नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 4 September 2010

जाहीर कबुली

तो पाण्यात पडला आणि त्याने ना पडताना, ना पडल्यावर मला कळवले. म्हणजे ती आत्महत्याच होती असे म्हणता येईल. आत्महत्येचे कारण काय? कोण जाणे. काही लेखी लिहून ठेवेलेले मिळालेले नाही. म्हणजे मग खुनाची शंका मनात येतेच. परंतु, त्याच्या संपर्कात शेवटी मीच होते. आणि खून करण्याची माझी प्रवृत्ती आधीतरी कधी दिसून आलेली नाही. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर प्रवृत्ती आहे असा दावा करता येईल. कारण आधी घडलेल्या तीन घटना त्याचीच ग्वाही देतात. परंतु ह्यावेळी घटनेची तीव्रता अधिक असल्याने खुनाचा नुस्ता प्रयत्न न रहाता त्याचा मृत्यूच ओढवलेला आहे. आणि त्यामुळे ह्या खुनाची जगभर चर्चा चालू आहे. तरीदेखील अटक संभावत नाही. कारण इतकेच की त्याला पुन्हा जीवनदान देण्याचा मी तितकाच मनापासून प्रयत्न देखील केलेला आहे. आणि त्या प्रयत्नांना साक्षीदार देखील उपस्थित होते. उलट मी त्यांना समोर ठेवूनच जोरदार प्रयत्न केलेले होते. आता त्या प्रयत्नांना यश मिळू नये ही प्रभूची इच्छा. त्याला मी कशी जबाबदार?
तरी देखील ही अपराधीपणाची बोच बाजूला ठेवून आणि जनहित मनाशी धरून त्याच्या शरीराची विल्हेवाट लावण्याअगोदर त्याच्या मेंदूतील माहिती आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मिळवण्याचा मी अखेरचा प्रयत्न लवकरच करणार आहे. परंतु त्यातही किती यश येईल हे पुन्हा त्या प्रभूवरच अवलंबून. मी माझा निष्पापपणा सिद्ध करण्यासाठी ह्याचा मृत्यू झाल्याझाल्या लगेच त्याची जागा दुसऱ्या कोणालाही घेऊ दिलेली नाही. उगाच न्यायदेवतेला शंका नको की, मी हे सगळे अतिशय पद्धतशीररीत्या आखणी करून केले. आता जागा घेण्यासाठी नवीन कोणी आणण्याइतकी माझी आर्थिक परिस्थितीच नाही ही बाब अलाहिदा. पण प्रयत्न चालू आहे. त्याच्या नसण्याने माझ्याव्यतिरिक्त बाकी जगाचेच अधिक नुकसान झाले आहे हे आता मला जरा उशिरा कळले आहे. त्यामुळे पुढच्या खेपेस असे काही करण्याआधी सर्व जगाला आधी कळवण्याची तसदी मी नक्कीच घेईन. म्हणजे माझ्या ब्लॉगवर माझे हे असे आत्मघातकी विचार मी टाकेन किंवा फेसबुकवर माझ्या स्टेटस मध्ये देखील मी जगजाहीर करेन. पण ह्या खेपेला मी असे काही केले नाही ह्याबद्दल क्षमस्व.

अहो, काय? मनात कसली शंका आणताय?? माझा मोबाईल फोन कमोडमध्ये पडला आणि मी त्यावर फ्लश करून त्याला त्या अर्धमेल्या अवथेत कमीतकमी १५ मिनिटे तरंगत ठेवून दिले. ह्याला कारण इतकेच की तो पडलेला मला कळलेच नाही! आणि मग त्याने फक्त १ दिवस तग धरला आणि मग परवा त्याने अखेर जगाचा निरोप घेतलेला आहे.

तुम्हांला काय वाटलं?
कमालच करता हो तुम्ही!
;)

12 comments:

भानस said...

