, एखादी खिडकी वा खिडकीची हिरवीजर्द फुटकी काच. शहराचे वेगळेपण पूर्ण धूळकटलेले. आणि बाकी आकाशातून लटकलेल्या विजेच्या वायरी, अस्ताव्यस्त. बारकाईने पाहिले तर त्याच काळ्या वायरींच्या मागे कदाचित लपलेले दिसेल एखादं नाजूक नक्षीकाम. हे असेच काहीसे मला जुन्या नाशकात फिरताना वाटले होते. कळकटलेल्या इमारती, इथे तिथे चिकटवलेली भित्तीपत्रके...नेत्यांची...नटनट्यांची. आंध्र सिनेमांची ही भित्तीपत्रके, चंट भडक. त्यांची त्यांची एक शैली राखून. डिझायनिं अगदी हॉलीवूड धर्तीवर. स्त्रियांसाठीचा बाजार...चमचमता...आणि फिरत्या काळ्या गोष्यातील स्त्रिया. त्यातून कोणाचा हात दिसलाच तर दिसाव्या त्या चमकत्या बांगड्या, आणि पायाकडे नजर टाकली तर गोऱ्या पायातील पादत्राण एखादा तारा चमकवून जावं.

ठीक...एक भारतीय पाचशे वर्ष जुनं शहर...काळाचा पडदा विरविरीत नाही तर अगदी जाड गोणपाटासारखा...

पुढे श्रीमान अझरुद्दीनची बंजारा टेकडी. बंजारा तलाव. सुंदर शांत. काठाशी लटकलेले पुढारी मात्र नजरेला शांतता नाही लाभू देत...आत तळ्यात शांत उभा बुद्ध. थोडा धूसर...बाकी शहर इतर भारतीय शहरांहून काय वेगळे? तेच ते देशी परदेशी मोठमोठे ब्रँण्ड सर्वत्र उभे. इमारती अश्या बांधलेल्या की आपल्यात कधी सौंदर्यदृष्टी होती ह्याबद्दल शंकाच यावी. अतिशय वाईट...सौंदर्याचे बारा वाजलेले. प्रश्र्न पडतो...कोण ह्यांना आर्किटेक्ट बनवतो...कुठून आणि का ह्यांना पदव्या मिळतात...हे का आपली नसलेली डोकी चालवतात... का ही अशी आता पुढे वर्षानुवर्ष बघावी लागणारी ओबढधोबढ बांधकामे करतात! सापासारखा पसरलेला फ्ल्यायओव्हर. वर त्याखाली जाडजूड खांबावर डकवलेली पत्रके. कुठे खरवडलेली...कुठे अगदी शाबूत. एकजात सगळे खांब हे असेच किळसवाणे...बरबटलेले.

ठीक...एक भारतीय प्रगत शहर...प्रगत भारतीयांनी उभारलेलं...वेडंविद्र.

....रात्रीच्या काळोखातील माझी निद्रानाश झालेली मुंबई...पुढारलेली....दुसऱ्यांच्या पापापोटी स्वत:चे व्यक्तिमत्व हरवून बसलेली.

कोण जाणे का...भारताच्या नवशृंगार करून बेढब दिसणाऱ्या ह्या शहरांपुढे कुठे कोपऱ्यात माडांखाली लपलेले, चार माणसांचे एखादे गावच शोधावेसे वाटते...कधी वाटतं, सायकल काढावी, एखादं वळण घ्यावं, पाय मारत मारत सिमेंटच्या ह्या करड्या रानातून कुठे निघून जावं...जिथे किनारा सापडेल...जिथे आसरा मिळेल...
माणसाला नाही तरी जास्तीतजास्त सहा फूट जागा लागते...मग आत्मा जी काय अवकाशात जागा व्यापेल ती आणि तेव्हढीच मालकीची...




Friday 18 February 2011

नको तिथे...

"ही तू ठेवलेली देवांची जागा बरोबर नाही."
"म्हणजे? मी पूर्वपश्चिम बघूनच ठेवलेत देव!"
"तरी पण....इथेच तू जेवण करतेस आणि तिथेच देव आहेत!"
"अरे? पण अन्न हे पुर्णब्रम्ह्च नव्हे काय? आणि म्हणतात बेडरूममध्ये ठेवू नयेत....हॉलमध्ये ठेवू नयेत...मग आता कुठे ठेवणार मी त्याला?"
"ते काही मला माहित नाही! ते तू बघ!"
"ठीक आहे...ही जागा बरोबर नाही. बरोबर?"
"हो."
"आणि माझ्या ह्या घरात दुसरी काही जागा नाही..."
"तुझ्या घरात देवाला जागा नाही!?"
"तसं नाही म्हणतेय मी...पण जर देवाला वाटतंय की मी त्याची बसण्याची नीट व्यवस्था केलेली नाही...आणि म्हणून तो माझ्यावर नाराज आहे...आणि वेळोवेळी त्याला ही त्याची नाराजी दाखवावीशी वाटत असेल...तर द्यावं त्याने मला मोठं घर घेऊन...मुंबईत...मग मी बसवेन त्याला...चुलीपासून दूर....हवं तिथे!"
"तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये!"
"अरेच्चा! त्याच्या मनाजोगती जागा त्याला हवी असेल तर त्यालाच नको का प्रयत्न करायला? कम्मालेय! पटत का नाहीये तुला?!"

