नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 7 June 2010

गळका घडा

तर नळ थोडा उघडण्यात आलाय. सध्या धार कमी आहे. पण आज ना उद्या नक्की जोरदार वेगाने तो चालू करण्यात येईल...मग खाली जमिनीवर जागोजागी खाचाखोचा तुडुंब भरतील. सगळीकडे पाणीपाणी होईल. आणि तरीही तो नळ बंद होणार नाही. तो बंद करणे तसेही आपल्या हातात नाही. त्याला जेंव्हा वाटेल तेंव्हा तो नळ बंद करेल आणि निघून जाईल. अगदी घट्ट. आपण जसा अर्धवट चालूच ठेवतो तसं तो करण्याची सुतराम शक्यता नाही.

डोंबिवलीत पाच वर्ष अगदी चमच्या चमच्याने औषधासारखं, औषधापुरतं पाणी वापरलंय आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत भांडी भरून नेलीत. वाटी पेला भरून ठेवलाय. तेंव्हा खूप वाटायचं की माणसालादेखील उंटासारखी सोय असती तर बरं झालं असतं.

कधी नव्हे ते दूरदृष्टीने, म्युन्सिपल कॉर्पोरेशनने आता नवीन बांधकामांना, स्वतःचे पाणी स्वतः जमवण्याची, तरतूद करण्यास भाग पाडले आहे. तसा त्यांनी नियमच केलेला आहे. त्याशिवाय बांधकामांना परवानगी मिळणार नाही. ज्यांचे बांधकाम अर्धे झाले आहे त्यांना देखील हे बंधनकारक आहे.

महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडतो हे कोणी आपल्याला सांगायची गरज नाही. आपण आणि आपल्या शहराने भरून ठेवलेलं पाणी, पुन्हा त्या वरच्या नळाचे पाणी सुरु होईस्तोवर संपून जातं. मग पुन्हा आपली बोंब.

पाणी अडवा, पाणी जिरवा...रेन वॉटर हार्वेस्टिंग....करू शकतो का आपण?

ऐकिवात आहे की सचिन तेंडूलकरने, स्वतःच्या वांद्रे येथील बंगल्याच्या अंगणात, सुयोग्य भोके असलेल्या सिमेंटच्या विटा बसवल्यात, पाणी जिरवण्यासाठी.

मला वाटतं, घरातील भांडी भरत बसण्यापेक्षा, घराबाहेरचं एकच मोठं भांडं भरून ठेवणं हे कधीही शहाण्याचं काम होईल.

No comments: