नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday 30 December 2010

कट्टी

कट्टी.
म्हणजे तू वागलेलं मला आवडलं नाही. म्हणून कट्टी. अबोला.

किशोरवयात, कॉलेजमधून घरी यायला उशिरा होतो म्हणून वडिलधाऱ्यांचा अबोला. वागणं चुकीचं आहे म्हणून अबोला. त्याच वयात; घातलेले कपडे नाही आवडले, त्याच्याशी का बोललीस, ह्याच्याबरोबर का हसलीस, इतकी का हसलीस म्हणून जिवलगाचा अबोला. महिना महिना. म्हणजे घरी कोणी बोलत नाहीच. बाहेर जिवलग बोलत नाही. गडबड. गोंधळ. वय तर चुकांचंच. मग अधिक चुका. वाढत्या चुकांनुसार वडिलधाऱ्यांचा वाढता अबोला. म्हणजे एक गरगर फिरणारा गुंता.
चुका म्हणून अबोला आणि अबोला म्हणून चुका.

मग दिनदर्शीका पालटत जाते. दशकं ओलांडतात. काहीही कष्ट घेता, साल दरसाल वय वाढतं. भूमिका बदलतात. मग ते न्यायाधीशाचे अदृश्य सिंहासन आपसूक दाखल होतं. आपण नकळत विराजमान. वाढत्या वयाची मुलं चुका करतात. आधुनिक युगाच्या अत्याधुनिक चुका. मग आता आपण काय करणार न्याय? अबोला? आता काय, आपण धरायचा अबोला? वडिलधारे कायम बरोबरच असतात, अशी काळ्या दगडावरची रेघ आपल्या हृदयावर मारून घेतली तर संपलेच की! मग आपल्या वडील माणसांनी केलेल्या चुका, आपल्या हातून परत होऊ नयेत अशी काळजी आपण कुठल्या जोरावर घेणार? कारण ते चुकू शकतात हेच आपल्याला मान्य नाही. त्या उलट, आपले आईवडील हे कोणी देव नव्हेत तर माणसेच आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या समजुतीनुसार चुका केलेल्या आहेत. माझी जबाबदारी एकच की त्याच चुका मी माझ्या मुलांच्या बाबतीत करणार नाही. अर्थात म्हणजे मी माझ्या नवीन काही चुका करेन हे त्यात आलंच! कारण मी देखील माणूस आहे. आणि हे मला पूर्ण माहित आहे.

हे जर मान्य केले तर मग माझ्या पुढील पिढीशी, ते चुकीचे वागत आहेत म्हणून मी अबोला धरून काय होणार आहे? काय समस्या सुटणार आहेत? नकळत धागा गरगर फिरवला जाईल. गुंता वाढत जाईल. आणि मग तो दुरावा आयुष्याला पुरून उरेल. गुंत्याला टोकं दोन. पण दोन्ही गुंत्यात फसलेली.
चुका +अबोला=अढी=दुरावा. हा दुरावा जीवघेणा. परवडणारा.