Wednesday 16 February 2011

वासंती

कधी कधी दु:खी वाटत असतं...
जसं काही मनाला एखादा जड पाषाण गुंडाळावा आणि समुद्रात सोडावं...
मग ते बिचारं मऊ लुसलुशीत मन हळूहळू खोलखोल रसातळाला पोचावं...
जेव्हा असं काही वाटतं त्यावेळी ते दु:ख बाहेर काढावे म्हणून कलाकार आपल्याला अवगत असलेल्या कलेचा आधार घेतो. कोणी चित्र काढतो, कोणी कविता करतो...कोणी एकटाच बसून अश्रू ढाळतो...
माणसं हे इतकंच करतात...

पण कधीकधी देव दु:खी असतो...
आणि त्याने तरी गप्प बसावं नाही का....
की दु:खी आहोत म्हणून दु:खी गोष्टी लिहित बसायचे...
आणि कोणाच्या ना कोणाच्या डोक्यावर आपली गोष्ट थापायची,
आणि....द्यावे पाठवून खाली त्या जीवाला...
ह्याने लिहिलेल्या गोष्टी जगायला....
नाहक.
अन्यायकारक...
नाही का?

आज माझी बालमैत्रीण गेली....
वासंती....

Tuesday 15 February 2011

देणे, गत जन्माचे

काल एक फुलपाखरू घरात बागडत होतं. काळं कुळकुळीत. जशी काही एखादी सावली....इकडे तिकडे उडणारी. आणि त्याबरोबर बागडणारे खरे रंगीबेरंगी फुलपाखरू नाहीच. फक्त धावणारी सावली. माझ्या इतकी हाताजवळून गेली की त्या नाजूक सावलीचा स्पर्श देखील हलकाच कळावा. सावलीचा स्पर्श. मी हलकेच माझी बोटं हलवली. सावली उडाली. आणि मला आठवण झाली...

...त्यादिवशी देखील अशीच एक सावली खोलीतील क्षीण प्रकाशात मला दिसली होती. मध्यरात्रच होती. ती सावली माझ्या मानेवर हुळहुळून सरकली होती. आणि म्हणूनच मला जाग आली होती. भीती. भीती दाटली मनात. मी उठले. त्या सावलीवर मी सपाताचा वार केला. एक दोन तीन. अज्ञानातील चढती भीती. सावली थरथरली. माझा वार प्रबळ झाला. धडपडत ती निष्प्राण झाली. मी लहानग्या लेकीला कुशीत घेतलं आणि तिच्यावरील नकळत आलेलं संकट दूर केल्याच्या आनंदात डोळे मिटले.

खोलीत प्रकाश शिरला तेव्हा सवयीनुसार जाग आली. सपाता पायात सरकवण्यासाठी पाय पुढे नेले. आणि जागतेपणाचा पहिला इशारा...अंगावर शहारा आणून गेला.

एक निष्पाप फुलपाखरू मरून पडलं होतं. चेचलं गेलं होतं. फाटके पंख, चिमुकला जीव. चिरडून गेला होता.
मला अंधाराने आंधळं केलं...जाणीवा नष्ट केल्या आणि माझ्या हातून ते फुलपाखरू मेलं. रात्रीच्या अंधारात मी केलेले ते वार आठवले. जीवाच्या आकांताने केलेले घाव. धस्स झालं. जर गेल्या जन्मावर विश्वास ठेवावा तर फुलपाखराचं आणि माझं असं काय नातं होतं? का त्याने मानेला नाजूक स्पर्श करून मला उठवावं आणि मग हे असं माझ्या हातून क्रूर मरण ओढवून घ्यावं? हे देणे, गत जन्माचे?

तो हाताच्या दोन पेराइतकासा जीव आणि पलंगावर माझ्यावर विसंबून, निवांत झोपलेला तितकाच निरागस एक जीव.
रात्री, खोलीतील मिट्ट काळोख दूर करणं खरं तर काही कठीण नव्हतं.
एकाच बटणाचे तर अंतर आणि त्यावर अवलंबून एक आयुष्य...

ते शरीर उचललं....
ती नाजूक कुडी...तळहाताएव्हढी...
कुंडीतील रातराणीला अर्पण केली...
निसर्गाला मान निसर्गाचा...

