नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 2 January 2011

लढा

मी काय तीर मारला?

१२ जानेवारी २०१०. दुबई.
संध्याकाळी सहाच्या सुमारास नवऱ्याच्या अस्थी हाती आणून दिल्या गेल्या. त्याच्या मित्राने.
पंधरा
तारखेचं परतीचं तिकीट होतं. अस्थी घेऊन मायदेशी परतायचं होतं. तो मंगळवार होता. बुधवारी संध्याकाळी दुसऱ्या मित्राने माहिती दिली, अस्थी भारतात घेऊन जाण्यासाठी दुबईतील दूतावासाकडून एक पत्र लागेल. त्याशिवाय दुबई विमानतळ, अस्थी घेऊन प्रवास करण्यास परवानगी देणार नाही. हे कळेस्तोवर बुधवारची संध्याकाळ होऊन गेली होती.

गुरुवार, १४ जानेवारी.
मृत्यूचा अरबी भाषेतील दाखला, असेच इतर अरबी भाषेतील काही कागद, पासपोर्ट, विसा, त्यांच्या काही नकला...हे सर्व असलेली एक जाडी फाईल. अस्थींचा एक फुट व्यासाचा पत्र्याचा गोल जड डबा. दुबईतील स्मशानभूमीने दिलेला. हे सर्व घेऊन दुबई दूतावास गाठला. सकाळी दहा वाजता. सोबत नवऱ्याचे तीन मित्र. सख्खे भाऊ नाहीत...परंतु इतर चुलत, मामे, मावस ह्या नावाखाली येणाऱ्या सर्व बंधूनात्याला मागे नेऊन टाकणारी ही माणसे.

"You thought you can carry your husband's ashes just like that? "
टेबलाच्या मागे बसलेल्या व्यक्तीचं वय अदमासे पंचावन. पाटी नाव वाचत होती...'Mr. Sinha.'
"I came to know about this permission letter yesterday."
"So? Is it our fault? You cannot make us work on a holiday!" बाजूचे टेबल. पाटी वाचत होती...Mr. Anil. वय अदमासे तीस-बत्तीस.
"Holiday? Today is Wednesday Sir."
"Madam, it's Makar Sankranti! We have a holiday!"
"I didn't know this."
"Carrying a dead body can be an emergency! Carrying ashes is not an emergency! Show your husband's passport!"
फाईल समोर टेबलावर ठेवली. त्यातून नवऱ्याचा पासपोर्ट काढला. श्रीयुत अनिल ह्यांच्या ताब्यात दिला.
"See! You got your dead husband's passport cancelled on 10th! Where were you for last 4 days?"
अस्थींचा डबा अजून तरी खाली जमिनीवर ठेवणे नव्हते जमले.
"I didn't know that I need a permission letter. I came to know that yesterday."
श्रीयुत अनिल,"This cannot be your excuse! Show us your tickets! Show us the proof that you are flying tomorrow!"
तिकीटं समोर ठेवण्यात आली. "Show us the death certificate we had issued."
फाईलीतील असंख्य कागदांमधून एक कागद अनिल ह्यांच्या समोर धरला. अनिल ह्यांचा आवाज आता नुसताच उर्मट नव्हता. चढा देखील झाला होता.
"Madam, this is not the one! You must be having a certificate with the consulate stamp!"
पाच मिनिटांचा फायलीतील शोध आणि दोन्ही अधिकाऱ्यांच्या उद्धट नजरा. त्यांनी दिलेला मृत्यूचा दाखला शेवटी समोर आला.
"We need to seal this box. Today is a holiday. We don't keep the seal in the office. You need to go to the officer's house and get it."

पत्ता घेऊन मित्र महेश निघाला. तीन चार तासांनी अस्थी सीलबंद झाल्या. पिवळट कापड त्यावर लालबुंद सील. परतीच्या प्रवासाला आता मुभा होती.


घरी परतलो.

काही जीवघेणे अनुभव आपल्याला येतात. मग वाटतं, हे आपल्यापर्यंतच संपावं. आणि कोणालाही हे सुन्न करणारे, माणुसकीवरील विश्वास उडवून लावणारे अनुभव येऊ नयेत. कुठेतरी वडिलांनी मनावर कोरलेले असते...माणुसकीवर विश्वास ठेवावा कारण तो विश्वास हीच मानवजातीची गरज आहे. अन्यायाविरुद्ध काहीही करणे म्हणजेच दुसऱ्या अर्थाने अन्याय करणे अन्यायाला पाठिंबा देणे आहे.

शशी थरूर जाल विहार करणारे आहेत अशी माहिती होतीच. जालावरून त्यांचा आणि त्यांच्या कार्यालयाचा -मेल पत्ता मिळवला. वरील अनुभव त्यांना मेल केला. त्यावेळी ते बहुधा स्वत:च्या लग्न गडबडीत होते. आणि बहुधा त्यांच्या बरोबर त्यांचे कार्यालय देखील लग्न सराईत होते. काही दिवस उलटले. जालाच्या पत्रपेटीत प्रत्युत्तर शून्य.