माणूस म्हणून प्रत्येक वयाच्या वेगळ्या चुका.
जोडप्यातील चुका. चुका दोघेही करणार. कधी तो. तर कधी ती. एक जोडीदार चुका करणार. आणि दुसरा तत्परतेने अविचारी सिंहासनात जाऊन बसणार. न्यायासानावर. अविचारी सिंहासन. आंधळे सिंहासन. न्याय देण्याचा तो हक्क चालवताना, त्या चुकांना नक्की कोण कारणीभूत आहे ह्याचा शोध कोण घेणार? आसनस्थ होताच आंधळेपण का येतं? म्हणजे अगदी धृतराष्ट्रच. ठार आंधळा.
त्या चुका करण्यास जोडीदाराला आपणच अनावधानाने का होईना पण प्रवृत्त केले आहे काय? म्हणजेच "तू माझा न्याय करणार आहेस...परंतु ज्या चुकांसाठी तू हे न्यायदान मांडले आहेस, त्या चुकांना तूच कारणीभूत नाहीस काय? ज्यावेळी तू एक बोट माझ्याकडे रोखणार, त्याच वेळी तीन बोटे तुझ्याचकडे रोखलेली आहेत...हे तुझ्या ध्यानात आले काय? की 'मी' शंभर टक्के बरोबरच आहे...आणि स्वत:च्या चुकांना १०० टक्के तुझा तूच/ तुझी तूच जबाबदार आहेस..."
टाळी वाजवताना दोन हात लागतात. एका हाताने फक्त कानाखाली वाजते....हे कधी पूर्ण पटणार? आणि जर हे नाही शिरले डोक्यात, तर मग जो आपण न्याय देऊ तो किती प्रमाणात निरपेक्ष असेल? त्यातून प्रश्र्न पुरुष आणि स्त्री यांमधील. पुरुषी अहंकार अध्याहृत. मग न्यायाची सुनावणी. सुनावणी नंतर अंमलबजावणी. न्याय मी देणारच. तुला पटो वा ना पटो. तो तुला बंधनकारक. मी लाख चुका करेन आणि त्या बदल्यात तुला एक चूक देखील अक्षम्य. भारतीय न्यायपद्धतीत जर गुन्हा कबूल असेल तर त्याला शिक्षेचे प्रमाण कमी केले जाऊ शकते. परंतु ह्या कौटुंबिक न्यायदालनात, येशू ख्रिस्ताला सुळी चढवण्यासारखेच. किंबहुना त्याहून भयानक. कारण ही शिक्षा चोरून. चार भिंतींच्या आत....वेशीवर टांगला आणि ठोकले खिळे! हे म्हणजे मेंदूत खिळामारी आणि मेंदूची कुरतोड.

कट्टी तर कट्टी.
बारंबट्टी.
बारा महिने बोलू नको.
लिंबाचा पाला तोडू नको,
आमच्या घरी येऊ नको!

17 comments:

हेरंब said...

बापरे.. खरंय.. अबोला, शिक्षा वगैरे प्रकार भयानकच.. !!

वपुंच्या पार्टनर मधला 'अबोला'वाला प्रसंग आठवला !

सौरभ said...

:-) अबोला/रुसवेफुगवे कधीकधी छान असतात. पण कधीकधीच. असो. आता बट्टीची पोस्टपण येईल लवकरच अशी अपेक्षा करतो. :-)

भानस said...

अशावेळी त्या न्यायाच्या आणि कट्टीच्याही पचनी पडणार नाहीत अशा चुका करायच्या. :D आणि बरेचदा अबोल्याचे एक खास अंतरंग असते... धरणार्‍यांना अनुल्लेखाने मारायला सुरवात केली की धुमसायला लागतात... मग आपण लांबून फक्त गालातल्या गालात हसत राहायचे. चेहरा मात्र निर्विकार ठेवायचा बरं... :P

Anagha said...

हेरंब, आहे खरं हे अबोला प्रकरण भयंकर! आभार रे प्रतिक्रियेबद्दल. :)

Anagha said...

पण मग बट्टीला असं काही पिटुकलं गाणं नाहीये ना सौरभ! :p

Anagha said...

:D भाग्यश्री, आणि आपल्याला नेहेमीच अपराध्याच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं तर काय बाई करायचं? :)

BinaryBandya™ said...

बाप रे ..
सगळ्यात भयानक शिक्षा अबोला ...

Anagha said...

हो ना बंड्या? खरोखर...असा अबोला कधी आपण आपल्या मुलांशी धरूच नये....कारण मग खरोखरच त्यांच्याकडून अधिक चुका होतात...पण मग करायचं तरी काय हे मात्र नाही माहित मला! (तुला मी हे 'ग्यान' उगाच इतक्या आधी देतेय ना?! :) )

Raindrop said...

aur jo muh se to bolate ho par behaviour and emotionally ekdum abola...unka kya? coz technically they are batti pan mentally they r katti???

Anagha said...

hmmmm कठीणच ना वंदू? :(

Shriraj said...

अनघा, डोळे उघडलेस माझे.

Anagha said...

श्रीराज, मुलगा म्हणून की नवरा म्हणून उघडले डोळे?? :)

Shriraj said...

mulga mhanun :(

Anagha said...

hmmm....गडबड होते ना श्रीराज...घरात कोणी नाही बोललं की?!

Shriraj said...

नको नको वाटते बघ !!! जाऊ दे !!!! आज नको त्या आठवणी.

THEPROPHET said...

का रे दुरावा? का रे अबोला?? अपराध माझा असा काय झाला....
ते गाणं आठवलं :D

Anagha said...

सुंदर आहे ना ते गाणं विद्याधर! :D