संपले असेल काय ते माझे आणि फुलपाखराचे देणे?
निदान ह्या आयुष्यात...

Sunday 13 February 2011

कहाणीतील गूढ

रविवारचा सूर्य मावळत आला होता. असा निवांतपणा परत मिळवायला सहा दिवसांवर मात करायची होती. हे असं जेव्हा होतं तेव्हाच त्या जलद सरकणाऱ्या सूर्याचं मोल कळतं.
"काल ती पुन्हा निराश होती."
"मग?" प्रशस्त दिवाणखाना. उंचच उंच मोकळ्या खिडक्या. त्या खिडक्या पुढ्यात घेऊन बसलं की मन मोकळं व्हायला कितीसा अवधी?
"मग काय? काही नाही. तिला मी जे गेली सहा वर्ष सांगतेय तेच पुन्हा सांगितलं...उसाचं गुऱ्हा पुन्हा चालवलं."
"रडत होती?"
"नाही. ते झालेलं म्हणे रात्री करून."
"हम्म्म्म. मग आता?"
"मला नाही कळत हिला कसं समजवायचं ते! गेली सहा वर्ष पुन्हापुन्हा त्यांचं ब्रेकअप होतंय आणि पुन्हापुन्हा पॅचअप! तो तसाच आहे! तो नाही बदलत! आणि ही त्याला नाही सोडत!"
खिडकीवरील कावळा उगाच दोघां जिवाभावाच्या मैत्रिणींना न्याहाळत होता.
"मला वाटतं तुला आता तुझी strategy बदलायला हवीय!"
"माझी? म्हणजे?"
"साधी गोष्ट आहे. त्याचे आईबाबा लहानपणीच गेलेले आहेत. तो एकटाच वाढलेला आहे. निर्णय एकट्याने घेणे त्याच्या अंगवळणी पडले आहे. आणि कोण कधी कोणासाठी बदलतं का?"
"खरं आहे. मग?"
"ह्यातून कोण चूक आणि कोण बरोबर हे आपण काढूनच टाकूया. ज्या गोष्टीला कधीही कुठलेही ठाम उत्तर नसते त्या गोष्टीला आपण इतके महत्व का द्यावे?"
"अं?"
"All this right and wrong..let 's keep that aside."
"Okkk. And then?"
"आता ह्या घटकेला नक्की होतंय काय? तर कधी हिच्या वागण्याचा त्याला आणि कधी त्याच्या वागण्याचा हिला...पण त्रास मात्र नक्की होतोय. आनंदाचे क्षणही असतीलच आयुष्यात घडत परंतु overall effect त्रासाचा आहे. नाही का?"
"हो."
"आता आपण फक्त तिचा विचार करु...कारण ती तुझी जिवलग मैत्रीण आहे. ठीकेय? तिला त्याच्या वागण्याचा त्रास तर होतोय. परंतु, त्याच्यावरच्या प्रेमाने तो त्रास ती आज सहन करते आणि हे नातं पुढे नेते. मग असंच पुढे जाऊन एकदोन वर्षांत त्यांचं लग्न होईल आणि आयुष्य पुढे सरकेल."
"हो...बहुधा..."
"आता मन हे आपण एक कोकरू धरू... निरागस, निष्पाप. ते प्रत्येक घावाबरोबर बावचळेल, दुखावेल. परंतु, निरागस ते, तसेच कठीण पर्वत चढू लागेल...वर वर. स्वप्नातील हिरवळीच्या दिशेने. ज्या गोष्टींचा लग्न होईपर्यंत त्रास झालेला आहे, ज्यातून तिचं हे कोकरू मन गेलेलं आहे...ठेचाळलेलं आहे...तेच लग्नानंतरच्या खडतर प्रवासात अधिकाधिक जखमी होईल...आणि त्याचा स्वभाव लक्षात घेता, तो जरी राक्षस नसला तरी देखील तो ह्या कोकराला तळहातावर जपणारा मेंढपाळ देखील नाही. नाही का?"
"ह्म्म्म. मग?"
"मग काही नाही . कधीतरी ह्या सगळ्याचा कडेलोट होईल...आणि ह्या कोकराकडून एखादं पाऊल जरी चुकीचं पडलं तरी मग त्याला माफी नसेल...असेल तो फक्त कपाळमोक्ष. हा मेंढपाळ नाही जपणार ह्या कोकराला. ह्याच्या शेकडो चुका ती आंधळ्या प्रेमाने माफ करून जाईल, सपशेल डोळेझाक करेल...आणि तिची एक चूक मात्र त्यांना आयुष्यातून उठवेल."
.........
"तुझे का डोळे भरले?"
"कारण मला माझी मैत्रीण आयुष्यात सुखीच व्हायला हवीय !"
"बघ हेच तिला सांगून. सांग तिला स्वत:च्या सहनशक्तीच्या मर्यादा जाणून घ्यायला. धनुष्य किती ताणलं जाऊ शकतं ह्याचा अंदाज, बाण टेकवण्याच्या आधीच घ्यावयास सांग."
.......
"आणि त्याही पलीकडे जाऊन एक ध्यानात ठेव तू."
"काय?"
"जे तिच्या नशिबात लिहून ठेवलेलं आहे...ते घडणारच आहे..."
"कसला कर्कश आहे हा कावळा!"
ती हसली...."हो का? कधी ऐकलास तू गोड आवाजात गाणारा कावळा?"
दोघींच्या गप्पा तर संपल्या हसतहसतच...परंतु, हसण्यावर सोडून देता येणाऱ्या त्या तिसरीच्या नशिबात, काय लिहून ठेवलंय हे तर काळच जाणे.
आणि कहाणीतील गूढ कायम राखण्याची हातोटी, कोणी या काळाकडूनच शिकावी!