हे असे नाही संपवू शकत. तशी शिकवणच नाही.

श्रीयुत शर्मा, Consul General of India, दुबई ह्यांना तेच पत्र पाठवलं. दोनतीन दिवसांनी त्यांचे धोरणी उत्तर आले.

Dear Ms. Nigwekar,
I was very disturbed and saddened to see your e-mail. There is simply no room for insensitivity on matters relating to death.
My colleagues in the Consulate are always under great stress and public pressure. I am, however, ensuring that we show complete sensitivity in such cases.
If you were still in Dubai or likely to be, please let me know so that I can personally express my regret at your experience. I hope you have the inner strength to deal with your loss.
I wish you the very best,
(Sanjay Verma)
Consul General of India, Dubai
March 18, 2010

त्याला उत्तर पाठवले....your mail gave me a sense that if you are very busy, stressed and under work pressure; you can be inhuman.

दोन दिवसांनंतर दुबईच्या दूतावासातून श्रीयुत संजय वर्मांचा फोन आला. माफी मागण्यासाठी.

त्यांनी माफी मागावी ह्यासाठी हा अट्टाहास नव्हता. दूतावासाच्या मूळ उद्देशाबाहेर जाऊन अशा प्रकारची असंस्कृत वागणूक पुन्हां कधीही कोणाला मिळू नये...हा उद्देश मनात धरून वरपर्यंत दार ठोठावले होते. त्याची जाणीव त्यांना करून देणे आणि ह्या घटनेची दाखल घेणे त्यांना भाग पाडणे...हे इथपर्यंत तर केले होते.

मग मी काय तीर मारला?
नाही. तीर नाही मारला...
परंतु निदान आपल्यापाठी भाता आहे त्यात तीर आहेत...ते बोथट होऊ देता त्याचा वापर करावा ही बाबांची शिकवण फुकट नाही घालवली.

"अन्यायाविरुद्ध काहीही करणे म्हणजे समाजावर अन्याय करणे आणि होणाऱ्या अन्यायाला पाठिंबा देऊन 'रावण पोसणे'."


42 comments:

भानस said...

ज्याच्या हाती सत्ता असते त्यांना समोरचा माणूसच दिसत नसतो तर त्याच्या भावना, अडचणी कुठून दिसणार.
आपल्या भात्यातले तीर बोथट नसतातच फक्त आपण अन्यायाला ( हे असेच घडणार हे गृहित धरून ) आधीच शरण गेलेलो असतो त्यामुळे वापरतच नाही.

तू खरेच धीराची.

Anagha said...

मी बाबांची. :)
आभार भाग्यश्री, प्रतिक्रियेबद्दल. :)

अपर्णा said...

tujhe post waachtana aajkal faar bharun yete g....tasahi baby blues cha emotionalpana aahech...

तू खरेच धीराची....

Anagha said...

अपर्णा, मला तुम्हांला कोणाला मानसिक त्रास द्यायची इच्छा नसते.
परंतु वाटतं, लढे हे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. मग कधी कुठे काही वाचलं, काही ऐकलं तर आपले लढे लढण्यासाठी एक मानसिक बळ येतं...असं आपलं मला वाटतं... :)

BinaryBandya™ said...

द ग्रेट अनघा ..

Anagha said...

बंड्या, ग्रेट काहीच नाही....आयुष्यात सगळ्यांचेच लढे चालू असतात...मी माझ्या वाट्याचा लढतेय....इतकंच.

सौरभ said...

ह्या लढ्याने नक्कीच बऱ्याच गोष्टी शिकवल्या. दुसऱ्यांशी लढा देणं एकवेळ सोप्प. पण लढा जेव्हा स्वतःशीच असतो तेव्हा खरी कसोटी लागते.

नीरजा पटवर्धन said...

खूप काय काय आलं डोक्यात आणि पाणी आलं डोळ्यात.
बस्स! इतकीच प्रतिक्रिया!

Anagha said...

नीरजा, भेट देत जा अशीच...बरं वाटतं...

Unique Poet ! said...

माणसांच्या जाणीवा बोथट झाल्याचा अनुभव... असं काही वाचलं की काय बोलू तेच समजत नाही ...... सुन्न व्हायला होतं , अशा लोकांना कडक , आणखी कडक धडा शिकवावासा वाटतो.......पण
ज्याचे त्याचे युध्दच चालू असते आपापल्या जगाशी , अशा लोकांशी, व्यवस्थेशी... ................................


Nothing more to say...............

Anagha said...

सौरभ, आभार प्रतिक्रियेबद्दल.

Anagha said...

Unique Poet, खरं आहे तुझं...लढा मात्र द्यायलाच हवा. हो ना? कारण ही तर विषवल्लीच. भसाभस पसरत जाणारी. तिला रोखायचा आपण प्रयत्नच नाही केला, तर आपण आपल्याच नजरेतून उतरतो...नाही का?

आभार, प्रतिक्रियेबद्दल.

सारिका said...

तुम्ही खरंच खूप धीराच्या आहात..

Anagha said...

सारिका, 'तुम्ही' नाही म्हटलंस तर बरं वाटेल...मैत्रीण आहेस ना? :)

panda said...

चीड-चीड होते अशा सरकारी नौकाराना बघून. फार कमी लोक असतात, जे "लढा" देतात....अशी मानसं भेटली कि खरोखर नमन करावेसे वाटते. नमन....त्रिवार नमन !!!

Unique Poet ! said...

अनघाताई , कुठलाही प्रश्न असो , त्याचे स्वरूप आणि व्याप्ती कितीही मोठी अथवा लहान असली तरी त्याची सुरूवात आणि शेवट हे आपल्या पर्यंत येऊन पोहोचतेच . म्हणूनच प्रश्नाचे उत्तर शोधण्या साठी आपापल्या परीने छोटासा का होईना प्रयत्न केला पाहिजे.

तुम्ही म्हणताय ते अगदी खरं ......... आपण आपल्या नजरेतून उतरायला नको , आणि ही विषवली रोखण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केलाच पाहिजे, खरा लढा यासाठीच चालू असतो ........
समीर पु. नाईक

Anagha said...

:)

Anagha said...

पंकज, काय बोलू?

Unique Poet ! said...

जो तुम्ही केलाय !

हे सर्वात महत्त्वाचे वाक्य पहिल्या परिच्छेदात टाकायचे राहून गेले , म्हणून परत कमेंटतोय. :(

Suhas Diwakar Zele said...

काय बोलू?
मन सुन्न झाला पण तुझ्या सारखी तूच.. :)

Shriraj said...

अनघा, तुझ्या 'फेसबुक' मधील नोट्स वाचल्यामुळे ह्या गोष्टीची मला कल्पना होती; पण इथे सविस्तर मांडून खूप बरं केलंस...

Anagha said...

हो..श्रीराज, तू फेसबुक वर वाचलं होतंस हे...मी तेव्हां ही नोट फॉरवर्ड करून, शशी थरूरपर्यंत पोचायचा प्रयत्न केला होता.

Anagha said...

सुहास, इतकीच इच्छा आहे हे असे पुन्हां जगाच्या पाठीवर कधीही घडू नये.

सारिका said...

ok anaghatai.. oh sorry.. anagha..

Anagha said...

समीर, तू काही विसरलायस असं काही माझ्या डोक्यात पण आलं नाही...:)

हेरंब said...

एवढा लढा मोठ्या धीराने देऊन म्हणतेस "मी काय तीर मारला?" !!

बापरे.. खरंच अंगावर आली ही पोस्ट. वाईट वाटलं, संताप झाला.. असं सगळं सगळं एकदम झालं :( ..

प्रचंड धीराची आहेस तू.. अशीच राहा !

अपर्णा said...

ho ga..takrar nahiye ti majhi...he lihinyamagchi ti bhavna ekdam pohochily..lihit raha...aani tula amhi kaay shubhecha denar..tuch amhala dyawaas....
kharach kahi ladhe blog war mandale gele pahijet...

Anagha said...

:)

Anagha said...

कारण हेरंब, सध्या अशी परिस्थिती आहे कि आपल्याला क्षणोक्षणी हे असे लढे द्यावे लागतात. सद्य परिस्थितीत आपल्याला कोणीही नेता राहिलेला नाही. आणि भविष्यात कोणी येणार आहे अशीही आशा राहिलेली नाही. परंतु ह्याचीच दुसरी बाजू अशी आहे की आता देश चालवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाच्या डोक्यावर आलेली आहे...आणि ती जबाबदारी छोट्या मोठ्या गोष्टीतून अशी आपल्यापुढे उभी रहाते...इतकंच. :)

Raindrop said...

' '

रोहन... said...

खूप धीराची आहेस तू.. कमेंटणारणार नव्हतो पण २-३ दिवस झाले सारखा विचार येत होता म्हणून आज लिहितोय. शिवाय तू आजच्या पोस्टवर कमेंट ऑप्शन डिसेबल करून ठेवला आहेस.

तुझ्या भावना व्यक्त करायला तू ब्लॉगपोस्ट केलीस पण त्यावर तुझ्या लिखाणाशी समरस झालेल्या तुझ्या वाचकांनी प्रतिक्रिया द्यायची नाही? असे का गं? माझ्यासारख्या अनेकांना काय लिहावे हे समजत नसेल. उगाच काहीतरी लिहून त्या आठवणी कशाला जाग्या करा म्हणून लिहिलेही नसेल... काळजी घे.

