नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 10 October 2010

"शाब्बास!"

लहानपणी, म्हणजे जेव्हांपासून अंगावर कामे टाकली जाऊ लागली तेव्हांपासून...ती कामे चांगलीच करण्याचा प्रयत्न असे. अर्थात त्या वयात ती कामे म्हणजे; केर काढ, गाद्या घाल, भांडी घास आणि धूळ पूस ही आणि अश्याच धर्तीची असत. परंतु ती पूर्ण झाली की घरातील वडिलधारी माणसं आपलं कौतुक करणार आहेत अशी एक अपेक्षा असे आणि म्हणून ते काम उत्तम करण्याचा जीवापाड प्रयत्न असे.

आजही मोठे झाल्यावर आपण त्याच अनुषंगाने जात असतो. अंगावर पडलेले काम चांगलेच करायचा प्रयत्न करतो. कौतुकाची थाप पाठीवर पडलीच पाहिजे ही इच्छा मनाशी बाळगून असतो.

आज एक अभ्यास वाचनात आला. काही संशोधकांनी उंदरांवर प्रयोग केला. त्यांना असे आढळून आले की बालपणी झालेल्या घटनांचा अतिशय तीव्र स्वरूपाचा परिणाम, आपल्या मेंदूच्या घडणीवर होतो.

"शाब्बास!"
ह्या शब्दाला फार महत्त्व आहे....
चिमुकल्या बाळाला देखील त्याचं महत्त्व कळतं आणि मग ते दुगण्या उत्साहाने पुढचं पाउल टाकतं! आपण आपल्या मुलांना लहानाचे मोठे करत असताना एक खात्री नाही का बाळगत, की पिल्लूने अगदी पेला जागेवर नेऊन ठेवला तरी देखील,"अरे वा! अगदी छानच केलेस बुवा तू हे काम!" अशी दाद आपण देत? आणि आपण बारकाईने जर बघितले तर आपल्याला दिसून येते की आपल्या ह्या दोन गोड शब्दांनी आपल्या बाळाला हुरूप आलेला आहे आणि त्याचा आत्मविश्वास देखील वृद्धिंगत झालेला आहे.

मग आपल्या ह्या पुढाऱ्यांचे लहानपण कसे गेले असावे? त्यांना ज्यावेळी अशी कामे सांगितली जात, त्यावेळी त्यांनी ती उत्तमरित्या पूर्ण केल्यानंतर (त्यांनी लहानपणी तरी ती केली असतील असे येथे गृहीत धरण्यात आले आहे) त्यांना अपेक्षित असलेले कौतुक कधी मिळालेच नाही काय? आणि त्यामुळे मग हळूहळू आपण केलेले काम कौतुकाच्या लायकीचेच असावे असा प्रयत्न करण्याची त्यांची इछाच नष्ट झाली?

वाटतं....
आपल्या बहुतेक नेत्यांनी, मेंदूला धक्का बसण्याइतक्या भयानक स्वरूपाच्या घटना त्यांच्या बालपणी अनुभवल्या असाव्यात!
आणि म्हणूनच कौतुकाला पात्र असे काही फार कमी प्रमाणात त्यांच्याकडून घडते!

14 comments:

rajiv said...

लहानपणापासून देशातील गरीब व गरिबीतील भयानकता बघितल्यामुळे आताही `या दोघांना ' बघितले कि त्यांचे हात-पाय गळून जातात .....बिच्चारे !

रोहन... said...

शाब्बास.... मला एकदम 'गलगले' आठवला... :D

Raindrop said...

asa pan hou shakta na ke ....whatever little good they do people will curse them only, that is why they don't do any good?? nahi ka?? koni neta ne ek chhotu sa hi kaahi changla kela tar koni shabbasich det naahi tyanna ....fakta vaitach mhantaat....mhanun maybe??

but u r right...lahaanpanapasun shabbasi milali ke apan kitti mehnat karto na ke azun zara changla kaahi tari karayacha :)

Anagha said...

वंदू, चांगल्या कामाचं कौतुक होतंच....पण वाईट कामांची यादी इतकी मोठी असते कि एखादं चांगलं काम मग कसं दिसणार?

Raindrop said...

satyavachan :)

THEPROPHET said...

बहुतेक लहानपणी फडतूस कामांसाठी जास्तच कौतुक मिळालं असेल, त्यामुळे आयुष्यभर फडतूस कामे करून होर्डिंग लावण्यातच धन्यता मानताहेत! :)

Anagha said...

विद्याधर, तसंच असावं! चुकीचे वाढवले गेलेले हे आपले नवीन नेते म्हणजे आपल्या देशाचं दुर्दैव आहे! आणि आपल्याला ह्याचे परिणाम पुढे कित्येक वर्ष भोगावे लागणार आहेत!

Shriraj said...

अनघा, मला काय वाटतं सांगू... जर सर्व ठिकाणी (म्हणजे शाळांपासून अगदी कार्यालयांपर्यंत) सर्वांना मुल्य शिक्षण द्यायला सुरुवात केली तर परिस्थिती थोडी बदलेल.

मला या देशाचा पंतप्रधान कर... मग बघ कसं सर्वांना वटणी वर आणतो ;D

rajiv said...

किंवा चुकांसाठी वेळीच ओरडा व शिक्षा न मिळता कौतुकाने हसण्यावारी नेल्यामुळे , आता निर्लज्जपणा अंगात मुरलाय .
`लोकासांगे ब्रह्मज्ञान व आपण कोरडे पाषाण' असे होऊ नये म्हणून प्रत्येक चांगल्या कामाची `स्वतःपासून ' सुरवात करतात हे नेते -`गरिबी हटवण्यासाहित '
व कामात एवढे गर्क होऊन जातात कि मान वर करून पण बघयला मिळत नाही इतरांकडे. :(

Anagha said...

खरंच श्रीराज, मी सध्या ज्ञानपीठ विजेते श्री. रवींद्र केळेकर ह्याचे मराठीतील भाषांतरित पुस्तक वाचते आहे. त्यात त्यांनी असेच काहीसे म्हटले आहे. ते म्हणतात... ' माझी आई मला म्हणायची,"बाळा, शिक रे! शिकल्याशिवाय तू माणूस होणार नाहीस." शिक्षण म्हटलं, कि ते मुलांना कोणत्या भाषेतून शिकवावं, किती भाषा शिकवाव्यात, इतिहास-भूगोल किती आणि कसा शिकवावा....असल्याच प्रश्नांची चर्चा करत बसतात. शिकायला आलेला मुलगा 'माणूस' कसा होईल, हा विषय महत्वाचा असायला हवा होता, यावर कधी चर्चा करता का तुम्ही?'
बाकी प्रश्न तुला पंतप्रधान करण्याचा...रहा उभा, कर काम (फलक नको लटकवू सगळीकडे नुसते!)....मग येतेच मी तुझ्यासाठी प्रचार करायला! ;)

सौरभ said...

शाबासकी मिळाली ना त्यांनापण लहानपणी, पण चुकिच्या कामांची.

Anagha said...

रोहन, शाब्बास गलगले! :)

संकेत आपटे said...

या नेत्यांचे आईबाप त्यांना लहानपणी अशी शाबासकी देत असणार... ‘अरे सुरेश, आलास? हातात काय आहे? अरे! हीच इअररिंग मी काल आपल्या शेजार्‍यांच्या कानात पाहिली होती! काय म्हणतोस? त्यांना काहीच माहित नाही? शाब्बास...’ :-D

Anagha said...

देवा! शक्य आहे रे संकेत! :(