Saturday 12 February 2011

माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो...

एक गोष्ट लिहिली होती. वय वर्ष अंदाजे दहा. बकुळी नावाच्या राजकन्येची. मग बाबांनी ती वर्तमानपत्राकडे पाठवली. आणि ती छापून देखील आली. मला वाटतं सकाळ मध्ये. बाबांच्या घरी त्यांच्या कपाटात ते कात्रण कदाचित असेलही. तिथे अनघा पाटील नाव वाचलं आणि पेपर हातात घेऊन उड्याबिड्या मारल्या.

घरी महाराष्ट्र टाइम्स येत असे. त्यात दर रविवारी अगदी वाट बघून सोडवायचे असे ते ह. अ. भावे ह्यांचे शब्दकोडे. हाताशी बाबांनी घरात आणून ठेवले होते महाराष्ट्र शब्दकोश. भाव्यांचे शब्दकोडे,
शब्दकोश, आईबाबांनी मिळून केलेले चमचमीत मटण म्हणजे पाटलांच्या घरचा रविवार. जवळजवळ दोन दशके.
त्याच सुमारास अगदी मन लावून लिहिलेली दिल्लीत रहाणाऱ्या मामेबहिणींना लिहिलेली मजेशीर पत्रे. अस्सल मराठीत.

मग कॉलेज. आणि फिरत्या कालचक्रानुसार प्रेमबीम. त्यामागोमाग दैनंदिनी. आता वाचायला घेतली तर बालिश वाटेल अशी. पण तेव्हाचा आधार. त्यात्या वेळी गळफास झालेले प्रश्न मन लावून ऐकणारी
दैनंदिनी.

मग हे बाहेरचं अक्राळविक्रा
जग. जाहिरातक्षेत्र. अतिशय स्पर्धक. त्या विश्वात तग धरून रहाण्याची एक धडपड. कधीकधी चमकणारी कधी फक्त धुमसणारी. आयुष्यातील पहिले बॉस आनंद गुप्ते. बाबांखालोखालचा हा आधार. त्यांना आता उगाच जग अवधूत गुप्तेचे बाबा म्हणून ओळखतात. हे माझे सर, उत्कृष्ट मराठी लिहितात. त्यावेळी त्यांची कॉपी आणि माझे आर्टडिरेक्शन. क्लायंट, जैन ठिबक सिंचन आणि युनायटेड वेस्टर्न बँक. भारतामध्ये त्या काळी जाहिरातक्षेत्रात कॅग स्पर्धा जोमात होती. मग आम्ही दोघांनी मिळून, आमच्या मराठीतील कॅम्पेन्सच्या जोरावर काही चंदेरी सोनेरी अवॉर्ड्स मारली.
त्या अवधीत मराठीशी हा असा संपर्क.

त्यापुढील कालावधीत मराठीतील वर्तमानपत्र नित्यनेमाने वाचणे आणि घरी मराठीत बोलणे एव्हढाच काय तो मराठीशी संबंध. बाकी कामानिमित्त वापरली जाणारी भाषा इंग्रजी वा हिंदी.
त्याच माझ्या क्षेत्रातील अतिशय आवडणारी टॅगलाइन म्हणजे श्री वसंत बापटांनी महाराष्ट्र
टाइम्ससाठी लिहिलेली...महाराष्ट्र टाइम्स, 'पत्र नव्हे मित्र'. तीन शब्दांमध्ये पकडलेलं सार! आता जेव्हा ICICI Prudential Insurance ची टॅगलाइन, 'जिने का इन्शुरन्स लिया क्या?' गावोगाव झळकताना दिसते तेव्हां मन उद्विग्न होतं...वाटतं उद्या हे माझ्या श्वासावर देखील पैसे लावायला कमी नाही करणार.
असो...


एक दिवस शोध लागला ह्या ब्लॉगविश्वाचा. पुन्हा लिहायला घेतलं...जवळजवळ तीन दशकानंतर. तोपर्यंत आयुष्यातील अनुभवांची पोतडी भरभरून वहात होती... एव्हढीच काय ती जमेची वा वजाबाकीची बाब.