बघ मनात आले ते काहीबाही लिहिले. चुकले असेल तर मोठ्या बहिणी सारखी मला माफ कर .. :)

Anagha said...

रोहन, अरे आता आपल्याला हा ऑप्शनच नाही राहिलेला... धीराने घ्यायचं कि नाही. न धीराने घेऊन सांगतोय कोणाला. ह्या अश्या विचित्र प्रसंगांना आपल्याला, सगळ्यांच जणांना, इथे ना तिथे सामोरे जावे लागते. आपण निदान आपल्या हातात जेव्हढे आहे तेव्हढे तरी करायला नको का? नाही तर कोणत्या तोंडाने सांगणार आपण कि 'भारत, माझा देश आहे' म्हणून?

sayee said...

खरच ग्रेट !
आपण तीर मारला नसला तरी आपल्याकडे भात्यामध्ये तीर आहेत हे जाणवून दिलेत.
(शरद यांच्या परतीच्या प्रवासात संघर्ष असू नये हीच इच्छा!)

Anagha said...

आभार साईप्रसाद.

THEPROPHET said...

:(
मी हे पूर्वी फेबु वर वाचलं होतं...अन तेव्हाही हेच वाटलं होतं...अन तुझ्याबद्दल अभिमान!

Anagha said...

माझा एक प्रयत्न होता तो विद्याधर...असंच पण नाही ना सोडून देऊ शकत...

Avani said...

2 khup strong ahes.. ashich raha..
~Avani

Anagha said...

अवनी, काहीच विसरता येण्यासारखं नव्हतं...मग निदान जेव्हढं आपल्या हातात आहे ते तरी निदान केल्याची भावना...नाहीतर त्यात कमी पडलो म्हणून मग अजूनच जगणं नकोसं...नाही का?

विनायक पंडित said...

अनघा! काय लिहावं ते इतरांप्रमाणेच सुचत नाही.पण तुम्ही अगदी नेमक्या शब्दात ते मांडलंय.अनेकदा माणुसकी, आपली-परकी आणि ही अशी कार्यालयीन कामाचं बुजगावणं मिरवणारी मंडळी ह्यांच्या अनुभवांनी भोवर्‍यात सापडल्यासारखं होतं.तुम्ही अगदी योग्य ते केलंत.कसा धीर एकवटला असाल तुम्हाला माहित.तुमच्या बाबांचा आशिर्वाद खरंच तुमच्या डोक्यावर सदैव राहो!

Anagha said...

विनायक, ह्या तुझ्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार! मला खरोखर पावलोपावली खूप गरज असते बाबांच्या आशीर्वादाची! आभार!

Niranjan said...

अनघा,
तुमचा अनुभव मला खुप मागे घेऊन गेला. तेव्हा मी पण एक ऑफ़िसर होतो, एक उद्दाम ऑफ़िसर. अशीच माझ्यासमोर एक केस आली. एक आदिवासी बाई मला सांगत होती, माझा नवरा दोन दिवसांपूर्वी मेलाय, मुलाला काही खायला नाही. काही मदत करता का ? माझी उद्दाम नजर त्या बाईवरुन फ़िरली, एक काळी रापलेली बाई. डोळे खोल गेले होते. त्या निस्तेज डोळ्यात न मला दुःख दिसल न कॊणाबद्दल प्रेम. ते डोळे विझलेले होते. काळ्या माणसाच दुख मला समजत नव्हतं. मी तीला हाकलुन देणार इतक्यात माझ लक्ष तीच्या हाताशी असलेल्या मुलाकडे गेल. माझ्या मुला एवढाच मुलगा. चेहर्‍यावर भुक स्पष्ट दिसत होती. डोळ्यात पाणी आणि आशा दिसत होती. त्या चेहर्‍यानी माझ्यातला ऑफ़िसर संपला. मी सर्वात आधी त्या दोघांना माझा डबा दिला. आणि मग मदतीचा विचार करायला लागलो. त्या भागात दूसर खायला काहीच मिळणार नव्हत. त्या दिवसाचा माझा उपास मला बरच काही शिकवुन गेला.

Anagha said...

प्रत्येकात खरं तर देव असतोच का? पण परिस्थिती देवाला देखील निर्बल करते तर
मानवाची काय कथा?
तुम्हीं हे इतक्या प्रामाणिकपणे लिहिलंत ही खूप मोठी गोष्ट आहे...असं मला वाटतं. माणुसकीची परीक्षा पास झालो कि जे बळ येत ते मला नाही वाटत दुसरी कुठलीही परीक्षा देऊ शकत असेल.
प्रतिक्रियेबद्दल आभारी.