हा हा... सकाळी तसा आणि आता झोपताना असा ठोका चुकवण्याच्या अपराधाचा दंड भरावा लागणार आहे तुला. :D

Anagha said...

अगं भाग्यश्री, मला वाटतं माझ्या डोक्याचा काटा ना थोडा निखळलाय. त्यामुळे तो मी जसं डोकं हलवेन तसा हलतो!! कधी वर तर कधी एकदम खाली!! काही कालावधी जाणार बहुतेक ठीक करण्यात! माफी गं त्याबद्दल! :)

सौरभ said...

(हळूच खुसफुस) ओय्य... शुकशुक... मडर होया? वांदा नय. बाव्डी की विल्हेवाट लगानेमे अपन हेल्प करेंगा. आजकल ऐसे गयेले बाव्डकी भी किमत मिल्ती है ग्रे-मार्केटमें. बौलेतो ५०% अप्ना... ;) :D

Raindrop said...

and plz do let the world know that this is the second phone that has been graced with this heavenly treatment ....as they slowly slipped out of your jeans pocket into the whirlpool of a commode!

Anagha said...

सौरभ!!! खो खो हसत सुटले मी!!! अरे, माझ्या मोबाईलची इतकी वाईट अवस्था झालेली आहे कि त्या ग्रे मार्केट मध्ये देखील कोणी त्याला उभा करणार नाही!! आणि बाय द वे ही 'भाई' भाषा कुठे शिकलात आपण?? एकदम Ph.D.मिळवलेय तुम्ही त्यात!! :D :D :D

Anagha said...

वंदू!! तिसरी वेळ आहे गं ही!! :) बघ किती प्रामाणिक आहे मी!! ह्या प्रामाणिकपणाबद्द्ल बक्षीस म्हणून तुम्ही जरा वर्गणी गोळा करून मला नवीन मोबाईल भेट देता का? कशी आहे कल्पना? दारावर गणपतीची वर्गणी गोळा करायला लोकं यायला सुरुवात झालेली आहे. त्यावरून ही कल्पना सुचलीय!! बघा, एखादी मिटिंग भरावा आणि ठरवा. लवकर निर्णय घ्या मात्र! तुमची किती अडचण होतेय! म्हणून म्हटलं! ;) :D

Shriraj said...

:D अनघा, तू पण ना!!! जाम हसलो गं मी... माझा मित्र मला शंकेच्या नजरेने बघत होता. त्याला वाटलं असेल - हा वेडा-बिडा झाला की काय!!!!

vaibhav_sadakal said...

जाहित कबुली दिली म्हणजे तुमचा प्रामाणिक पणा समजला बरं पण बिच्चारा मोबाईल जीवाणीशी गेला हो......

सौरभ said...

आ... भाय बोले तो एकदम ढासू भाय. अभीच बन्या. रिसेन्ट्ली. वो मोहल्लेका सारा छोक्रीलोग जमा होया था. रक्षाबंधनके दिन. ऑप्शन दिया. चुडी पैनेगा के राखी? राखी सावंत के नामपे मै राखी बोला. तबसे अपन मोहल्ले का भाय और चंटरपंटर लोगोका दादा... :D :P

Anagha said...

सौरभ, तू मला हसवल्याशिवाय सोडणारच नाही असं ठरवंलयस काय??!! :D :D मज्जा येते मला तुझ्या ह्या एकेक प्रतिक्रिया वाचून!! मी असते कुठेतरी भलत्याच विश्वात आणि हे तुझं असं काहीतरी हसवणारं वाचते आणि मग कितीतरी वेळ हसत बसते!!!

Anagha said...

वैभव, त्याचीच चुकी नाही काय? मागचापुढचा विचार न करता एकदम सूर मारला तो त्याने!!! आता त्याच्या चुकीचे परिणाम मी भोगतेय! :( :D

vaibhav_sadakal said...

हो बिचाराच म्हणावा लागेल सुर मारला तो पण कमोड मद्धे दुसरी जागाच मिळाली नाही त्याला........