मग नवनवीन मित्रमैत्रिणी मिळाल्या ही एक फार मोठी गोष्ट. आणि त्याला धरून आली चक्क बक्षिसे....म्हणजे लिखाण, जगण्याचा आधार आणि बक्षिसे, त्यावरील बोनस.

तुम्हां सर्वांचे मनापासून आभार...मला जगण्याचे बळ दिल्याबद्दल....खरोखर...
:)



Thursday 10 February 2011

नमस्कार!

इतिहासात वाचलेलं बरेचदा...
ह्याने त्याने नोकरीला लाथ मारली आणि मग हे हे केलं.
कोणी देशकार्य केलं तर कोणी उद्योगधंदे केले आणि मग ते कोणी मोठेमोठे झाले!

पण आम्हांला शिकवलंय ना...
लाथ राहिली बाजूला...
कशाला पाय देखील लावू नये!
लागलाच कधी पाय...चुकून...
तर नमस्कार करावा!

तेच तर चाललंय!
लाथ नाही मारत...
नमस्कार करते...
अगदी...
स. न. वि. वि.
सां. न.
आणि अगदी...
को. न.

हो...
कोपऱ्यापासून नमस्कार!

Wednesday 9 February 2011

भेजा फ्राय

मला भेजा फ्राय आवडतो.
चमचमीत, मसालेदार.
सुकी कलेजी व्वा व्वा!
एकेक तुकडा खुमासदार.

फक्त आता असं झालंय,
इथे सगळीच लोकं हे खाताना दिसतायत,
दाद देतायत,
मिटक्या मारतायत !

प्रॉब्लेम काही नाही...
पण माझाच भेजा आणि माझंच हृदय....
ह्यांनी कापायला घेतलंय..
एकेक तुकडा खायला घेतलाय...
मस्त मस्त..दाद देतायत...

म्हणजे एक दिवस..
पोकळीच उरणार..
मी म्हणजे...
इजिप्तची ममीच होणार.

हे सगळे
नरभक्षक...
चटावलेले...
खातात ते खातात...
आणि खायला दिल्याचे हे मला पैसे देतात!
आता म्हटलं निदान एका प्लेटचे भाव तरी वाढवा..
तर मिटक्या मारतात...
आणि स्वत:च्याच तुंबड्या भरतात!

चिंता वाटते...
एकदा सिटी स्कॅन करायला हवं..
काय शिल्लक राहिलंय
बघायला हवं!

Monday 7 February 2011

चपात्यांचं गणित

आठ करायला हव्यात. मनाशी म्हटलं. कणिक, तेल, मीठ आणि पाणी. मळायला सुरुवात. जवळजवळ एखाद्या वर्षाने हे काम अंगावर आले होते. चपात्या करणे म्हणजे एक ध्यान लावणे. एकाच प्रकारची क्रिया ठराविक टप्प्यात करत जायची. मनच्या वारूची अवकाशात दौड सुरु.
आधी कणिक मळून ठेवणे, पंधरा मिनिटे झाकून ठेवून देणे, तेव्हढ्या वेळात भाजीची तयारी करणे आणि मग पुन्हा त्या मळून ठेवलेल्या कणकेकडे वळणे वगैरे वगैरे...
ओssssम सुरु.....

जवळजवळ तीन दशकांपुर्वीची गोष्ट.
"अगं, तिला घे हाताशी चपात्या भाजायला." आईने माझ्या मामेबहिणीला फर्मावले. कॉलेजच्या मे महिन्याच्या सुट्टीतील हे ट्रेनिंग. बहिणीच्या चपात्या मऊसूत , पापुद्र्यांच्या. चपात्या करणे हे जेवण करण्यातील सर्वात कठीण काम. आईने माझे चपाती शिक्षण चांगल्याच गुरूवर सोपवले होते.
मग रोज सकाळी सुरू. अक्का काय करते ते तिच्या बाजूला उभे राहून न्याहाळणे. अंतिम निकाल मऊ लागण्यासाठीची पूर्वतयारी. किती पीठ, किती मीठ, किती पाणी आणि किती तेल. मग संगमरवरी पोळपाटावर एक दोन इंची गोळा घ्या, तो थोडा लाटा, त्याचे अंग चिमटवा, मोजकं तेल लावा, घडी करा आणि करा सुरु. लाटायला. अगदी गोल. मग तिला घ्या तव्यावर तुमच्या ताब्यात.
"अगं, उलट!"
"उलटू?"
"हो! मग?!"
.......
"अगं, चिकटली!
धडपड!
"अय्या! फाडलीस कि गं!"
हिरमुसलेला चेहेरा.
"असू दे! पुढची नीट पलट. जरा हळूवार."
मग कुठेही न चिकटता अलगद तप्त तव्यापासून तिला दूर सारून उलटसुलट गरजेपुरते भाजणे जमले. म्हणजे असेही नाही, उभं आयुष्य जाळून उठल्यासारखी. हळूहळू माझ्या चपातीला वाफ स्वत:त कोंडून घेणेही जमले. अक्काची सहनशक्ती संपायच्या आत. गेला बाजार इथे तिथे..'अरे संसार संसार' ची सुरुवात हातावर दिसू लागली होती.
सुट्टी मध्यावर येईपर्यंत खातेबदल घडून आला. अक्काने मोठ्या विश्वासाने लाटणे माझ्या हातात दिले आणि कालथा स्वत:च्या ताब्यात घेतला. त्यामुळे आपोआपच आत्मविश्वास वृद्धिंगत झाला.
मात्र पुढील जबाबदारीत आकार महत्वाचा होता. गोलाकार. आता 'वेगवेगळे देशाकार' घडवणे, कसे कोण जाणे पण माझ्याकडून नाहीच घडले. तेव्हांच कळून चुकायला हवं होतं....आपली कुवत काही देश घडवण्याची नाही. आपला एकच तो साच्यातला गोलाकार. जमून गेला.
जिवलग मैत्रिणीबरोबर गप्पांना मग एक वेगळा विषय मिळाला.
"पप्पांना ना मी केलेल्याच चपात्या आवडतात."
"माझ्या पण आता चांगल्या फुगू लागल्यात." वगैरे वगैरे...

मग ह्या पोळपाट लाटण्याची एक वेगळीच आठवण. जवळपास त्याच सुमाराची. त्या आठवणीच्या मध्यस्थानी माननीय अहिल्याबाई रांगणेकर. त्यांनी शहरातील सर्व स्त्रियांना केलं होतं एक आवाहन. सूर्यास्तानंतर सर्व स्त्रियांनी हातात एक थाळी एक लाटणे घ्यावयाचे होते. घराबाहेर उभं राहून सुमारे दहा मिनिटे लाटण्याने त्या स्टीलच्या थाळीवर बडवायचे होते. ढ्यॅढ्यॅढ्यॅण! कारण नाही आठवत. महागाई हे अबाधित चालणारे कारण होते की काय कोण जाणे. परंतु त्यांना पूर्ण पाठींबा देऊन आम्ही घरातील चार स्त्रियांनी, हा ठणाट मोठ्या आवेशात पार पाडला होता. आवाजाचा प्रचंड त्रास होणारे एकमेव पुरुष, बाबा, त्यावेळी घरात काय करत होते कोण जाणे!

मग आठवण
कॉलेजमधील. आई डब्यात तीन चपात्या देत असे. त्यावेळचा माझा मित्र, ( आणि नंतर झालेला नवरा! हो! सांगून टाकलं! उगाच शंका नको! :) ) ...आता तो काही डबा आणत नसे. म्हणजे माझीच जबाबदारी नाही का त्याला घरचं खायला घालण्याची? मग आईकडून जास्ती चपात्या कश्या मागायच्या? आई ऑफिसला निघण्याच्या घाईत आमच्या एव्हढ्या चपात्या करत असे! आणि त्यात आता हे!
"आई."
"काय?" घाईघाईत आईची गणती चालू!
"मला ना हल्ली जास्तीच भूक लागते! आणि तू दिलेला डबा ना सगळ्यांना खूपच आवडतो."
"मग?"
"मग काही नाही! सगळ्या माझ्या मैत्रिणी खाऊन टाकतात ना! मग मला काहीच नाही उरत! तू ना मला अजून दोन चपात्या जास्ती दे बाबा! आणि भाजी पण जास्तीच दे!"
पटलं बुवा तिला! मग पुढली तीन वर्ष मला पाच चपात्या मिळाल्या. तीन त्याला आणि दोन मला!

हे आठवणीचं लाटणं फिरवता फिरवता
सहा चपात्या झाल्या होत्या. दोनच उरल्या.

डोंबिवलीतील गोष्ट. बाळ, हवेत लाथा झाडणे ह्यापलीकडे काहीही करता न येणारं. पाचच्या आसपास स्वयंपाक आटपणे आणि मग सहाच्या सुमारास बाळाला घेऊन फिरायला पडणे हा रोजचा रिवाज. आता हे फक्त एका जागीच पडून रहाणारं बाळ तसं काही भीतीदायक नव्हतंच. मग स्वयंपाकघरात तिला मागे चटईवर ठेवायचं आणि आपल्या चपात्या आटपायच्या. एकदा हे असंच आमचं दोघींचं काम चालू होतं. माझ्या तोंडाची टकळी चालू. काहीही प्रतिसाद मिळाला नाही तरी गप्पा मारण्याचे हे कौशल्य एखाद्या नवजात आईकडूनच शिकावे. एक दहा मिनिटांनी सहज मागे बघितलं तर काय? मागचं माझं बाळ गुल! म्हणजे काय? म्हणजे चटई आपली जागच्या जागी आणि त्यावर बाळ नाहीच! धाबं दणाणलं! लाटण ओट्यावर टाकलं आणि स्वयंपाकघराच्या दारापाशी आले. तिथेही नाही! काहीही न येणार हे बाळं एका क्षणात गेलं कुठे? कुठे मिळालं? बाळाला त्याच क्षणी गडाबडा लोळण्याचा शोध लागला होता आणि बाळ लोळतलोळत संडासाच्या दाराशी पोचलं होतं! म्हणजे हे असं लोळता येतं हे कळल्याकळल्या एकदम आर की पार! पुढल्या क्षणाला एकदम आत शिरलं असतं! "अगं माझे आई!" उचलला तिला! म्हणजे ह्याचा अर्थ उद्यापासून बाईसाहेब झोपलेल्या असताना उरकायला हवाय हा कार्यक्रम!

तर गोल चपात्यांचं हे असं गोल घड्याळ. म्हणजे दिवसाचं घड्याळ बसवायचं ते ह्या चपात्यांवर आधारित. चपात्या करायच्या आधी आणि चपात्या झाल्यानंतर...असं फिरणारं.

सात आणि आठ! झाल्या चपात्या.

चपात्या आणि चपात्यांशी निगडीत लाटत गेलेलं आयुष्य.
कधी संपल्या कधी शिळ्या राहिल्या. मग शिळ्याला चमचमीत फोडणी तर कधी गुळाचे लाडू.
चपात्यांचा आकडा कधी वाढला तर कधी महिनोंमहिने एक आकडी राहिला.
आता कळतं, गणती जास्त म्हणजे आयुष्यात रंगत जास्त.
चढती भाजणी बरी. उतरती खिन्न.
चपात्यांचं गणित. सुखदु:खाशी निगडीत.

हे एव्हढं चपात्यांवर भाष्य करण्याची आज संधी दिली ती आमच्या वैभवीने. बाई गावी गेल्यात. चांगलंच झालं म्हणायचं. मी चपात्या केल्या. करताकरता आयुष्याची गणती केली आणि हे हाताशी लागलं.

हा उद्योग संपल्यावर म्हटलं जरा गुगलकाकांना विचारू, चपात्यांवर त्यांचं काय म्हणणं आहे.
त्यांच्या सांगण्याप्रमाणे चपाती हा पदार्थ द्राविड आहे. तिला मराठीत पोळी म्हणतात आणि हिंदीत चपाती! पटलं? अजिबात नाही! मी काय हिंदीत बोलतेय इतकी वर्ष? कैच्याकै!
गुगलकाकांना ह्या आपल्या चपातीचा उल्लेख अगदी पार अकबराच्या ऐने-अकबरीत सापडलाय!

शिकरण चपाती!
ऑल टाइम फेवरीट! न्याहारी म्हणा नाहीतर जेवताना ताटात घ्या!

आणि ज्याचा शेवट गोड ते सारंच गोड!
कसं?
:)

Thursday 3 February 2011

रशियन बाहुली

"तो माझा सर्वात जवळचा मित्र होता. बालपणीचा. एकत्र मोठे झालो. एकत्र खेळलो. हसलो, रडलो. किती प्रवास एकत्र केले. त्याच्याचमुळे तर मी घडलो. आजपर्यंतचे माझे आयुष्य मी त्यालाच देणे लागतो."
"आम्ही गेली चारपाच वर्ष एकत्र काम केलं. कामं, काय आवडीने करायचा तो! अतिशय जलद. आणि माणसं जमवण्याचे त्याचे कसब काही अलौकिकच."
"सरळ माणूस. काही छक्के पंजे नाहीत."
"पार्टांची जान यार, तो म्हणजे!"
"पार्टांची आणि सहलींची!"
"ते माझे काका. खूप प्रेमळ. कधी आले भेटायला तर खाऊ नक्की घेऊन यायचे."
"मला तर तो मुलासारखाच. माझ्या पोटाच्या लेकापेक्षा मी ह्याच्यावर जास्त प्रेम केलं. आईच तर मानायचा तो मला."
"तो आसपास असला की सगळे वातावरणच कसं नुसतं हलकं फुलकं! हा विनोद करणार आणि आम्हीं दिवसभर हसत बसणार!"
"अरे, प्यायला बसलो की काय विचारता! जितकी लोकं असतील नसतील ना त्या सगळ्यांची बिलं हा भरायचा!"
"हो ना! एकदा मी माझ्या घरातल्या सगळ्यांना घेऊन गेलो होतो हॉटेलात! हा पण होता बरोबर! मस्त दारू प्यायलो आम्हीं! आणि अरे मजा म्हणजे जवळ जवळ पन्नास हजारांच बिल ह्यानेच भरलं! मोठ्या मनाचा माणूस!"
"दिलदार माणूस यार!"

जवळजवळ दोन तास उलटून गेले होते. श्रद्धांजली चालू होती. ती आणि तिचा एकुलता एक लेक कोपऱ्यात बसून ऐकत होते. तिचं मन नेहेमीसारखंच उघड्या खिडकीतून कुठे दूर भरकटत होतं. तिच्या नजरेसमोर राहूनराहून येत होती रशियन बाहुली. कोण जाणे कधी कोणी भेट दिली होती. घरात खिडकीच्या एका कोपऱ्यात उभी असलेली ती बाहुली. गोल चेहेऱ्याची. गोल अंगाची. ती पहिल्यांदा जेव्हा हातात आली, तेंव्हा नव्हती कळली. पण मग तिचं डोकं उघडलं, तर अजून आत एक...तशीच्या तशीच. थोडी आक्रसलेली. मग तिलाही उघडलं. तर त्यात दडलेली अजून एक. अश्या एकातेक नऊजणी. आठ डोकी उघडली आणि नऊ जणी हाताशी लागल्या. आज इथे बसून त्याच नऊ जणींची आठवण येत होती....भाचा बोलत होता, पुतणी बोलत होती. मित्र बोलत होते...किती बोलू आणि किती नको...

...हा माणूस होता, तसाच काहीसा. रशियन बाहुली. एकात एक अनेक बाहुल्या. सर्वात छोटी बाहुली फक्त तिलाच माहित. कारण तीच लागली होती तिच्या हाताशी. माणूस दिसायला एकच होता. कधी मित्र, कधी भाऊ, कधी काकामामा, बाप. खूप कमी वेळा, तिचा नवरा. नशीब, तिला नव्हतं कोणी सांगत श्रद्धांजलीत बोलायला. ना तिच्या लेकाला. ती काय बोलणार? तिचा लेक काय बोलणार? त्यांची रशियन बाहुली जगावेगळी होती. तिचा नवरा तोच त्याचे पप्पा. तोच जमावाचा मित्र. वर एक आणि आत अनेक विविध रूपे. तिचे तिच्या अदृश्य बाहुलीबद्दलचे मत वेगळे होते. तिने लेकाकडे नजर टाकली. लेक देखील आरपार खिडकी बाहेर नजर लावून होता. त्याचे वडील म्हणून त्याच्या अदृश्य बाहुलीबद्दलचे मत काय होते? काय जमावाला ते जाणून घ्यावयाचे होते? नव्हते. कोणाला नव्हते ते जाणून घ्यायचे. सगळेच आपापल्या बाहुलीवर खूष होते. त्यांची बाहुली हरवली म्हणून अश्रू ढाळत होते.

"मॅडम, तुम्हीं बोलणार का?"
त्या आवाजाने तिच्या मनाची कवाडे बंद झाली. बाहुल्या आपोआप एकातएक गेल्या. तिची बाहुली, सर्वात आत. जशी काळ्या जादूने भारलेली. मंतरलेली. ती लपली. खोल खोल. न कोणाला कधी दिसली, न कोणाला कधी कळली. जशी काही ती नव्हतीच. त्याचे ते रूप कोणाला कधी न कळलेले. जे फक्त तिच्यासाठीचे होते. आणि तिच्या लेकासाठीचे.
...जेव्हा तो मित्रांची दारूची बिले भरत होता, तेंव्हा ती तिचे मंगळसूत्र विकत होती. रात्रीबेरात्री पार्ट्यांवरून तो घरी येत होता, तेव्हा तिचं तर त्याच्या मुखी घास भरवत होती. उशिरा घरी आलेल्या पप्पांना त्यांचा लेकच तर सावरत होता, पलंगावर निजवत होता...

बाहेरील, सर्वांचीच गोरीगोमटी बाहुली, समोर स्टेजवर फोटोत होती. मेणबत्या जळत होत्या. तिची नजर पुन्हा त्या ज्वालेत अडकली.

तिने दखल न घेतलेल्या आवाजाचा माणूस तिच्या नजरेच्या चौकटीतून हलला. जमाव अश्रू ढाळत होता त्यावेळी त्यांची लाडकी बाहुली, गळ्यात हार घालून तिच्याकडे बघत होती. विजयी हास्य. मृत्यूने देवत्व बहाल केले होते.

त्याच्या जिवलग मित्राने आक्रोश व भाषण आवरतं घेतलं.
मेणबत्यांनी शरणागती मागितली होती...जमावासाठी शोकसभा संपली होती.
जमाव विस्कळीत झाला.
ती लेकाला घेऊन सभागृहातून बाहेर पडली.

काळी बाहुली काम करतच होती.
रक्त आतल्याआत शोषतच होती.